जोशीबाई
सर्वात वरच्या मजल्यावरच्या कोपर्यातल्या आठवीच्या वर्गात आम्ही वाट पाहत होतो, आता कोण येणार तासाला? जोशीबाई जिना चढताना दिसल्यावरच एकच गलका सुरु झाला,
" बाई.. गोष्ट, बाई गोष्ट.."
" अरे, अरे मला वर्गात तरी येऊ द्याल की नाही?"
"परवाच्या ऑफ तासाला अर्धवट राहिलेली कार्व्हरची गोष्ट आधी पूर्ण करा, मग अभ्यास..."
बाई हसतच बरं म्हणाल्या आणि धडा शिकवायचे बाजूला ठेवून कार्व्हरचा अनोखा जीवन झगडा विलक्षण प्रभावीपणे सांगू लागल्या ...
साधारण सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, शेलाटा बांधा आणि शांत,सात्विक चेहरा! बाईंना आवाज चढवून बोलताना कधी पाहिले नव्हते, तशी त्यांना गरजही लागत नसावी. अगदी अव्वल नंबरी कार्ट्यांनाही बाईंबद्दल अतीव आदरच होता. त्या आम्हाला शिकवायला कधी येणार ह्याची सारेजण वाट पाहत होतो आणि त्या आठवीपासून आम्हाला मराठी शिकवणार म्हटल्यावर आम्ही सारेच फार आनंदलो होतो कारण आतापर्यंत बाईंची ओळख आम्हाला पर्यवेक्षिका म्हणून होती.. एकदोनदा खूप शिक्षक आले नव्हते तेव्हा आमच्या वर्गात येऊन बाईंनी ग्रंथालयातली गोष्टीची पुस्तके वाचायला दिली होती आणि पुढच्या वेळी कोणी काय वाचले, काय आवडले हे सुध्दा विचारले होते. शनिवारी शाळा सुटल्यावर तासभर वाचलेल्या चांगल्या पुस्तकांवर बाई बोलतात असे ६वी, ७वीत असताना समजले होते. त्यावेळी मराठी साहित्य, मराठी वाङ्मय वगैरे शब्दसुध्दा माहित नव्हते पण छान गोष्टी ऐकायला मिळतील ह्या नादात आम्ही काहीजण एका शनिवारी थांबलो आणि थांबतच राहिलो. मराठी वाङ्मय मंडळाचे अॅक्टिव्ह सदस्य आम्ही कधी झालो ते कळलेच नाही. अॅन फ्रँकची डायरी बाईंनीच आम्हाला दाखवली. कार्व्हर, अलबर्ट श्वाइटझर,लिंकनशी ओळख बाईंनी करुन दिली आणि आणि पुलंच्या गटणे, अंतूबर्वा, नारायणाशीही मैत्री बाईंनीच करवली.
आठवीच्या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच त्यांनी वहीच्या मागच्या दोन पानांवर काही कॉलम्स करायला सांगितले. त्यात धड्याचे /कवितेचे नाव त्याचा लेखक/कवी ,त्याचे टोपणनाव,तो उतारा/कविता कोणत्या पुस्तकातली आहे, ह्या साहित्याचा/काव्याचा वाङ्मय प्रकार कोणता अशी सारी माहिती प्रत्येक नव्या धड्याच्या सुरुवातीला त्या सांगत आणि आम्हाला त्यात भरायला लावत, नंतर नंतर त्या आम्हाला ती माहिती शोधायला लावत. आवडलेला धडा किवा कविता कोणत्या पुस्तकातली आहे ते आपसूकच कळत असे आणि ते पुस्तक मिळवून वाचण्याची ओढ लागे.बाईंनी दहावीपर्यंत आम्हाला मराठी शिकवलं, नुसतं टेक्टबुक नाही तर मराठीशी, मराठी साहित्याशी ,कवितेशी आमची मैत्री करुन दिली. मला आठवत आहे नववीत असताना आमच्या वर्गातल्या ८/१० मुलांचा एक असे गट करुन प्रत्येक गटाला बाईंनी एकेक साहित्यप्रकार दिला आणि त्यावर निबंध लिहवून घेतले आणि त्याचे हस्तलिखित तयार करायला लावले. त्या हस्तलिखिताला साजेसे नावही आम्हीच शोधायचे होते. आमच्या वर्गाची अशी ५/६ हस्तलिखिते झाली. मग वर्गातच बाईंनी त्याचे प्रकाशनही केले आणि सगळ्या पुस्तिका वाचून त्यातल्या उत्तम लेखांना आणि सर्वोत्तम पुस्तिकेला बाईंनी बक्षिसही दिले.
