मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्धमान ते महावीर - भाग ३

दशानन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे तेज होते व ओठांवर स्मित!
वर्धमान ते महावीर - भाग 2 तो आपल्या ध्यानामध्ये मग्न होता, तटाच्या त्याबाजूला असलेला तो साधू आता याच्यासमोर उभा राहून याला निरखत होता. त्याने हळूच आपले डोळे उघडले व समोर उभ्या असलेल्या साधूकडे स्मितनेत्रांनी पाहिले व म्हणाला “या मुनिवर्य. आपले स्वागत आहे.” साधूने त्याच्याकडे पाहिले व आपल्या पांढऱ्या शुभ्र दाढीवरून हात फिरवत तो म्हणाला “मला आपल्या सोबत चर्चा करावयाची आहे. ईश्वर, धर्म आणि मुक्ती विषयी.” असे म्हणून ते समोर असलेल्या खडकावर बसले. त्यांने साधूकडे पाहिले व हात जोडत म्हणाला “अवश्य, फक्त काही क्षण द्या, आपण चर्चा सुरु करू.” त्याने आपले पद्मासन सोडले व उभा राहत, साधू ज्या खडाकावर बसला होता त्याच्या समोर जाऊन बसले व म्हणाला “सुरु करू” साधूने पहिला प्रश्न विचाराला. “तुमचा धर्म कोणता व तुम्ही कोणाची आराधना करत आहात येथे?” त्याने साधूकडे पाहिले व मंद स्मित करत उत्तर देण्यास सुरुवात केली “माझा धर्म मी अजून शोधतो आहे. धर्म हे असे तत्त्वज्ञान असावे की आत्मास निरंतर सुखाचा मार्ग दाखवेल व या लोकात समता, शांती व समृद्धी व परलोकात सर्वोच्च आनंद कसा मिळवावा याचे मार्गदर्शन अनुयायींना देत राहील. मी माझ्या तील माझ्या आत्माची आराधना करतो आहे. कारण हा आत्माच सर्वकाही आहे, माझ्या पाप-पुण्याचे जे संचीत जमा होणार आहे त्याला कारणीभूत हा माझा आत्माच आहे, म्हणून मी त्याला सर्वोच्च मानतो. म्हणून सर्वात आधी त्याचे ज्ञान, आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा यत्न करतो आहे. आत्मा हा अनंत ज्ञानाचा, सुखाचा व विराट शक्तीसामर्थ्यचा शक्तीस्त्रोत आहे. सुखदु:खचा निर्मिता तोच, उपभोग घेणाराही तोच व यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारा देखील तोच. आत्मज्ञान म्हणजे मोक्षद्वार आहे. म्हणून मी त्याची आराधना करतो आहे.” साधू त्याच्या या उत्तराने थोडा विचलित झाला व म्हणाला “तू ईश्वराची आराधना नाही करत? मग हे तप करून तुला काय मिळणार? ना इहलोकी सुख ना परलोकी सुख. मग हे तप का? घरी बसून सुद्धा तू स्व: आत्माचा शोध घेऊ शकत होतास.” तो थोडा गंभीर झाला व साधूकडे पहात म्हणाला “तप म्हणजे इच्छा, आकांशा यांचा निरोध करणे, यश, कीर्ती, प्रतिष्ठा आणि इहलोक-परलोक मध्ये सुखाची अपेक्षा ठेऊन तप करू नये. तप हे केवळ आणि केवळ आत्मशुद्धीसाठीच केले जावे, या मताचा मी आहे.” साधू उठून उभा राहिला व आकाशाकडे तोंड करून दूरवर कोठेतरी पाहात विचार करू लागला, थोड्यावेळाने तो म्हणाला “ तुझ्या तपाचे प्रकार किती आहेत?” तो तसाच बसून होता व आपल्या उजव्या हाताची दोन बोटे दाखवत म्हणाला “दोन, तप हे दोन प्रकारचे असते, बाह्य आणि आभ्यतर. अनशन, ऊनोदरी, भिक्षाचरी, रसपरित्याग, कायक्लेशा आणि प्रतिसंलीनता ही बाह्य तपे आहेत. अनशन म्हणजे काही दिवसांसाठी, किंवा जीवनभरासाठी अन्न त्याग. ऊनोदरी म्हणजे अल्प आहार घेणे, गरज असेल त्याही पेक्षा कमी. भिक्षाचरी म्हणजे संकल्प करून भिक्षावृत्ती कमी करत जाणे. रसपरित्याग म्हणजे ज्याच्या सेवनाने आपल्यामध्ये रस उत्पन्न होईल अश्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे, दुध, दही, मिष्टान्न, तूपजन्य पदार्थ. कायक्लेशा नियमित पद्मासन, उभे राहून, एका पायावर उभे राहून शरीर साधना करणे. प्रतिसंलीनता म्हणजे सर्व विकारांवर विजय मिळवणे, त्याचा त्याग करणे. ही सर्व बाह्य तपे आहेत. तसेच प्रायश्चित्त, विनय, वैय्यावृत्त्य, स्वाध्याय, ध्यान आणि व्युत्सर्ग ही सहा आभ्यतर तपे आहेत. या सर्वांच्या शिवाय आपले तप पूर्ण होऊ शकत नाही.” साधू सस्मित होत, म्हणाला “आता फक्त एवढे सांग ईश्वराबद्दल तुझे काय विचार आहेत?” तो उभा राहिला व निर्भेळपणे आपल्या आसपास पसरलेल्या निसर्गावर आपली नजर फिरवत तो बोलू लागला “ईश्वर! सृष्टी, आत्मा, कर्म हे नित्य राहणार आहे. यांचा कोणी निर्माता नाही. आणि निर्माता नसल्यामुळे याचा नाशकर्ता देखील कोणी नाही. आपण जे जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला त्याचे फळ मिळते. ईश्वर तुम्हाला लाभ किंवा दंड देत नाही. आपण पूजा केली म्हणून ईश्वर प्रसन्न होईल व आपल्याला इच्छित फळ तो प्रसन्न झाल्यावर देईल व आपल्या केलेल्या त्याच्या स्तुतीला, पूजेला भूलेल व आपण केलेल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला देणार नाही असे घडेल का? ईश्वर असेल तर तो सर्वज्ञ आहे आणि मंगलस्वरूपात या विश्वात आहे, पण त्याची आपण पूजा केली म्हणून तो आपल्यावर कृपा करेल यावर माझा विश्वास नाही." तो क्षणभर थांबला व साधूकडे पहात म्हणाला “सृष्टीचा न्याय सर्वांना सारखा असेल, त्यात कणभर देखील कोणी बदल करू शकणार नाही. तुमच्या कर्माचे जे काही चांगले वाईट फळ आहे ते ते तुम्हाला मिळणार! सृष्टीच्या नियमामध्ये तो ईश्वर देखील ढवळाढवळ करू शकत नाही. तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता, पण मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे, तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल. याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल. पण तो ईश्वर आहे म्हणून तो ना निर्माता आहे, ना नाशकर्ता!” क्रमशः

