मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडवाखालून !!

सूड · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हातातल्या बेसनाच्या लाडवाचा एक घास घेतला असेल तो फोन वाजला. उचलला खरा पण एरवी आपण होऊन कधी फोन न करणार्‍या व्यक्तीचा फोन बघून जरा आश्चर्यानेच कॉल अटेंड केला... तो,"हं, बोल मामी. काय म्हणत्येस." पलिकडून, " मी मजेत तुझं कसं काय चाल्लंय. कशी काय झाली टूर." "झाली बर्‍यापैकी, बाकी काय चाल्लंय." "बाकी रोजचंच, बरं मी काय म्हणत्ये नोकरीचं तुझं व्यवस्थित चाललंच आहे आता पुढचा काय प्लान?" "म्हणजे?" "म्हणजे लग्नाचं वैगरे कसं काय?" "अजून तरी काहीच विचार नाही, बघू कसं काय होतं ते" "बरं बघ हं, माझ्या भाचीसाठी..म्हणजे मोठी बहीण आहे कनई तिच्या मुलीसाठी स्थळ शोधणं चाललंय. माझ्या बहिणीनं मागच्या वेळी गणपतीत तू आला होतास तेव्हा तुला पाह्यलं होतं, म्हणली विचारुन बघ काय म्हणतोय. विचार कर जरा. मुलीला मी अगदी तिच्या लहानपणापासनं बघतेय. सगळं नीट सांभाळेलशी आहे" आता प्रश्न असा होता की या मामीनं मोठ्या मामीसारखा कधी तुसडेपणा केला नव्हता की फटकून वागली नव्हती. एरवी त्याच्या उत्तरासमोर भलेभले गार होत. पण आता काय करावं हे त्याला कळत नव्हतं. हिला दुखवायचंही नाहीये आणि येवढ्यात लग्नाला हो म्हणावं की नाही तोही प्रश्न आहे. फोनवर मामीची कॅसेट चालू असताना हे सगळं गरगर डोळ्यासमोर फिरत होतं. मग लख्ख उजेड पडल्यासारखं झालं!! पत्रिका!! ही जुळली नाही तर नकारही देता येईल आणि कोणाला दुखवल्यासारखंही होणार नाही. पाव्हण्याच्या जोड्यानं विंचू मारल्यासारखं होईल. त्याचं उत्तर, "बरं, एक काम कर मामी. मुलीची जन्मवेळ, जन्मतारिख आणि जन्मस्थळ पाठव. मी इथं ऑनलाईन पत्रिका चेक करतो." "आत्ता फोन ठेवते आणि मेसेज पाठवते सगळ्या डिटेल्ससहित. पण मावशीला वैगरे यातलं काही सांगू नको फायनलाईझ झाल्याशिवाय" फोन डिस्कनेक्ट झाला पण डोक्यात चक्र सुरु झालं होतं. मावशीला का नाही सांगायचं!! आणि येऊन जाऊन ठरवूनच करायचं तर मग ही लपवाछपवी का? ते काही नाही जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना सांगायचा. होकार असो वा नकार घरातल्या मोठ्या माणसांच्या कानावर ही बातमी असायलाच हवी. मेसेजच्या रिंगने हे विचारचक्र थांबलं. मेसेजमधले सगळे डिटेल्स एका साईटवरच्या रिकाम्या जागांमध्ये टाकले आणि 'Show Horoscope' वर क्लिक केलं. आता हा दुसरा धक्का होता. नक्षत्र मघा, प्रथम चरण इत्यादि इत्यादि...आयला!! म्हणजे पाचेक मिनीटापूर्वी जिथे नकाराला वाव आहे असं वाटत होतं तिथे चक्क छत्तीस गुण जुळतायेत? अष्टमात मंगळ होता, पण मुलगी खरंच चांगली असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला काय हरकत आहे. आता सरळ पुढच्या बोलाचालींसाठी ग्रीन सिग्नल द्यायचा. सगळंच बघत बसलं तर आता जे रखडून राह्यलेत त्यांच्यासारखी आपली गत व्हायची. सगळे विचार चालू असतानाच फोन लावला.."हं मामी, मी आताच सगळे डिटेल्स चेक केले ऑनलाईन. छत्तीस गुण जुळतायेत. मंगळ आहे मुलीला, पण मुलगी खरंच चांगली असेल तर मी हे सगळं इग्नोर करायला तयार आहे. पन्नास टक्के तरी होकार आहे माझा. बाकी मुलीशी भेटून वैगरे काय ते ठरवेन. तुम्ही मोठी माणसं काय ते बघून घ्या." "बरं झालं कॉल केलास ते. मी आत्ता बहीणीला कळवते." "हो, पण माझं स्वतःचं घर वैगरे नाहीये हे माहितीये ना त्यांना? ते सगळं मान्य असेल तरच पुढे बोला म्हणाव." "ते त्यांना माहित असल्याशिवाय का मी तुला विचारलं?? मुलगीही नोकरी करतेच आहे त्यामुळे तू फार काळजी करू नकोस. सगळं नीट होईल." आता मात्र खरंच टेंशन आलं होतं. ज्या गोष्टीला अजून अवकाश आहे असं वाटत होतं ती अगदी जवळ येऊन ठेपली होती. सगळ्याच गोष्टी पसंतीप्रमाणे झाल्या तर त्याच्या भाषेत यावर्षीच सगळा 'निक्काल' लागणार होता. दोन तीन मित्रांना फोनाफोनी झाली. अजून मुलीचा फोटो पाह्यला नव्हता. त्यामुळे पुढच्या कॉल्स कडे लक्ष लावून राहणं होतं. तीनेक दिवसांनी पुन्हा फोन.. "तुझ्या पत्रिकेची स्कॅन कॉपी आणि तुझा फोटो मेल करतोस का?" "अगं मामी, पण सगळे डिटेल्स तर मी दिले होते. ऑनलाईन पत्रिका बघू शकतात की!! मी नाही का पाह्यली?" "हो, पण त्यांना स्कॅन्ड कॉपीच हवीये आणि तुझा फोटोही. मुलगी तिचा फोटो नंतर पाठवील. त्यांच्या घरचं नेट गंडलंय." "ठिकाय, मी उद्या सकाळपर्यंत पाठवतो." सगळे डिटेल्स त्याने पाठवले. आता पुढला कॉल येईस्तवर निश्चिंती होती. पण त्यांचा होकार आला तर ?? अजून कोणालाच माहिती नाहीये. ते काही नाही, घरात आणखी कोणाला तरी हे माहित असायलाच हवं असं मन ओरडून सांगत होतं. . . . . . . गुरुवारी सगळे डिटेल्स पाठवलेत, आज रविवार. काही बातमी आलेली नाहीच, पण आता स्वस्थ बसता उपयोगी नाही. आता मात्र सरळ मावशीचं घर गाठलं. अथपासून इतिपर्यंत जे काही घडलं ते सगळं सांगून जरा डोकं आणि मन दोन्ही शांत झाल्यासारखं झालं.