भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १७ - विश्वनिर्मिती संबंधित सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
28 Jun 2020 - 5:52 pm

या प्रकरणापासून 'अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह' हा विभाग सुरू होतो. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात विश्वनिर्मिती संबंधित विविध सिद्धांतप्रणाली तसेच जगाच्या सत्यत्वाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

अध्यात्मिकतेशी संलग्न असलेल्या सैद्धांतिक प्रणालींमधे रमण महर्षींना 'न के बराबर' इतकेच स्वारस्य होते. 'स्व' विषयीचे सजग भान जागृत ठेवणे ही साधकांच्या जीवनातली सर्वोच्च प्राथमिकता व्हावी ही एकमेव गोष्ट महर्षींच्या दृष्टीने सगळ्यात मोलाची होती. ती साध्य करायची असेल तर तर्कवितर्क करण्यात वेळ दवडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती (साधना/ उपासना) करणेच अत्यंत महत्वाचे आहे असे आग्रही प्रतिपादन ते सातत्याने करत असत. निव्वळ सैद्धांतिक स्वरूपाच्या चर्चांना प्रोत्साहन मिळू नये या दृष्टीने तर्ककुतर्क सुरु झाले की महर्षी एक तर मौन धारण करत असत, किंवा शक्य असेल तर प्रश्नकर्त्याला ' जो सगळ्या शंका कुशंका उपस्थित करतो आहे त्याच्या स्वरूपाचा शोध घेण्याकडे लक्ष केंद्रित केलेत तर तेच तुमच्या हिताचे ठरेल' असे सांगत संवादाची दिशाच बदलण्याचा ते प्रयत्न करत असत. क्वचित प्रसंगी साधकांच्या दृष्टीने खरोखर उपयुक्त ठरेल असे वाटले तरच तत्वज्ञानाच्या विविध पैलूंवर महर्षींनी सविस्तर भाष्य देखील केलेले दिसते. प्रश्नकर्त्याने तळमळीने विचारलेले प्रश्न संपल्यावर त्याने/ तिने निव्वळ आपलाच मुद्दा पुढे रेटण्यासाठी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली किंवा संवादाचा रोख वांझोट्या बौद्धिक कसरतींच्या ('स्टराईल इंटेलेक्चुअलिझम') दिशेने जातो आहे हे लक्षात आल्यावर मोठ्या खुबीने विषयांतर करून प्रश्नकर्त्याचे लक्ष त्याच्या/ तिच्या जिव्हाळ्याच्या तसेच व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त असलेल्या विषयांकडे वळवण्यात महर्षी कुशल होते.

जगाचे सत्यत्व किंवा विश्वाच्या उत्पत्तीबाबात सामान्यज्ञानाने ('कॉमन सेन्स') काढलेल्या निष्कर्षांपेक्षा रमण महर्षींचा दृष्टीकोन खूपच आगळावेगळा असल्याचे सर्वज्ञात असल्याने त्यांच्याबरोबर झालेल्या तात्विक चर्चेत हे दोन्ही विषय प्रामुख्याने चर्चिले जात असत. प्रश्नकर्त्याची भूमिका तसेच त्याच्या/ तिच्या वैचारिक परिपक्वतेशी सुसंगत ठरतील अशा पद्धतीने अन्य तात्विक विषयांप्रमाणेच महर्षी या दोन्ही विषयांवर दिलेली उत्तरे देखील शिंप्याने एखाद्याच्या मापाचे कपडे शिवावे तद्वतच 'बेतून' देत असत. असे असले तरी महर्षींच्या संकल्पना बहुसंख्य लोकांनी नि:शंकपणे स्वीकारलेल्या तसेच मनोभावे अंगिकारलेल्या भौतिक जगाच्या सत्यत्वाचे पूर्णपणे खंडन करण्याकडे झुकलेल्या होत्या हे सहज लक्षात येते.

भौतिक जगाविषयी बोलताना महर्षी तीन वेगवेगळ्या भूमिका घेत असत. तिन्ही भूमिकांचे महर्षींनी वेळोवेळी (ठराविक परिप्रेक्ष्यात) समर्थन केलेले दिसले, तरी त्यांनी वेळोवेळी केलेल्या टिकाटिप्पणींकडे साक्षेपाने पाहिले असता पहिले दोन सिद्धांतच सत्य आहेत किंवा साधकांसाठी उपयुक्त आहेत असे त्यांचे ठाम मत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

१. अजातवाद ('अगा जे घडलेची नाही', कार्यकारणभाव पूर्णपणे नाकारणारा सिद्धांत, अध्यात्मिक सत्य) -