वाचने 5741 वाचनखूण प्रतिक्रिया 20

स्पा 01/10/2014 - 11:55
“ईश्वर! सृष्टी, आत्मा, कर्म हे नित्य राहणार आहे. यांचा कोणी निर्माता नाही आहे, आणि निर्माता नसल्यामुळे याचा नाशकर्ता देखील कोणी नाही. आपण जे जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला त्याचे फळ मिळते. ईश्वर तुम्हाला लाभ किंवा दंड देत नाही. आपण पूजा केली म्हणून ईश्वर प्रसन्न होईल व आपल्याला इच्छित फळ तो प्रसन्न झाल्यावर देईल व आपल्या केलेल्या त्याच्या स्तुतीला, पूजेला भूलेल व आपण केलेल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला देणार नाही असे घडेल का? ईश्वर असेल तर तो सर्वज्ञ आहे आणि मंगलस्वरूपात या विश्वात आहे, पण त्याची आपण पूजा केली म्हणून तो आपल्यावर कृपा करेल यावर माझा विश्वास नाही." तो क्षणभर थांबला व साधूकडे पहात म्हणाला “सृष्टीचा न्याय सर्वांना सारखा असेल, त्यात कणभर देखील कोणी बदल करू शकणार नाही. तुमच्या कर्माचे जे काही चांगले वाईट फळ आहे ते ते तुम्हाला मिळणार! सृष्टीच्या नियमामध्ये तो ईश्वर देखील ढवळाढवळ करू शकत नाही. तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता, पण मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे, तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल. याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल. पण तो ईश्वर आहे म्हणून तो ना निर्माता आहे, ना नाशकर्ता!”
जबराट.. __/\__

तुमची मतं? कारण दोन्ही अंगांनी त्यात ढोबळ चुका आहेत. एक)
मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे,
अशी लोकेशन्स कुठेही अस्तित्वात नाहीत. समजा ती असली, तर मग तिथे पाप-पुण्याची काय परिस्थिती असते? का तो फ्री झोन आहे? दोन)
तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल.
वरील विधान, तुमच्या खालील विधानाशी :
तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता
पूर्णपणे विसंगत आहे. कारण त्यानुसार जीवस्वरुपात (म्हणजे जगतांनाच) सगळा हिशेब मिटवणं आलं. आणि थोडं जरी पाप राहिलं तरी पुन्हा मेरी-गो-राउंड सुरु! त्यातूनही इतक्या अब्जावधी लोकांचा हा सगळा अकाउंट कोण ठेवतो हा प्रश्न उरतोच. तीन)
याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल.
पहिली गोष्ट पाप आणि पुण्य या नैतिक कल्पना आहेत, वास्तविकात, त्यात स्थल-काल परत्वे भेद असतो. आणि तर्क कितीही ताणला तरी, सगळं पाप, इक्वल पुण्यानं `सेट-ऑफ' झालं आणि त्या क्षणी मृत्यू आला तरच ईश्वरप्राप्ती (किंवा मोक्षप्राप्ती) होईल, ही कल्पना हास्यास्पद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 03/10/2014 - 21:07
मागे पण तुम्हाला मी एकदा धाग्यात लिहिले होते, कि तुमच्या बुद्दीसमोर माझी बुद्धी तोकडी आहे, उगाच आपला वेळ व श्रम दोन्ही माझ्या धाग्यावर वाया घालवू नका. असो. पुढील वेळी हे देखील सांगण्याचे कष्ट घेणार नाही आहे.