चहा वैगरे उरकलाच असेल, तो पुन्हा फोन आला. "बोल मामी" "आताच बहिणीचा कॉल आला होता. त्यांनी दाखवली म्हणे एका ज्योतिषाला पत्रिका तुझी. काय तर म्हणे मुलाचा शनि दुर्बळ आहे, हे लग्न तितकंसं चांगलं ठरणार नाही." "ओक्के, हरकत नाही. बरं झालं लवकर कळवलंस." मावशी शेजारीच उभी राहून ऐकत होती. त्यामुळे ती समजून गेली. त्याला मात्र नकाराचा शोक मानावा की पुढल्या सगळ्या खर्चाचं आलेलं टेंशन चुटकीसरशी सुटलं याचा आनंद मानावा ते कळत नव्हतं. शेवटी मन म्हणालं अरे आनंदच हा!! मागचा सलग आठवडाभर पुढच्या खर्चाचं प्लानिंग, विचार याच्या बेरीज वजाबाकीत घालवलास त्यातून आता निदान पुढलं स्थळ येईस्तवर सुटका झाली आहे. या सगळ्या विचाराने कुठेतरी त्याचा जीव भांड्यात पडल्यागत झालं. त्याच्या चेहर्‍यावर हसू बघून मावशीच्या कपाळावरच्या आठ्याही गेल्या. गाडी पुन्हा रुळावर आली होती. दोन तीन दिवस गेले. ऑफिसला जायची तयारी चालूच होती तो पुन्हा मामीच. आता काय नवीन म्हणून कपाळावर आठ्या आणत कॉल अटेंड केला. "थोडा घोळ झालाय अरे." "काय झालं?" "तेच रे मी माझ्या भाचीचं म्हणलं नव्हतं का?" "ह्म्म, मग?? नक्की काय झालंय?" "त्याचं काय झालं, त्या लोकांनी ज्या ज्योतिषाकडे पत्रिका दाखवली त्याचे प्रेडिक्शन्स नीट नव्हते रे. ते लोक आता म्हणतायेत. तुमच्या इथं कुणाकडे तरी पत्रिका दाखवून बघा." "कशाला, मामी?? आता एकदा आलाय ना नकार. मग पुन्हा काय? बरं त्यांना जे काही आधी कोणी सांगितलंय ते त्यांच्या डोक्यातून जाणार आहे का? त्यांच्या मनात या गोष्टी राहणारच ना कुठेतरी. नकार आलाय ना, मग जरा थांबूच. निवांत होऊ दे सगळं." "तू फारच मनाला लावून घेतलंससं दिसतंय. नकार नव्हताच रे तसा त्यांचा. मी मुलीला फोटो पाठवायला सांगते तुझ्या इमेल आयडीवर आत्ताच. पत्रिकाही दाखवून घ्या तुम्ही लोक." त्याने काहीही प्रत्युत्तर न करता फोन ठेवला. नक्की काय चाल्लंय कळत नव्हतं. विचारलं त्यांनी, नकार दिला त्यांनी आणि आता परत होकारही देतायेत?? नक्की माणसं काय म्हणायची ही? आता इतकी डळमळीत आहेत तर नंतर काय करतील हे लोक. आपण शांत बसावं. फॉलो अप करुन वैतागून विषय सोडून देतील. आठवडाभरानं पुन्हा कॉल. "काय ठरलं मग?" "कशाबद्दल?" "फोटो पाठवला होता की तिनं, पाह्यला नाहीस का?" "नाही. मी मेल आल्या आल्या ताबडतोब डिलीट केला." "असं का केलंस?" "का म्हणजे? मी काय खेळणं आहे का? विचारलं तुम्ही, नकार तुम्ही दिलात, परत होकार देताय. एका दगडावर पाय आहे का नाही? इतके दिवस मान राखायचा म्हणून गप्प बसलो होतो, पण आता हे अति होतंय असं नाही का वाटत? मी नुसत्या बर्थ डिटेल्सवर सगळं शोधलं. मुलीला मंगळ आहे तोही इग्नोर करायची तयारी दाखवली. त्यांचा मात्र माझ्या पत्रिकेच्या स्कॅन्ड कॉपीसाठी, फोटोसाठी आग्रह? कुठल्या युगात वावरताय? मुलीचा फोटो मी मागितला नाही ठीकै, पण घरचं नेट बंद आहे हे कारण कोणाला सांगता? सायबर कॅफे ओस पडलेत का? हे बघ, आता त्यांना म्हणाव आम्हाला घाई नाहीये. निवांत बघू आणि तेवढ्यात जर कोणतं स्थळ आलं मुलीसाठी तर खुश्शाल पुढे जा म्हणाव." "असं कसं बोलतोस तू? माझ्या भाचीला काय मुलं मिळणार नाहीत की काय?" "ठीकाय ना!! मला पण हिच्याशिवाय दुसरी मुलगी मिळणार नसल्यासारखं तुमचं वागणं का चाल्लंय?" पलिकडून फोन डिस्कनेक्ट. . . . . . तीन महिन्यांनी..... "काय गं? काही कॉल केलेलास का त्याला?" "मी का करु? माझा अपमान केलाय त्याने?" "हो, पण लहान आहे. सांभाळून घे ना!" "वन्सं, तुम्हाला म्हणून सांगत्ये. इतकं चांगलं स्थळ आणलं मी. पण हा माजोरडेपणा म्हणावा की काय? माझी भाच्ची अगदी सोन्यासारखी आहे हो. म्हणे दुसरं स्थळ मिळालं तर शोधा. माझ्या भाच्चीला मुलं मिळणार नाहीत की काय!" "हो, अगदी गुणाचीच आहे हो तुझी भाची. मला माहित आहेच की सगळं. नकार कळवायला तू त्या रविवारी फोन केलास ना त्याला तेव्हा त्याच्या शेजारीच उभी होते मी." भावजय तोंडात मारल्यासारखी गप्प बसली.

