या चर्चात्मक विनोदी लेखनात आपल्याला तीन पात्रे भेटतील.
कधी तिघेही एकत्र ,तर कधी दोघे, तर कधी एकेकटे.
मिस्टर विनोद विरंगुळे,
मिस्टर गंभीर विचारे,
मिस चर्चा गुऱ्हाळे
--ही ती तीन मजेदार व्यक्तीमत्वे.
या तीघांचे जे प्रताप किंवा संवाद (की वाद) असतील त्याला आपण म्हणूया "गंभीर विनोदी चर्चा" आणि या चर्चेत ते करतील अर्थाचा विनोदी अनर्थ.
(१) एक रुपयात अनर्थ
तर आपला 'विनोद विरंगुळे' एकदा सहज रस्त्याने जात होता.
एका एस. टी. डी. बुथवर तो अचानक थबकला. खिशात हात घालून पैसे आहेत का ते तपासले. अचानक आनंदला. बुथवर 'आनंद अवकाळे' बसला होता.
आनंदः काय रे विनोद! कसे काय? आज एकदम आनंदात? नाव विनोद असून तू नेहेमी गंभीर असतोस. आज आनंदी आहेस. ते कसे काय?
विनोदः तू जरा थांब. मला फोन करायचे आहेत.
असे म्हणून विनोद फोन करू लागला. आधी त्याने केरळ मध्ये फोन केला. नंतर तामिलनाडू, हैदराबाद, काश्मीर, दिल्ली, पुणे, मुंबई.. याप्रमाणे एकाही प्रदेशाला सोडले नाही. सगळ्या ठीकाणी फोन केलेत. आनंद दु:खात बुडाला, कारण एवढे सगळे फोन केल्यावर विनोद पैसे देईल का ती शंका त्याला येत होती. पण यावेळेला विनोद आनंदचे ऐकेनासा झाला.
विनोदः वा वा वा! काय सोय केली आहे शासनाने. मजा आली. मी तामीलनाडू च्या एयरपोर्ट्वर, हैदरावाद च्या माझ्या मित्राला, असे सगळे फोन आज शासनामुळे करू शकलो.
असे म्हणत त्याने आनंद समोर एक रुपया टिकवला.
आनंदः हे काय? एक रुपया? फक्त? अरे शंभर रुपये झालेत.
विनोदः शंभर रुपये कसले? तू या फोनसमोर काय सूचना लावली आहेस? वाचः एक रुपयात संपूर्ण भारतात बोला. मी पूर्ण भारतात बोललो. हा घे एक रुपया.
आनंद: अरे असे शब्दशः अर्थ घेतल्याने त्याचे अनर्थ होतात बाबा. चल दे शंभर रुपये. नाहीतर मी एक रुपयात पोलिसांना बोलावीन.
विनोदः (शंभर रुपये आनंदला देत म्हणाला) अशा दुकानासमोर पाट्या लावायच्या आनी गिऱ्हाईकांना फसवायचे हे बरोबर नाही. मी तक्रार करीन. ग्राहक मंचाकडे. चल येतो आता.
विनोदने चर्चाला आपल्या मोबाईलवरून फोन लावला: "चर्चा. लवकर निघून ये. मी एक रूपयात संपूर्ण भारतात बोलायचा नादात शंभर रुपये घलवून बसलो. आता माझेजवळ घरी जायला पैसे नाहीत. तू प्लीज पैसे घेवून ये "
(२) गजिनी इफेक्ट
त्या प्रसंगानंतर विनोद बाईकवरून चर्चासोबत जात होता. रस्त्याने त्यांना त्यांचा जिवलग मित्र गंभीर विचारे भेटला. त्याने फक्त पॅण्ट घातलेली होती. बाकी शरीर उघडे होते. त्यावर मध्यभागी छातीवर लिहिलेले होते "गॅस संपला आहे." उजव्या हातावर लिहिले होते, "लाईट बील भरण्याची शेवटची तारिख ३१/०२/२००९", डाव्या हातावर एक भली मोठी यादी होती, "एक किलो कांदा, चार किलो बटाटे, मेथी, पालक, गाजर, वाटाणे" पोटावर लिहिले होते, "दोन सामोसे, चार वडा पाव, तीन पाव भाजी" आणि त्याचे चेहेऱ्यावर वैचारिक आणि सांसारिक अजीर्ण झाल्याचे भाव दिसत होते.
