मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बतावणी!

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
स्थ्ळ - वैकुंठ शीन - हातात 'मादक आणी जहाल'चा मग सहजच घेऊन महालात श्री विष्णू पहुडले आहेत ६० इंची एल्सीडीवर प्रोग्रॅम सुरु आहे जोरजोरात हसण्याचे आवाज येताहेत! (महालात प्रवेश करत) नारद : "नारायण, नारायण!" विष्णूंचं लक्ष नाही असं पाहून पुन्हा एकदा मोठ्याने "नाऽऽरायण! नाऽऽरायण!!" टीवीवरची नजर ढळू न देता विष्णू एका हातानेच थांबायची खूण करतात! एवढ्यात कार्यक्रमाचे प्रायोजक 'मिपाकर स्वयंभोचक संघाची' अ‍ॅड सुरु होते आणी विष्णू टीवी म्यूट करतात. "हा हा हा! मेलो मेलो!! कॉकटेल उडाली ..ठ्यॉ!! बसा बसा मुनिवर!!" "काय हे देवा? एवढे का हसताय?" हसून हसून डोळ्यातून येणारे पाणी पुसत "अहो मुनिवर हसू नको तर काय करु, आजपासून "डॉक्टर आणी कंपाउंडर" ही मालिका सुरु झाली! अहो काय सांगू हसून मेलो! बसा त्या काऊचवर, तुम्हीही बघा! काय ते काळू-बाळू वग फुलवतात!!" "घ्या!" खार्‍या काजूंची बशी समोर करत विष्णू म्हणतात! टाळी वाजवून "कोण आहे रे तिकडे, एक लार्ज भरा मुनींसाठी!" सिंहासनाकडे जाणार्‍या मुनिंना विष्णू सांगतात : " अं हं तिकडे नाही मुनिवर इकडे, इकडे ह्या काऊचवर! 'ते सिंहासन' आता कंडम झालं!" नारद : "काऊच? हा काय प्रकार आहे?" विष्णू : "अहो ज्यावर बसून बसून तुम्ही सुदृढ होत जाता आणी मग उठताना गुढघेदुखीने "आउच" असा आवाज येतो ना त्याला काऊच म्हणतात! असो विनोद सोडा. हा आमच्या दुबईच्या शेखकाकांनी भेट पाठवलाय ह्या रमजानला!" नारद डोळे मोठ्ठे करत : " आं..रमजान!?" विष्णू : "मुनिवर, अहो सर्वधर्मसमभाव नको का? मग काय बिघडलं ही भेट घेतली तर?" काऊचवर बसत कोपर्‍यात वेटोळे करुन पडलेल्या शेषाकडे बोट करुन मुनिवर : "आणी हे काय? हा शेष असा का पडलाय? आणी तुम्ही ह्या गादीवर का पहुडलाय?" "हां हां, तो शेष ना? आता तो 'नि:शेष' झालाय! शूऽऽ शूऽऽ गादी नाही म्हणायचं ह्याला 'स्लीपिंग सिटिम' आहे ही!!" "काय? कसली सिस्टिम?" "स्लीपिंग सिस्टिम! स्लीपिंग सिस्टिम! 'स्लीपिंग ब्यूटी' माहीते ना तुम्हाला? तशीच 'स्लीपिंग सिस्टिम!"" "आता हे काय नवीन खूळ देवा!" "अहो मुनिवर अगदीच कसे हो तुम्ही भोट्म? अहो ते भूतलावरचं मल्टीलेवल मार्केटिंग ऐ़कून आहात ना, ते एकेक लेवल पार करत थेट स्वर्गात पोचलं आणि मग मला ही सिस्टिम मिळाली! काय मऊ आहे म्हणून सांगू, कित्येक युगात असली गाढ झोप लागली नव्हती!!" "ही घेतलीत कुणाकडून पण?" "हॅ हॅ हॅ! आमच्या गरुडानंच घेतलीन एजन्सी! आपल्या आपल्यातच करायचं असतं म्हणे ते मार्केटींग!!" एवढ्यात चोचीत एक सीडी घेऊन गरुड येतो. ब्लू रे प्लेअरमध्ये सीडी टाकतो. नारद : "हे काय आहे गरुडा?" "ती मार्केटिंगची अ‍ॅड. सीडी बघा. थक्क व्हाल आणी ह्या स्लीपिंग सिस्टिमवर पडाल!" एवढ्यात पलीकडून पावलांची चाहूल येते, तसा गरुड डिवीडी प्लेअर बंद करतो. लक्ष्मी : "अय्या, मुनिवर तुम्ही कधी आलात?" नारद : " मला येऊन बराच समय झाला देवी!" "हो का! अग्गोबाई माझं लक्षच गेलं नाही. ह्यांच्यासाठी मिरची भजीची नवीन पाकृ ट्राय करत