प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित. अशा अंनिसच्या हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख अंनिस वार्तापत्राच्या त्यावेळच्या संपादक मंडळाने नाकारला. असे समजले की त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होत होते म्हणून नाकारला गेला. नंतर मी तो लेख मनोगत या जालीय दिवाळी अंकात प्रसिद्ध केला. तसेच तो माझ्या ब्लॉगवर ही आहे. शिवाय तो अन्य संकेतस्थळांवर पण टाकला आहे. मिपावर मात्र टाकायचा राहिला असे लक्षात आल्याने तो आत्ता टाकतो आहे. अनेकांनी तो लेख आवडल्याचे आवर्जून कळवले होते. अंनिस वार्तापत्रात नंतर व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होणारे असंख्य लेख येउन गेले. असो. कदाचित त्यामुळेच त्यानंतर रिसबूडांविषयी असलेला आदर अनेक ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मी सोडली नाही. 2005 मधे मला वार्तापत्र लेखक पुरस्कार मिळाला. तो घ्यायला आयुष्यात एकदाच सांगलीला गेलो होतो. तेव्हा एक त्यांची आठवण झाली कारण त्या पुरस्काराचे खर्या अर्थाने असलेले मानकरी हे माधव रिसबुड हेच आहेत. त्यांची आठवण येत नाही असा दिवस जात नाही.
माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'.
किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला.
डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?" हे पुस्तक लिहायला घेतले.
"राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे."
फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील "कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी "कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक" हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला.
रुडॉल्फ एच. स्मिट "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. "ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले.
नाडी भविष्य आणि रिसबूड
त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत.
शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे?
श्रद्धेचा दुसरा भाग
श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला.
पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका
अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक.
शेवटचा लेख
फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो.
( पुर्वप्रकाशित मनोगत दिवाळी २००७)
प्रतिक्रिया
21 Sep 2020 - 5:47 pm | मराठी कथालेखक
स्थान हा काल्पनिक बिंदू आहे
म्हणून स्थान निरर्थक असे मानले.
म्हणजे दोन स्थानांतले अंतर हे सुद्धा निरर्थक
जर अंतर निरर्थक तर लांबी सुद्धा निरर्थक
जर लांबी निरर्थक तर शिंपी दोन मीटर कापड कसे मोजणार ? म्हणजे शर्ट नाही ...आणि उघड्याने रहाणे आले..
[कृपया एक गमतीदार उहापोह म्हणून या प्रश्नाकडे बघावे. नव्या वादाची सुरुवात होवू नये]
22 Sep 2020 - 12:00 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
असहमत.
गाडी स्थानकातून वेगाने सरकते आहे. गाडीचा चालक आणि आईन्स्टाईन या दोघांतही स्थानभेद आहे. पण (आईनस्टाईनच्या सापेक्षतावादानुसार) त्यांचं वस्तुस्थितीचं आकलन समान आहे. कारण की दोघांचा सापेक्ष वेग ० आहे.
याउलट जातक स्थानकात स्थिर असल्याने आईनस्टाईन व जातक यांच्यात default स्थानभेदासोबत वेगभेदही आहे. म्हणून (आईनस्टाईनच्या सापेक्षतावादानुसार) त्यांच्या वस्तुस्थितीच्या आकलनांत फरक आहे.
वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष असण्यामागील कारण स्थानभेद नसून वेगभेद आहे. असं आईनस्टाईन म्हणतो.
आ.न.,
-गा.पै.
22 Sep 2020 - 12:55 am | गवि
ज्योतिष विषयाशी या चर्चेचा कसा संबंध जुळतो ते अजिबात कळलेलं नाही. पण केवळ वेगभेद इतकाच फरकाचा मुद्दा नसून गुरुत्वाकर्षण क्षेत्राचे बल हाही भाग आहे. हे ट्रेन आणि फलाट यांबाबत लागू होणार नाही... पण ढोबळ उदा घेऊन सोपे करायचे तर .. (हे मी ज्यांना नेमका अंदाज नसेल अशांसाठी लिहितोय. अधिक चांगल्या शब्दात कोणी भौतिकशास्त्र विद्यार्थ्याने सांगितलं तर उत्तमच)
पुरेसे जास्त गुरुत्वीय बल असणार्या वस्तूमुळे (उदा. प्रचंड तारा) त्याच्या आसपास स्पेसटाईम हा घटक (निरीक्षकांना जाणवण्याइतपत) ताणला अथवा खेचला गेल्यासारखी स्थिती बनते आणि तिथून प्रकाशाला पार व्हायला अधिक "वेळ" लागतोय किंवा कोणतीही घटना तिथे तुलनेत हळू घडतेय असं त्या क्षेत्राबाहेर दूर असलेल्या निरिक्षकाला "भासतं". समजा "अ" हा पृथ्वीवर आहे. आणि "ब" एका अति अवजड तार्यानजीक (कशाला मरायला ) पोचला आहे..
तर तुलनेत खूप कमी गुरुत्वीय बल असलेल्या क्षेत्रातून बघणार्या व्यक्तीला (उदा पृथ्वीवरील आपला "अ") ती उच्च गुरुत्वीय क्षेत्रातील व्यक्ती "ब" स्लो झाल्याचे (इथून) भासेल. वास्तवातही ती "ब" व्यक्ती पुन्हा पृथ्वीवर आल्यास तिच्या जड तारा भ्रमंतीतील आभासी कालगणनेपेक्षा पृथ्वीवरचा आभासी काल फास्ट पुढे गेल्याचे तिला "जाणवेल".
पण पण पण अ किंवा ब या दोघांनाही आपापला काळ एकाच आभासी वेगाने सरकत असल्याचे या पूर्ण घटनाक्रमात जाणवेल.
अ आणि ब नसतीलच तर हा काळाच्या जाणिवेतला फरक अस्तित्वात येणार नाही. कारण..
पुन्हा एकदा. काळ ही काल्पनिक सोयीस्कर कल्पना आहे. तिला भौतिक अस्तित्व नाही.
पण पुन्हा एकदा.. या सर्वामुळे ज्योतिष अथवा कोणतीही भौतिक जगातली कल्पना निराधार कशी ठरते हे कळत नाहीये.
व्यवहारात आभास तर आभास, त्याला मानूनच सर्व करावे लागणार. हमको भी मालूम है "काळ" की हकीकत लेकिन दिल के ख़ुश रखने के लिये ए जालिम ..
-(भौतिकशास्त्र पदवीधर) गवि
22 Sep 2020 - 1:31 am | संजय क्षीरसागर
ज्योतिषाचा काल आणि स्थल (जातकाचे जन्मस्थान) यावर उभारला गेला आहे. घाटपांडे म्हणाले, संक्षींनी काल हा भास आहे हे सिद्ध केल्यानं एक कणा मोडला. आता दिक्काल या संकल्पनेची वाट लावली की ज्योतिष हे सर्वस्वी थोतांड आहे हे सिद्ध होईल.
त्यावर माझं म्हणणं आहे की अवकाश अखंड आहे त्यात भेद होऊ शकत नाही त्यामुळे स्थल हा काल्पनिक बिंदू आहे. तिथे चर्चा संपन्न झाली होती.
पण प्रतिसादात मी म्हटलं की आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादात निरिक्षकाच्या स्थानामुळेच आकलनात फरक पडतो. खरं तर तो पासिंग रिमार्क होता, पण त्यावर गामा हट्टाला पेटले आणि सुरुवात झाली.
__________________________________________
आता वरच्या प्रतिसादात हे क्लिअर झालं आहे
अशाप्रकारे, सापेक्षतावादात निरिक्षकाच्या स्थानामुळेच आकलनात फरक पडतो हा माझा मुद्दा सिद्ध झाला आहे !
22 Sep 2020 - 1:35 am | संजय क्षीरसागर
ज्योतिषाचा डोलारा काल आणि स्थल (जातकाचे जन्मस्थान) यावर उभारला गेला आहे.
22 Sep 2020 - 1:49 am | गवि
हो. स्थान महत्वाचे आहेच. पण तुम्ही ही थियरी ज्योतिष विषयाच्या खंडनासाठी वापरुन उगीचच ज्योतिष विषयाच्या मूळ गृहितकांना फार गांभीर्याने घेताय. ज्योतिष हे ग्रह काल स्थळ यांच्याशी निगडीत आहे हे गृहीतक मोडून दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. पण ज्योतिष, भविष्य हा विषय (भौतिक)शास्त्राचा नाहीच मुळी. तो अनिश्चितता असलेल्या जगण्यात लोकांना लागणार्या मानसिक आधारासाठी असलेला एक व्यावहारिक प्रकार आहे. यातील ग्रहस्थिती, जन्मस्थळ, वेळ वगैरे मुद्दे हे त्यात काहीतरी अगदीच रैंडमनेस नसून ते एक अभ्यास आणि तर्काधारित शास्त्र आहे असा विश्वास आणण्यापुरते आहेत. त्यावर "अधिक अभ्यास" केवळ स्टैटिस्टिक्सच्या अंगाने होऊ शकतो. Causal relation दाखवणे "भौतिकशास्त्राच्या" आधारे तरी शक्य नाही. शक्य असतं तर एव्हाना तो कार्यकारण भाव establish झाला असता. तेव्हा त्याच्या खंडनासाठीहि भौतिकशास्त्र invoke करण्यात मतलब दिसत नाही.
पण प्रत्यक्ष त्यावर (भविश्यावर) विश्वास असलेले लोक त्यात आधार शोधतात. तो सोपा आणि हवासा आधार असतो. तुम्ही किंवा मी जी क्लिष्ट (आणि या व्यावहारिक बाबतीत थेट संबंधही नसणारी) भौतिकशास्त्र बेस्ड थियरी सांगतोय ती जाणून त्यातून तो आधार मिळणं बहुतांश लोकांना शक्य नाही. त्यामुळे ते ज्योतिष असू दे.
तुम्ही पत्ते खेळणे या प्रकारात मी नेहमी जिंकतो किंवा अमुक एकजण नेहमी हरतो वगैरे कोणी बोलत असल्यास किंवा त्यावर पैसे लावून खेळून त्यात कमावण्याचं एक शास्त्र आहे अशी चर्चा कोणी केल्यास त्याचा इतका शास्त्रीय किंवा गणिती प्रतिवाद कराल का?
भविश्याच्या नादी लागून सर्वांचे प्रचंड नुकसानच होतं आहे किंवा त्यापासून त्यांना भौतिकशास्त्रीय थियरीने दूर करता येईल या दोन्ही गोष्टी पटत नाहीत.
तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे हे दिसतं,पण...
उर्जा व्यर्थ जातेय. वेगळ्या विचारांचे तत्वचिंतन तुम्ही उत्कृष्टरित्या मांडता. पूर्वी गेस्टाल्ट, फिश बाऊल, हॉकिंग वगैरे विषय किंवा हजार चिन्तानी डोके खाजवतो कविता या अनुषंगाने प्रभावी विचार मांडलेले आठवतात.
