आजचा सुविचारः न पिणार्याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे.
रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते.
प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो. मन स्वच्छ करणारा साबण मात्र कुणी बनवला नाही. पण काहीही असलं तरी 'नाही निर्मळ मन, काय करील साबण...' असं म्हणून अंघोळ टाळणं हा पलायनवाद आहे. पाणी वाचवायचे अनेक इतर पर्याय उपलब्ध आहेत.
शरीरासोबतच मनात साचलेलं, साठून राहिलेलंही वाहून जायला हवं. भावना उचंबळत्या, विचार प्रगल्भ आणि जाणीवा टोकदार असल्या की आयुष्याला नवी दिशा मिळते.
आयुष्य फार सुंदर आहे. फक्त नजर हवी. सकाळी जेव्हा चहा पितो तेव्हा त्यातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच अस्तीत्व एकमेकांत विरघळवून टाकलेलं असतं. चहा पावडर, दूध, साखर, आलं, गॅस... प्रत्येकानी स्वतःची चव जपली तर चहाची चव येणार कशी? आणि चहाची चव आली नाही तर किक न बसल्याने सुखाच्या प्रत्येक अनुभुतीसाठी कुंथावं लागणार. तसंच आयुष्याचं आहे. कुटुंबातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच वेगळं अस्तीत्व जपलं तर घरात आणि लोकल ट्रेनच्या डब्यात फरक तो काय? सगळे एकत्र बसणार, जाणारही एकाच ठिकाणी... पण कुणाचा कुणाशी संबंध नाही. मोटरमनरुपी आई आणि गार्डरुपी बाप ह्यांच्यामधे पोरं चेन खेचायची वाट बघत बसतील. गंमत बघायला जमणारे पाकिटमार नातेवाईक वेगळेच.
सकाळी पेपर पूर्ण वाचून झाल्यावर त्या २०-२२ पानांमधल्या ठळक बातम्याच केवळ लक्षात राहतात, फाफट पसारा विस्मॄतीत जातो. तसंच आयुष्याचंही असायला हवं. नको त्या आठवणींचा पसारा गुंडाळून, दु:खद आठवणींची जळमटं काढून, ठळक आणि आयुष्य उजळ करणार्या गोष्टीच लक्षात ठेवायला हव्या. वर्तमानपत्राचा उपयोग दुसर्या सकाळी कशासाठी केला जातो ते माहिती आहेच. जशा आपल्याला आठवणी असतात तशाच लोकांनाही असतात. त्यामुळे लोकं आपल्याला कसं आठवतात हे सुद्धा महत्वाचं आहे. काही गोष्टींचा वापरानंतर कचरा होतो, पण फुलांचं मात्र निर्माल्य होतं.
आयुष्यातील सुंदर क्षण वेचून ठिपक्यांची रांगोळी रेखाटायची, की जे आपलं नव्हतंच ते न मिळाल्याच्या काल्पनीक दु:खात हातात असलेल्या सुखक्षणांकडे दुर्लक्ष करून आयुष्याच्या हसर्या फुलांवर शेण फिरवायचं, हे आपल्याच हातात आहे. शेणावरून आठवलं, गाईच्या शेणाला पंचगव्यात स्थान आहे; बैलाच्या शेणाला मात्र बुलशीट म्हणतात.
अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं. आठवणींची अंडी मात्र उबवू नये.
आपला,
आदि जोशी
प्रतिक्रिया
17 Nov 2017 - 3:44 pm | पुंबा
ज्जे बात!!
आता, अंडी चांगलीच दवणीय व्हायलीत राव...
हे पण अंडं आवडलं.
17 Nov 2017 - 4:06 pm | खेडूत
:))
झकास!!
17 Nov 2017 - 4:06 pm | एस
हे अंडं खरं दवणीय झालं आहे.
17 Nov 2017 - 6:11 pm | सुबोध खरे
असेच म्हणतो
17 Nov 2017 - 6:44 pm | महेश हतोळकर
आता जमायला लागलं.
पुलेशु.
17 Nov 2017 - 5:02 pm | सूड
वाह!!
17 Nov 2017 - 6:06 pm | पगला गजोधर
मागच्या शाळेतील लेखात ट्रीप्पल सेंच्युरी हाणणारा
फलंदाज, या वेळी मात्र अंड्यावर परतला...पॅव्हेलिअन कडे
17 Nov 2017 - 6:26 pm | तेजस आठवले
फारच छान! पुढील वाक्ये अगदी दवणीय झाली आहेत.
