Skip to main content

रेल्वे कोर्ट, एक अनुभव

Published on शनीवार, 03/03/2012
ते कॉलेज चे मयूर पंखी दिवस होते. हॉटेल व्यवस्थापन शिकत असतांना संध्याकाळी आम्हाला मुबई मधील अनेक पंचतारांकित हॉटेलात वेटिंग साठी जावे लागायचे. म्हणजे काय तर स्वतःचा पोकेट मनी सुटावा व आपण जे पुस्तकी शिक्षण घेत आहोत त्याची तोंड ओळख व्हावी म्हणून ह्या हॉटेलात आम्हाला काम करायला जावे लागायचे. १९९९ साली १५० रुपये दिवसाचे वर पंचातारीकीत भोजन ( प्रती थाळी ८०० ते ....) वर उंची विदेशी मद्ये अर्थात पैसा सोडल्यास ही खानपान सेवा रात्री बारा नंतर तळे राखी तो पाणी चाखी किंवा हाजीर तो वजीर ह्या न्यायाने आम्हास उपभोगास मिळायची. असेच एकदा एका मोठ्या सिनेतारीकेचा वाढदिवस सकाळी ४ पर्यत साजरा केल्यावर मी फोर्टातून तडक सी एस टी स्टेशन गाठले. घरी कधी एकदा अंथरुणाला पाठ टेकतो असे झाले होते. माझे मित्र मात्र हॉटेलात स्टाफ रूम मध्ये थांबून पेंगत होते. काहींनी हॉटेल च्या कर्मचाऱ्यां सोबत पत्यांचे डाव टाकले होते. मी मात्र आज तडक घर गाठायच्या बेतात होतो. स्टेशन वरून एक नुकतीच सुटलेली गाडी धावत जाऊन पकडली. मालाच्या डब्यात चुकून शिरलो .पण पहाटेची वेळ होती म्हणून मी उतरायचा आळस केला. आणी अचानक रेल्वे पोलिस डब्यात अवतीर्ण झाले त्यांनी माझी व माझ्या बरोबरील सहप्रवाशांची गाठोडी थेट रेल्वेच्या तुरुंगात केली. मधील काळात माझ्या बरोबरील तीन अनवाणी असलेल्या मुलांना ते सिद्धीविनायकाला रांगेत उभे राहण्यासाठी चालले होते, म्हणून त्यांना सोडून दिले.ती पुण्यवान माणसे सुटली व आमच्यासारखी पापी माणसे मागे रखडली. मी जवळील १५० त्यांच्या हातात टेकवण्याचा प्रयत्न करून पहिला,पण आज त्यांना त्यांचे पावती पुस्तक संपविण्याची घाई झाली होती. त्यामुळे माझ्या सारखी मासोळी त्यांना सोडायची नव्हती. ( माल डब्यातून माश्याचा गंध दरवळत असल्याने त्यावेळी हीच उपमा मनात आली) तसे पहिले तर कोळी लोकांमध्ये आणी ह्यांच्यात साम्य होते. कोळी समिन्दारांचे राजे. अथांग समुद्रात जायचे नी जाळे टाकायचे मग मासोळीचा जथ्था घेऊनच परतायचं. तसे हे रेल्वेचे मामा जणू फलाटाचे राजे. संपूर्ण स्टेशनात ह्यांची सत्ता. मनात आले तेव्हा फलाटावरील माणसांच्या अथांग सागरातून आपले सावज त्यांना अगदी सहजतेने गावते. तर एव्हाना आमची वरात कुर्ला स्थानकात आली नी मला जरासे हायसे वाटले कारण आमची ब्राह्मण वाडी कुर्ला स्टेशनला लागून अवध्या ५ मिनिटावर होती. मग आता गेल्यावर तेथे परत उलट तपासणी झाली. कुठे चढला , कुठे गेला होतास ? मग मी सी एस टी आणी ताजमहाल हॉटेल अशी उत्तरे दिली. सगळे माझ्या कडे पहात राहिले. मग माझी कहाणी मी कर्म कहाणी बनवून त्यांना सांगितली, म्हणजे शिक्षण संभाळून नोकरी, घरची हालाखीची परिस्थिती असा भावनिक मालमसाला ठासून माझी कथा संपली. " आता सांगून काय उपयोग, आधी नाही का सांगायचे, आता साहेबांनी पावती बनवली सुद्धा. इति पोलिस मामा म्हणजे माझा इमोशनल कावा फुकट गेला होता, उशीराने आलेले शहाणपण दुसरे काय. मग माझी रवानगी आत कोठडीत झाली. तेथे एक गर्दुला माझ्या बाजूला येऊन" क्या हुआ "अशी चौकश करायला लागला. मी लगेच "तुने क्या किया" प्रतिप्रश्न केला. ५ मिनिटाच्या संभाषणातून एवढे उमगले की तो एक सराईत साखळी चोर असून कालच त्याला पकडले . त्यांचा काळा नीळा झालेला चेहरा त्याच्या शाही पाहुणचाराची साक्ष देत होते. पण त्याला दुखं होते की त्याला चुकीच्या हद्दीत पकडले त्याचे, कारण येथे त्याला साधा चहा सुद्धा विचारला नव्हता. मग मला परत बोलवून घरी फोन करायला सांगितला. फोन घरी नाही असे सांगितले तर ह्यांच्या सवडीने ह्यांनी घरी पोलिस पाठवला असता. घरी फोन केल्यावर थोडक्यात काय झाले ते सांगितले. बाबा कामावर गेले होते नी आई कामावर जायच्या तयारीत . मग आईने दंडाची रक्कम ५५० माझ्या धाकट्या भावाकडून पाठवले. मग मला पावती देऊन सोडले. व हि पावती घेऊन फोर्ट मधील रेल्वे कोर्टात जायला सांगितले. तेथे मला आकारलेल्या दंड जर जास्त वाटला तर न्यायमूर्ती योग्य आकडा सांगतील व समजा त्यांनी ३०० रुपये रक्कम दंडाची ठरवली तर उरलेली रक्कम परत मिळले. असे कळले. रेल्वे कोर्ट म्हणजे अजब प्रकार असतो. तेथे न्यामुर्तीशी हुज्जत घातली तर वाक्यामागे ते दंडाची रक्कम वाढवतात असे वाचून होतो. बाहेर आलो आणी घरी जाण्याच्या आधी नुकत्याच