हेच सर्व तत्वज्ञान कोणाचेही खंडन न करता मांडत राहिल्यास ते अनुसरले जाण्याची अतएव त्याचा लाभ जास्त लोकांना होण्याची शक्यता वाढेल.
22 Sep 2020 - 11:46 am | संजय क्षीरसागर
१.
माझ्या ललित लेखनाचा उद्देश मौज असतो आणि बाकी सर्व लेख किंवा प्रतिसाद लोकांच्या चुकीच्या धारणा निस्सरित करण्यासाठी असतात. अशा धारणा संपल्या की व्यक्ती निर्भ्रांत होते, विचारात कमालीची क्लॅरिटी येते आणि परिणामी सहजपणे वर्तमानात येऊन आपण स्वतःशी कनेक्ट होते. हे स्वतःशी कनेक्ट होणं स्वास्थ्य आहे. जीवनातल्या सर्व अस्वास्थ्याचं एकमेव कारण हा डिसकनेक्ट आहे.
२.
लोकांना त्यांच्या धारणा प्राणाहून प्रिय असतात आणि त्यांना धक्का लगतोयं म्हंटल्यावर ते कृतज्ञ होण्याऐवजी उफाळून उठतात. प्रतिवाद संपला किंवा संपतोयं असं वाटायला लागलं की ते व्यक्तीगत होतात आणि मग मूळ विषय भरकटतो.
उदा. देवाचं नांव कुणी ठेवलं ? इतका साधा सरळ लेख, कोणतंही खंडन न करता मांडलेली वस्तुस्थिती. पण पब्लिकनी आपल्या धारणा कशा ज्याम पकडून ठेवल्या आहेत ते खास बघण्यासारखं आहे.
३.
दिलसे धन्यवाद ! आपल्याला जे समजलंय ते दुसर्याला सांगण्यात एक खुमारी आहे. चौफेर व्यासंगाचा या निमित्तानं एक दस्तैवज तयार होतो. माझं लेखन जगभरात वाचलं जातं याचा प्रत्यय मध्यंतरी आला. लंडनमधल्या एकानं पुण्यातल्या त्याच्या भावाला फोन करुन माझा शोध घ्यायला सांगितला. तो भाऊ नेमका माझा मित्र निघाला. ते गृहस्थ इथे आल्यावर त्यांनी शाही पार्टी अरेंज केली, दिलखुलास गप्पा झाल्या. पुण्यातल्या (निगडी) एका दांपत्याची, एकुलती एक डॉक्टर मुलगी ऐन तारुण्यात अॅक्सीडेंटमधे गेली. नेटसर्फिंग करतांना त्यांच्या पत्नीनं माझे मनोगतवरचे लेख एखाद्या पुस्तकासारखे मन लावून वाचले आणि ती कमालीची शांत होऊन त्या परिस्थितीतून बाहेर आली. माझा एक टेबलटेनीस ग्रुपमधला मित्र म्हणाला त्यांना तुला भेटायचंय, त्या वेळी ही हकिकत कळली.... अजून काय हवं ?
22 Sep 2020 - 4:59 pm | प्रकाश घाटपांडे
यातील ग्रहस्थिती, जन्मस्थळ, वेळ वगैरे मुद्दे हे त्यात काहीतरी अगदीच रैंडमनेस नसून ते एक अभ्यास आणि तर्काधारित शास्त्र आहे असा विश्वास आणण्यापुरते आहेत. त्यावर "अधिक अभ्यास" केवळ स्टैटिस्टिक्सच्या अंगाने होऊ शकतो. Causal relation दाखवणे "भौतिकशास्त्राच्या" आधारे तरी शक्य नाही. शक्य असतं तर एव्हाना तो कार्यकारण भाव establish झाला असता. तेव्हा त्याच्या खंडनासाठीहि भौतिकशास्त्र invoke करण्यात मतलब दिसत नाही.>>>>>>>
भविश्याच्या नादी लागून सर्वांचे प्रचंड नुकसानच होतं आहे किंवा त्यापासून त्यांना भौतिकशास्त्रीय थियरीने दूर करता येईल या दोन्ही गोष्टी पटत नाहीत.>>>> गवि या मुद्द्याशी अगदीच सहमत आहे. मी सर्वसामान्य तार्किक पातळीवर यात चिकित्सा कशी करता येईल याबाबत देखील मुद्दा मांडला होता. पण तत्वज्ञानाच्या गदारोळात तो तसाच राहिला.
http://www.misalpav.com/comment/1080099#comment-1080099
22 Sep 2020 - 6:33 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
मी हट्टाला पेटून प्रमाणाबाहेर वाद घालंत बसलो हे खरंय. त्यामागे तुमच्या विधानात अचूकता असावी इतकाच आग्रह होता. किरकोळ शेरा ( = पासिंग रिमार्क ) असला तरी वाचकाचा प्रचंड गोंधळ उडू शकतो. तो तसा उडू नये इतकीच अपेक्षा आहे.
आ.न.,
-गा.पै.
22 Sep 2020 - 11:29 pm | संजय क्षीरसागर
गोंधळ तुमचा उडाला होता हे लक्षात आलं असेल (गविचे दोन्ही प्रतिसाद पुन्हा बघा).
मी मुद्दा सिद्ध केला आहे आणि त्यामुळे आता तुम्हाला क्लॅरिटी आली असावी.
अर्थात, तुमच्याशी झालेल्या सर्व चर्चा, या संकेतस्थळासाठी पारस्पारिक सभ्यतेचा वस्तूपाठ आहेत आणि त्यात मला कायम मजा आलेली आहे. 👌
____________________________________
इथे मात्र ज्या सदस्यांना सापेक्षता वादाची शून्य माहिती आहे त्यांनी (नेहेमी प्रमाणे) केलेली निर्बुद्ध व्यक्तीगत शेरेबाजी; ज्यांचा खरडफळ्या पलिकडे वकूब नाही आणि आपल्या प्रछन्न गलिच्छतेचं सोशल फोरमवर प्रदर्शन करायची काहीही लाज वाटत नाही अशांनी मारलेल्या कमेंटस. संकेतस्थळावर केवळ पिंका टाकण्यापलिकडे काहीही अक्कल नसलेली त्याचू मंडळी आणि विषयाचा आवाका बघून स्वतःच्या छपरीपणाची जाणीव झाल्यावर, मला व्यनितून लिहा सांगणारे महाभाग यांना सणसणीत थोतरीत बसली आहे. इथून पुढे ते धडा घेतील अशी आशा करु. 👍
23 Sep 2020 - 1:36 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
माझा आजिबात गोंधळ उडाला नाही. कारण की मी आईनस्टाईनचा विशिष्ट सापेक्षतेचा सिद्धांत वाचून व समजून घेतला होता.
आ.न.,
-गा.पै.
23 Sep 2020 - 1:47 am | संजय क्षीरसागर
तुमचा प्रतिसाद वाचा :
हा तुमचा गोंधळ होता. अजून ही उलगडा झाला नसेल तर गविंचे दोन्ही प्रतिसाद वाचा.
23 Sep 2020 - 4:46 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
हा माझा गोंधळ नव्हे. गरज नसतांना आईनस्टाईनचं नाव घेतल्यामुळे तुमचा गोंधळ उडाला होता. तो मी दूर केला.
धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
23 Sep 2020 - 7:09 pm | संजय क्षीरसागर
माझा पहिला प्रतिसाद वाचा आणि तुमचा गोंधळ कुठे आहे ते (माझ्या वरच्या प्रतिसादात) बघा.
मी अजूनही (आणि कायम) माझ्या पहिल्या प्रतिसादावर ठाम आहे.
24 Sep 2020 - 2:14 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमच्या या प्रतिसादात आईनस्टाईनचं नाव नको.
बस इतकंच.
आ.न.,
-गा.पै.
24 Sep 2020 - 4:08 pm | संजय क्षीरसागर
एक जण पृथ्वीवर आहे आणि दुसरा तार्यावर म्हणून त्यांच्या निरिक्षणात फरक आहे.
ज्योतिषात ही एकावेळी जन्मलेल्या दोन जातकांच्या जन्मस्थानावरुन फेकंफाक बदलते.
असा त्या विधानाचा अर्थ आहे. आता तुम्हाला मुद्दा कळला असावा.
आणि रिलेटिवीटीची तर बातच सोडा, मला अबसल्यूट काय आहे ते माहिती आहे, त्यामुळे चूक असंभव आहे. आता चर्चा अबसल्यूटकडे वळवू नका ! 😄 😄
24 Sep 2020 - 7:52 pm | सुबोध खरे
मला अबसल्यूट काय आहे ते माहिती आहे, त्यामुळे चूक असंभव आहे.
गा पै
हे समजलंय ना
23 Sep 2020 - 3:29 am | कोहंसोहं१०
प्रकाश सर,
तुमचे प्रतिसाद मला थोडे गोंधळात टाकणारे वाटतात. असे वाटते आहे की तुम्ही दोन्ही दगडांवर पाय ठेऊन आहात. असो.
ज्योतिष खरे का खोटे यावर तार्किक वादविवाद करण्याऐवजी केवळ दोन प्रश्नाची उत्तरे हवीत:
१. ज्योतिष खोटेच असे ठासून सांगणाऱ्यांनी कधीतरी चांगल्या ज्योतिषाची योग्य प्रश्नानुरूप (ज्याचे प्रेडिक्शन ज्योतिषाच्या माध्यमातून दिले जाऊ शकते) शहानिशा करायचा प्रयत्न केला आहे का? असेल तर अनुभव वाचायला आवडेल
२. ज्योतिष संपूर्णच खोटे असेल फसवणूक असेल तर आत्तापर्यंत ते संपूर्णपणे लयाला जायला हवे. पण लोकांना अनुभव तर येतात. ते कसे?ज्योतिष हा फक्त अंदाजे फेकलेल्या प्रोबॅबिलिटीचा खेळ असेल तर काही उत्तम ज्योतिषांची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आणि अचूक कशी (काही प्रश्नांमध्ये मिळणारी उत्तरे अगदी मिनिटामध्ये बरोबर आली आहेत)?
मागे एका प्रतिसादात मी लिंक शेयर केली होती केस स्टडीज साठी जिथे एका ज्योतिषाने बऱ्याच केसेस, रिजल्ट, जातकाचे प्रतिसाद सर्व काही शेयर केले आहे. बरेचसे जातक प्रतिसाद योग्य शिक्षण घेतलेले आहेत म्हणजे उगाच सहज मूर्ख बनवता येईल असे नाहीत.
बरे आवर्जून प्रतिसाद देतात आणि नमूद करतात म्हणजे निर्णय दिल्याप्रमाणे घडलेले देखील असावे.