होते ना!" नारद : "अरे वा! मग आम्हालाही एक प्लेट येऊद्याकी!" टीपॉयवर पडलेली वेगवेगळ्या पोझमधल्या मादक ललनांची रेखाचित्रे बघत लक्ष्मी : "अग्गोबाई! ही कसली चित्रं? ही कुणी काढली? आणी इथे कशी?" विष्णूंकडे डोळे मोठे करुन! गडबडीने विष्णू : "हां हां ते ना, अगं आपले दंतवैद्य कडमडकर नाहीत का ते एक गुणी बाळ आहे! कलाकार माणूस आहे. परवाच्या पृथ्वीभेटीत त्यानं सहज म्हणून रेखाटलीन म्हणे. माझी दाढ भरायला गेलो होतो तेव्हा दाखवलीन मला चित्रं, म्हटलं असूदेत काही दिवस जरा विरंगुळा!!" लक्ष्मी " हुं! कलाकार म्हणे! असेनाका तुम्हाला कशाला हवीत असली चित्रं? काहीतरी चाळे मेले!!" आता वाद उफाळून येणार असं दिसताच साळसूदपणे विष्णू : "पण मुनिवर तुम्ही आज अंमळ गंभीर दिसताहात! काय झालं तरी काय?" एक मोठ्ठा सुस्कारा टाकत नारद : "ह्म्म्म्म्...काय सांगायचं देवा! पृथ्वीवरच्या पुरुषांवर मोठा अवघड प्रसंग ओढवणार आहे लवकरच." "का काय झालं?" "अहो देवा पूर्वी हुंडाबळी जात असे ऐकून आहात ना? आता बायकांना म्हणे ४९८ की काय असे कुठलेसे कलम मिळाले आहे म्हणे त्यामुळे सगळ्या नवर्‍यांची पाचावर धारण आहे!" लक्ष्मी घाईघाईने : "खरं की काय? काय आहे हो कलम मुनिवर?" विष्णू : "आं .....??" नारद : "ह्या कलमाने एका सेकंदात नवर्‍याशी संबंध कलम केले जातात! आणि त्याला कायमचे वेठबिगारीच्या गर्तेत लोटून दिले जाऊ शकते. ह्या कलमाने समस्त स्त्री जातीच्या हातात एक विघातक अस्त्र मिळाले आहे! हा काय आत्ताच मी "तप्तपदी घटस्फोट मंडळा"च्या कार्यालयातूनच येतोय. हुतुतु म्हणून कोणी महान विद्वान आहेत त्यांनी सुरु केलंय म्हणे हे कार्यालय! भली मोठी रांग तर दिसत होती त्रस्त पुरुषांची बाहेर!" विष्णू कावराबावरा चेहेरा करत : "हं आहे खरा गंभीर मामला!" लक्ष्मी आनंदित होत : " बरं झालं. असं काहीतरी आहे हे तरी समजलं. चला आत्ता जातेच लगोलग आणी आणते सगळी माहिती!" लगबगीने आत आते. नारदाच्या कानाशी लागत विष्णू : "मुनिवर अहो हा काय प्रकार आहे? ह्यातून तोडगा कसा काढायचा?" नारद : " हॅ हॅ हॅ! आलात की नाही शरण? अहो सोप्पं आहे! तुम्ही लेको ते एकपत्नीव्रत वगैरे खुळं डोक्यात घेउन बसता आणी सगळे लोचे होतात!" विष्णू : "मग, आम्ही करावं तरी काय?" नारद : " देवा, अहो दिसली जरा छान बाई की 'हिच्यावर आमचा फार जीव!' असं म्हणायचं. चार चार बायका करुन आणायच्या! सवती मत्सराने त्यांना दिवसरात्र काही सुचेनासे होते. सगळ्याच एकमेकींचा विचार करत बसतात आणी आपली मज्जाच मज्जा! कसलं कलम ४९८ अन कसलं काय, द्या टाळी!!" विष्णू : "माताय! हे मला सुचलंच नव्हतं!! बरं झालं आयडिया दिलीत!! आपण ह्याला कलम ४२० म्हणूयात!!!" दोघेही मोठ्याने हसतात!! एवढ्यात लक्ष्मी येते आहे असं बघून नारद काऊच वरुन उठत म्हणतात "बरंय तर देवा काळजी घ्या! प्रणाम देवी तुम्हीही काळजी घ्या. मी निघतो आता!" पायात चपला सरकवत निघतात. विष्णू आणी लक्ष्मी एकदम : "आं..हे काय चपला? खडावा कुठे आहेत?" नारद : "नाही हल्ली मी गोंडेदार कोल्हापुरीच घालून जातो सगळीकडे, बर्‍या पडतात! चला निघतो. नारायण! नारायण!"

वाचन 8609 प्रतिक्रिया 0