नवीन घेतलेल्या भ्रमण ध्वनिवरून मित्रांना संपर्क केला. त्या काळी आई बापापेक्षा मित्र जास्त जवळचे होते. त्यांनी मग कॉलेज ला दांडी मारून रेल्वे कोर्टात जाऊया असा प्लान केला. कोर्टात जाण्याचा पहिलाच प्रसंग आणी त्या वयात हौस दांडगी, आणी जर २०० ते ३०० रुपये सुटले तर कालचे प्रत्येकाला मिळालेले १५० आणी काही ब ,क दर्जाच्या सिने अभिनेत्याला हरभर्याच्या झाडावर चढवून त्यांचाकडून टीप म्हणून मिळालेले १००० रुपये हे सर्व पाहता छोटेखानी जीवाची मुंबई करायला काहीच हरकत नव्हती. घरी आलो. मग नेहमीचे उपदेशाचे डोस पियुन मी कोर्टात जायला निघालो. अर्थात घरच्यांच्या लेखी एवढे होऊन हा आता कॉलेज ला निघाला म्हणून आलबेल होते. भावाचे तोंड २० रुपयात शिवले गेले होते. आज बेटां सायनच्या गुरुकृपात त्याच्या शाळेतल्या मित्र मंडळींना पार्टी देणार होता. आमचे डोंबिवली मधील बालपणीचे दिवस आठवले तर ३ वर्षात मुंबईने आम्हाला अंतर्बाह्य बदलले होते. पूर्वीची मुंबई राहिली नाही म्हणजे नक्की काय ? मुंबईत नवीन आलेल्या पाहुण्यांनी तिला बदलले की त्यांना हिने बदलले हे एक कोडेच आहे. कोर्टात रक्कम कमी झाली नाही. तेव्हा जरा निराशा झाली होती. पण माझ्या एका मित्राने " च्याला घरी १००१ दंड का नाही सांगितला., दोन शिव्या जास्त पडल्या असत्या" असे सुनावले. त्याचा सात पिढ्या पासून सोन्याची पेढी हा प्रमुख धंदा व परकीय चलन विकणे व विकत घेणे, अडलेल्या माणसाला पठाणी व्याजावर कर्ज देणे. हवाला व इतर अनेक इतर उद्योग होते. त्याने प्रत्येक गोष्टीतून पैसा कसा कमवावा ह्या बद्दल आमची वेळोवेळी शाळा घेतले होती. आज खूप दिवसांनी ह्या घटनेची आठवण झाली. आज सर्वच मित्र चारी दिशांना पांगले. उरल्या आहेत, त्या कॉलेज काळातील आठवणी. मुंगीला देखील चढायला जागा नाही अश्या लोकल च्या डब्यात शिरण्या पेक्षा रिकाम्या अपंग किंवा माल डब्यात शिरण्याचे प्रलोभन कोणालाही पडणे साहजिकच आहे. मग पोलिसांनी जर कारवाई त्यांच्या पद्धतीने केली नाही तर टपावर बसून प्रवास करणारे मुंबई चे अगतिक प्रवासी अपंगाच्या अथवा माल डब्यात घुसले तर कसे चालेल कुर्ल्याला महिन्यातून ३ ते चार वेळा पटरी क्रोस करतांना लोकांचे मृत्यू व त्यांचे लगदा झालेले मृतदेह पांढर्या कापडात स्ट्रेचर वर कृर्ल्याच्या फलाटावर कितीतरी वेळा पहिले आहे. घाई गाडी गाठण्याची अहमिका ह्यामुळे मी कितीतरी वेळा हे दुष्कृत्य केले आहे. . आपल्याकडील आर्थिक सामाजिक विषमतेने माणसांचे लोंढे मुंबई येणार त्याला अपुरे लोकल चे डबे व त्यांच्यावर लक्ष ठेवायला अपुरे पोलिस दल व त्यांच्या मोक्याच्या वेळी दगा देणार्या शोभेच्या बंदुका व दांडके कसे पुरे पडणार? त्या वेळी वयात पोकेट मनी पुरेसा मिळत नाही म्हणून घरून विविध कारणांसाठी पैसा मागायचा ही माझी मानसिकता किंवा अपुरा पगार मिळतो म्हणून काळा पैसा कमावणारे सरकारी कर्मचारी सारे एका माळेचे मणी दोन वर्षापूर्वी मुंबईत आलो तेव्हा असाच घाटकोपर ला मित्राकडे गेलो. जुनी आठवण म्हणून रेल्वे ने जायचे ठरवले. खर तर फलाटावरील काश्मिरी सोडा प्यायचा होता. जलद लोकल ५ सोडल्या पण डब्यात शिरायचे धाडस होईना. जायची घाई नव्हती हा भाग वेगळा. मग अपंगांच्या डब्यात चढलो नी पकडल्या गेलो. कुर्ला येथील पोलिस स्टेशन मध्ये परत ७ वर्षानंतर आलो. त्यांनी काही विचारायच्या आत मी म्हणालो" पावती फाडा" आणी पाकिटातून हजाराची नोट काढली. मला बाजूला नेऊन मग समजावणे सुरु झाले " तुम्ही जंटल मेन लोक असे कसे ........ त्याचा मतितार्थ असा की दंड भरण्यापेक्षा रोख रक्कम द्या.ही लोक माणसे व त्याची देहबोली पाहून पुड्या सोडतात हे अनुभवाने शिकलो होतो. मी रोख रक्कम दिली नी मार्गस्थ झालो. सलमान च्या जागी समजा आपण असतो व आपल्या गाडी खाली कोणी आला तर आपले पालक आपल्याला वाचवतील की त्याने गुन्हा केला आता द्या त्याला हवी ती शिक्षा असे म्हणून मोकळे होतील? माणसे नाही तर सिस्टम चुकीची असते. जी माणसांनी बनविली असते. ती दुरुस्त झाली पाहिजे. परदेशात सुद्धा मी भ्रष्टाचार होतांना पहिले आहे. मात्र ते होतांना कायद्याचे दडपण मग तो भारतीय पाकिस्तानी किंवा गोरा असो त्याला जाणवते. म्हणूनच तेथे भ्रष्टाचार होण्याचे प्रकार कमी आहेत. एवढेच .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5286
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