काही केस स्टडीज तर फारच अचूक प्रेडिक्शन चे आहेत (अगदी मिनिटामध्ये).
उत्तम प्रेडीक्शन्स देणारे अनेक ज्योतिष देशामध्ये असतील ज्यांचे बरेच प्रेडीक्शन्स बरोबर आले असावेत
ज्योतिष हा फक्त अंदाजे फेकलेल्या प्रोबॅबिलिटीचा खेळ असेल तर काही उत्तम ज्योतिषांची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आणि अचूक कशी (वर नमूद केल्याप्रमाणे काही प्रश्नांमध्ये मिळणारी उत्तरे अगदी मिनिटामध्ये बरोबर आली आहेत)?
कितीही फेकंफाक केली तरी इतके अचूक तेही बऱ्याचदा येणे जवळपास अशक्य आहे.
मग ते कसे होत असावे?
माझ्या मते उगाच शुष्क तार्किक वादविवाद करण्यापेक्षा एकतर अनुभव (हवं तर परीक्षा) घेऊन पहा मग ठरवा.
23 Sep 2020 - 3:57 am | कोहंसोहं१०
सहजच उदाहरण म्हणून हे २ घेऊयात. अशी अनेक सापडतील पण सध्या हे एक पुरे.
https://www.mblog.suhasgokhale.com/%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a4%b2-%e0%a4%a7...
https://www.mblog.suhasgokhale.com/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%82%...
जाता जाता थोडेसे जास्त अचूक प्रेडिक्शन (विचारलेला प्रश्न गहन नाही पण मुद्दा अचूकतेचा आहे त्यादृष्टीने पाहिल्यास चांगले उदाहरण वाटते) चे एक उदाहरण:
https://blog.suhasjyotish.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A...
वरील उदाहरणात नमूद केलेला टेक्निकल भाग सोडला तर कोणीही असे प्रेडिक्शन अंदाजपंचे करून बरोबर उत्तर देऊ शकेल का? तेही प्रोफेशनल पद्धतीने रीतसर पैसे घेऊन? कारण उत्तरांच्या प्रोबॅबिलिटीज जवळपास असंख्य आहेत.
ज्योतिषशास्त्राला निराधार, फेक म्हणणाऱ्यांनी याचाही विचार करून पटेल असे उत्तर शोधावे (उगाच अहंकार जपण्यासाठी स्वतःचा मांडलेला मुद्दा रेटायच्या हेतूने नको)
23 Sep 2020 - 1:42 pm | प्रकाश घाटपांडे
आपण मी उपक्रमावरील दिलेली लिंक व त्यावरील चर्चा व्यवस्थित वाचली आहे का या बद्दल मला शंका वाटते. सध्या तरी आपण या लिंकवरील प्रश्न वाचावेत http://mr.upakram.org/node/854
माणसाच्या स्वभावाची एक गंमत आहे. देव नवसाला पावला तर ती देवाची कृपा, नाही पावला तर आपलेच नशीब वाईट, असे स्वत:चे समाधान माणूस सहज करून घेतो. ज्योतिषाचे तसेच असते. एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते. चुकला तर ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत पण बरोबर आलं तर फलज्योतिष बरोबर आलं ही मानसिकता ज्योतिषांनीच रूजविली आहे.
23 Sep 2020 - 1:59 pm | Rajesh188
जीवन अस्थिर झालेले आहे .लोकांना पुढे चांगले दिवस येतील अशी तीव्र इच्छा आहे.
आणि असा आशावाद ज्योतिष दाखवते.
ते पूर्ण चुकीचे आहे असे आपण म्हणू शकत नाही.
भविष्य सांगण्याची पद्धत ही किती तरी वर्ष असलेल्या अनुभवावर अवलंबून आहेत .
भविष्य कसे सांगितले जाते ते सुद्धा करा असे म्हणता येणार नाही .
मुळात हे पारंपरिक ज्ञान आहे
हळदी चा वापर,कडू निंबाचा वापर,शिकेकाई च वापर हा अनेक वर्ष चालू आहे
फक्त अनुभव वर च ते ज्ञान आहे.
त्याची शास्त्रीय कारणे लोकांना माहीत नव्हती
फक्त प्रयोग आणि अनुभव ह्या वरच पारंपरिक ज्ञान अवलंबून आहे .
हळदी मध्ये कोणते घटक असतात,कडू निंबत कोणते घडक असतात ते कसे परिणाम करतात हे सांगता येत नव्हते.
23 Sep 2020 - 4:22 pm | चौकस२१२
हळदी चा वापर,कडू निंबाचा वापर,शिकेकाई च वापर हा अनेक वर्ष चालू आहे
हो बरोबर पण मग आधुनिक रसायन शास्त्र उपलब्ध असताना त्यातील घटक का / ते का होते आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवावे / त्याचे उत्पादन कसे करावे - त्यात मात्रा चुकली तर औषध पेक्षा मारक असे होऊ शकते का/ वैगरे सगळे पडताळता येत आहे तर मग त्याला विरोध का? का कारण एकतर कष्ट घ्यायला नकोत किंवा आत्ता पर्यंत केलेले दावे जर खोटे निघाले तर? आपले दुकान बंद होईल म्हणून ..
पण हे मान्य कोणी करणार नाही///
"आमच्या परंपरेला' प्रश्न कसे विचारता असे उर बडवणे ( आणि त्यातून प्रश्न विचारणारा जर भारताबाहेरील असेल तर काय त्याच्या प्रशांत धुडकावून देणे सोप्पे)
साधी हळद घ्या तिने रक्तस्त्राव थांबतो ( भौतिक गुण) आणि जखमेततीळ जंतू मरतात ( रासायनिक गुण ) याची प्रयोगशाळेत चाचणी करणे अवघड आहे का ?
तसेच ज्योतिषाचे..
23 Sep 2020 - 4:12 pm | संजय क्षीरसागर
१.
हीच ती उल्लू बनवण्याची नामी ट्रीक !
असे पपलू जातक मग वेडगळासारखे त्या ज्योतिषाची भारंभार जाहिरात करतात. परिणामी त्याचा धंदा फोफवतो. पूर्वी १० मधला १ मटका बसत असेल तर आता हजारातले १०० मटके बसायला लागतात. जेवढा सॅम्पल साइज मोठा तेवढे न्यूमरिकल उल्लू वाढतात. ते अगदी जागृत देवस्थान निर्माण करण्यासारखं आहे. त्याचू मंडळी आधी हूल उठवून देतात आणि महात्याचू मग रांगा लावायला लागतात !
संकेतस्थळावर आता चाललेला प्रकार म्हणजे वरील रिअॅलिटी शोचा ऑनलाईन नमुना आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे मुळात किती बावळट असतात ते बघा !
24 Sep 2020 - 11:02 pm | कोहंसोहं१०
एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते >>>>>>>>
आणि एखाद्याची बरीचशी भाकिते बरोबर येत असतील तर? तुम्ही वर सांगितले की तुम्ही २ चांगल्या ज्योतिषांना ओळखता तर तुम्हाला त्यांची अचूकता कदाचित ठाऊक असेलही. इतरही ज्योतिषी तुम्हास ठाऊक असतीलही जे बरेचसे निष्णात आहेत.
माझे एवढेच म्हणणे आहे अशी अनेक भाकिते जी उगाच फेकून बरोबर येऊ शकत नाहीत ती कशामुळे बरोबर येतात याचा विचार व्हायला पाहिजे. उगाच १० मूर्ख ज्योतिषांची भाकिते चुकली म्हणून ज्योतिषशास्त्रालाच खोटे म्हणणे ही अज्ञानता झाली.
शिकलेसवरलेले लोकही पुरेश्या खोलात न जात पुरोगामी झेंडा हातात घेऊन काहीही माहिती नसताना अनुभव घेतला नसताना हे खोटे ते खोटे म्हणत फिरतात तेंव्हा ते झाले पढतमूर्ख.
जगात पढतमूर्खांची कमी नाही. संशोधक वृत्तीची मात्र अत्यंत कमी आहे. पण विरोधाभास म्हणजे हेच पढतमूर्ख संशोधक वृत्ती अंगी बाळगण्याऐवजी विज्ञानाचे सर्वात महत्वाचे अंग - 'तपासून पाहणे' हे सोयीस्कररीत्या विसरून न पटणाऱ्या गोष्टी नाकारत स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणत फिरत असतात.
25 Sep 2020 - 7:23 am | चौकस२१२
शिकलेसवरलेले लोकही पुरेश्या खोलात न जात पुरोगामी झेंडा हातात घेऊन काहीही माहिती नसताना अनुभव घेतला नसताना हे खोटे ते खोटे म्हणत फिरतात तेंव्हा ते झाले पढतमूर्ख.
"बाप दाखव नाही तर श्राद्ध कर" अश्या प्रकारची आव्हाने "ज्योतिष बिझिनेस " वाल्यांना अनेकदा दिली गेली आहेत ( अनिस एक उदाहरण)
दुसरा मुद्दा अगदी साधी वस्तुस्थिती
जगात कोट्यवधी लोक "ज्योसिथ" वैगरे चाय भानगडीत पडत नाही त्या कडे चुकून सुधाच त्यापाकडे पाहत नाहीत... काय झालाय त्यांचा? जे सगळ्यांचा होता तेच ना चांगला / वाईट
हा प्रश्न पूर्व आणि पश्चिम यातील विचारसरणीच्या दृष्टीने उलगडता येईल
पूर्व: आधी विश्वास ठेव मग अनुभव
पश्चिम : आधी सिद्ध कर मग विश्वास ठेवीन
23 Sep 2020 - 5:26 pm | चौकस२१२
एक अनुभव सांगतो... हा ज्योतिषाचे भाकीत खरे निघले किंवा नाही याबद्दल नसून तर त्याच्या "नीति /जबाबदारी " बद्दल आहे
- आयुष्यात काही वयक्तिक कठीण अडचणीतून जात होतो ( सन्यान असताना ) .. घरच्यांना काळजी होती आणि मला या "ज्योतिष / गुरु या वाटेला अजिबात जायचे नाही " हे माहित असून सुद्धा काळजी पोटी नात्यातील दोघांनी सुचवले कि मी अमुक व्यक्तीला भेटावे ...
मी तयार नवहतो पण दोन अटींवर तयार झालो
१) मी येत आहे हे केवळ तुम्हाला माझ्याबद्दल जे प्रेम आहे त्याचा मान म्हणून हे लक्षात घ्या
२) मी मला पाहिजे ते प्रश्न त्या ज्योतिषाला विचारणार चालले का?
