मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चैत्रोत्सव!

स्वाती दिनेश · · पाककृती
Taxonomy upgrade extras
वसंत आल्याची वर्दी कोकिळकुहुने दिली आहेच.मिपावरही 'एप्रिलफळे' आणि 'लोणची' तेच सर्वांना सांगत आहेत. घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.असा चैत्रोत्सव साजरा होत असताना आंबे पिकल्याची चाहूल लागेल आणि मग आमरसपुरीच्या मेजवान्या झडतील. ह्या स्मरणरंजनात मग्न असतानाच लक्षात आले ,इथे सातासमुद्रापार मी आणि माझ्यासारखेच अनेक सुह्रद ह्यातल्या अनेक गोष्टी 'मिस' करत आहेत,असे असायचेच..त्याबद्दल तक्रार नाही पण मग वाटले 'आंब्याची डाळ' तरी मिपावर करुया...
आंब्याची डाळ
साहित्य- २वाट्या चण्याची डाळ, पाव ते अर्धी वाटीच्या मध्ये कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी जास्त करणे), ६/७हिरव्या मिरच्या,ओले खोबरे,कोथिंबिर,फोडणीचे साहित्य,तेल,मीठ,साखर कृती- चण्याची डाळ ४/५ तास भिजत घालावी.रोळीत उपसून घावी आणि पाणी पूर्ण निथळू द्यावे.डाळ मिक्सरवर थोडी भरडच वाटावी, वाटताना त्यात मिरच्याही घालाव्यात. ही वाटलेली डाळ+मिरच्या,कैरीचा कीस एकत्र करून त्यात ओले खोबरे,कोथिंबिर,चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालावी.तेलाची खमंग फोडणी करावी व ही फोडणी त्या मिश्रणावर ओतावी.चांगले कालवावे. सर्व्ह करताना खोबरे व कोथिंबिर वरुन घालून सजवावी. कैरी न मिळाल्यास लिंबू किवा आमचूर वापरू शकतो पण अर्थात ते आपले दुधाची तहान ताकावर..

वाचन 8271 प्रतिक्रिया 0