मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पारध झालेला तो पारधी

प्रसन्न केसकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
* हे सर्व अनुभव मी स्वतः सोळा वर्षांपुर्वी घेतलेले आहेत. परंतु ते कुठेच शब्दबद्ध केलेले नव्हते. केवळ आठवणीच्या आधारे लिहिताना काही गोष्टींचा थोडाफार विपर्यास होऊ शकतो यासाठी हे लिखाण कथा या सदराखाली केले आहे. १९९३ च्या जुनचा तो बहुधा दुसरा आठवडा असेल. एके दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रेसनोट मधे एका बारामतीला दोन दिवसाआधी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची माहीती होती. चोरी हा तसा पुण्यासारख्या शहरात नेहमी घडणारा गुन्हा. रोज एव्हढ्या चोर्‍या शहरात होतात की तेव्हाच आम्ही पत्रकारांनी अलिखित नियम केला होता की किमान दहा पंधरा हजाराचा माल गेलेला नसेल तर चोर्‍यांच्या बातम्या द्यायच्याच नाहीत. पण सहज नजर फिरवली अन त्या गुन्ह्याचे वेगळेपण जाणवले. प्रेसनोटमधे आरोपीचे नाव लिहिले होते पिन्या हरी काळे (मयत). नावावरुनच कळत होते की पिन्या पारधी जमातीचा होता. ही जमात तशी शूर पण १८७१च्या क्रिमीनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट ने तिच्यावर गुन्हेगारी जमातीचा शिक्का मारला अन संपुर्ण जमात सेटलमेंट नावाच्या तुरुंगांमधे बंदीवान झाली. ब्रिटीशांच्या 'अक्कलहुशारीमुळे' अश्या अनेक "गुन्हेगारी जमाती" तयार झाल्या होत्या. त्यातले लोक सेटलमेंट नावाच्या तुरुंगातच जन्मायचे, तिथेच जगायचे अन तिथेच मरायचे. १९५२ मधे भारत सरकारने या जमातींना क्रिमिनल ट्राईब म्हणणे बंद केले अन विमुक्त असे नवे नाव दिले. पण त्या आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्याच राहिल्या. त्यातलीच ही एक - समाजाने नाकारलेल्या, पोलिसांच्या अरेरावीला बळी पडणार्‍या लोकांचा गट. अश्या लोकांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना आल्या पण सर्व फसल्या. त्यांच्या नशीबी गुन्हेगाराचेच जिणे लिहिले होते या समाजाने अन त्याने निर्माण केलेल्या निर्दय व्यवस्थेने. प्रश्न पडला की चोर मयत कसा झाला म्हणुन चौकशी केली तर कळले की ७ जुनला चोरी झाल्यावर काही वेळातच त्याला पोलिसांनी पकडले होते अन रात्रभर पोलिस स्टेशन मधे त्याच्याकडे तपास केला होता. दुसर्‍या दिवशी म्हणे त्याला पोलिसांनी त्याच्या घरी नेले अन घरझडती घेतली. झडती संपत आली तेव्हा म्हणे पिन्या पळाला अन पाठलाग सुरु झाला. एका शेतातुन पळता पळता पिन्या म्हणे कश्यालातरी अडखळून पडला अन जागीच मेला. ही माहीती मी घेईपर्यंत त्याचे अंत्यसंस्कारही झाले होते (पारधी मृतांना पुरतात). पोलिसांनी सांगितलेल्या 'स्टोरीत' बरीच लूपहोल्स वाटत होती. विचार केला बारामतीला जावुन याबाबत सखोल चौकशी केली पाहीजे पण इतर कामे, कंटाळा यात दोन तीन दिवस गेले. दरम्यान हा विषय डीएनटी-रॅग या भटक्या विमुक्तांसाठी काम करणार्‍या संस्थेने अन पारधी महासंघाने मुंबईत लावुन धरला होता. त्यावेळी