वाचने 28135 वाचनखूण प्रतिक्रिया 96

रेवती 18/11/2013 - 01:24
हम्म्....माझ्या वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं असतस तर असं झालं नसतं. आता पुन्हा ते स्थळ आलं तर जा की बघायला, मुलगी तर बघून ये. ;) बरेचदा अशी लग्नं जमतात बरं का, आमचा अनुभव आहे.:)

In reply to by एस

रेवती 21/11/2013 - 00:20
कोणीही नोंदवू शकतात. ;) आता काये अजूनपर्यंत एकानंही नोंदवलेलं नाहीये ती गोष्ट वेगळी. झायरात तरी किती करायची म्हणते मी! अवांतर: माझे ववसूमं खरेखुरे नाही हो. ही सगळी चेष्टा चाललीये.

In reply to by रेवती

प्यारे१ 21/11/2013 - 00:55
>>>ही सगळी चेष्टा चाललीये. काय सांगता? डॅम इट! आता आमच्या १...२...३...४....५...६...७.५, ८.१५, १०, ११.०५, १२ मिपाकर मुलं (हो मोजलीत मी) नि १...२...३...४...५ मुलींची (ह्यात २ ड्यु आयडी पण) लग्नं रखडली की! -प्यारेश कोठारे

In reply to by प्यारे१

मृत्युन्जय 21/11/2013 - 00:58
१२:३ (डु आयडी वगळले) म्हणजे ४:१ गुणोत्तर आहे रे. भयाण प्रमाण आहे. एकुणात मुलींना मालाचा चॉइस जास्त आहे सध्या असे दिसतय.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 21/11/2013 - 01:03
तो एक वेगळाच विषय आहे. ;) समाजात आंतरजालावर असलेल्या मुली, त्यात वाचनाची आवड असलेल्या मुली, त्यात मिपावर येणार्‍या मुली असं ते व्यस्त होत जातंय. मुलांनो धीर सोडू नये. मिलेगा. सबको मिलेगा! जल्द या देरी से ही सही... -प्यारेबाबा

In reply to by पिशी अबोली

अत्रुप्त आत्मा 22/11/2013 - 19:42
@बबडी रॉक्>>> =)) बालिका आणी पिशी अबोली चे परस्पर प्रतिसाद पाहून हम पांच मधल्या त्या स्विटी आणी तिला गुरुमैय्या हाक मारणार्‍या खोड-गोळीची अठवण झाली! =))

प्यारे१ 18/11/2013 - 01:40
चला. आणखी एक सदस्य लायनीत आला. हार्दिक शुभेच्छा! टीपः लग्नानंतर बायकोबरोबर एखादं स्थळ 'डिस्कस' कर. 'मजा' येईल बघ. :) बाकी चेपु चेपु खेळताना (कदाचित ऑर्कुट असेल. आम्ही जुन्या काळातले) साधारण आगेमागे सगळ्यांचे ग्रॅजुएशनचे, मग नोकरी मिळाल्याचे/ बाहेर ट्रीप कुठं तरी, घर/गाडी मग हळूच एंगेजमेंटचे, मग लग्न (घर/लग्न थोडं मागे पुढे अस्तं) त्यानंतर दोन एक वर्षात 'मी आणि माझा' असं टप्प्याटप्प्यात सुरु असतं... चार सहा महिन्याच्या फरकानं हे सगळ्यांचं सुरु असतं.

स्पंदना 18/11/2013 - 03:37
हं! अस सगळीकडे चाचपत सुटायच, इकडचा होकार आला तर तिकडच्याला नकार, तिकडचा नकार आला तर इकडच्याला होकार! तोवर आणी दोन ठिकाणी गळ टाकलेलेच!! सगळ्याची तयारी ठेवा! तरीही त्याने घेतलेला निर्णय आवडला. शेवटच अन महत्वाच...या गाठी देवाने बांधलेल्या असतात, जी असेल ती येइलच आयुष्यात. (रेवाक्काकडे नाव नोंदवा. झटकन काम, अत्यल्प दाम!)

In reply to by नगरीनिरंजन

विश्वनाथ मेहेंदळे 23/11/2013 - 20:48
कथानायकाने थोडे हलके घेतले असते तरी चालले असते. या ठिकाणी स्थळ अगदी ओळखीतुन आले होते हा प्लसपाॅइंट होता. अगदी खात्री असल्याशिवाय कुणी सुचवणार नाही. काही चुकले तर जन्मभर दोन्हीकडुन शिव्या. आणि नकार द्यायचाच होता तर प्रेमाने देता आला असता. मामी तोवर नीट वागत आल्या होत्या ना. कथानायकाने पुढील वेळेस फोन आणि सुत्रे वडीलधार्यांकडे दिले तर कसे ??? ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे१ 23/11/2013 - 20:57
>>>कथानायकाने पुढील वेळेस फोन आणि सुत्रे वडीलधार्यांकडे दिले तर कसे ??? पूर्ण वाक्य 'मी करतो तसं' कथानायकाने पुढील वेळेस फोन आणि सुत्रे वडीलधार्यांकडे दिले तर कसे- असं आहे का रे विमे? ;)

किसन शिंदे 18/11/2013 - 08:51
भाग १ तर माहीत होताच आधी, दुसरा आत्ता कळाला. :D
अरेरे मुलीने दिलेला नकार लवकर पचत नै मुलाना , पण एव्ढं चिडण्यासारखं त्यात काहिच नव्हतं ... प्रत्येक व्यक्तिचे विचार वेगळे , प्रत्येकाने आपल्यासारखच वागावं असा अट्टहास नसावा . मांडलय बाकि छान .