मला अंबरनाथला रुळ ओलांडला म्हनुन असेच पकड्ले होते. रोख रक्कम स्विकारायला पोलीस तयार होते पण मलाच खुमखुमी आली म्हणालो पावती फाडा. बहुतेक ५००ची पावती फाडली. माझ्यासारखे आणखी १०-१५ लोक पकडले होते.२-३ लोक रोख देउन सुटले. बाकीच्यांना तिथेच थांबवले कारण पैसे नाहीत. मी एकताच रुबाबात पावती फाडणारा. पोलीस म्हणाले तुम्ही २-३० ला या. कल्ल्याणला कोर्टात जावे लागेल. घरी जाउन जेउन परत आलो. पोलीस , ते ७-८ लोक आनी मी असे कोर्टात पोहोचलो. एकाचं नाव पुकारलं , त्याने जजला वाकुन नमस्कार केला, त्याला काहीतरी फाईन केला. एकाच गुन्ह्यासाठी त्या कोर्टाने आम्हाला वेगवेगळे पैसे भरायला सांगीतले. मग माझं नाव पुकारलं, मी हात वर केला , जजः ५०० रुपये. मला वाटले मला बाकींच्यासारखाच कमी भुर्दंड पडेल पण तसे झाले नाही. मग बरोबरच्या पोलीसाला मी विचारले असे का? ते म्हणाले तुम्हाला हवं असेल तर बाहेर वकील आहेत त्यांना पकडा आनी अपील करा. पण अपील करण्याच्या भानगडीत पडुन आणखी चुना लावुन न घेता मी आपली कलटी मारली , एक अजब अनुभव पाठीशी घेउन.