नातेवाईक तयार झाले
आम्ही गेलो... डॉक्टर कडे असावे तशी रचना होती ... आमचा "नंबर" लागला... हो ज्योतिषी सभ्य आणि शिकलेलं होता वरकरणी तरी पैसे नको होते त्याला ( आतून रचना अशी होती कि "कन्सल्ट" झाल्यावर अतलया खोलीत त्यांचं गुरुन्नआ एकदा नमस्कार करा सांगायचे.. मग आपसूक आत गेलेले लोक पैसे ठेवणार.. पण त्यापेक्षा कोण्ही व्यासायिक जसा मोबदला घेतो तसा घ्या ना? आणि जे अगदी गरीब आहेत त्यांना फुकट सेवा द्या पाहिजे तर" असो हा मुद्दा बाजूल ठेवू "
केस पेपर ( पत्रिका वगैरे ) होती त्यानं पाहिजे त्या "फॉरमॅट" मध्ये
- त्यांनी जे काही सांगतेल त्यात मला काही फार अर्थ वाटलं नाही पण मी त्यांना २ प्रश्न विचारले तो संवाद असा
मी: आधीच सांगतो मला यावर विश्वास नाही आणि मला काही आधी प्रश्न विचारायचे आहेत चेले का
ते: विचार
मी: या "कन्सल्ट" नंतर चे आपले उत्तरदायित्व ( जबाबदारी) काय?
ते: म्हणजे? तुम्हाला काय काही ग्यारंटी अपेक्षित आहे का?
मी: नाही हो अहो डॉक्टर सुद्धा अशी ग्वाही देत नाही आणि मी/ बहुतेक त्यानाच असे विचारीत नाही मग तुम्हाला कशी विचारेन अशी ग्वाही ?.. जबाबदारी या अर्थाने कि
- तुम्ही सांगितलेल्या "उपाया" mule जर "अपाय" झाला/ त्याचं उपायात हलगर्जी पणा दिसला तर एक ग्राहक म्हणून जसे मी डॉक्टर किंवा घर बांधणाऱ्या स्थापत्य तांत्रिकाला जाब विचारून न्यायालयात नेऊ शकतो तसे या " वयसाय - शास्त्राचा प्रचार आणि आणि उपलब्ध करून देणार्यांविरिध" अशी काहीच सोया नाही !
आता आठवत नाही नक्की पण त्यांनी अशीच काही तरी वेळ मारून देणारे उत्तर दिले ( हुशार होते ) शेवटी विश्वास वैगरे ( म्हणजे परत तेच पुंगी वाजली तर ज्योतिष भारी नाही वाजली तर तुमचा विश्वास नाही वैग्रे.. म्हणजे "अमुक बाबा सांगतात ते करा प्रश्न विचारू नका असेच"
तेवहा त्या गावाचा रास्ता ना विचारलेलाच बरा
मुन्नाभाई munnabhai mbbs ज्योतिष बटुक आणि मुन्ना यांचाच प्रसंग तुनळीवर बघा
24 Sep 2020 - 10:41 pm | कोहंसोहं१०
अजुनही माझा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
"ज्योतिष हा फक्त अंदाजे फेकलेल्या प्रोबॅबिलिटीचा खेळ असेल तर काही उत्तम ज्योतिषांची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आणि अचूक कशी (वर नमूद केल्याप्रमाणे काही प्रश्नांमध्ये मिळणारी उत्तरे अगदी मिनिटामध्ये बरोबर आली आहेत)?
कितीही फेकंफाक केली तरी इतके अचूक तेही बऱ्याचदा येणे जवळपास अशक्य आहे.
मग ते कसे होत असावे?"
काहीतरी तथ्य असलेच पाहिजे. काहीही फेकून अशी उत्तरे बरोबर देता येत नाहीत (वर प्रतिसादात काही उदाहराखाल लिंक दिल्या आहेत).
फक्त ते कसे काम करते याची डिटेल माहिती आपल्याला ठाऊक नाही एवढेच. राहिला प्रश्न ज्योतिषांच्या चुकीच्या भाकितांचा तर त्यासाठी ज्योतिषशास्त्राला जबाबदार धरून किंवा खोटे म्हणून चालणार नाही. निष्णात ज्योतिषी अतिशय कमी आहेत आणि त्यांची अनेक भाकिते बरोबर येतात आणि तेवढी अचूकता फेकून मिळणे शक्य नाही.
अभावाने चांगले ज्योतिषी असणे आणि तो सापडणे दुर्मिळ, पण फसवाफसवी वाले जास्त म्हणून अनुभव न घेता शास्त्राविषयी जाण नसताना आणि संशोधन न करताच ज्योतिषशास्त्राला फेक म्हणणारे पढतमूर्खच.
24 Sep 2020 - 10:59 pm | ऋतुराज चित्रे
अनिसचे अचूक भविष्य वर्तविन्याचे २१ लाखाचे बक्षिस घ्यायला जगातील एकहीजण अद्याप पूढे आलेला नाही ह्यातच सर्व काही आले.
25 Sep 2020 - 8:29 am | कोहंसोहं१०
आव्हान घेतले नाही म्हणून शास्त्र खोटे कसे ठरेल?
25 Sep 2020 - 10:21 am | चौकस२१२
आव्हान घेतले नाही म्हणून शास्त्र खोटे कसे ठरेल?
हा सगळा शब्दांचा खेळ खेळताय ...
मग घ्या ना आव्हान? उद्या जर मी म्हणलं कि माझ्य नवीन शास्त्रा प्रमाणे " गुरुत्वाकर्षण नाहीच" तर मला ते सिद्ध करावे लागेल वेगवेगळ्या कसोट्यातून जावे लागेल तेव्हा कुठे माझे हे नवीन म्हणणं शास्त्र म्हणून संमत होईल !
25 Sep 2020 - 10:49 am | ऋतुराज चित्रे
"ज्योतिष हा फक्त अंदाजे फेकलेल्या प्रोबॅबिलिटीचा खेळ असेल तर काही उत्तम ज्योतिषांची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आणि अचूक कशी (वर नमूद केल्याप्रमाणे काही प्रश्नांमध्ये मिळणारी उत्तरे अगदी मिनिटामध्ये बरोबर आली आहेत)?
म्हणून तर म्हणतोय आव्हान स्विकारावे समोरच्याला अनुभव तात्काळ तपासता येईल. दूध का दूध पाणी का पाणी फैसला होऊन जाईल.
25 Sep 2020 - 7:17 am | चौकस२१२
ज्योतिषांच्या चुकीच्या भाकितांचा तर त्यासाठी ज्योतिषशास्त्राला जबाबदार धरून किंवा खोटे म्हणून चालणार नाही.
भाकीत / सल्ला देण्रायला काही उत्तरदायित्व नसते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
इमारतीची रचना आणि निर्मिती करणाऱ्याला, ती पडली तर कोर्टात खेचता ना ? मग तेच नियम ज्योतिष, फेंग शुई च्या "प्रॅक्टिस" करणाऱ्याना का नाही ? या हि पप्रश्नचे उत्तर द्व्यावे !
25 Sep 2020 - 7:48 am | शा वि कु
हेच म्हणतो.
25 Sep 2020 - 8:06 am | कोहंसोहं१०
भाकीत / सल्ला देण्रायला काही उत्तरदायित्व नसते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? इमारतीची रचना आणि निर्मिती करणाऱ्याला, ती पडली तर कोर्टात खेचता ना ? मग तेच नियम ज्योतिष, फेंग शुई च्या "प्रॅक्टिस" करणाऱ्याना का नाही ? या हि पप्रश्नचे उत्तर द्व्यावे ! >>>>>>>> कदाचित तुम्ही प्रतिसाद नीट वाचला नसावा. माझे म्हणणे आहे की ज्योतिष सांगणाऱ्या माणसाच्या चुकीमुळे ज्योतिषज्ञानाला जबाबदार धरू नये किंवा अनुभव घेतला नसताना ते खोटे म्हणत फिरू नये
25 Sep 2020 - 5:51 pm | प्रकाश घाटपांडे
अजुनही माझा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
"ज्योतिष हा फक्त अंदाजे फेकलेल्या प्रोबॅबिलिटीचा खेळ असेल तर काही उत्तम ज्योतिषांची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आणि अचूक कशी (वर नमूद केल्याप्रमाणे काही प्रश्नांमध्ये मिळणारी उत्तरे अगदी मिनिटामध्ये बरोबर आली आहेत)?
कितीही फेकंफाक केली तरी इतके अचूक तेही बऱ्याचदा येणे जवळपास अशक्य आहे.
मग ते कसे होत असावे?"
काहीतरी तथ्य असलेच पाहिजे. काहीही फेकून अशी उत्तरे बरोबर देता येत नाहीत (वर प्रतिसादात काही उदाहराखाल लिंक दिल्या आहेत). >>>>>>>> हा तुमचा मुख्य मुद्दा. इतका कसा योगायोग असेल? यामागे नियतीचे म्हणा दैवाचे म्हणा किंवा अज्ञात शक्तीचे म्हणा काहीतरी संबंध असला पाहिजे हा मुद्दा शेकडो वर्षे चर्चेत आहे.कधी कधी तर चक्क अविश्वसनीय वाटावे असे अनुभव येतात. खरतर संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. तसच माणसा्चा गुढावर विश्वास ठेवण्याचा कल असतो. मेंदुच्या मनात सुबोध जावडेकर म्हणतात," ज्यांना भोवतालची परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात आहे असे वाटत होतं, त्यांच्या बाबतीत हे प्रकर्षानं घडताना दिसलं. अशा लोकांना नसलेल्या गोष्टी दिसतात, नसलेले संबंध दिसू लागतात. माहिती अपुरी असली तरी स्वत:च्या कल्पनाशक्तीनं रिकाम्या जागा भरून पूर्ण चित्र तयार करणयात आपला मेंदु वाकबगार असतो. त्याला गोंधळ, अनिश्चितता मानवत नाही. प्रत्येक गोष्टीमागचे कारण समजलेच पाहिजे हा जणू त्याचा हट्ट असतो. दोन घटना एकामागोमाग घडताना दिसल्या तर दुसरीमागचे कारण पहिलो घटना हेच असणार, अशी समजूत मे करून घेतो. मारुन मुटकून असा संबंध जोडणं कितीही मूर्खपणाचे असले तरी कारण आजबात माहीत नसण्यापेक्षा हास्यास्पद कारणसुद्धा मेंदू स्वीकारतो, हे अनेकदा दिसून आले आहे. त्यातूनच अंधश्रद्धेचा जन्म होतो." शिवाय सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली नाहीत हे खरेच आहे. मिळतात तेव्हा नवे प्रश्न निर्माण होतात. हे अनंत काळ चालूच आहे.
