अरे तुझी टोपी : अरुण कोलटकरांच्या कवितेचं रसग्रहण
लेखनप्रकार
प्रथम वाचनात खालील कविता अगम्य वाटते. पण नीट अर्थ लावल्यास कवीला काय म्हणायचंय हे नुसतंच स्पष्ट होत नाही, तर आतमध्ये कुठे तरी लागतं
अरे तुझी टोपी
तुझी टोपी गेली खड्ड्यात
कपाळ पहिलं सांभाळ
काय डेंजर वारा सुटलाय
डोसक्यात कचरा
धूळ धूळ डोक्यात
साहेबाची खिडकी फुटली
गादीवर काचा काचा
आपोआप गुंडाळतोय
पंजाब्याचा गालिचा
पार्शिणीचा फ्लावरपाट
गडाबडा लोळतोय
सिंधीणीच्या दांडीवरली
म्हागडी नायलॉन साडी
चालली वार्यावर हवाई झाज
नवव्या मजल्यावरल्या
बंगाल्याचा लेंगा लगेच
लागला तिच्या पाठी
खापरांना फेफरं भरलं
फडफड करतायत पाखरांसारखी
कुलकर्ण्याच्या भिंतीवरल्या
डिगर्या ठिकर्या फरशीवरती
नार्या नार्या तुझा बाप
सटकला की फोटोमधनं
मैदानावर जिकडंतिकडं
एसेस्सीचे पेपर
धावत्या मर्जीडीझवर
कडकडकडाट झाड पडलं
प्रोफेसरसाहेब तुमची
कविता गेली उडत
पळा पेंटर
र्हाऊदे रंगाचं डबडं
झ्यायरातपत्रा खडखड करतोय
तुम्हीच रंगविलेली पंचवीस फुटी हेलन
तुमच्या बोकांडी बसणाराय
ढेंगात मानगूट पकडणाराय
मास्तर मास्तर बघा कसा
हिसडे मारतोय भिंतीवरती
भारताचा नकाशा
गेला उडत खिडकीबाहेर
डोंगरांसकट नद्यांसकट खुंटीसकट
गेला सरळ आकाशात
------------------------
अरे तुझी टोपी
तुझी टोपी गेली खड्ड्यात
कपाळ पहिलं सांभाळ
मला असं वाटतं की बाजूला चालू असलेल्या चर्चेशी या कवितेचा घनिष्ठ संबंध आहे. आपलं कपाळ फुटत असताना, दर्शनी टोप्या सांभाळण्याचा प्रयत्न चालू आहे. लोकं, लहान मुलं - कुपोषण, हगवण, मलेरिया, प्रसुतीसुविधांचा अभाव, अस्वच्छता, गढूळ पाणी यामुळे दशलक्षांनी दरवर्षी मरतात. शिक्षणाचा अभाव, गरीबी आणि भ्रष्टाचारामुळे कित्येक कोटी 'कुणी दाबुनी जखम आजची, जरा उद्याचा काढावा पू' (आयला पुन्हा मर्ढेकरच) करत जगतात. हे सगळं भारतात होतं.
आणि इंडियातले विचारवंत
डोसक्यात कचरा
धूळ धूळ डोक्यात
घालून लोकशाहीची टोपी सांभाळत बसतात. राजकारण्यांच्या सर्कशीकडे मंत्रमुग्ध होऊन पाहात राहातात. आणि ही खेळी चुकीची ,हे नियमाप्रमाणे नाही यातला कोणाचा कौल बरोबर यावर जणु काही थर्ड अंपायर असल्याप्रमाणे भांडतात.
या दु:खातून, गरीबीतून अशांततेचं, असंतोषाचं वादळ निर्माण झालंय. सगळीकडे हे वादळ सुटलंय, आणि त्यात सगळेच सापडले आहेत. वादळाला भारत, इंडिया असले भेद माहीत नाहीत. ते सर्वभक्षी आहे - पंजाब, सिंध, मराठा, बांग्ला सगळे त्याच्या कचाट्यात सापडतात. त्यात साहेबाच्या खिडकीचा - उधार घेतलेल्या दृष्टीकोनाच्या ठिकऱ्या उडतात. पायाखालची जमीन (गालिचा) सरकते. शिक्षणाच्या चिंधड्या उडाल्या - कारण सुशिक्षितांच्या घोकंपट्टीचा काही उपयोग नाही. आपल्या पूर्वजांचे जुने पुराणे विचार चौकटीतून नष्ट होतात (फोटोमधून निसटले). या वादळात प्रोफेसरांचं उच्चभ्रू गुलगुलीत काव्य काय किंवा तीच ती हेलन रंगवणारी षंढ कला काय, सगळ्या उडून जाणार. कशाला काही अर्थ नाही, किंमत नाही. यात टिकून राहील असं काय आहे? नीतीमत्ता? ती लेंगे साड्यांसारखी उडून जाणार. कृत्रिम सौंदर्य? ते फ्लॉवरपॉटसारखं घरंगळून जाणार. शाश्वत काय आहे? शेवटी "अशाश्वताच्या वादळामध्ये शाश्वताचीही उडेल टोपी..."
आपल्याला आज वादळाच्या खुणा दिसत आहेत. पण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणून ते दाखवून देण्याची कवीवर पाळी येते. आणि हे वादळ हाताबाहेर गेलं तर सगळा भारत देशच तो ज्या तत्त्वांच्या खुंटीवर टांगला आहे त्यासकट उडून जाईल... तेव्हा वादळ थांबवा, टोप्या नंतर ठीकठाक करा असा कवीचा रोख वाटतो. वादळ थांबवणं सोपं नाही. पण नुसताच डोक्यात कचरा भरून टोप्या सांभाळणं हे त्यावर उत्तर नाही.
वाचन
10276
प्रतिक्रिया
0