In reply to by विलासराव

काल सांगीतले ते लिहू का?
विलासराव, तुम्ही लिहिण्याचा तो 'सोनियाचा दिवस' कधी येतो आहे, याकडे डोळ्यात तेल घालून बघत आहे, याची तुम्ही नोंद घ्याल अशी अपेक्षा आहे.

In reply to by विलासराव

चालेल.. आणखीही किस्से असतीलच पोतडीत.. वजनकाट्याचा किस्सा कहर होता.. जसा रंगवून सांगीतला तसाच शब्दबध्द करा. :-)

मला नागपूर स्टेशनवर १२वीत असताना पकडले होते. अगदी बेकार अवस्था केली होती. शेवटी ३ तासांनी २०० रुपये घेऊन सोडले.

ब-याच दिवसांनी छान (सगळ्या अर्थाने) लिहीलेले पाहून बरे वाटले.

विलास राव तुमच्या सारखाच माझा कोर्टाचा अनुभव होता. आज पर्यत सिनेमात पाहिलेले कोर्ट व कोर्ट रूम ड्रामा ह्यांनी १९व्या वर्षी मनावर गारुड करून होते. माझे मित्र माझे नाव कधी पुकारणार ह्याची उत्कंठेने वाट पाहत होते. कोर्टात शांतता होती व विशेष नाट्य जे सिनेमात दाखवतात तसे घडत नव्हते. म्हणून त्या रुक्ष कारभारावर वैतागून माझा एक मित्र म्हणाला" आपणच जरा गडबड करुया म्हणजे जज किमान ऑर्डर ऑर्डर तरी म्हणेन" दादर स्टेशन वर आम्ही केलेला एक किस्सा आठवला. १२ ते १५ जणाचा घोळका आम्ही बारावीत असतांना शिवाजी मंदिरात नाटक पाहायला आलो होतो. तिकिटाला लाईन फार व आमचे कॉलेज चे तेव्हा पास ही नव्हता व तिकीट काढले नव्हते. फक्त एका माझ्याकडे दादर चा पास होता..वरती ब्रिज वर ..वरती ब्रिज वर कावळ्यांची शाळा भरली होती . व आम्हाला त्यांची फळी फोडून जायचे होते. प्रसंग बाका होता. तिकीट काढायचा आळस आम्हाला महाग जाणार असे वाटत असतांना माझ्या डोक्यात आयडीया आली. मी माझा पास बेगेत ठेवला व मित्रांना पाठी ठेवून मुद्दाम कावळ्याच्या बाजूने घाईत त्यांची नजर चुकवून जायला लागलो. इच्छित परिणाम साधला गेला व त्यांनी मला बाजूला घेतले. मी त्यांना मला घाई आहे जाऊ द्या असे सांगायला सुरवात केली. त्यांनी तिकीट मागताच मी पाकीट काढून तिकीट शोधण्याचा प्रयत्न केला. व तिकीट इथेच होते असे सांगून गांगरून गेल्याचा साभिनय केला. त्यांना बकरा सापडला ह्याचा आनंद झाला. मला पोलीस ,तुरुंग मग पाकिटात किती पैसे आहेत असे नेहमीचे क्रमवार संभाषण सुरु केले. ह्या धांदली मध्ये ब्रिज वरील गर्दीत माझे मित्र सटकून केले. मग मी काहीतरी आठवल्याचा अभिनय करत बेगेतून पास काढला व ""मम्मीने रखा था, मे भू गया था" अशी बतावणी केली. व मला उशीर झाला आहे. तेव्हा मी निघतो. तकलीफ के लिये माफ करना हे एक सांगून सटकलो. वेळ आणी पैसा ह्यांचा अपव्यय झाल्याचे दुख मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहू शकत होतो. सवयीने एक गोष्ट जाणली होती की कावळ्यांच्या नजरेला थेट नजर भिडवत त्यांचे काय चाललाय हे कौतुकाने ,उत्सुकतेने पाहत तेथून शांत पणे निसटणे हा एकमेव राजमार्ग होता.