नागीन काळे नावाची या समाजाची एक तरुणी फौजदार झाल्यामुळे पारधी समाजाबद्दल बरीच उत्सुकताही वाढली होती. नंतर कळले ११जुनला पारधी समाजाचे लोक बारामतीला या विषयावर आंदोलन करणार आहेत अन लगबगीने मी बारामतीत डेरेदाखल झालो. मदतीला होते तेथिल एक मुक्त पत्रकार्-कार्यकर्ते अविनाश गायकवाड अन पारधी समाजातील माझा खबर्‍या चिंध्या (हे त्याचे खरे नाव नाही. खरे नाव जाहीर करण्याने त्याच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणुन दिले नाही.) हा माझा पारधी जमातीशी जवळुन आलेला पहिला संबंध. त्या दिवशी बारामतीत जवळपास हजारभर पारधी कुटुंबे आली होती. नगर, सातारा, सोलापुर, सांगली सारखे जिल्हे; मराठवाडा अश्या दुरदूरच्या ठिकाणांहुन ते लोक आले होते. पण निदर्शने शांततेत पार पडली. प्रसिद्ध लेखक लक्ष्मणराव गायकवाड यांचे नेतॄत्व होते. त्यावेळी अनेक पारध्यांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या अन बरीच माहीती मिळाली. "सगळ्यांना वाटते सगळे पारधी एक. पण तसे नाही. आमच्यात आठ जाती आहेत - राज पारधी, फांसेपारधी,लंगोटी पारधी, चिता पारधी, पाल पारधी गाव पारधी अश्या. आमच्या जातीला खूप मोठा इतिहार आहे. आमचे पुर्वज राणा प्रतापाच्या सैन्यात होते. राणा प्रताप जिंकल्याशिवाय गावात परतणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली अन जंगलात रहायला गेले. युद्ध संपले पण त्यांनी प्रतिज्ञा मोडली नाही. आमचा समाज जंगलातच राहीला, शिकार करत. पण नंतर गोरा साहेब आला. त्याला भीती की आम्ही बंड करु म्हणुन त्याने आम्हाला चोर ठरवलं. आपले गावातले लोक पण त्यांना भुलले आणि आम्हाला गावकुसाबाहेर काढले. शिकारीवर पण बंदी आली. आम्हाला ना कधी शिकायला मिळाले ना पैसा कसा कमवायचा ते कळले. मग जगायला आम्ही तरी काय करणार? काही लोक लागले दारु गाळणे, चोर्‍या असे धंदे करायला. नेहरु, विनोबा भावे, जयप्रकाश असे थोडे पुढारी आमचा विचार करायचे. त्यांनी लोकांना सांगीतले तुमच्याकडे एव्हढी जमीन आहे थोडी या लोकांना द्या. त्यांना जगु दे. घरे बांधु दे. पण चांगली जमीन कोण सोडणार? लोकांनी सरकारला दिली खडकाळ पडीक जमीन. ती आमच्यातल्या काहीना मिळाली पण एकतर ती जमीन नापिक अन त्यात आम्हाला शेती कशी करायची माहीती नाही. ती राहीली तशीच पडुन, गावात चरायला लोक ती वापरतात अन शहरात तर बिल्डरांनी तिथे इमारती बांधल्यात. आम्ही होतो तिथेच राहीलोय," चिंध्या मला सांगत होता. भूदान, सर्वोदय या चळवळी का अन कश्या फसल्या याचा जणु तो लेखाजोखाच होता. इथे जरी मी हे सगळे मराठीत लिहिले असले तरी त्याची भाषाही वेगळीच होती. नंतर पुण्यात परतल्यावर चौकशी केली तेव्हा कळले की पारधी लोक हिन्दी, गुजराथी, मारवाडी, मराठी अश्या अनेक भाषांची सरमिसळ करुन तयार झालेली वेगळीच भाषा बोलतात. फक्त भाषाच नाही तर त्यांची संपुर्ण संस्कृतीच वेगळी आहे. पारधी पुरुषांचा पारंपारिक पोषाख मुंडासे अन लंगोट असा असतो तर बायका घागरा चोळी, गुजराथी पद्धतीची साडी नेसतात. तरुण