मोदकेन ताडय
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एक दंतकथा
एका राजाची कन्या उपवर झाल्यावर त्या राजाच्या प्रधानाला वाटले की राजकन्येने आपल्या मुलाशी विवाह करावा. पण राजकन्येने ते नाकारले. प्रधान अतिशय भडकला. त्याने सूड उगवावयाचे ठरविले. राजाने त्याला कन्येकरिता वर शोधावयास सांगितले. वरसंशोधनाकरिता हिंडत असतांना त्याला एक अतिशय सुस्वरूप मुलगा एका झाडाच्या फांदीवर बसून बुंध्याकडून ती फांदी तोडतांना दिसला. प्रधानाने त्याला "असे कां करतोस ?" विचारले. तो मुलगा उत्तरला "खाली उतरण्याकरिता". हा महामूर्ख तरुण पाहून प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्याला खाली उतरवून, प्रधानाने त्याला आपल्याबरोबर राजधानीला आणले. त्याला बजावले कीं "तू तोंडातून एक शब्दही काढावयाचा नाही. जे काही सांगावयाचे ते हातवारे करून सांगावयाचे. ही तुझ्याबरोबर असलेली दोन माणसे बोलतील. तुला राजकन्या बायको म्हणून मिळेल" आणि त्याच्याबरोबर दोन विद्वान दिले व दोघांना सांगितले कीं कोणी प्रश्न विचारले कीं तुम्हीच उत्तरे द्यावयाची. मग त्या मूर्ख तरुणाला उत्तम वस्त्रे नेसवून, दागिने घालून दरबारात नेले. राजाला प्रधान म्हणाला, "हा विद्वान तरुण आहे. याच्यासह याचे दोन शिष्य आहेत. काही कारणाने याने तूर्तास मौन व्रत धरले आहे. याला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे हा हातवारे करून सांगेल व त्याचे हे शिष्य त्याचा अर्थ तुम्हाला सांगतील." एवढ्या लहान वयांत या सुस्वरूप तरुणाने एवढी विद्वता प्राप्त करावी व वयाने मोठे असलेल्यांनी त्याचे शिष्यत्व स्विकारावे याचे राजाला मोठे कौतुक वाटले.विद्योत्तमा राजकन्या सुसंस्कृत होती. तिने निरनिराळे प्रश्न विचारले. तरुणाने काहीही हातवारे केले की त्याचे शिष्य त्यांची योग्य उत्तरे द्यावयाचे. राजकन्येला आपल्याला इतका सुंदर विद्वान पती मिळतो याचा आनंद झाला. दोघांचे लग्न झाले. त्याच दिवशी सगळे जलविहाराकरिता तलावात गेले असतांना हा तिच्यावर जोराने पाणी उडवू लागला. राजकन्या म्हणाली "मोदकेन ताडय" (मा+उदकेन ताडय..पाण्याने मारू नकोस) हे चिरंजीव अति हुषार. लागलीच राजवाड्यात जाऊन मोदक घेऊन आले व त्यांनी राजकन्येला मारावयास सुरवात केली. आता राजकन्येला याची विद्वत्ता कळली. तिने सर्वांसमोर याची छीतू केली व त्याला हाकलून दिले.
अपमानित तरुणाने तातडीने नगर सोडले व दूर अरण्यात जावून एका कालिमातेच्या मंदिरात आश्रय घेतला. तिथे त्याने केलेल्या कठोर तपश्चर्येने कालिमाता प्रसन्न झाली व तिने त्याला संस्कृतमधील सर्वोत्तम कवी केले. तो हा "कालिदास"
या दंतकथेचा पुढचा भागही असाच मनोरंजक आहे. कालिदास लगेच नगराला परतला. त्याने राजकन्येचा बंद दरवाजा ठोठावला. कालिदास म्हणाला "द्वारं देहि अनावृत्तं कपाटम् ", दार उघड, आंत येऊं दे. राजकन्येने थोड्या तिरस्कारानेच आतून विचारले " अस्ति कश्चितवाग्विशेष:?" काही सांगण्यासारखे, बोलण्यासारखे आहे कां ? ..... आणि कालिदासाने आपल्या तीन महान काव्यांची सुरवात अस्ति, कश्चित व वाक् या तीन शब्दांनी केली.
अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः !
पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः !! कुमारसंभव
कश्चित कांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त: मेघदूत
वागर्थिव संप्रुक्तौ वागर्थ प्रतिप्रत्यये
जगत:पितरौ वंदे पार्वतीपरमेश्वरौ ! रघुवंश
(श्री. वल्ली यांच्या एका प्रतिसादात "मोदकेन ताडय" असा उल्लेख असलेला श्लोक होता. त्यावरून आठवलेली एक दंतकथा वर दिली आहे. श्री. बॅटमन यांची "चौरपंचाशिका" आपण पहाणारच आहोत पण दुधाची तहान पाण्यावर भागवावयाची असेल तर वा अपीटायज़र म्हणून बिल्हणची मराठी कविता http://misalpav.com/node/13683 पहा. कस्येयं तरुणि हा श्लोक श्रीसुभाषित-रत्न-भांडागारम् मध्ये ३५५/१२२ येथे पहावयास मिळेल.
शरद
प्रतिक्रिया
आवडले.
उत्तम स्फुट.
लिंक ऑफलाईन आहे
नाही. लिंक चालू आहे.
धन्यवाद
है शाबाश !
मस्त.
मस्त +१
एक शब्द दोन अर्थ
मस्तच!
असेच..
मोदकेन ताडय....शाळेत शिकवल
लेख आणि रमेश आठवल्यांचा
मस्त !