25 Sep 2020 - 8:20 am | चौकस२१२
समजला तुमचा मुद्दा थोडं वेगळा आहे ... बरं तर नसेल हि "
खोटे" परंतु ते "खरे" आहे हे पटण्यासाठी त्याचे पाठीराखे पुरेश्या चाचण्यांना सामोरे जाण्यास तयार नसतात असा सर्वसाधारण पाने दिले
ते कोणतेही उत्तरदायित्व स्वीकारत नाहीत असे दिसते
.. मुद्दा हा आहे कि जसे इतर शास्त्र/ वयवसाया हे या चाचणीतून जायला तयार असतात आणि नसले तर समाजहितासाठी त्यांना भाग पडले जाते तर मग ज्योतिष का नाही तयार?
आणि पढतमूर्ख म्हणाल तर जे आंधळेपणाने यावर विश्वास ठेवतात किंवा वरील मुद्ययप्रमाणे चाचणी ची मागणी करीत नाहीत त्यांना पण पढतमूर्खच म्हणलं पाहिजे!
उद्या कोविड वर लस निघाली तर ती घेण्याआधी ती कोणी/ कशी तपासली आहे हे बघूनच घ्याल ना मग असे खणखणीत चाचणी ची अपेक्षा ज्योतिषांकडून ठेवली तर मात्र हि मागणी करणारे पढतमूर्ख कसे ?
जसे आत्तापर्यंत पर्यंत आधुनिक वैद्यक शास्त्र या दशकांचं चाचण्यांतून प्रवास करते तसे या ज्योतिष व्यसनाने केले असते तर हे वाद कधीच मिटले असते
26 Sep 2020 - 10:14 am | प्रकाश घाटपांडे
जसे आत्तापर्यंत पर्यंत आधुनिक वैद्यक शास्त्र या दशकांचं चाचण्यांतून प्रवास करते तसे या ज्योतिष व्यसनाने केले असते तर हे वाद कधीच मिटले असते >>>>>
याबाबत मी सहमत नाही. फलज्योतिष हे विज्ञान नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले तर त्यामागे धावणाऱ्यांचे प्रमाण किती कमी होईल? ते विज्ञान आहे अशा भूमिकेतून फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा वापर करणारे लोक किती? या मुद्द्यावर मी मिपा संपादकीयात लिहिले आहे. या ज्योतिषाचं काय करायचं ? आपल्या नजरेतुन सुटले नसावे अशी आशा करतो.
अवांतर- ज्योतिष व्यसन म्हणायच य की ज्योतिष व्यवसाय?
25 Sep 2020 - 8:21 am | चौकस२१२
समजला तुमचा मुद्दा थोडं वेगळा आहे ... बरं तर नसेल हि "
खोटे" परंतु ते "खरे" आहे हे पटण्यासाठी त्याचे पाठीराखे पुरेश्या चाचण्यांना सामोरे जाण्यास तयार नसतात असा सर्वसाधारण पाने दिले
ते कोणतेही उत्तरदायित्व स्वीकारत नाहीत असे दिसते
.. मुद्दा हा आहे कि जसे इतर शास्त्र/ वयवसाया हे या चाचणीतून जायला तयार असतात आणि नसले तर समाजहितासाठी त्यांना भाग पडले जाते तर मग ज्योतिष का नाही तयार?
आणि पढतमूर्ख म्हणाल तर जे आंधळेपणाने यावर विश्वास ठेवतात किंवा वरील मुद्ययप्रमाणे चाचणी ची मागणी करीत नाहीत त्यांना पण पढतमूर्खच म्हणलं पाहिजे!
उद्या कोविड वर लस निघाली तर ती घेण्याआधी ती कोणी/ कशी तपासली आहे हे बघूनच घ्याल ना मग असे खणखणीत चाचणी ची अपेक्षा ज्योतिषांकडून ठेवली तर मात्र हि मागणी करणारे पढतमूर्ख कसे ?
जसे आत्तापर्यंत पर्यंत आधुनिक वैद्यक शास्त्र या दशकांचं चाचण्यांतून प्रवास करते तसे या ज्योतिष व्यसनाने केले असते तर हे वाद कधीच मिटले असते
25 Sep 2020 - 9:01 am | कोहंसोहं१०
उद्या कोविड वर लस निघाली तर ती घेण्याआधी ती कोणी/ कशी तपासली आहे हे बघूनच घ्याल ना मग असे खणखणीत चाचणी ची अपेक्षा ज्योतिषांकडून ठेवली तर मात्र हि मागणी करणारे पढतमूर्ख कसे ? >>>>>>>>>>>
मागणी करणारे पढतमूर्ख नाही. ते चिकित्सक. पण काहीच माहिती नसताना स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवून ज्योतिष खोटेच आहे ची आरोळी ठोकणारे पढतमूर्ख. पण मागणी पूर्ण झाली नाही म्हणून ज्योतिषज्ञान खोटे म्हणता येणार नाही कारण निर्णय बाकी आहे.
शेवटी अनुभव हा सर्वात महत्वाचा. चिकित्सेच्या पोटीने का होईना भविष्याविषयी एखादा हार्मलेस प्रश्न विचारून अनुभव घेऊन पाहावा. जगात असंख्य गोष्टी वैज्ञानिक कक्षेच्या बाहेर आहेत पण म्हणून त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपण त्या सगळ्याच खोट्या म्हणत नाही. खुद्द विज्ञानात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या फक्त थिअरीज आहेत पण तरीही बरेच जण विश्वास ठेवतातच की. ज्योतिषाचे तर अनेकांना अनुभव पण आलेत मग ते खोटेच आहे असे म्हणून कसे चालेल?
शेवटी विश्वास असणे किंवा नसणे हा वैयक्तिक मुद्दा. पण अनुभवाअभावी दुराग्रह नसावा.
इथे ज्या दुराग्रहीपणे काही आयडी ज्योतिष खोटेच आहे हे पटवून देण्याच्या मागे लागले आहेत खास करून ज्योतिषशास्त्राचे काडीचेही ज्ञान नसताना आणि अनुभव घेतला नसताना त्याचाच अचंबा वाटतो.
आत्तापर्यंत पर्यंत आधुनिक वैद्यक शास्त्र या दशकांचं चाचण्यांतून प्रवास करते तसे या ज्योतिष व्यसनाने केले असते तर हे वाद कधीच मिटले असते >>>>>> ज्योतिष विषयावर अधिक संशोधन व्हावे हा विचार मी आधी मांडला आहेच. जे थोडेफार झाले आहे त्याचे काही उत्तम अनुभव लोकांना आले आहेत. पण तेवढे पुरेसे नाही.
संशोधनाअभावी हा विषय तास दुर्लक्षित राहिला आहे आणि बाजारीकरणामुळे कलंकीतही झाला आहे.
25 Sep 2020 - 10:14 am | चौकस२१२
संशोधनाअभावी हा विषय तास दुर्लक्षित राहिला आहे आणि बाजारीकरणामुळे कलंकीतही झाला आहे.
चला ...यावर आपले एकमत
मग आता मला वाटते कि आपण हे हि समजून घ्याल कि हि परिस्थिती सुधारायची जबाबदारी प्रश्न विचारणाऱ्यांची/ चिकित्सकांची नसून तर
- त्याची "प्रॅक्टिस" करणाऱ्यांची आणि त्यावर हे असेच म्हणून पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांची आहे
"कारण निर्णय बाकी आहे."
हो ना मग तो निर्णय लागे पर्यंत हे "शास्त्र" म्हणून प्रचार करू नये?
परत औषधाचे उदाहरण... क्लिनिकल चाचण्या झाल्याशिवाय औषध म्हणून ते बाजारात आणता येत नाही...आणि आणले आणि पकडले गेले तर तो गुन्हा ठरतो...
आता हाच नियम लावा कि ज्योतिषाच्या "उपयाय सांगणाऱ्यांना " मग बघू
26 Sep 2020 - 7:27 am | कोहंसोहं१०
औषधांवरचे आणि रोगांवरचे संशोधन, निरीक्षण, चाचण्या हा आधुनिक पद्धतीच्या चिकित्सेचा एक भाग झाला.
असेच संशोधन, निरीक्षणे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी केली होती आणि अनेक अनुभवानंतर आपली निरीक्षणे नोंदवून ठेवली होती. याच प्रकारे पाश्चात्त्य ज्योतिर्विदांनी सुद्धा निरीक्षणे नोंदवून काही नियम/ठोकताळे बांधले (ज्यात भारतीय आणि पाश्चात्त्य निरीक्षणात बरेच साम्य आहे). निरीक्षणे आणि आलेले अनुभव यांवर आधारित ते शास्त्र आहे.
त्यामुळे तुम्हाला अपेक्षित ज्या "चाचण्या" आहेत तश्या त्या हजारो वर्षांपूर्वी झाल्या आहेत.
पण त्या आधुनिक पद्धतीने व्हाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर त्या तश्या करून घेण्यासाठी तुम्ही जरूर पुढाकार घेऊ शकता. ज्योतिषात संशोधन झाले पाहिजे हे मी लिहिलेच आहे. तुम्ही त्यासाठी नक्की फंडिंग करा.
पण फक्त "चाचण्यांचा" हा नियम आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींना लावा जी तुम्ही वापरता. म्हणजे बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू ही शास्त्रीय "चाचण्या" तूनच आली पाहिजे. अगदी तंबाखू, गुटखा, दारू हे सुद्धा.
मग बघा.
26 Sep 2020 - 8:51 am | चौकस२१२
त्येक वस्तू ही शास्त्रीय "चाचण्या" तूनच आली पाहिजे. अगदी तंबाखू, गुटखा, दारू हे सुद्धा.
हो आहेत ना दारू निर्माण करण्याला पण नियम लागू आहेत ,, सुटका नाही म्हणून तर बेकायदा दारू हा वयसाय दिसतो
उद्या युनाइटेड ब्रेवरी किंवा सुकाळ विन्स नि भेसळ केली तर त्यांना समजला तोंड दवयेच लागेल...
आणि मुळात हे वयसाय उभे व्हायला त्यांना पण भरपूर नियम / चाचण्या यातून जावे लागते
तुमचं ज्योतिष विकणाऱ्याला काय नियम? अटी / त्यावर देखरेख? शून्य .. "वयक्तिक विश्वास " हि ढाल पुढे केली कि झालं
हा... आता समजत दारू किंवा बिडी ला मुळात परवानगी असावी कि नसावी हा संपूर्ण वेगळा मुद्दा आहे
उगाच दोन गोष्टींची गफलत करू नये
ज्योतिषाबद्दल प्रश्न विचारले कि लगेच दारू . बिडी वयायाला पण नियम नकोत असे नाही उगाच कुठंच तरी कुठे चिकटवताय
25 Sep 2020 - 10:28 am | चौकस२१२
शेवटी विश्वास असणे किंवा नसणे हा वैयक्तिक मुद्दा.