मुली परकर पोलके घालतात अन मुले हाफचड्ड्या. हल्ली पारधी तरुण पॅन्ट्-शर्ट घालतात तर बायका नायलॉनच्या साड्या नेसतात. या समाजाचे देव पण वेगळे. ते देव म्हणजे वेगवेगळ्या अप्सरा, यक्ष, नैसर्गिक शक्तीची प्रतिके असतात. काही देव माणसांचे मित्र तर काही शत्रु असतात. त्यांना ते धानी, जारण अश्या नावांनी संबोधतात अन त्यांना जनावरांचे, पक्षांचे बळी देतात. त्यांची नावेपण वेगळी - चॉकलेट्या, फौजदार्‍या, बिबळी अशी. पारधी कोणताही आवडलेला शब्द मुलांचे नाव म्हणुन वापरतात. साधारणतः पारध्यांची राहणी अस्वच्छ म्हणण्यासारखी. आंघोळ नियमीत नसल्याने अनेकांच्या अंगाला वास येतो अन दात न घासल्याने ते किडलेले असतात. पारधी बायका तश्या रुपवान - काळ्यासावळ्याच पण देखण्या, बांधेसुध अन त्यांचे डोळेपण पाणीदार टप्पोरे असतात. पण बहुधा त्या पण अस्वच्छ रहातात, अनेकदा फण्या कंगवे विकणार्‍या या बायकांचे स्वतःचे केस मात्र विस्कटलेले असतात अन कपडे मळलेले. हे सर्व त्या बहुधा शीलरक्षणार्थ करत असाव्यात. तश्या त्या दिसायला देखण्या असल्याने अनेकदा टोळभैरव त्यांच्याकडे आकर्षित होतात. विरोध करण्याची शक्ती नाही अन समाजातुन कुठल्याच प्रकारचा पाठिंबाही नाही अशा परिस्थितीमुळे बहुधा त्यांची राहणी अशी असावी. तोवर तिथे फलटणहुन आलेली चलाखी आम्हाला सामील झाली होती. चलाखी चिंध्याची मेहुणी. ती म्हणाली, "मुळात आम्ही बंडखोर असल्याने कायदे मोडणे, गुन्हे करणे अनेकदा आमच्या समाजात प्रतिष्ठेचे मानले जाते. मुलगा चोरी करतो तेव्हाच तो वयात आला असे समजतात अनेक जण. जर गुन्हा केला नाही तर त्याच्याशी सोयरीक होत नाही. शिवाय आमच्यात लग्न करायला मुलगी तिच्या आईबापाला लिलावात पैसे देवुन विकत घ्यावी लागते. त्याला द्याज म्हणतात. वर लग्न झाले अन त्या बाईला दिलेल्या द्याजापेक्षा जास्त पैसे देणारा कोण भेटला तर ते पैसे घेऊन तिला सोडुन द्यावे लागते. त्यामुळे नाईलाजाने मुले गुन्हे करतात. ते गुन्हे पारध्याने केले ते कळावे म्हणुन पुर्वी विशिष्ठ खुणा करत - जसे दरोडा टाकताना त्या घरात जेवण करणे, तिथे नैसर्गिक विधी करणे. अनेकदा बलात्कार पण करायचे. पण आता ते सगळे कमी होते आहे. आमच्या लोकांना पण यातुन बाहेर यायचे आहे." पण मग ते गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रतिबंध का करत नाहीत? तसे विचारले तर चलाखी एकदम संतापली. "तुम्ही मग आम्हाला जगु द्याल? बर्‍याचदा आमचे लोक गुन्हे करतात पण त्यांना गुन्हे करायला लावतात ते पारधी नसतात. ते तर गावातले मोठे लोक असतात. ही एकोणिस वर्षाची लवणी बघा. आमच्या पलिकडच्याच गावात असते. पाच वर्षांपुर्वी तिच्यावर त्या गावातल्या पाटलाची नजर पडली अन त्यानं तिला नासवली. मग त्यानं त्याच्या माळावर पालं टाकु दिली आमच्या लोकांना. चांगले पन्नास साठ लोक आहेत. सगळ्या बायका दारु गाळतात अन पुरुष चोर्‍या करतात. चोरीचा माल पाटलाला देतात. पाटील तो माल विकतो अन त्यांना धान्य वगैरे देतो. शिवाय पोलिसांनी पकडले तर