मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९

धर्मराजमुटके · · काथ्याकूट
नमस्कार ! चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९ च्या नव्या पानावर आपणा सर्वांचे स्वागत ! या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी सारखे सण आपण साजरे करणार आहोत त्यामुळे एकंदरीत महिना आनंदाचा असेल अशी आशा बाळगतो. वैयक्तीक रित्या मला स्वतःला हा महिना नेहमीच त्रासाचा जातो. व्यवसाय करणार्‍याला अनेक जणांना खुश ठेवावे लागते. दिवाळी हा महिना ग्राहकांना भेट देण्याचा महिना असतो. त्यामुळे घरातील खरेदी, ग्राहकांना द्यायच्या भेटींची खरेदी ह्यात आर्थिक नियोजनाचा कस लागतो. बरेचसे ग्राहक कॉर्पोरेट क्षेत्रातील असल्यामुळे देण्यात येणार्‍या भेटवस्तू देखील त्या दर्जाच्या असाव्या लागतात. बर्‍याच उद्योगांच्या पॉलीसीनुसार कर्मचार्‍यांना आपल्या विक्रेत्यांकडून एका ठराविक प्रकारच्या / किमतीच्या वरच्या भेटवस्तू घेता येत नाहीत. बर्‍याचशा उद्योगांनी आपल्या कर्मचार्‍यांना अशा भेटी स्वीकारू नयेत असे धोरण बनविलेले असते मात्र हे सगळे असले तरी भेटवस्तू न देण्याच्या पर्याय अजूनतरी भारतीय विक्रेत्यांना १००% उपलब्ध आहे असे म्हणता येणार नाही. भेटवस्तू स्वीकारणारे देखील उघड अपेक्षा ठेवत नाहीत मात्र दिवाळी आली की मनातून अपेक्षा ही असतेच. हितसबंध जपणे हा भेटवस्तू देण्यामागचा मुळ उद्देश्य असला तरी काही ग्राहक खरोखरीच इतके चांगले असतात की त्यांना भेटवस्तू देता यावी असे व्यावसायिकांना मनापासून वाटते. भेटवस्तू विकत घेताना डोक्याला खुपच ताण द्यावा लागतो. ती वस्तू अगदी हलकी वाटली नाही पाहिजे, अगदी महाग नको, आपल्या खिशालाही परवडली पाहिजे, एकंदरीतच उभयतांना आनंद झाला पाहिजे ह्यासाठी खुपच कसरत करावी लागते. अगदी वर्षभर नियोजन केले तरी शेवटच्या क्षणी मन म्हणेल आणि खिसा होकार देईल अशीच वस्तू खरेदी केली जाते. पुर्वी मिठाई वाटण्याचा प्रघात होता मात्र विषबाधेच्या वाढत्या बातम्या, भेसळ इत्यादींमुळे मिठाईचे मार्केट सध्या कमी झाले आहे.त्याची जागा विविध आकर्षक चॉकलेटसने घेतली आहे. सुंदर सुंदर वेष्टनांत पॅक केलेली चॉकलेटस मनाला भुरळ पाडतात. वेष्टन मोठे आणी आतमधे कमी प्रमाणात माल असलेली चॉकलेटस भेट देणे हाच मला सध्या योग्य पर्याय वाटतो. ग्राहकाला भेट देताना कर्मचार्‍यांना विसरुन चालत नाही. मी प्रथमपासूनच कर्मचार्‍यांना नियुक्त करतांना माझ्याकडे बोनस मिळत नाही हे सांगूनच कामाला ठेवतो त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा निर्माण होत नाही मात्र दिवाळीत भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करतो. मागील काही वर्षांपासून मी स्वतःच १०-१२ वस्तू निवडून एक "गिफ्ट हँपर" बनवतो. त्यातील वस्तू रोजच्या उपयोगातील पण थोड्याश्या 'लक्झरी' वर्गातील असतील अशा असतात. आधी ग्राहक, मग कर्मचारी यांच्यानंतर आई-वडील, बहीण,भाचा, मुलगा आणि बायको आणि यांचा अनुक्रम येतो. त्यांची खरेदी झाल्यावर मग पैसे उरलेच तर स्वतःची दिवाळी असा क्रम असतो. कधीतरी (केवळ) दुसर्‍यांच्या आनंदातच आपला आनंद सामावलेला असतो या उक्तीचा आनंद घेता येतो. मी स्वतःबद्द्ल लिहिले असले तरी थोड्याफार फरकाने प्रत्येक कुटूंबप्रमुखाची हीच कथा असते यात शंका नसावी. धागा चालू घडामोडींचा असला तरी दिवाळी निमित्ते भावनावेगाने फारच अवांतर झाले. आता मुद्यांकडे येऊया.... १. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचे दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. आजपासून त्यांच्या सुनावणी सुरु होतील. २. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल बहुधा आज लागेल. ऐन निवडणूकीच्या वेळेत निकाल लागला तर कोणत्या पक्षाला फायदा आणि कोणाला तोटा होईल हे बघणे रोचक ठरेल. ३. सरकारने कांदा महाग झाल्यामुळे त्याची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांनी हे सरकार शेतकरीविरोधी आहे असा आरोप केला आहे. एकंदरीत कधी कधी सरकार चालविणार्‍या पक्षापेक्षा विरोधी पक्षात बसणे मजेचे असते असे वाटते. ४. देशभरात मंदीची ओरड चालू असताना मारुती रोज नवेनवे मॉडेल बाजारात उतरवत आहेत, मॉरीस गॅराज, किया सेल्टोज सारख्या नवीन कंपन्या भारतात येत आहेत. मॉरीस गॅराज ने तर मंदीच्या काळात देखील आपल्या हेक्टर या गाडीची किंमत २०,००० रुपयांपासून वाढविली आहे असे वाचनात आले. ५. देशात सध्या आर्थिक मंदीचं वातावरण असून वस्तूंच्या मागणीतही घट झाल्याचं म्हटलं जात आहे. अशातच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मात्र आपल्या फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून मोठी कमाई केल्याचं समोर आलं आहे. शनिवारपासून ॲमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची सुरूवात झाली. यादरम्यान केवळ 36 तासांमध्ये ॲमेझॉनकडून 750 कोटी रूपयांचे मोबाईल विकल्याचा दावा करण्यात आला आहे. तर फ्लिपकार्टनंही सुरू केलेल्या ‘बिग बिलियन डे’ च्या पहिल्याच दिवशी दुपटीपेक्षाही अधिक नफा मिळवल्याचा दावा केला आहे. हे ७५० कोटी रुपयाचे मोबाईल खरेदी करणारे कोण आहेत ? मी सरकारच्या पक्षाचा किंवा विरोधक नाहीये पण मला खरोखरीच प्रश्न पडतो की खरोखर मंदी आहे काय ? एकीकडे लोक ७५० कोटीचे मोबाईल २ दिवसात खरेदी करत आहेत पण ऑटॉ सेक्टर वाले रडत आहेत. नक्की मंदी आहे की रस्त्यांची दुर्दशा, सार्वजनिक वाहनांची वाढती उपलब्धता यामुळे ग्राहक ऑटॉ सेक्टर पासून दूर जात आहे ? माझ्याकडे देखील स्वतःची गाडी आहे पण आजकाल गाडी रस्त्यावर काढायची हिंमत होत नाही, खड्डे, ट्राफिक जाम मुळे मुंबईच्या कोणत्याही एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जायचे तर कमीत कमी २-२.३० तास सहज निघून जातात. खिशात पैसे असले तर ओला उबेरचा वापर केला जायचा मात्र सध्या शहरात सिटीप्लो, गोक्रुझ, शटल सारख्या वातानुकुलीत बसेसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. १००-१२५ रुपयात घरापासून बर्‍याच ठिकाणी प्रवास करता येतो त्यामुळे हा पर्याय जास्त आकर्षक वाटतो आहे. मेट्रोचा प्रवास हा देखील एक आरामदायक पर्याय आहे. सध्या त्याचा आवाका कमी असला तरी ४-५ वर्षात बर्‍याच ठिकाणी मेट्रोचे जाळे पसरले असेल तेव्हा गाडीची गरज कितपत भासेल ही शंका आहे. असो. तर नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! ता. क. दिवाळी विशेषांकाची वाट पाहत आहे. दिवाळी विशेषांक आला रे आला की मी नेहमी एक प्रश्न विचारतो की आता याची पीडीएफ आवृत्ती कधी ? सं.मं. यावर्षी सुरुवातीलाच पीडीएफ अंक प्रकाशित करुन आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का देईल काय ? पीडीएफ अंक जपून ठेवणे, ऑफलाईन वाचता येणे, मित्रमंडळींना पाठवून मिपाचा प्रसार करणे या कामी उपयुक्त ठरतो.

वाचन 59775 प्रतिक्रिया 0