आमी पयल्यापासनच लय यिचित्र. तुमच्यागत आस मिळमिळीत आमी काय बी केल न्हाय आमी त्येंच्या बापाला पुरुन शान उरलो व्हतो.Smiley येकदा रेल्वेच्या भायेरच्या लोखंडाला लटकून आमी गेल्तो. पन दहिसरमंदी एक टकूर बोल्ल आर बेन्या आस लटकू नगस न्हायतर तुला पकडत्याल बोरीवलीत. त्या ह्येंद्र्यामुळं आमी पटकशान उतारलो तसा तिथं टपलेला मामा आलाच! मागनं माज्या खांद्यावर हात टाकला (ही समद्या पोलिशांची लगट कराय्ची सवय लै वंगाळ बगा! बाप्या पोरांची आब्रू आस्ती का नस्तीच! आँ?) Smiley मला म्हण्ला, "काय बोल्ला रं त्यो तुला?" म्हण्ल, "कुटं काय?" म्या त्याचा बाप!Smiley त्यो म्हण्ला, "आता ते पोरग काय बोल्ल तुला?" म्या म्हण्ल, "कैच नाय बॉ!" त्येचा नावासारखाच मामा केला त्या येळी. नंतर त्ये मला इचारुन इचारुन भंडावल पण म्या त्यालाच खूळ्यात काढलं! Smiley शेवटी आम्च्या त्वांडाला न लागताच ते बेनं मला हापिसात सोडून दुसरीकडं कुटंतरी पळून गेलं. आगदी --ला पाय लावून पांदीला पळत्यात तसचं. आता म्या सायबाकडं मोर्चा वळीवला सायबाला बोल्लू कशाला मला धरूनशान आण्लै? Smiley तस सायबानं तडकुन त्याच धमकीचं गुर्‍हाळ गाळलं आन आमी त्याच्या आकलच! Smiley आमी काय केलंच न्हाय आसं छाताड ठोकून सांगितल, सायब बोल्ला. आता तुला दंड भरावा लागणार. म्या म्हण्लं म्या शेल्समन हाय! फुटक छदाम पन न्हाय आपल्याकडं. आता कुटंला पैका घेताय तो घ्या आनं कुटंली कारवाय कराय्ची हाय ती बी करा जा! Smiley शेल्शमनच नाव ऐकून तर सायबान स्वताच्या टकूर्‍यावरच हात मारुन घेत्ला! Smiley थोड्याच येळात आमी राजासारखं तिथून सन्मानानं भायेर पडलो. Smiley त्या दिसानंतर आजतागायत त्ये सायेब मला तिथं कंदीबी दिसल न्हायीत! बिच्चारं.......!!!! च्यू च्यू..च्यू..Smiley

लेखातील व प्रतिसादातीलही अनुभव रोचक आहे.

हाहाहा... माझ्या मित्राने केलेली धमाल. वाशी स्टेशनला टीसीला पाहून असा चेहरा करुन ट्रेनमध्ये चढला की जसं ह्याच्याकडे तिकीटच नाही आणि त्या टीसीने त्याचा बेलापूरपर्यंत पाठलाग केला. बेलापूर स्टेशनला उतरताना टीसीने त्याला हटकल्यावर त्याने पास दाखवला आणि पास बघताच टीसीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.. - पिंगू

In reply to by अन्या दातार

+१

लेखातला अनुभव आणि इतर प्रतिक्रिया फार आवडल्या!

तिकीट न काढता भ्रष्टाचाराचे मार्ग आदानप्रदान करतांना पाहून काय बोलावे ते सुचत नाही. असो पण लेख अन प्रतिक्रिया छान आहेत. बर्‍याचजणांना कामात येतील.

विनातिकीट प्रवास करतांना माझ्या एका मित्राला कस्टडीची हवा खावी लागली होती. ते आठवले. छान लेखन.

हे सगळे "रेल्वे कोर्ट की हवा" खानेवाले लेखक असे छुपे रुस्तम आहेत. उचला लेखणी आणि भरा रंग मिपावर!! :) हॅप्पी होळी!! :)