शेवटी हि ढाल घेतलीत तर बोलणेच खुंटले
"ज्योतिष विकणे असो किंवा औषध विकणे असो .. शेवटी हि गोष्ट वैयक्तिक मुद्दा वैगरे च्या पुढे जाते समाजावर याचा काय परिणाम होईल याचा विचार समाजाला आणि राज्यकर्त्यांना करावाच लागतो... तस नास्ता तर कोण्ही उद्या वैद्य म्हणून उपचार करण्याचाच "उद्योग" चालू करेल...
उत्तरदायित्व चा मुद्दा का टाळताय?
पण अनुभवाअभावी दुराग्रह नसावा.
अवघड प्रश्न विचारला कि दुराग्रह ? वाह!
26 Sep 2020 - 6:58 am | कोहंसोहं१०
उत्तरदायित्व म्हणजे नक्की काय? लोक ज्योतिषाकडे जातात सल्ला मागायला. पुढे सल्ला अमलात आणायचा कि नाही हा त्यांचा निर्णय. निर्णय तुम्ही घेणार तर मग उत्तरदायित्व दुसऱ्यांचे कशाला? तुम्ही मेडिकल आणि ज्योतिषाची तुलना म्हणजे सफरचंद आणि संत्र्याची तुलना केल्यासारखी आहे. तरीही एखाद्या रोगावर समजा एखाद्या डॉक्टरकडे गुण आला नाही तर तुम्ही त्याच्यावर केस करता का? तिकडे जाऊन म्हणता का की तुमच्या औषधाने मला गुण आला नाही हातात याचे उत्तरदायित्व घ्या?
आजकाल ऑपरेशन करण्याआधी सुद्धा डॉक्टर १०० पेपरांवर सह्या घेतात ज्याचा अर्थ एकच असतो- तब्येतीचे बरेवाईट झाले तर जबाबदारी त्यांची नाही. ऑपरेशन करायचे की नाही हा निर्णय तुमचा.
वित्तीय क्षेत्रात गेले अनेक वर्ष म्युच्युअल फंड बद्दल मोठ्या जाहिराती दिसतात पण तिथेही शेवटी मार्केट रिस्क ची कंडिशन असते. तुमचे पैसे बुडले तर जबाबदार तुम्ही.
उद्या कोर्टात केस लढवायची असेल तर वकिलाला केस जिंकून देण्याची हमी दे नाहीतर पुढे उत्तरदायित्व घे असे सांगाल का?
ज्योतिष विकणे असो किंवा औषध विकणे असो .. शेवटी हि गोष्ट वैयक्तिक मुद्दा वैगरे च्या पुढे जाते समाजावर याचा काय परिणाम होईल याचा विचार समाजाला आणि राज्यकर्त्यांना करावाच लागतो...>>>>>> असे असेल तर मग समाजात रामराज्यच यायला हवे... नाही का ? सगळ्यात पहिला तंबाखू, गुटखा, दारू बंद झाले पाहिजेत. पण अपाय होतो हे माहित असूनही लोक सेवन करतात, सरकार विक्रीला परवानगी देते. उद्या दारूच्या व्यसनाने यकृत निकामी होऊन मृत्यू झाल्यास किंवा सिगारेट ओढून कँसर झाला तर सरकार किंवा कंपनी उत्तरदायित्व घेते का?
सांगायचं मुद्दा हा की जगात कोणत्याच क्षेत्रात १००% हमी नाही.
यश अपयश प्रत्येक क्षेत्रात आहेत....लाईफ थ्रेटनिंग कंडिशन असो किंवा नसो डॉक्टर, सरकार, कंपन्या जबाबदारी/उत्तरदायित्व घेत नाहीत कारण शेवटी 'निर्णय' तुमचा असतो मग ज्योतिषांनी उत्तरदायित्व घ्यावे हा आग्रह कशासाठी? आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तुमचे असेल तर तुम्ही तुमचे उत्तरदायित्व टाळून ते दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न कशासाठी करताय?
"अवघड प्रश्न विचारला कि दुराग्रह ? वाह!">>>>>. मी प्रश्न विचारले म्हणून दुराग्रही म्हणलेच नाहीये. काहीच माहिती आणि अनुभव नसताना ते ज्योतिषशास्त्र खोटे असा रेटा ज्यांनी लावला आहे त्यांना दुराग्रही म्हणले आहे.
26 Sep 2020 - 8:46 am | चौकस२१२
ज्योतिषाची तुलना म्हणजे सफरचंद आणि संत्र्याची तुलना केल्यासारखी आहे
ते तुमच्या सोयीसाठी असेल ...!
पण शेवटी ग्राहक म्हणले कि औषध ज्योतिष, आर्थिक सल्ला असो कि एखादे उत्पादन करून विकणे असो सगळे सारखेच
समाजात जे काही वयसाय चालतात ... त्यांना एकदा व्यवसाय म्हणले कि सेवा पुरवल्यावर पुढील जबाबदारी तुन हात झटकून मोकळे नाही होता येत याला उत्तरदेयत्व से मी संबोधले... याचा अर्थ मला हे नाही म्हणायचे कि ज्योतिषाने सांगितलेली उपायांची हमी दवयवी ( अर्थात तशी हमी गाडी/ फ्रिज उत्पादकाला आणि स्ट्रक्टरल इंजिनेर ला दयावी लागेल हे विसरू नका )
मार्केट रिस्क सगळी कडेच असते ते माहिती आहे हो नवीन काय सांगताय
- मी बोलतोय ते पुरवलेल्या सेवेत जर हलगर्जीपणा किंवा भेसळ दिसली तर समाज अशांना न्यायालयात नेऊ शकतो
आणि म्हणून एफडीए , आय एस आई स्टॅंडर्ड, इंजिनीरिंग सर्टिफिकेट , मेडिकल असोसिएशन आणि शेवटी देशाचं कायदा हे आहेत हे सगळे त्याचा प्रमाणात "ज्योतिष विकणाऱ्याला " लागू होते का?
- रामराज्य: तुम्ही शब्दांचा खेळ करताय : नियम आहेत म्हणून गुणे होत नाहीत असे कानी म्हणताय का?
सर्व वयसायांना ( ज्योतिष धरून ) असे नियम लावले जावेत जेणेकरून ग्राहकला सुरक्षितता मिळण्याची शक्यता वाढते ( तो १००% सुरक्षित होऊ शकतो असा दावा नाहीये )
आर्थिक सल्ल्याचे उदाहरण घेऊ
तो देण्यासाठी देशादेशाप्रमाणे नियम वेगळे असतात
यात दोन भाग आहेत एक म्यनेज्ड फंड म्हणजे जनतेचे पैसे घेऊन गुंतवणूक करणे आणि दुसरे ट्रेडिंग कसे आणि केला करावे याचा सल्ला ( यात फंड सारखे पैसे गोळा केले जात नाहीत तर फक्त सल्ला दिला जातो - इशारा दिला जातो कि आज हे विकत घ्या ते विका वैगरे )
यातील ट्रेडिंग करावे या भागासाठी नियम आणि वस्तुस्थिती बघा
- भारतात सुद्धा खरं नियम बघितले तर तुम्हाला सेबी नोंदणी आव्यश्यक असते .. अगदी अकाउंटंट असाल तरी पण किती तरी लोक "टीप" देण्याचं वयसाय करतात .. काह्ही निर्बंध नाहीत
- अमेरिकेत हा व्यवसाय " आर्थिक शिक्षण या नावाखाली " विकला जातो ... परत निर्बंध नाही नुसती तरदेईंग रम चालवतो म्हण्याचे
- ऑस्ट्रेलियात मात्र असे करण्यासाठी फिनान्शिअल सर्विसेस चा प्रवण लागतो
दुर्दैवाने अध्यात्म / ज्योतिष याचा धंदा उघडून बसल्यानं असले कोणते निर्बंध नाहीत आणि प्रश्न विचारले कि " तुमचा काही अभयास नाही हे उत्तर तोंडावर फेकायचे
मी आता थांबतो ,, माझा मुद्दा असा कि ज्योतिष अगदी जर एक चांगले शास्त्र असले तरी त्याची का बदनामी झाली आहे त्याचा पण आपण विचार करावा ,, नुसते दुसऱ्यानं तुमचा अभ्यास नाही हे म्हणून सुटका होत नाही
26 Sep 2020 - 10:02 am | शा वि कु
१००% हमी नसतेच. हे अगदी मान्य.
पण जो उरलेला अंश आहे तो असा:
उत्तरदायित्व असतंच.
सनदी लेखापाल असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो.
या सर्वांच्या देखरेख करणाऱ्या गव्हर्निंग बॉडीज असतात.
या बॉडीजनी कामाचे स्वरूप, कामाच्या मर्यादा, कामात पाळण्याचे प्रोफेशनल इथिक्स ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित संज्ञाबद्ध करून ठेवल्या असतात.
यातून चुकणारा व्यक्ती या प्रोफेशनल बॉडीजच्या तडाख्यात येऊ शकतो.
उदा. सनदी लेखापाल भविष्यातील व्यवसाय स्थितीबद्दल गॅरंटी,सर्टिफाय किंवा "खात्रीपुर्ण विधान" असा अर्थ निघू शकेल असे प्रोजेक्शन्स देऊ शकत नाही. हे सगळे तर्क आणि अंदाजावर आहे आणि चुकू शकते हे स्पष्टपणे, वाचणार्याला समजेल असे आपल्या रिपोर्ट मध्ये लिहावेच लागते.
तसे का नाही ज्योतिषाच्या बाबतीत ?एक प्रोफेशनल बॉडी बनावी. सर्वानुमते ज्योतिषविद्येच्या मर्यादा आणि प्रोफेशनल इथिक्स ठरवाव्यात. ज्योतिषविद्येतून काय गोष्टींची अपेक्षा करू नये हे ठळकपणे ग्राहकास समजावण्याची व्यवस्था करावी.
तसेच ज्या गोष्टींच्या व्हॅलीड अपेक्षा केल्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत, तिथे ज्योतिष शास्त्राच्या प्रॅक्टीशनरवरती प्रोफेशनल नेग्लिजन्स ची कारवाई व्हावी.
तसेच आपल्या प्रोफेशनने घेतलेल्या कामांच्या यश आणि अपयश या गोष्टींची माहिती सुद्धा एका समितीने ठेवावी. आणि हि माहिती सर्वांसमोर मांडावी.
हे असे का होऊ नये ? (किंबहुना असे काही आहे का ?असल्यास मला माहित नाही.)
26 Sep 2020 - 10:13 am | शा वि कु
हे राहिले.
नियंत्रक समितीने ठरवलेले निकष (उदा- लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा) पूर्ण केलेल्यांना सनदी ज्योतिषी म्हणून सर्टिफिकेट मिळावे. नियंत्रक समिती त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवून असावी. तसेच समोरचा ज्योतिषी सनदी आहे का नाही हे तपासण्याची सोय ग्राहकाकडे असावी.
(हे आत्तापर्यंत न होण्यामागचे कारण काय ? ज्योतिष अभ्यासक तयार असतील का ?