कोर्टाचा खर्च पण करतो. अन ती बघा रखमा. ती सांगली साईडची आहे. तिच्या मुलानं मालकाला चोरी करायला नाही म्हणलं तर तिच्यावर चोरीचा आळ घातला अन गावातुन नागव्याने धिंड काढली. नंतर फौजदाराला सांगुन अटक पण करायला लावली. आणि अडवणार कोण? अजुन पण आमच्यात लोक एव्हढे नाही सुधारले. होतीय सुधारणा पण हळुहळु. तुमच्यात पैसे, शिक्षण सगळे असुन सुधारणा व्हायला किती वेळ लागला?" चलाखी पुढे म्हणाली, "अन आमच्यात सुधारणा होण्याला सगळ्यांचाच विरोध आहे. कुठलाही पारधी बघा, कपड्यापासुन सगळ्या गोष्टींच्या पावत्या कायम जवळ बाळगतो. तो समोरचा फिरंग्या आहे ना, दोन सालाआड त्यानं एक रेडिओ विकत घेतला, बॅटरीवरचा. तो रस्त्यानं रेडिओ ऐकत चालला होता तर पोलिसानं बघितलं. पारध्याकडची प्रत्येक गोष्ट चोरीचीच असणार या हिशेबानं नेलं त्याला गेटावर अन मार-मार मारलं. त्याच्या रेडीओची पावती जवळ नव्हती. शेवटी एका दुकानात चोरी झाली होती त्या केस मधे टाकला आत. दुसर्‍या पण दहा बारा केस टाकल्या. पोलिसांची कामगिरी झाली, त्यांना बक्षीस मिळाली पण फिरंग्या सहा महिने आत होता, काहीच न करता." पारध्यांच्या चलाख चोर्‍यांचे बरेच किस्से ऐकले होते... पारधी पळता पळता पायाने पाठलाग करणार्‍यांना दगड मारतात असले. विचारले तर चिंध्या म्हणाला, "साहेब ते सगळे जुन्या जमान्यातले. आता आमचे लोक ट्रॅक्सनं लांबवर जाऊन चोर्‍या करतात. ट्रॅक्सपण त्यांच्या मालकांच्याच असतात. एव्हढे पण मागं नाय राहीलो आम्ही." ----- ताजा कलम :- हा सर्व प्रसंग सोळा वर्षापुर्वीचा. त्यानंतर पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेलेय. चिंध्याला दोन मुले अन एक मुलगी होती. या प्रसंगानंतर महिन्यातच चिंध्याची मुलगी मेली अन चिंध्या तिच्या मतिमंद मुलीला त्याच्याकडे घेऊन आला. ती मुलगी वयात आली अन एके दिवशी तिला तिच्याच एका नातेवाईकाने पळवुन नेली अन तिच्यावर बलात्कार केला. चिंध्याने जातपंचायतीत तक्रार केली. पंचायतीने त्या माणसाला एक हजार रुपयांचा दंड केला. नाराज चिंध्याने कायद्यामार्फत न्याय मिळवण्यासाठी फिर्याद केली ती केस बरेच महिने तशीच पेंडिंग राहीली. संतापलेल्या चिंध्याच्या मुलांनी शेवटी त्या माणसाच्या गावी जाऊन त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर काही महिन्यांनी त्या माणसाच्या नातेवाईकांनी चिंध्याच्या मुलांवर हल्ला केला त्यात चिंध्याचा मोठा मुलगा मेला तर धाकट्याच्या मेंदुला गंभीर दुखापत झाल्याने तो कायमचा पांगळा झाला. त्या केसमधेही कुणालाच अटक झाली नाही. आता चिंध्याचे वय सत्तर वर्षे आहे पण अजुन तो एका ठिकाणी वॉचमनची नोकरी करतो. त्याच्या घरात तोच एकटा कमावतो अन कुणीही गुन्हे करत नाही. पण चिंध्याने खबरी म्हणुन काम करणे मात्र सोडुन दिले आहे. पैशाची नड असेल तर ज्यांच्याकरता पुर्वी खबरी म्हणुन काम केले त्यातल्या कुणालातरी भेटायला जातो. तो काही न बोलताच सगळे समजतो आणि शंभर्-दोनशे रुपये चिंध्याच्या हातात ठेवतो.

वाचन 12927 प्रतिक्रिया 0