वर्षासहलीच्या खर्या मजेची ओळख बाईंनीच आम्हाला करुन दिली. येऊरच्या जंगलात पावसाच्या कवितांनी बाईंनी श्रावण उभा केला होता. आमच्या दहावीच्या वर्गाची मेच्या सुटीत आम्ही ट्रीप काढायचे ठरवले तेव्हा जोशीबाई आवर्जून आमच्याबरोबर येऊरच्या जंगलात आल्या. त्यांच्या कवितावाचनाने आणि गुप्तेबाईंच्या गाण्यामुळे सुंदर झालेली ती सहल आज इतक्या वर्षांनतरही मनाच्या खूप जवळ आहे. शाळेच्या १५ ऑगस्टच्या गौरवसमारंभाच्या कार्यक्रमाकरता एखादी थीम घेऊन त्याची संहिता जोशीबाई किवा साठेबाई स्वतः लिहित आणि मग त्या दोघी आणि गोडबोलेबाई तो कार्यक्रम उत्कृष्ठरीत्या बसवत असत. बाईंनी लिहिलेला 'ज्ञानाचे मानदंड!' आज २५ वर्ष झाली तरी मनात ताजा आहे. कार्यक्रमाच्या तालमीसाठी बाईंच्या घरी आम्ही जात असू. अंगणातले लगडलेले रायआवळ्याचे झाड खुणावत असे पण बाईंना न विचारता आवळे वेचायचे धाडस आदरापोटी होत नसे, खरं तर बाईंना कधीच रागवतानाच काय पण आवाज चढवून बोलतानाही पाहिले नाही. अतिशय मृदू, ऋजु तरीही ठाम बोलत असत त्या! तालमीच्या ब्रेकमध्ये मग बाईच म्हणत, जा आवळे हवेत ना, घेऊन या जा.. मग काय? पर्वणीच असायची. त्यांचे 'साद देती हिमशिखरे'.. ऐकताना अभिवाचन कसे असावे, कसे करावे याचे वस्तुपाठच मिळत होते. एका टिळकपुण्यतिथीला बाईंनी नेहमीच्या 'टिळककथा' आणि भाषणबाजीला छेद देत एक नवा प्रयोग केला. लो.टिळकांच्या काही ग्रंथ,पुस्तकातले निवडक उतारे आम्हा काहीजणांकडून वाचून घेतले होते आणि नंतर चांगले वाचन केले म्हणून कॅडबरीही बक्षिस दिली त्या कॅडबरीचं अप्रूप आज ढिगानी उपलब्ध असणार्या चॉकलेटात कुठून असणार?
व्याकरणासारखा रुक्ष विषयही बाई किती रसाळपणे आणि सोपी,सोपी लक्षात राहण्यासारखी उदा. देऊन शिकवत. व्याकरणासाठी त्यांनी आम्हाला आठवी पासून दहावीपर्यंत एकच वही ठेवायला सांगितली होती आणि ती वही पुढेही जपून ठेवा असं सांगितलं होतं. समास, शब्दालंकार,अक्षरगणवृतांची अगदी लक्षात राहतील अशी उदाहरणे त्या देत. त्यामुळेच 'ताताजगागा गणी इंद्रवज्रा' किवा 'मंदाक्रांता वृत्त हे मंद चाले'.. हे आजही लक्षात आहे. एम ए चा अभ्यास करतानाही 'त्या' जपून ठेवलेल्या वहीचा उपयोग झाला हे विशेष! बहुतांश मुलं दहावीनंतर विज्ञान शाखा घेतात आणि भाषेपासून, लिहिण्यापासून दुरावतात असे त्यांना वाटे. जेव्हा बी.एस्सी नंतर मी एम. ए. केले आणि त्याचे पेढे द्यायला आवर्जून बाईंकडे गेले तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं.
संक्रातीला तिळगूळ द्यायला बाईंकडे गेलं की आशीर्वादाबरोबरच त्यांनी आता नवीन काय वाचलं आणि त्यात काय आवडलं ते ही ऐकायला मिळायचं आणि त्याचबरोबर तू काय नवीन वाचलंस, लिहिलंस हा प्रश्नही! बाई जेव्हा मुख्याध्यापिका झाल्या तेव्हाही त्यांना भेटायला आवर्जून गेले होते. आमच्या शाळेच्या अमृतमहोत्सवात बाई भेटल्या होत्या पण नंतर ठाण्याबाहेर आणि मग देशाबाहेर गेल्यावर बाईंशी भेटी जवळ जवळ थांबल्याच !
बाईंना खूप दिवसात भेटलो नाही, एकदा वेळ घेऊन जायला हवं, नवीन लिहिलेलं,वाचलेलं बाईंशी शेअर करायला हवं.. बाईंना खूप बरं वाटेल. मित्रमंडळींकडून बाई आजारी असल्याचं समजलं तेव्हा तर असं फारच वाटलं.
आणि एक दिवस समजलं की 'जोशीबाई गेल्या..'
सुन्न व्हायला झालं. ह्या भारतभेटीत बाईंकडे जाऊ, नवीन लिहिलं, वाचलेलं बोलू.. असं मनात म्हणत होते ते आता अधुरंच राहिलं ह्याची रुखरुख आहे.
याद्या
5322
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रकटन फार
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा सकाळची
खूप आवडले.
सुंदर..
स्वातीताई
स्वातीताई
खूप छान
मनापासून
सुरेख साठवण..
आठवणी आवडल्या
आठवणी आवडल्या
सुरेख!! हुप
छान
आवडले.
बाईंना खूप
नेहमीप्रमाणेच..
छान व्यक्तीचित्रण
धन्यवाद
सुरेख शब्दचित्र!
तीळगूळ
In reply to सुरेख शब्दचित्र! by चतुरंग