शेवटच्या ओळींमध्ये तर आकाशगंगेएवढ्या विचारांना जणू एका लहानश्या अंड्यात बंदिस्त करून ठेवल्यासारखं वाटतंय :)
पण न जाणो कधी स्वतःच्याच प्रतिभेची टाचणी लागून ते अंडे फुटले तर मग फारसा विचार न करता सरळ झणझणीत भुर्जी करणेच श्रेयस्कर. मुळात माझ्या प्रतिभेचा वारू चौखूर उधळलेला असताना माझ्या लेखनाने दगडालाही मी पाझर फोडतो तर ते अंडे ना फुटल्याशिवाय राहील का ?(उगाच नाही मला साहित्यातील रडका बुकल म्हणत! डिहायड्रेशन झालेल्या माणसाच्या शरीरात एकवेळ पाणी शिल्लक नसेल पण माझे साहित्य वाचल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू येणार हे मात्र नक्की!)
हे वपु वाटतंय.
17 Nov 2017 - 6:34 pm | नाखु
या गुलाबजाम लेखात दवणीय पाक ठायीठायी आहे
17 Nov 2017 - 6:51 pm | सुबोध खरे
बाकी आजचा सुविचार भारी आहे
आजचा सुविचारः न पिणार्याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
17 Nov 2017 - 7:07 pm | दुर्गविहारी
मस्तच जमलीत दवणीय अंडी. यांचा पुर्ण पोल्ट्रीफॉर्म होणार आता. ;-)
17 Nov 2017 - 8:15 pm | टवाळ कार्टा
_/\_
17 Nov 2017 - 10:15 pm | Rahul D
1 no
18 Nov 2017 - 12:39 am | संग्राम
_/\_
18 Nov 2017 - 2:20 am | अभिदेश
हे खरं दवणीय झालं आहे. येऊ द्या अजून.
18 Nov 2017 - 6:30 am | अभिजीत अवलिया
मस्त.
18 Nov 2017 - 7:48 am | आनन्दा
अंड्याचं आम्लेट करायची इच्छा आहे, पण सुचत नाहीये. त्यामुळे माझी अवस्था दयनीय झालीय
18 Nov 2017 - 10:42 am | जागु
छान लिहील आहे.
18 Nov 2017 - 11:51 am | गोंधळी
तुम्ही अंड्यांचा नविन ब्रँड तयार करायला हरकत नाहि.
ब्रँडेड दवणीय अंडी.
पुण्यातुन खुप येईल तुम्हाला .
18 Nov 2017 - 11:52 am | गोंधळी
पुण्यातुन खुप मागणी येईल तुम्हाला.
18 Nov 2017 - 12:41 pm | स्वाती दिनेश
हे पण अंडे भारीच..
स्वाती
18 Nov 2017 - 6:35 pm | नंदन
प्रात:दवणीय!
18 Nov 2017 - 8:47 pm | पैसा
भारी जमलंय!
18 Nov 2017 - 10:34 pm | मित्रहो
शत प्रतिशत दवणीय
22 Nov 2017 - 12:06 am | रातराणी
किती सुंदर लिहिताहात!! पट्टीच्या गवयाचा सूर लागल्यावर कसं भारावून जायला होतं अगदी तसंचं वाटतंय हो ;)
28 Nov 2017 - 4:11 pm | शित्रेउमेश
||| अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं. आठवणींची अंडी मात्र उबवू नये. |||
बापरे खूपच भन्नाट
28 Nov 2017 - 4:22 pm | पद्मावति
मस्तं लिहिताय :)
मी पुर्वी कधीतरी वाचलेला हा सुवीचार--- 'घर म्हणजे एक पिझाबॉक्स असतो. त्यातले कुटुंबीय म्हणजे पिझाचे तुकडे. दिसायला वेगळे आणि त्रिकोणी असु देत पण शेवटी असतात सगळे एकाच गोल पिझ्याचा भाग' =))
29 Nov 2017 - 4:01 pm | चारु राऊत
सुंदर लिहील आहे.
29 Nov 2017 - 4:01 pm | चारु राऊत
सुंदर लिहील आहे.