In reply to by जेनी...

स्पंदना 19/11/2013 - 03:18
अरेरे मुलीने दिलेला नकार लवकर पचत नै मुलाना ,
पूजा ? येथे मुलीने किंवा मुलाने नकार दिलाय का? मुद्दा समजलेला दिसत नाही आहे. आअल्या बहिणीच्या मुलीच लग्न ठरवताना; नवर्‍याच्या बहिणीचा मुलगा एक बाहुलं म्हणुन वापरण्याचा प्रकार झालाय येथे. असली मन दुखावणारी 'राजकारणं' बायकाच जाणे. :( वर आणी आपण जे काही करतो आहोत ते घरच्या कुणाला कळु नये अशी काळजी घेतली जातेय मुलाला घरात कोणाला सांगु नको अस सांगुन. लग्नाच वय झालेल्या मुला मुलींना बाजारात भाज्या पसंत नापसंत कराव्या इतक्या सहजतेने हाताळल जातय, हा मुद्दा आहे. जरा पुढे जाउन बघु नाहीतर हा/ही ठिक आहे. त्यात आणी आईबाप जरा मुलांचा विचार करतात पण हे असले बातेवाईक (हो ना नाही बा च) अथवा मध्यस्थ कधीकधी फार नुकसान अन नको तो कडवटपणा निर्माण करुन जातात.

स्पा 18/11/2013 - 10:06
हॅ हॅ चला ओपनिंग म्याच तरी धडक्यात सुरु झाली क्रमशः राहिलंय का? पुढील भागाच्या प्रतीक्षेत ;)

ज्ञानोबाचे पैजार 18/11/2013 - 10:06
टेंशन न‍ई लेने का रे बाबा, ऐसाइच होता हय. जबतक शादी नहि होता तबतक ऐसे बहोत अनुभव मिलेंगे तुझको. माझ्या एका मित्राच्या लग्नाचे जमवताना तोंडावर पडलो होतो तो प्रसंग आठवला. मुलगा मुलगी दोघांनी सगळ्यां समोर होकार दिला, त्यानंतर दोन बैठका झाल्या. साखरपुड्याच्या तारखा काढून मुलीच्या घरी गेलो त्यावेळी, मला एकट्याला बाजूला घेउन, तिच्या वडिलांनी सांगीतले, मुलीला अजून शिकायचे आहे, सध्या तिचा लग्नाचा विचार नाही. जोडा मारल्या सारखे थोबाड घेउन मित्राच्या घरी गेलो. मित्राला, त्याच्या घरच्यांना कोणत्या तोंडाने सांगायचे हा मोठा प्रश्र्ण माझ्या पुढे होता. आता तो मित्र दोन मुलांचा बाप आहे, त्याचे व्यवस्थीत चालले आहे. त्याच्याशी माझे अजूनही चांगले संमंध आहेत. त्या मुलीची शैक्षणीक पात्रता वाढल्याचे ऐकीवात नाही, पण नंतर तिचेही सुस्थळी लग्न झाले.

मृत्युन्जय 18/11/2013 - 11:03
चालायचेच रे सूड. असले अनुभव आल्याशिवाय लग्नाला मजा येत नाही. मग हे असले अनुभव बायकोबरोबर रंगवुन रंगवुन डिस्कस करायचे असतात. मजा येते. ;) बाकी खरे सांगायचे तर तु एक खुप चांगला चांस घालवलास. तुझ्या मनाला जर एवढे लागले होते तर नकार देताना मुलगी नाही पसंत पडली असे सांगायला पाहिजे होतेस. जिथे फुले वेचली तिथे गवर्‍या वेचायला लागल्यागत अवस्था झाली असती त्यांची
माझ्या बाबतीत थोड्या फरकाने असेच झाले होते. दोघांच्या पत्रिका जुळल्या, बघण्याचा कार्यक्रम आटोपला. दोघांची पसन्ति. मधी माघ का कुठला महिना आला, मुलीकडचे म्हणले महिना संपला कि पुढचे ठरवू. महिना संपल्यावर दोन वेळा फोन करून माझ्याबद्दल सगळे परत विचारून घेतले, आणि दोनतीन दिवसांनी फोन केला तर म्हणे मुलागीची नोकरी पुण्यात सगळे मित्र पुण्यात, त्यमुळे पुणे सोडून जायला मुलगी तयार नाही. आता काय बोलणार,काही बोलू शकलो नाही, जावू दे म्हणून पुढचे स्थळ नक्की करून टाकले. हाय काय आन नाय काय

In reply to by शैलेन्द्र

प्यारे१ 18/11/2013 - 12:41
शैलेन्द्र ना +११११ बाकी हसायला येतं खरं पण हा अत्यंत गंभीर विषय व्हायला लागलाय. मुलीचे आईवडील मुलीला ठामपणं सांगू शकत नाहीत किंबहुना मुलीच्या पगारावर बर्‍याच गोष्टी अवलंबून झाल्यानं तिला दुखावणं देखील पटेनासं सॉरी झेपेनासं झालं असावं. त्यापुढची गोष्ट म्हणजे मुलीच्या संसाराला मदत ह्या नावाखाली, मुलीच्या मुलांना सांभाळणं ही गरज म्हणून काहीही कारणानं मुलगी माहेरी, माहेरच्या परिघात, पर्यायानं जावई सुद्धा तिथेच असं चित्र दिसायला लागलंय. कदाचित दलित दलितेतर सारखा हा ही काळाने उगवलेला सूड असावा. (कालचक्र उलटं) 'मुलाचे' आईवडील दोघे(च)एकमेकांना समजावताना दिसतात. :(

In reply to by प्यारे१

राही 18/11/2013 - 13:51
खरंय. परिस्थिती अगदी १८० अंशांतून बदलतेय. मुलाच्या आईवडिलांना हातावर हात धरून किंवा हात चोळत बसण्यापलीकडे कामच उरलेलं नाही. आपल्याची ती मदत आणि 'दुसर्‍याचा' तो इंटरफिअरन्स असं झालंय खरं. सूर्याचे की कोणाचे ध्रुव बदलत असल्याचा परिणाम असावा.