26 Sep 2020 - 10:29 am | प्रकाश घाटपांडे
ज्योतिषी हा सेवादाता आणि जातक हा ग्राहक असे चित्र भारतात तरी नजिकच्या भविष्य काळात येईल असे वाटत नाही. जरी आला तरी हे ग्राहकच ज्योतिषाचे मागचे दार ठोठावुन सेवेची मागणी करतील अशी परिस्थिती भारतात आहे . अमेरिकेत वेगवेगळ्या स्टेट मध्ये या बाबतीत कायदे वेगळे आहेत असे ऐकून आहे. एका ठिकणी ज्योतिषाची प्रॅक्टीस बेकायदेशीर तर शेजारच्या स्टेट मध्ये कायदेशीर . आणी कायद्यातील पळवाटा , परस्पर सामंजस्य असेल तर कायदा काय करणार?
"फलज्योतिषासंबंधाने विचारी माणसांचे कर्तव्य" हा जानेवारी १९२१ सालचा "चित्रमय जगत" च्या अंकात सत्यान्वेषी म्हणतात "ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या येत नाहीत हे आकडे वार माहितीने ठरवून ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा काही गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषांविरुद्ध सरकार कडून एखादा कायदा पास करवुन घ्यावा."
वर लिहिलेले सत्यान्वेषी या टोपणनावाने लिहिणारे प्राध्यापक व समीक्षक न.र.फाटक होते.
26 Sep 2020 - 10:48 am | शा वि कु
तुमचे म्हणणे योग्य आहे.सरकारने कायदा करून तो अमलात आणणे हे अवघड आहे. आणि तसे करून एका प्रकारे ज्योतिषशास्त्राला सरकारी मोहोर मिळाल्या सारखे होईल. त्यामुळे कोणतेही सरकार असे करायला धजावायचे नाहीत.कायद्याने बंदी आणणे एका प्रकारे अयोग्य सुद्धा.
पण ज्योतिशच एकत्र येऊन अशी संस्था का तयार करत नाहीत ? जशी अमेरिकेत फायनान्स प्रवीण सल्लागारांची सीएफए संस्था आहे. हि संस्था सरकारने स्थापलेली नाही, तरीही ती सीएफए सनद देते आणि त्यांच्या पात्रता निकष आणि इथिक्स मुळे पूर्ण जगात हि सनद मान्यताप्राप्त आहे. चूक झाल्यावर सनद रद्द सुद्धा होते.
तसं ज्योतिषांची सनदी संस्था ज्योतिषच तयार करू शकत नाहीत का? ह्याने त्यांच्या व्यवसायाचा झाला तर फायदाच होईल.
(जे भोंदू ज्योतिषी असतील त्यांना सनद मिळणार नाही. जे सनदप्राप्त ज्योतिषी गैरव्यवहार करतील, त्यांची सनद रद्द होईल आणि जाहिरातीद्वारे हि गोष्ट कळवली जाईल हीच त्यांची शिक्षा.)
26 Sep 2020 - 11:14 am | चौकस२१२
परस्पर सामंजस्य असेल तर कायदा काय करणार?
अगदी बरोबर आणि दुर्दैवाने याचाच फायदा " पिंजऱ्यातील पोपट वाला " पासून ते " फाईव्ह स्टार ज्योतिषी" घेतात ...
26 Sep 2020 - 11:02 am | चौकस२१२
शा वि कु
मी हि हेच म्हणतोय... आपण जास्त योग्य पद्धतीने मांडलेत माझ्यापेक्षा
ज्योतिषावर गाढ श्रद्धा असणारे जेव्हा घर बांधायला जातात किंवा शस्त्रक्रिये साठी जातात तेवहा हि दोन्ही शास्त्रे "राजमान्य" आहेत ना हे बघतात तिथे मग वयक्तिक विश्वास मामला अशी मखलाशी नाही करत कारण जीवन मरणाचाच प्रश्न असतो ना ! तेव्हा इंजिनेर नुसताच इन्स्टिटयूट ऑफ इंजिनेर चा मान्यताप्रवत आहे कि नाही हे बघतात असे नाही तर मुळात इंजिनीरिंग हे जे शास्त्र विकसित झाले आहे ते मुळात खरे आहे ना याची पण पडताळणी करतो माणूस .....
एक उप मुद्दा
- आपण म्हणता तसे "सेल्फ गव्हर्निंग " हे काहीच नसण्यापेक्षा बरे हे खरे पण मूळ मुद्दा हे शास्त्र आहे ते पूर्ण ठरवरणार कशे? इतर "शास्त्रे" वर्षानुवर्षे चाचणी परीकिश्तुन गेलेली असतात आणि सतत त्यावर "स्वतंत्र परीक्षण मंडळाचे लक्ष असते " फक्त "सेल्फ गव्हर्निंग नाही
उदाहरण वित्त क्षेत्रात जरी नॅशनल फुचर्स अससोसिएशन हि सेल्फ गव्हर्निंग असली तर शेवटी https://www.cftc.gov/About/अबौटथेकंमिस्सीओं हे सर्वोच्च आणि ते सेल्फ गव्हर्निंग नाही
26 Sep 2020 - 11:11 am | चौकस२१२
हे सगळे तर्क आणि अंदाजावर आहे आणि चुकू शकते हे स्पष्टपणे, वाचणार्याला समजेल असे आपल्या रिपोर्ट मध्ये लिहावेच लागते.
- फंड मॅनेजर ला आपला आधीच अनुभव, आधी किती परतावा मिळवू शकले आहेत कि नाही तसेच सतत काय परतावं दिला जातोय हे सगळे उघड पणे दाखवले लागते , एकूण किती पैसे ते "मॅनेज" करीत आहेत हे सांगावे लागते
- ज्योतिषाला पती लावली कि काढलं दुकान .. कोणी टँकर केली कि "यावर विश्वास असावा लागतो" वैग्रे चालू फारच अंगाशी आला तर मग "बघा हजारो वारशाच्या भारतीय संस्कृती वॉर शंका घेताय " असा प्रति हल्ला ... धन्य
25 Sep 2020 - 11:50 pm | गामा पैलवान
25 Sep 2020 - 11:50 pm | गामा पैलवान
25 Sep 2020 - 11:51 pm | गामा पैलवान
25 Sep 2020 - 11:53 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तेच तर मी ही म्हणतोय. अब्सोल्यूट हा चर्चेचा विषय नाहीच्चे मुळी. प्रश्न फक्त आईनस्टाईनच्या सापेक्षतेचा आहे. ते शिंचं आईनस्टाईनचं नाव काढून टाका. त्या जागी तुमचं स्वत:चं नाव टाका.
बघा, तुमचं सुधारित विधान असं होईल :
( मूळ स्रोत : https://www.misalpav.com/comment/1080631#comment-1080631 )
वरील सुधारित विधान मी आनंदाने मान्य करायला तयार आहे.
आ.न.,
-गा.पै.
25 Sep 2020 - 11:58 pm | संजय क्षीरसागर
सर्व बाजूंनी पाडाव झाला आहे. ते तुम्ही मान्य करा किंवा न करा आता काहीही फरक पडत नाही.
26 Sep 2020 - 1:35 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
कसला पाडाव? मी अजिबात लढाई करीत नव्हतो. मी तर उलट आनंदित झालोय. तुमचा गोंधळ दूर केला म्हणून.
आ.न.,
-गा.पै.
26 Sep 2020 - 11:06 am | संजय क्षीरसागर
अर्थ उरला नाही हे दुर्दैव ! तुमचं सापेक्षतावादाचं आकलन साफ चूक आहे. बघा :
व्यर्थ प्रतिसाद टाकून तुम्ही उगीच मुद्दा रेटतांय हे तुमच्या आता पर्यंतच्या वाटचालीशी पूर्णपणे विसंगत आहे. आता यापुढे तुम्ही काय वाट्टेल तो प्रतिसाद दिलात तरी काहीएक उपयोग नाही.
27 Sep 2020 - 2:31 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
मी मुद्दा रेटतोय हे खरंय. कारण की आईनस्टाईन तसं म्हणतो म्हणून. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाचा आधार आईनस्टाईननं स्वत:च विशद केलेला आहे. त्याच्यापायी तुमच्या विधानाची हानी होऊ नये इतकीच माझी इच्छा आहे.
आ.न.,
-गा.पै.
27 Sep 2020 - 5:10 pm | संजय क्षीरसागर
मान देऊन मुद्दा सोडून देतो ! 👍
27 Sep 2020 - 5:21 pm | संगणकनंद
म्हणजे इतके दिवस आईन्स्टाइनच्या नावावर काय वाटेल ते फेकत होतात.
27 Sep 2020 - 7:19 pm | संजय क्षीरसागर
माझा मुद्दा बरोबर आहे आणि तो लेखातल्या विषयाशी सुसंगत आहे. पहिल्यापासून माझे सर्व प्रतिसाद नीट वाचा. मला कोणत्याही गोष्टीवर माघार घेण्याची गरज नाही. अर्थात, काहीही न वाचता निर्बुद्ध प्रतिसाद देण्यापलिकडे तुम्ही काहीही करत नाही त्यामुळे दरवेळी थोतरीत बसते.
तुम्हाला सापेक्षता वाद काय कसलीच काही माहिती नाही, उगीच केंव्हाही उगवायचं आणि वेडगळ प्रतिसाद दिला की स्वतःला धन्य समजायचं ही सवय सोडा.
27 Sep 2020 - 7:35 pm | संगणकनंद
बिनबुडाचा मनगढंत "संक्षी"प्तवाद तुम्ही आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या नावाखाली रेटत होता. आता श्री गामा पैलवान या अभ्यासू आयडीने तुमची फेकाफेकी उघडी पाडल्यावर "तुमच्या या समंजस स्वराला मान देऊन मुद्दा सोडून देतो !" या शर्करावगुंठीत शब्दात शेपूट घातलीत.
श्री गामा पैलवान यांनी काय म्हटलं आहे बघा:
मी मुद्दा रेटतोय हे खरंय. कारण की आईनस्टाईन तसं म्हणतो म्हणून. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाचा आधार आईनस्टाईननं स्वत:च विशद केलेला आहे. त्याच्यापायी तुमच्या विधानाची हानी होऊ नये इतकीच माझी इच्छा आहे.
म्हणजे आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या नावाखाली तुमची भलतीच फेकाफेकी चालू होती. अर्थात स्वतःचे पांडीत्य पाजळण्यासाठी अशी फेकाफेकी करणे तुमच्यासाठी नवीन नाही.
27 Sep 2020 - 7:58 pm | संजय क्षीरसागर
न प्रतिसाद वाचायची समज.