दर पाच मिनिटांनी मोबाईल वर त्याच्या बायकोचा फोन येत होता व ती त्याला सांगायची,"आरसा बघा" मग तो खिशातून आरसा काढून शरीरावर लिहिलेले बघायचा आणि आणखी त्याचा चेहेरा आक्रसायचा आणि पुन्हा तो आक्रसलेला चेहेरा आरशात पाहून तो पुन्हा गंभीर व्ह्यायचा.
लग्न होण्यापूर्वी कॉलेज जीवनात हा म्हणे बेस्ट कॉमेडीयन होता.... आणि त्याचे लग्न झाले. हसणे बंद झाले. असे म्हणतात की, त्याचे लग्नापूर्वी नाव 'हर्षल हसवे' होते, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी त्याने नाव बदलून गंभीर विचारे केले.
चर्चा ने गाडी थांबवली. म्हणाली, " अरे विनोद बघ. संसारात पडल्यावर असे होते. आपण कॉलेजमधले तिघे जीवलग मित्र. पण या गंभीर विचारे चे लग्न झाल्या पासून त्याचे हाल काय झालेत बघ. त्याने 'गजिनी' ला गंभीरपणे मनावर घेतलेले दिसते आहे."
विनोद : "अरे, गंभीर, थांब की! कुठे चाललास? "
गंभीर ने खिशातून आरसा काढला व डाव्या गालावर धरला, त्यावर बायकोची पाच बोटे उमटलेली होती व पाचही बोटांवर त्याने आज करावयाच्या कामांची यादी लिहिलेली होती.
गंभीर : "अरे मला घाई आहे. मला बरीच कामे करायची आहेत. मी सतत कामे विसरायला लागल्यावर बायकोने गजिनी बघून एक गोंदण मशीन विकत घेतले. आणि त्यानंतर ... असे माझे हाल झालेत.. तीच्या मते मला 'शॉर्ट टर्म मॅरेज लॉस' आणि ' लॉंग टर्म शॉपींग लॉस' झाला आहे."
चर्चा : 'लॉंग टर्म शॉपींग लॉस' ठीक आहे रे, पण हा 'शॉर्ट टर्म मॅरेज लॉस' काय भानगड आहे?
गंभीर : "त्याचे असे आहे की, मी बरेचदा रस्त्याने सुंदर मुलगी दिसल्यास, लग्न झाल्याचे विसरून जातो. त्याला माझ्या बायकोने हे नाव दिलेले आहे. आणि त्यासाठी ते मी विसरू नये म्हणून सुद्धा बरेच ठीकाणी गोंदलेले आहे..असो ..."
एवढ्यात त्याच्या बायकोचा फोन वाजला आणि तो घाबरून घाईघाईने बाजारात पळाला. त्याचे उघड्या पाठीवर लिहिले होते, "हरवल्यास खालील पत्त्यावर आणून देणे- पत्ता"
चर्चा आणि विनोद यांची हसून हसून पुरेवाट झाली. ते जावू लागलेत. चर्चा म्हणाली, "अरे तू गजिनी पाहिलास का? आमिरने काय बॉडी बनवली आहे त्यात! सुपर्ब"
विनोद : " हो पाहिला आहे"
चर्चा : " तोच चित्रपट जर का करण जोहरने किंवा चोप्रा कंपनीने बनवला असता तर त्याचे नाव काय असते माहिती आहे? "
विनोद : " काय? "
चर्चा : "रब ने बनादी बॉडी"
विनोद : "आणि जुन्या काळात हा चित्रपट बनला असता तर त्यातले गाणे काय असते सांगू: "भूल गया सब कुछ, याद नही अब कुछ, हो हो हो, गजिनि ... ओ ओ ओ , मै आ राहा हू..."
प्रतिक्रिया
22 Feb 2009 - 11:32 am | भडकमकर मास्तर
सांसारिक अजीर्ण झाल्याचे भाव
:)
छान आहे ...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
22 Feb 2009 - 5:44 pm | टारझन
ह्यावर कोणत्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत ? (गौतम) गंभिर की विणोदी(कांबळी) ?
22 Feb 2009 - 11:04 pm | पक्या
रब ने बना दी बॉडी :)
गंभीर विनोदी चर्चा चांगली वाटली.