In reply to by प्यारे१

पिलीयन रायडर 18/11/2013 - 14:03
त्यापुढची गोष्ट म्हणजे मुलीच्या संसाराला मदत ह्या नावाखाली, मुलीच्या मुलांना सांभाळणं ही गरज म्हणून काहीही कारणानं मुलगी माहेरी, माहेरच्या परिघात, पर्यायानं जावई सुद्धा तिथेच असं चित्र दिसायला लागलंय.
हरकत काय आहे नक्की? हेच मुलगा माहेरच्या परिघात आणि मुलगी सासरच्या असं असेल तर वरचा मुद्दा आला असता का मनात?

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ 18/11/2013 - 14:18
पारडं झुकायलाच हवं का कुठल्यातरी 'एकाच' बाजूनं? तारतम्य आवश्यक आहे एवढंच. मुलीच्या आईवडलांचं 'प्रेमानं' होतं नि मुलाच्या आईवडलांचं 'कर्तव्य' म्हणून. एकाच घरातली ही दोन चित्रं आहेत. बाकी हा सनातन विषय आहे. लग्नापूर्वीच सूडच्या 'बाल'मनावर वाईट परिणाम नको. ;)

In reply to by प्यारे१

पिलीयन रायडर 18/11/2013 - 14:29
झुकायला नको असलं तरी ते झुकतच.. अनेक वर्ष ते मुलाच्याच आई वडीलांच्या बाजुने झुकायच.. आणि त्या बद्दल चर्चा झालेली पाहीली नाही. पण आज काल मुलीच्या बाजुने झुकायला लागलय तर लगेच "काय होणार आता ह्या जगाचं" टाईप चर्चा कशाला? बाकी मुलीच्या मुलांना सांभाळुन कंटाळलेले आजी आजोबाही पाहिले आहेत..आणि "आमचा नातु तुमच्या घरात नाही रमत" हे मुला कडच्या आजी आजोबांनी नातवाच्या आजोळी गेल्यावर मुलीकडच्या आजी आजोबांना ऐकवलेलंही ऐकलं आहे. त्यामुळे एक प्रेमानी आणि एक कर्तव्य म्हणुन असच असेल असं काही नाही.त्यालाही परत अनेक बाजु असतात. बाकी विषय सनातन आहे हे मान्य.. आणि त्यावर आता इथे चर्चा नको हे ही मान्य.. !

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ 18/11/2013 - 14:46
>>>अनेक वर्ष ते मुलाच्याच आई वडीलांच्या बाजुने झुकायच.. आणि त्या बद्दल चर्चा झालेली पाहीली नाही. पण आज काल मुलीच्या बाजुने झुकायला लागलय तर लगेच "काय होणार आता ह्या जगाचं" टाईप चर्चा कशाला? आता हे विषय निघण्याचं कारणः मुलीने मु लाकडं लग्नानंतर राहायला जाणं ही समाजमान्य रुढी होती हे वास्तव आहे. पूर्वीच्या अनेक (४-५-६) मुलं असण्याच्या काळात 'आईवडील कुणाकडं' हा विषय येण्याचा संबंध नव्हता. एकानं नाही सांभाळलं दुसरा सांभाळेल हे होतं. मुलीच्या आईवडलांना नि मुलीच्या आईवडीलांनाही असा विचार करण्याची गरज नव्हती. एकानं येणंजाणं टाकलं तरी खुपण्याइतकं मॅग्निफायिंग नव्हतं. आता काय झालंय? एक मुलगा एक मुलगी डोक्यावरुन पाणी. ऑप्शन आहेत का शिल्लक? दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाच्या संधींमुळे स्त्रियांचं विस्तारलेलं क्षेत्र. पूर्वी हा प्रकार सरासरीत मुळातच फार कमी होता. तेव्हा झकत, चरफडत, प्रेमानं घरातली सून नवर्‍याचं ऐकायची, कमावत नसल्यानं तिच्या आईवडीलांना सुद्धा भारच होती. असे बरेच पैलू आहेत. असो. बाकी एकूणात पोरं बैलच हो! एक तर आई(वडीलांचा)चा नाहीतर बायकोचा. ;)

In reply to by प्यारे१

पिलीयन रायडर 18/11/2013 - 14:58
बर मग नक्की म्हणयचय काय? मुलीने तिच्या आई वडीलांच्या जवळ रहाणे, त्यांनी मुली कडे येणे- जाणे- रहाणे वाढले आहे, हे चांगले की वाईट?
आता काय झालंय? एक मुलगा एक मुलगी डोक्यावरुन पाणी. ऑप्शन आहेत का शिल्लक?
तेच ना मग? मुलीच्या आई वडीलांनाही ऑप्शन्स नाहीत ना? मग मुलाचे आई वडील ह्यांचा अगदी घरातल्या निर्णयांमध्ये सुद्धा प्रभाव असणे योग्य आणि मुलीच्या आई वडीलांनी मात्र तसे केले तर ते अयोग्य का? माझा मुद्दा एवढाच आहे की आई वडीलांनी (कुणाच्याही) मुलांच्या संसारात कितपत लक्ष घालावे, किती जवळ राहवे वगैरे मुद्दे परिस्थिती वर अवलंबुन आहेत. त्यात मुलगा मुलगी असा भेद नको...