पुन्हा सांगतो, असला बोगसपणा सोडा. माझ्या विधानाची काही हानी होत नाही. सर्व विधानं बरोबर आहेत. तुम्हाला कोणत्याही विषयाचं काहीही गम्य नाही त्यामुळे असा वेंधळेपणा होतो आहे.
थोडी फार समज असेल तर सापेक्षतावादावर लिहा मग तुमच्या आकलनाची काय वाट लावतो ते पहा. पण तितकी हिंमत तुमच्यात नाही.
27 Sep 2020 - 8:03 pm | संजय क्षीरसागर
या गामांच्या विधानाची पुष्टी करुन दाखवा :
वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष असण्यामागील कारण स्थानभेद नसून वेगभेद आहे. असं आईनस्टाईन म्हणतो
मी ते वर खोडून काढलं आहे.
27 Sep 2020 - 8:14 pm | संगणकनंद
फेकाफेकी करणार्या ज्या आयडीने जिथे आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाची जिथे वाट लावली, मला हाकलले नसते तर सत्ताबदल झाला असता असे अचाट विधान केले, स्मृती स्ट्रींग सारखी अफलातून पूडी सोडून वर स्वतःला विज्ञानवादी म्हणवून घेतले तिथे माझ्या आकलनाची वाट लावणे अवघड असेल का त्या आयडीला?
फेकायचेच तर आहे.
आणि हो ते स्मृती स्ट्रींग हा शोध तुम्ही म्हणे प्रतिसादात सिद्ध करणार आहात (प्रयोगशाळेत नाही) हे वर लिहायचे राहीले.
27 Sep 2020 - 9:47 pm | संजय क्षीरसागर
भरकटवू नका. मी सापेक्षतावाद करेक्ट मांडला आहे. तुम्ही तुमचं त्याविषयीचं ज्ञान इथे पाजळा. एक शब्द लिहिण्याची हिंमत नाही, दुसर्याचं शेपूट पकडून चालण्यापलिकडे काही वकूब नाही आणि निघाले सापेक्षतावादावर बोलायला.
28 Sep 2020 - 9:50 am | संगणकनंद
आपलं बिनबुडाचं, कसलाही आगापिछा नसलेलं मत रेटण्याचं तुमचं कौशल्य माझ्याकडे नाही, नाही तर लिहीलं असतं :)
28 Sep 2020 - 10:34 am | संजय क्षीरसागर
तुमच्याकडे काहीही कौशल्य नाही. विषयाला धरुन बोलण्याची शामत नाही आणि कोणत्याही विषयाचं काहीही गम्य नाही हे आतापर्यंतच्या सर्व प्रतिसादांवरुन उघड आहे.
आता या गामांच्या विधानाची पुष्टी करुन दाखवा :
वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष असण्यामागील कारण स्थानभेद नसून वेगभेद आहे. असं आईनस्टाईन म्हणतो
अन्यथा गप पडा.
27 Sep 2020 - 10:46 pm | कानडाऊ योगेशु
संक्षीसरांचा हा दावा मलाही आतापर्यंत अतर्क्य वाटत होता पण ह्या चर्चेत २५.३० सेकंदांनंतर मेमरी स्ट्रींग सदृश गोष्टीचा उल्लेख आहे.
28 Sep 2020 - 9:40 am | प्रकाश घाटपांडे
त्या व्हीडीओत डॉ विद्याधर ओक यांनी दिलेला संदर्भ दुर्लक्षिता येणार नाही. किंवा स्यूडोसायन्स म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये या सहज समजेल फलज्योतिष काय आहे काय नाही या पुस्तकातील प्रकरणात मा.श्री रिसबूड म्हणतात,"
भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत.माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तहेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते.मी है। का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतो :
‘विश्वाचा गाडा आपोआप आपल्या नियमानुसार चाललेला आहे, त्याच्यामागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही.'
‘स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूत आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही.'
वरील दोन्ही विधाने बुद्धिवादी मंडळी अनेकदा करतात.मी श्रद्धाळू वगैरे नसलो तरी मला ही विधाने पटत नाहीत.का पटत नाहीत ते सांगतो......"
28 Sep 2020 - 9:45 am | संगणकनंद
स्मृती स्ट्रींग हा शोध नसून एका स्वयंघोषीत "विज्ञानवादी" मिपाआयडीचा अचाट दावा आहे. अर्थात त्यांच्या दृष्टीने तो शोधच असून तो स्वयंसिद्ध आहे. त्यासाठी प्रयोगशाळेत प्रयोग वगैरे करण्याचा फालतूपणा करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त एक पुनर्जन्मावरील लेख लिहा, त्यावरील प्रतिसादात हे "विज्ञानवादी" आयडी आपला "शोध" सिद्ध करतील.
28 Sep 2020 - 10:42 am | संजय क्षीरसागर
.
धन्यवाद ! विषयाचं शून्य ज्ञान असलेले आणि भूछत्र्यांसारखे व्यर्थ उगवणारे उपटसूंभ, इथे येऊन चांगल्या चर्चेत विघ्न आणतात.
28 Sep 2020 - 11:12 am | संगणकनंद
आणि तुमच्या फेकाफेकीला मुद्देसुद आक्षेप घेणारे तुमच्या दृष्टीने "विषयाचं शून्य ज्ञान असलेले आणि भूछत्र्यांसारखे व्यर्थ उगवणारे उपटसूंभ" :)
हा तुमचा दावा:
एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो.
नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते.
या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात.
अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात
आणि आता या मुद्द्याच्या बरोबर विरोधी तुमचा दुसरा दावा:
मॄत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही
एकंदरीत काय तर त्या त्या वेळी जी तंद्री लागलेली असेल त्याप्रमाणे द्यायचे ठोकून. आणि म्हणायचे "चांंगल्या चर्चा"
बरं या विधानांची सत्यासत्यता कशी तपासायची तर "तुम्ही धागा काढा, मी त्यावर प्रतिसाद लिहीन". ही तुमच्या "संशोधनाची" अत्याधुनिक पद्धत. आणि याला जे आक्षेप घेतात ते उपटसुंभ. धन्य आहात संशोधकराव.
28 Sep 2020 - 11:48 am | संजय क्षीरसागर
आधी स्वतःचे ज्ञान पाजळलंय त्याविषयी लिहा.
या गामांच्या विधानाची पुष्टी करुन दाखवा :
वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष असण्यामागील कारण स्थानभेद नसून वेगभेद आहे. असं आईनस्टाईन म्हणतो
अन्यथा गप पडा.
28 Sep 2020 - 11:56 am | संगणकनंद
आपण सापेक्षतावादाकडे नंतर येऊ.
आधी तुम्ही हे सांगा:
१. वरील दोन्ही दावे तुमचेच आहेत की नाही
२. ते दोन्ही दावे परस्परविरोधी आहेत की नाही
कसं आहे, हे खुप जुने मुद्दे आहेत. आधी ते निकालात काढू. मग सापेक्षतावादाकडे वळू. तर द्या पाहू उत्तरे.
28 Sep 2020 - 12:32 pm | संजय क्षीरसागर
तरी फालतू पचपच करणं बंद करा.
हे घ्या :
A Certain Part of Human Body Survives Death and The Information is Released from Micro Tubules in the Brain in the Space : Roger Penrose
ही घ्या काऊंनी दिलेली लिंक पुनर्जन्म खरोखरच असतो?
आणि रॉजर पेनरोज हा स्टीफन हॉकिंग्जबरोबर काम केलेला शास्त्रज्ञ आहे > Penrose has been awarded many prizes for his contributions to science. He was elected a Fellow of the Royal Society (FRS) in 1972. In 1975, Stephen Hawking and Penrose were jointly awarded the Eddington Medal of the Royal Astronomical Society.
ही घ्या रॉजर पेनरोजची क्रेडेंशियल्स :Roger Penrose
बसली ना आता सणसणसणीत थोतरीत ? परत तोंड वर करुन हा विषय आता निर्बुद्धासारखा पुन्हा काढू नका.
___________________________________
आता इथे जो शहाणपणा केलायं तो निस्तरा :
या गामांच्या विधानाची पुष्टी करुन दाखवा :
वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष असण्यामागील कारण स्थानभेद नसून वेगभेद आहे. असं आईनस्टाईन म्हणतो
काहीही वकूब नसतांना फालतू बडबड बंद करा.
28 Sep 2020 - 1:42 pm | संगणकनंद
हे जे काही भाराभर लिहीलं आहे तो सारा प्रकार "प्रयोगशाळेत सिद्ध झालेला वैज्ञानिक शोध" आहे की रॉजर पेनरोज यांनी "मांडलेली" थियरी आहे? :)
उत्तर हो किंवा नाही एव्हढंच दिलंत तरी चालेल.
अहो तो केवळ चर्चेतील मुद्दा आहे, वैज्ञानिक सत्य असल्याचा पुरावा नाही.
विज्ञान काय आहे हे खरंच तुम्हाला माहिती नाही. उगाच कुठेतरी काहीतरी वाचता, इथे येऊन खरडता आणि स्वतःला विज्ञानवादी म्हणवता.
28 Sep 2020 - 4:28 pm | संजय क्षीरसागर
ते रॉजर पेनरोजचं विधान आहे, तो काय तुमच्यासारखा बसल्याबसल्या पिंका टाकणारा वाटला का ? आणि ते विधान माझ्या विधानाला पुष्टी देतं.
आता इतकं सुद्धा कळत नसेल तर मग काय कळतं तुम्हाला ?
_________________________________
आता सापेक्षतावादावर इथे सुरुवातीला जी फालतू पिंक टाकली होती त्यानुसार स्वतःचं ज्ञान पाजळा.
28 Sep 2020 - 1:28 pm | Rajesh188
आणि त्याचे नियम त्रि मिती गृहीत धरून आहेत.
पण ब्रह्मांड हे किती मीती मध्ये अस्तित्वात आहे ह्याचे ज्ञान आपल्या अजुन माहीत नाही.
त्या मुळे नका भांडू.
संशोधक पण आत्महत्या करतील अती आत्मविश्वास पूर्ण ठाम मता मुळे.
Length, width, depths ह्याच मिती फक्त आपल्याला माहीत आहेत.
विश्व हे किती मिती मध्ये आहे हे पाहिले शोधा
29 Sep 2020 - 7:03 pm | प्रकाश घाटपांडे
तुमचे म्हणणे मान्य पण शेवटी आपण ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत जे सध्या आहे त्याचाच विचार करणार. जेव्हा फलज्योतिष आजच्या विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही असे जेव्हा विधान केले जाते तेव्हा त्याचा अर्थ जर उद्याच्या विज्ञानात ते सिद्ध झाले तर तेव्हा आम्ही ते मानू असाही आहेच ना! शिवाय ते विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही म्हणून त्याची किंमत शून्य असे मी म्हटलेले नाही. या ज्योतिषाच काय करायच हा लेखात ते दिले आहेच.