In reply to by दशानन

प्रश्न तुमच्या लेखनातील विसंगती विषयी आहेत. प्रतिसादावरुन तुमच्याकडे उत्तर नाही असं दिसतं. लेखनातली विसंगती दाखवून देण्यात सदस्यांचा वेळ जातो असा तुमचा (गैर)समज असेल तर संकेतस्थळावरचं सगळं लेखन केवळ वाचनमात्र करावं लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 03/10/2014 - 22:26
अहो सगळ्याच विसंगतीवर बोट ठेवत बसलो तर, दिवस-रात्र येथे मिपावरच कीबोर्ड बडवत राहावे लागेल. आणि लेखातील ज्या विसंगती तुम्ही "सांगत" आहात, त्या का, कश्यासाठी हे तुम्हाला माहिती असावेच व मला ही आहे. तुम्हाला पटले तर वाचा पटले नाही, तर मी सांगतो बरोबर काय आहे! हा तुमचा "ज्ञानदर्शक" अजेंडा सोडून या अवश्य चर्चा करू जेव्हा मी "चर्चा" सुरु करेन! एक तर तुम्हाला "कळत" नाही, किंवा आपल्यालाच सर्व कळते, या मताचे तुम्ही मला नेहमी दिसता, त्यामुळे आपले पटेल असे कधी होणार नाही, म्हणून मी आधीपासून 'दूर' राहण्याचा प्रयत्न करत आहे. "कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे, उद्या मी महावीरांच्या काळात एलियन आले व त्यांनी त्यांना ज्ञान दिले असे लिहीन.. तुम्हाला का आक्षेप? तुम्हाला सत्य माहिती असेल तर तुम्ही तुमचे सत्य तुमच्या पद्धतीने लिहा, पण माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका. *संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही! - धन्यवाद!

In reply to by दशानन

मला काय समजलंय किंवा मी स्वतःला काय समजतो या वळणावर (नेहमी प्रमाणे) चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. तश्यात तुम्ही :
कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे"
हा नवा विनोद केलायं, कारण तुम्ही निवडलेला लेखनविषय : संस्कृती - धर्म - जीवनमान आहे. पुढे तर आणखी विनोद केलायं : "माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका". आपण संकेतस्थळावर लेखन करतोयं डायरीत नाही, याची तुम्हाला कल्पना आहे. शेवटी तुम्ही म्हटलंय : "संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही!" `सदस्यांनी लेखनातली विसंगती दाखवू नये' हा तुमचा दृष्टीकोन आहे आणि त्यासाठी धागा `वाचनमात्र' असावा लागतो याची ही तुम्हाला कल्पना आहे, इतकंच माझं म्हणणं आहे.

हाही भाग आवडला. लेखमालिका पकड घेऊ लागली आहे. एक सूचना -
यांचा कोणी निर्माता नाही आहे
हे
यांचा कोणी निर्माता नाही
असे वाचायला बरे वाटेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

दशानन 06/10/2014 - 23:36
बरोबर, आभारी आहे, ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. *पुन्हा एकदा संपादक यांना त्रास देतो आहे, योग्य तो बदल करावा ही विनंती.

आयुर्हित 08/10/2014 - 09:56
तप हे दोन प्रकारचे असते, बाह्य आणि आभ्यतर. अनशन, ऊनोदरी, भिक्षाचरी, रसपरित्याग, कायक्लेशा आणि प्रतिसंलीनता ही बाह्य तपे आहेत. अनशन म्हणजे काही दिवसांसाठी, किंवा जीवनभरासाठी अन्न त्याग. ऊनोदरी म्हणजे अल्प आहार घेणे, गरज असेल त्याही पेक्षा कमी. भिक्षाचरी म्हणजे संकल्प करून भिक्षावृत्ती कमी करत जाणे. रसपरित्याग म्हणजे ज्याच्या सेवनाने आपल्यामध्ये रस उत्पन्न होईल अश्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे, दुध, दही, मिष्टान्न, तूपजन्य पदार्थ. कायक्लेशा नियमित पद्मासन, उभे राहून, एका पायावर उभे राहून शरीर साधना करणे. प्रतिसंलीनता म्हणजे सर्व विकारांवर विजय मिळवणे, त्याचा त्याग करणे. ही सर्व बाह्य तपे आहेत. तसेच प्रायश्चित्त, विनय, वैय्यावृत्त्य, स्वाध्याय, ध्यान आणि व्युत्सर्ग ही सहा आभ्यतर तपे आहेत. या सर्वांच्या शिवाय आपले तप पूर्ण होऊ शकत नाही.” छान व उपयुक्त माहिती मिळत आहे! धन्यवाद.