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ 18/11/2013 - 15:06
माझा मुद्दा एवढाच आहे की आई वडीलांनी (कुणाच्याही) मुलांच्या संसारात कितपत लक्ष घालावे, किती जवळ राहवे वगैरे मुद्दे परिस्थिती वर अवलंबुन असावेत. मात्र माझा मुद्दा एवढाच आहे की आई वडीलांनी (कुणाच्याही) मुलांच्या संसारात कितपत लक्ष घालावे, किती जवळ राहवे वगैरे मुद्दे व्यक्तिंवर अवलंबुन आहेत. हिअर आय कन्क्लुड माय लॉर्ड! ए बास आता. :) सूडच्या धाग्याचं शतक का आपणच करायचं का काय? पार्टी घेणारे बाकीचे नि कष्ट आपण? ये ना चॉलबे

In reply to by पिलीयन रायडर

मृत्युन्जय 18/11/2013 - 15:09
तिच्या आई वडीलांच्या जवळ रहाणे, त्यांनी मुली कडे येणे- जाणे- रहाणे वाढले आहे, हे चांगले की वाईट? नि:संशय चांगले. पण समस्त विवाहित पुरुषवर्ग नाकारुच शकत नाही की बायकोने माहेरी जाणे हे सोने पे सुहागा असतय. केवळ या एकाच कारणास्तव तरी किमान बायकोचे माहेर घरापासुन किमान २५० किमी दूर असावे. नेण्याआणण्यासाठी नवरा पेस्शल ट्याक्सी करेल वाटल्यास ;)

In reply to by शैलेन्द्र

आहो मित्र मैत्रिणी असे लिहायचे होते … प्रकाशित करा वर टिचकी मारली आणि पहिला विचार हाच आला की कोणीतरी नक्कीच एव्हढाच भाग अधोरेखित… आम्हाला कुण्या दुसर्याकडून अपेक्षा होती……… जावूदे ………;-)

मन१ 18/11/2013 - 23:24
किस्सा रंजक वाटला. सविस्तर नंतर लिहितो.(शिंचं नेट दिवसबह्रात उणं पुरं अर्धा एक तासच मिळतं.)

अधिराज 18/11/2013 - 23:35
रोचक! आजकाल असे अनुभव शक्य आहेत. आणि अजून एक, मुली जे दाखवण्यासाठी फोटो काढतात, त्या फोटोंवरूनतर अजिबात काही अंदाज बांधू नका, निराशा होण्याची शक्यता असते.

In reply to by अधिराज

थॉर माणूस 20/11/2013 - 18:05
अगदी सहमत... नुकताच मित्राबरोबर एका पहाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आम्ही बिचारे मुलगी बाहेर आल्यावरसुद्धा मिनीटभर "फोटोमधली मुलगी अजून यायची आहे" अशी समजूत घालून घेत होतो. :)

पियुशा 19/11/2013 - 09:58
मला वाट्त या झालेल्या प्रकारात मुलीचा काही दोष नव्हता, मेल डायरेक्ट डीलीट न करता किमान मुलीचा फोटो तरी पाहुन घ्यायचा न जाणो क्लिक झाली असती तर ;)

In reply to by जेनी...

हासिनी 19/11/2013 - 15:48
तोटा तरी झाला नसता ना काही....हाय काय अन् नाय काय. *LOL* ईमेल होता समोर तर पहायला हवा होता ब्वा!

पियुशा 19/11/2013 - 10:55
अग पुजा बै नसती झाली "च्लिक" तर सांगता आले असते "यंदा कर्तव्य नाही " तसेही लग्नाळु मुला-मुलींनी अन त्यांच्या पालकांनी बरीच "विविध "कारणे शोधुन ठेवलेली असतात ;)

पियुशा 19/11/2013 - 11:13
एक्षच्त्ल्य बोंबला.. काय लिव्ल्य डोक्याव्रुन जआत अएहे म्झ्या ;)

In reply to by पियुशा

पूजा ताईंना बहुतेक एक्जाक्टली म्हणायचे असावे. त्याचे स्पेलिंग विंग्रजीतून लिहील्याने हा घोळ झाला असावा. आता यावर जर तुम्हाला परत एक्जाक्टली म्हणाय्चे असेल तर इथलाच एक्जाक्टली शब्द कॉपी-पेस्ट करावा. उगाच तो अगम्य शब्द नका लिहू. :)

पैसा 19/11/2013 - 15:43
पण हा अनुभव आहे की कथाकथन कळलं नाही. अनुभव असेल तर लगेच पुढचे प्रश्न तयार आहेत!

जोशी 'ले' 19/11/2013 - 21:10
शक्यतो स्वत:च्या लग्नाची बोलनी स्वत: करु नये कमीत कमी नात्यातील स्थळ आले तर करुच नये, पुढचा कडवटपना टाळता येतो, बाकि आन्भव लिहलाय मस्त :-)

वीणा३ 20/11/2013 - 02:40
"का म्हणजे? मी काय खेळणं आहे का? विचारलं तुम्ही, नकार तुम्ही दिलात, परत होकार देताय" या सगळ्या अनुभवातून गेलेली असल्याने सांगते कि जेवढ्या लवकर "अरेंज लग्न " हा एक बाजार आहे हे मान्य कराल तेवढा त्रास कमी होइल. पूर्वी हा फक्त मुलींसाठी बाजार असायचा, मुलगा येउन बघून जाणार, चालून दाखव गाऊन दाखव सांगणार, आणि तो (किंवा त्याच्या घरचे) होकार नकार ठरवणार. हल्ली हा दोघांसाठी पण बाजारच आहे, किमान लग्न लागेपर्यंत तरी. तुम्ही असा विचार करा कि एखाद्या मुलीशी तुमची बोलणी चालू आहेत, तुम्हाला ती आवडलीये पण काहीही नक्की झालं नाहीये, त्याचं वेळी दुसरं स्थळ बघितलत, ती पण मुलगी चांगली आहे पण पहिली जास्त चांगली आहे, तर तुम्हाला दुसऱ्या मुलीला सरळ नकार देण्यापेक्षा थोडं लांबवत ठेवावं आणि पहिलीचा नकार आला तर उत्तर द्यावं असं नाही वाटणार का? अवांतर : नकारासाठी "योग नाही" हे एक उत्तम कारण मी ऐकलं होतं, उगाच कोणालातरी नावं ठेवण्यापेक्षा मला तरी हे कारण आवडलं :D