जगाच्या उत्पत्तीसंबंधी विचार करू पाहता मुळात जगाची उत्पती कधीच झालेली नाही असे प्रतिपादन करणारी 'अजातवाद' ही एक प्राचीन हिंदू तत्वप्रणाली आहे. भौतिक जगातल्या कार्यकारणभावाला ही तत्वप्रणाली पूर्णपणे नाकारते. ज्ञानसिद्ध व्यक्तीची प्रचिती लक्षात घेतली तर आत्मतत्व ही एकमेव सद्वस्तु अपरिवर्तनीय वास्तविकतेच्या स्वरूपात निरंतर नांदत असते. त्यामुळे आत्मस्वरूपात कुठलीही गोष्ट अस्तित्वात येणे किंवा तिचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यताच नसते. जगाच्या उत्पत्तीविषयीचच्या बहुतांशी सगळ्याच सिद्धांतप्रणाली काळ, अवकाश आणि कार्यकारण भावावर आधारित असल्याने या तीन गोष्टी गृहीत न धरता त्या मांडताच येत नाहीत. अजातवाद ही एकमेव पूर्णपणे विपरीत भूमिका घेणारी सिध्दांतप्रणाली आहे. अजातवाद असे सांगतो की काळ, अवकाश आणि कार्यकारण भावाचे अस्तित्व फक्त अज्ञानी व्यक्तीच्या मनातच असते. आत्मप्रचिती आली की या तिन्ही गोष्टी अस्तित्वातच नाहीत असा बोध होतो.

अजातवाद सिद्धांतप्रणाली जगाचे सत्यत्व (व्यावहारिक वस्तुस्थिती) नाकारत नाही. जगाच्या उत्पत्तीची प्रक्रिया मात्र अजातवादाला पूर्णपणे अमान्य आहे. ज्ञानी व्यक्तीला जगाच्या सत्यत्वाचाच अनुभव येतो, मात्र परस्परांवर क्रिया प्रतिक्रिया घडत असल्याने सतत परिवर्तनशील असलेल्या नानाविध प्रकारच्या जड वस्तु आणि उर्जा यांची गोळाबेरीज असे त्या जगाचे स्वरूप नसते. ज्ञानदृष्टीने पाहता आत्मस्वरूपात अकारण प्रकट झालेला एक देखावा इतकेच जगाचे सत्यस्वरूप आहे. हा मुद्दा उलगडून दाखवताना महर्षी असे सांगत असत की जगत रूपी देखाव्याचे खरे स्वरूप किंवा त्या देखाव्यामागे सुप्त स्वरूपात असलेले पायाभूत चैतन्य (substratum) आणि स्वसंवेज्ञतेचे कार्यकलाप संभवत नसलेले निखळ अस्तित्व (beingness of the Self) ही एकच गोष्ट असल्याने स्वसंवेज्ञतेतच अपरिहार्यपणे जगद्रूप असलेला देखावा समाविष्ट झालेला असतो. ज्ञानसिद्ध व्यक्तीसाठी जग प्रकट स्वरूपात दृष्टीगोचर असल्याने नव्हे, तर आत्मस्वरूपाचाच एक अविभाज्य घटक या स्वरूपात सत्य असते.

जगाचे उगमस्थान (स्वसंवेज्ञता) तसेच त्याच्या अनेकत्वामागे दडलेल्या एकत्वाविषयी अज्ञानी व्यक्ती मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असते. परिणामस्वरूप ज्ञानेंद्रियांमार्फत मिळवलेल्या माहितीचा सातत्याने चुकीचा अन्वयार्थ लावत उर्जेच्या संयोगाने क्रिया प्रतिक्रियांमधे गुंतलेल्या स्वायत्त वस्तुंचा समूह अशा स्वरूपात अज्ञानी व्यक्ती तिच्या मनानेच सतत आभासी जगाची निर्मिती करत राहते. अज्ञाननिर्मित जग मूळ वस्तुस्थितीवर मनाने आरोपित केलेले असल्याने ज्ञानदृष्टीने पाहता त्याचे मूल्य स्वप्नाइतकेच आहे. या सगळ्या उहापोहाचे सार रमण महर्षी एका वाक्यात सांगत असत - आत्मस्वरूपात अंतर्भाव असलेला एक देखावा या स्वरूपात जग सत्य आहे, मात्र मनाने मूळ सत्यस्वरूपावर आरोपित केलेले जग मिथ्या आहे.