In reply to by वीणा३

सुबोध खरे 20/11/2013 - 10:06
हे किंवा पत्रिका जुळत नाही हे कारण चांगले आहे. आमच्या मामासाठी(तो डॉक्टर आहे) मुलगी पाहून झाल्यावर आमच्या आजोबांनी पत्रिका जुळत नाही सबब योग नाही असे कळविले होते त्यावर वधूपित्याने दूरध्वनी करून त्यांना विचारले अहो तुम्ही इतके सुशिक्षित आणि पत्रिकेवर विश्वास कसा ठेवता ? इतके अंधश्रद्ध असला असे वाटले नाही. यावर आमचे आजोबा त्यांना शांतपणे म्हणाले कि त्याचे असे आहे कि आम्हाला तुमची मुलगी अजिबात पसंत नाही पण मुलीच्या मनाचा विचार करून आम्ही तसे कळविले होते पण आता तुम्ही आम्हाला शिव्या घालता तर स्वच्छ सांगतो कि मुलगी ठेंगणी आणि स्थूल आहे आणि आमच्या मुलाच्या मानाने काहीच नाही आणि मुख्य म्हणजे मुलाला अजिबात पसंत नाही. सबब आपला योग जुळणे नाही. तरीही मुलीच्या मनाचा विचार करून तिला पत्रिका जुळत नाही हे सांगावे.

In reply to by वीणा३

अत्रुप्त आत्मा 20/11/2013 - 16:05
@नकारासाठी "योग नाही" हे एक उत्तम कारण मी ऐकलं होतं, उगाच कोणालातरी नावं ठेवण्यापेक्षा मला तरी हे कारण आवडलं>>> या सगळ्या कारणांन्ना(खरोखर)-पुरुन,उरणारं कारण देता येत...आणी ते सर्रास देतात. ते म्हणजे (अता) पत्रिका जुळत नाही...आंम्ही त्या दुसर्‍या ज्योतिषाला दाखवली!(आणी त्याच्या कडून,पहिली "जुळणी" तोडून'ही घेतली)

पियुशा 20/11/2013 - 14:14
एक किस्सा सांगते , आमच्या हापिसातला एक कलिग त्याने किमान ५० एक मुली पाहील्या अस्तील एकही आवडत नव्हती, हीचे काय ही काळी आहे , तिचे काय ती जाडी आहे, अमुकला चष्मा आहे, तमुक ठेंगणी आहे ,हिचे शिक्षण कमी , तिचे माझ्यापेक्षा जास्त ,अशा नानाविध कारणाने मुली नाकारत गेला शेवटी एक त्याचे आइ बाबा अन घरचे इतके वैतागले की स्थळ आले की त्याला एकट्यालाच जा म्हणायचे मुलगी पाहयला , कारण दगदग, सुट्ट्या , प्रवासखर्च इइ वैतागुन गेले होते बिचारे अन वरतुन मुलगी आपल्या दिवट्याला नाही पसंत पड्ली तर नकार कळवण्याचा अजुन एक ओझ मनावर शेवटी आइबाबानी स्पष्ट सांगितले कि नुसत दिसण्यावर जाण्यापेक्षा गुण/ संस्कारपण बघ मुलीचे शेवटी नाही - हो करत एक मुलगी पसंद पडली तर म्हणतो कसा " हिच्यापेक्षा अमुकतमुक छान होती का ग आइ ? " आइला मुलीची इत्यंभुत माहीती होती म्हणुन शेव्टी आइने पुढाकार घेउन स्थळाला होकार कळवला अन एक आठ्वड्यात साखरपुड्यातच लग्नही उरकले, आता स्वारी मजेत आयुष्य जगतेय कारण बायको खुप छान अन गुणी आहे त्याची ,आता म्हणतो ", खरेच हिला गमावले असते मुर्खपणामुळे , आता समजले आइ-बाबांनी भरपुर उन्हाळॅ पावासाळे पाहिलेत त्यांच म्हणन ऐकुन घेतल ते बर झाल ,नाय तर नुसत आपलच घोड दामटवत बसलो होतो"

विटेकर 20/11/2013 - 16:29
निरिक्षणाने मी एक गोष्ट नक्की सांगतो , लग्नाच्या बाबतीत आई- वडिलांचा निर्णय शिरसावंद्य मानावा ! आपली(मुलगा अथवा मुलगी) नेमकी कशी आहे हे त्यांना बरोब्बर माहीत असते ! सहजीवनासाठी अत्यंत आवश्यक असे उभयताण्चे स्वभाव , आवडी - निवडी जुळायला आणि त्या १००% जुळल्या नाहीत तर ते सहन करायची आपल्या अपत्याची क्षमता त्यांना पुरेपूर ठाऊक असते. आप्ल्यापेक्शा आपण आपल्या आई- वडिलांना अधिक चांगले माहीत असतो - निदान त्या वयात तरी! अगदी प्रेम विवाह जरी केला तरी, त्यांना विश्वासात घेणे अत्यंत महत्वाचे असते. निर्णय बरोबर आला तर आपण्च सुखी होऊ.समजा निर्णय चुकला तर ते तुमच्यामागे ठामपणे उभे राहतात,कठीण प्रसंगी आपल्या माणसांसारखा आधार नाही. अयशस्वी विवाहात प्रेम विवाहांचे प्रमाण जास्त आहे असे ही माझे निरिक्षण आहे ! ( सॅम्पल फ्रोम - मध्यमवर्गीय मराठी कुटुंबे, अर्थात अपवाद असतीलच )

रेवती 20/11/2013 - 19:08
वीणा३ व विटेकरांशी सहमत. पूर्वी हा लग्नाचा बाजार फक्त मुलींसाठी होता आता मुलांसाठीही झालाय त्यामुळे गोष्ट पचवायला जड जातय. पूर्वी मुलांकडून दिसायला, शिक्षणाला, स्वभावाला एक चाम्गली मुलगी असली तरी दुसरी यापेक्षा चांगली मिळतीये का (काहीजण जास्त हुंडा मिळतोय का)यासाठी पहिल्या स्थळाला ताटकळत ठेवणे सर्रास असे. शिवाय मुलीच्या नाकाचा कोन इतके अंशात नाही, किंचित सावळी असली खुस्पटे काढली जात असत. चष्मा असणे हेही कारण असे. आता मुलांनाही ते ऐकून घ्यावे लागते एवढेच! मग पत्रिका जुळत नाही हे सांगणे बरे असते. घरातील ज्येष्ठांना आपल्या स्वभावाचा पुरेपूर अंदाज असतो म्हणून ते योग्य मुलगी/मुलगा आपल्यासाठी पसंत करण्याची शक्यता असते. (१०० टक्के म्हणत नाही). कठीण काळात आपल्याला नक्की कोणती मदत लागेल हे त्यांना त्यामु़ळेच समजते. सूड, दोन प्रतिसाद दिलेत तुझ्या धाग्याला. लक्षात ठेव. ;) जे काही घडले आहे हे फक्त तुझ्याच बाबतीत झालेय असे अज्जिबात नाही. बरेचदा मध्यस्थांचे कन्फ्यूजन, मोठेपणा देण्या घेण्याची गरज यात मुलामुलींची मने दुखावतात. तुझ्यासारखे हजारोजण आहेत हे लक्षात घेतलेस की त्रास कमी होईल. झाल्याप्रकारात मुलीचा दोष कितपत आहे कोणास ठाऊक? तुलाच खरे काय ते माहित. निदान फोटू तरी बघायचास. न जाणो एक खरच चांगली मुलगी मिळाली असती. तुला संसार मामीशी करायचाय की मुलीशी? यापुढे जी मुलगी आवडेल तिची मावशी चांगलीच असेल कश्यावरून?

In reply to by रेवती

शिद 20/11/2013 - 20:05
तुला संसार मामीशी करायचाय की मुलीशी? यापुढे जी मुलगी आवडेल तिची मावशी चांगलीच असेल कश्यावरून?
हे बाकी १००% पटले.

सूड 21/11/2013 - 01:09
ववसुमं आणखी कोणाला खरंखुरं वाटायच्या प्रतिसाद द्यावा म्हटलं. तर, सगळ्यात आधी लेखात नक्की काय म्हणायचंय हे बर्‍याचशा लोकांनी समजून उमजून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. या सगळ्या प्रकारात खटकलेल्या गोष्टी: १) सगळ्या प्रकरणात आपल्याला बाव्हल्यासारखं नाचवलं गेलं ही जाणीव (अर्थात होकार दिला असता तर न जाणो पुढेही तेच घडलं असतं). २) ज्या व्यक्तीचा आपण अगदी आदर करत होतो त्या व्यक्तीने असं वागणं. ३) बरीचशी सूत्र आपण हलवूनसुद्धा शेवटी माझा अपमान झाला हे सांगत सुटणं. बरेच लोक म्हणले की मुलीचा फोटो बघायचा कदाचित पसंत पडली असती, झाला प्रकारच इतका मनस्ताप देणारा होता की आता ती मुलगी अगदी मदनाची पुतळी असली तरी नको असं झालं होतं. नकार पचला नाही असंही काही जणांचं मत पडलं. जसा मला नकार द्यायचा अधिकार आहे तसा तो समोरच्या व्यक्तीलाही आहेच की!! आपलं दिसणं, कामाचं स्वरुप, उत्पन्न, कौटुंबिक पार्श्वभूमी असं काहीही खटकू शकतं समोरच्या व्यक्तीला. ते खटकणं मनात न ठेवता सरळ नकार द्यायला गट्स लागतात ज्या त्यांनी सुरुवातीला दाखवल्या, त्यात काहीही वावगं नव्हतंच. प्रश्न हा होता की एकदा नकार आणि पुन्हा अगदी दोन दिवसांनी होकार. ज्याचा अर्थ ती मंडळी स्वतःच्या निर्णयावर ठाम नाहीत. न जाणो ह्या डळमळीतपणामुळे त्यांनी अगदी लग्नाच्या आदल्या दिवशीही मत बदललं असतं. आता त्यांनी दिलेला नकार कोणीही पचवायचा पण त्यांना कोणाचा नकार पचनी पडत नसेल तर मग काय म्हणावं. असो. झाला प्रकार एकंदरीतच हात दाखवून अवलक्षण पैकी होता. जे यातून गेलेत, जे जातायेत सगळ्यांचेच प्रतिसाद उपयोगी पडतीलच!! धाग्याचं काश्मीर न करता समजून उमजून प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. इति लेखनसीमा!! :)

In reply to by सूड

जेनी... 21/11/2013 - 01:25
पंत अहो मुलीचा काय दोष होता त्यात ? फोटो बघुन , भेटुन ती स्वतहा स्वताहाच्या मतावर किती ठाम राहु शकते हे बघायचं होततना गावाला एवढं महत्व कशाला देत बसायचं

पियुशा 21/11/2013 - 10:08
पुजा इज राइट ! अहो कधी कधी आपण ईतरांच्या( अती) हस्तक्षेपामुळे मुलीचा अथवा मुलाचा काही दोष नसताना सरळ बघण्याआधी नकार कळवतो जे चुकीच आहे अशाने बरीच चांग्ली स्थळ हातची जातात . ( स्वानुभवानी शहाणी झालेली पियु )

नगरीनिरंजन 22/11/2013 - 22:10
प्रतिसादही धाग्या इतकेच रोचक आहेत; पण एखाद्याने एखादा निर्णय घेऊन कृती करून झाल्यावर तू असं करायला नको होतं असं म्हणणे मला थोडंसं क्रूर वाटतं. उगाच त्या माणसाच्या मनात चुकचुक होत राहते. कथानायकाने जे केलं ते योग्यच होतं.