२. दृष्टी - सृष्टी वाद (मी आहे त्यामुळे जग आहे, मीच माझे जग निर्माण करतो, प्रातिभासिक सत्य) -

'अजातवाद' सिद्धांतप्रणाली प्रश्नकर्त्याच्या पचनी पडत नसेल तर महर्षी असे प्रतिपादन करत असत की 'मी आहे' या विचाराबरोबरच ('मी' च्या सापेक्षतेत) जग अस्तित्वात येते (उदा. गाढ झोपेतून जाग आल्यावर). 'मी आहे' हा विचार नसेल तर जगाचे ('मी' च्या सापेक्षतेत असलेले) अस्तित्व संपुष्टात येते (उदा. निद्रीस्त झाल्यावर). अद्वैत वेदांतात या सिद्धांतप्रणालीला दृष्टी - सृष्टी वाद असे नाव दिलेले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर अज्ञानी व्यक्ती अनुभवत असलेले जग हे मुळातच वस्तुस्थितीवर मनाने आरोपीत केलेले स्वप्न असल्याने मन निद्रिस्त झाले की त्या जगाचे अस्तित्व संपुष्टात येते. मन स्वतःला पूर्णपणे सत्य वाटेल असे आभासी जगत निर्माण करण्यासाठी सक्षम आहे हा सिद्धांत सिद्ध करण्यापुरतीच दृष्टी - सृष्टी वादाची धाव आहे. आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिले असता आभासी 'मी' ने मनाद्वारे निर्माण केलेले स्वप्नवत जगत असे जगाचे एकंदर स्वरूप असल्याने जगाची खरोखरच निर्मिती झालेली आहे असे अजिबात सिद्ध होत नाही. रमण महर्षी कधी कधी असे सांगत असत की 'दृष्टी - सृष्टी वाद' सिद्धांतप्रणालीत विश्वनिर्मीतीशी संबंधित अंतिम सत्याचा समावेश नसला, तरी एक कामचलाउ गृहीतकप्रमेय ('वर्किंग हायपोथेसिस') या स्वरूपात तिचा स्वीकार करणे साधनेच्या दृष्टीकोनातून पाहता उपयुक्त आहे. हा मुद्दा आणखी स्पष्ट करून सांगताना जगाकडे सातत्याने 'मनाने निर्माण केलेला एक चकवा' या स्वरूपात पाहण्याची सवय लावून घेतली, तर बाह्य जगताविषयी वाटणारे आकर्षण साहजिकच कमी होते. त्या योगे चित्त विचलित होणे कमी झाल्याने सतत स्वरूपानुसंधान साधणे सुलभ आणि सुकर होते असे स्पष्टीकरण महर्षी देत असत.

३. सृष्टी - दृष्टी वाद (जगाचे स्वायत्त अस्तित्व, उत्क्रांती वाद, व्यावहारिक सत्य) -

जगाच्या उत्पत्तीबद्दल सामान्यज्ञानाने ('कॉमन सेन्स') आकलन होण्याजोगी ही एक सिद्धांतप्रणाली आहे. या सिद्धांतप्रणालीनुसार 'कार्यकारण भावाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली वस्तुनिष्ठ वास्तविकता' असे जगाचे स्वरूप असल्याने जगाच्या निर्मितीचा मागोवा घेतला असता कोण्या एका विवक्षित क्षणी जगाच्या निर्मितीची घटना घडली असावी ही एकमेव शक्यता संभवते. पाश्चात्य जगतात प्रचलित असलेल्या बायबल मधील सृष्टीच्या उत्पत्तीची कथा ते 'बिग बँग थिअरी' पर्यंतच्या सगळ्या संकल्पनांचा समावेश सृष्टी - दृष्टी वादातच होतो. अजातवाद किंवा दृष्टी - सृष्टी वादाचा भावार्थ समजावून घेण्यासाठी एखादा साधक पूर्णपणे अपात्र आहे किंवा त्या सिद्धांतप्रणालीं त्याला पूर्णपणे अमान्य आहेत असे लक्षात आल्यावरच महर्षी सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींचा उल्लेख करत असत. बौद्धिक कुतुहल शमविण्यापलीकडे सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींची धाव जात नसल्याने पारमार्थिक साधकांनी त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही अशी शिकवण महर्षी सातत्याने देत असत.

*** व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि अध्यात्मिक सत्य या वेदांतातल्या संकल्पना उपरोक्त विवेचनात स्पष्ट केलेल्या आहेत.

प्रश्नः सृष्टीची निर्मिती कशी झाली? काही लोक म्हणतात की ती पूर्वनियोजीत (ईश्वरी संकल्प) घटना आहे. काही लोक म्हणतात की ही सारी ईश्वराची लीला आहे. सत्य नेमके काय आहे?
रमण महर्षी: जगभरच्या धार्मिक साहित्यामधे विविध सिद्धांत दिलेले आहेत. पण (सृष्टीची) निर्मिती खरोखर झालेली आहे का? निर्मिती झालेली असेल तरच तदनुषंगिक स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. आपल्यापैकी किती जणांना विश्वनिर्मितीविषयीच्या सगळ्या सिद्धांतप्रणालींची साद्यंत माहिती असते? एक गोष्ट मात्र आपल्याला पक्की माहित आहे की मी अस्तित्वात आहे. साहजिकच मी असा सल्ला देतो आहे की 'मी' चे खरे स्वरूप आधी जाणून घ्या, विश्वनिर्मिती झाली अथवा नाही हे त्या नंतर ठरवायला काय हरकत आहे?

प्रश्नः विश्वनिर्मितीच्या मागचा हेतू काय आहे?
रमण महर्षी: (स्मितहास्य करत) हा प्रश्न उपस्थित व्हावा हा एकमेव हेतू आहे. या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू करा, आणि शेवटी अवघ्या अस्तित्वाच्या निर्मितीची गंगोत्री असलेल्या आत्मस्थितीत लीन होऊन जा किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर सर्वोच्च सत्याचा साक्षात्कार करून घ्या. विश्वनिर्मितीमागच्या हेतूचा शोध घेण्यासाठी केलेल्या मानवी प्रयत्नांची परिणती शेवटी स्वरूपाचा शोध घेण्यातच होते. अनात्मतत्वाला दूर सारत सच्चिदानंद स्वरूपाचा त्याच्या चैतन्यमय विशुद्ध अवस्थेत साक्षात्कार झाला तरच साधकाचे समाधान होते. परम विश्रांत असलेली आत्मस्थिती प्राप्त केल्यावर साधकाचे प्रयत्न आपोआप थांबतात.

विश्वनिर्मीतीबद्दल जगभर किती सिद्धांतप्रणाली असाव्यात याची तर गणतीच नाही! त्यांचा सारा शोध बहिर्गामी आहे (बाह्य जगाच्या वस्तुनिष्ठ विश्लेषणाच्या आधारे चाललेला आहे). काळ आणि अवकाश अमर्याद असल्याने रोज नवनव्या सिद्धांतप्रणाली निर्माण होत राहतील. त्या मन आणि बुद्धीच्या चौकटीतच घुसमटत राहतील. त्या पेक्षा मनाच्या उगमस्थानाचा शोध आरंभला, तर काळ आणि अवकाशाच्या मर्यादा ओलांडून स्वरूपाची प्रचिती येते.

तुमच्या लक्षात येईल की जो तो आपले स्वत:चे समाधान करण्यासाठी विश्वाच्या उत्पत्तीचे वैज्ञानिक किंवा तार्किक स्पष्टीकरण शोधण्याच्या प्रयत्नात असतो. या बाबतीत निर्णायक स्वरूपाची तर्कनिष्पत्ती निघणे कालत्रयी तरी शक्य होणार आहे का? क्रमसृष्टीवर (क्रमशः विकसित होत गेलेले जग) आधारित असंख्य सिद्धांतप्रणाली आहेत. त्या उलट दृष्टी - सृष्टी वादाप्रमाणे 'युगपात सृष्टी'(simultaneous creation) हेच सृष्टीचे खरे स्वरूप आहे. द्रष्टा नसेल तर कुठलीही गोष्ट दृश्यमान होत नाही. द्रष्ट्याच्या स्वरूपाचा शोध घेतला तर अवघी सृष्टी द्रष्ट्यातच सामावलेली दिसते. दृष्टीला बहिर्मुख करून अंतहीन असलेल्या इंद्रियगोचर घडामोडींचा अन्वयार्थ लावत बसल्याने हाती काय येणार आहे?

प्रश्न: महर्षी नेहेमी असे सांगतात की माया आणि ब्रह्म एकच आहे. हे कसे शक्य आहे?
रमण महर्षी: आदि शंकराचार्यांची 'माया' ही संकल्पना नीट न समजल्यानेच त्यांना अनाठायी आणि अनुदार टीकेचे धनी व्हावे लागले. शंकराचार्यांचा उपदेश असा आहे: १. ब्रह्म सत्य आहे २. जग मिथ्या आहे आणि ३. जगच ब्रह्म आहे. दुसरे विधान करून आचार्य थांबले नाहीत. तिसरे विधान अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्या विधानाच्या संदर्भात बाकी दोन्ही विधानांचा खरा भावार्थ लक्षात येतो. आत्मस्वरूपात अंतर्भाव असलेला देखावा असा बोध झाला तर जग सत्यस्वरूप/ ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूपापेक्षा पृथकत्वाने नांदणारे (नानाविध वस्तुंनी बनलेले, कार्यकारण भाव असलेले) जग असा बोध झाला तर तेच जग मिथ्या/ मायास्वरूप आहे. अर्थातच द्रष्ट्याच्या प्रचितीनुसार अन्वयार्थ बदलला तरी तत्वतः माया आणि ब्रह्म यात अभेदच आहे!

*** ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रहैव नापरः (निरालम्बोपनिषद – २८)

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

28 Jun 2020 - 6:09 pm | शाम भागवत

१. ब्रह्म सत्य आहे २. जग मिथ्या आहे आणि ३. जगच ब्रह्म आहे.
_/\_