निंदा एक धंदा

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
19 Jun 2017 - 3:36 pm

काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात भारतातील एका आघाडीच्या उद्योगपतींचा परिचय वाचण्यात आला. हे गृहस्थ त्या आधीच्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जाहीर झाले होते. त्यांच्यावरील या लेखात त्यांच्या साध्या राहणीसंबंधीचे काही उल्लेख होते. ते एवढे धनाढ्य असूनही विमानप्रवास मात्र नेहेमी ‘इकॉनॉमी क्लास’ नेच करतात, त्यांच्या घरी आणि कंपनीत वीज व पाणी यांचा काटकसरीने वापर होण्याबाबत ते खूप काटेकोर असतात, इत्यादी.

हे सर्व वाचून मी प्रभावित झालो आणि माझ्या एका परिचिताला हे सगळे कौतुकाने सांगितले. त्यावर त्याची प्रतिक्रिया मला काहीशी खचवणारी होती. तो मला म्हणाला, ‘अहो, या वलयांकित लोकांसंबंधी हे जे काही प्रसिद्ध होते ना, त्यावर माझा काही विश्वास नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांचा जो अवाढव्य उद्योग असतो, तो ते पूर्णतः प्रामाणिकपणे आणि सर्व कायदेकानू पाळून करतात का? प्रथम त्यांनी शपथेवर सांगावे की ते त्यांचा उद्योग कुठल्याही प्रकारची लबाडी न करता चालवत आहेत आणि मग या इतर साधी राहणी वगैरेच्या गप्पा माराव्यात’’.

प्रत्येक माणूस हा गुणदोषयुक्त असतो. व्यवहारात तर प्रत्येक जण काही ना काही लबाडी करत असतोच. काही वेळेस तर आपली इच्छा नसतानाही आपल्याला नाईलाजाने लबाडीत सामील व्हावे लागते. पण तरीसुद्धा एखाद्याजवळ काही चांगले गुण नक्कीच असतात. त्याची दखल घ्यायला हरकत नसावी. पण नाही, एखाद्याविषयी बोलताना त्याचे चांगले गुण दुर्लक्षित करून त्याचे दोष मात्र आवडीने चघळणारी भरपूर मंडळी आपल्याला दिसतात. किंबहुना, आपल्याजवळ एखाद्याच्या लबाडीचे कोणतेही पुरावे नसले, तरी त्याच्यावर आगपाखड करीतच राहायची आणि त्याचे काही चांगले गुण हे नजरेत भरण्याइतके असले तरी त्याची दाखलसुद्धा घ्यायची नाही, हा आपला खाक्या असतो.

समाजातील कुठल्याही गोष्टीकडे पाहताना सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही दृष्टीकोन ठेवता येतात. या संदर्भात एक साधे उदाहरण नेहमी दिले जाते. समजा, एक पेला पाण्याने अर्धा भरून टेबलावर ठेवलेला आहे. त्याकडे बघताना सकारात्मक माणूस म्हणेल की हा पेला अर्धा भरलेला आहे. तर नकारात्मक माणूस मात्र तो पेला अर्धा रिकामाच आहे हे ठसवू पाहील. अशा प्रकारची ‘पेल्यातले रिकामेपण’च सतत बघत राहणारी अनेक माणसे माझ्या संपर्कात येतात आणि त्यांची ही वृत्ती बघून मी खिन्न होतो.

काही वर्षांपूर्वी ‘जागतिक लोकसंख्या दिना’च्या दिवशी एका दैनिकात भारतातील एका थोर शास्त्रज्ञांचा आपल्या लोकसंख्येविषयी माहितीपूर्ण लेख आला होता. साधारणपणे आपण सामान्य जन भारताच्या वाढत्या लोकसंख्येबाबत सतत चिंताच व्यक्त करीत असतो. परंतु, सदर लेखात त्या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या संख्याशास्त्रीय अहवालांचे दाखले देऊन असा निष्कर्ष काढला होता, की गेल्या काही वर्षांत आपल्या लोकसंख्यावाढीचा दर कमी होतोय. तेव्हा भविष्यात हा प्रश्न अगदी अक्राळविक्राळ स्वरूप धारण करणार नाही, अशी चिन्हे आहेत. तो लेख मला पटला होता.

असेच एकदा गप्पाटप्पामध्ये मी त्या लेखातील हा मुद्दा माझ्या सहकाऱ्यांना सांगितला. लगेचच एक ‘रिकामा पेलाप्रेमी’ त्याच्या विरोधात तावातावाने बोलू लागले, “अहो, हे लेखबिख विसरा. आपल्या झोपडपट्ट्या बघा, भिकाऱ्यांच्या पोरांची लाईन बघा. तुम्ही-आम्ही मूठभर सुशिक्षित आपापले कुटुंब मर्यादित ठेवतो. पण, हे असले लोक लोकसंख्या सतत वाढती ठेऊन आपल्या देशाची वाट लावतात.”
त्यावर मी म्हणालो, “अहो, आपण सामान्य लोक पुरेशा माहिती व अभ्यासाशिवाय सतत उथळ विधाने करीत असतो. पण, या शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे, तेव्हा त्यात नक्कीच तथ्य असणार.” परंतु, नकारात्मकता अंगी भिनलेले हे गृहस्थ पुढे म्हणाले, “हे संख्याशास्त्रीय अहवाल, आकडेवारी ही सगळी धूळफेक असते. तुम्हाला माहित असेलच की ‘Statistics can prove anything except the truth”.

तो लेख वाचल्यावर मला तरी भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत आशावादी राहावेसे वाटत होते; परंतु या गृहस्थांनी मात्र त्यांच्या बोलण्याने मला काहीसे निराश केले. नुकताच माझ्या वाचनात अजून एका दिग्गज शास्त्रज्ञाचा असाच एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी म्हटले आहे की भारतच काय, पण चीनच्या लोकसंख्यावाढीचा आलेख सुद्धा आता चढता राहिलेला नसून तो स्थिर होत आहे. तेव्हा याबाबत आता फार चिंता करत बसू नये. आता हे वाचून माझे पुरते समाधान झालेले आहे. हे इतर कोणाला सांगण्याच्या फंदात न पडलेले बरे !

सक्रीय राजकारणापासून स्वतःला कायम दूर ठेवणारे पण येता जाता प्रत्येक राजकारणी व्यक्तीसंबंधी वाईट बोलणारे असंख्य लोक आपल्याला आढळतात. हे लोक राजकारणातील वाईट गोष्टी अथवा दोष दूर करण्यासाठी स्वतः काहीही करीत नाहीत. मात्र त्यावर सतत टीका करून गप्पांचे अड्डे फक्त रंगवतात. एकदा एक परिचित म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चांगले सर्वोच्च नेतृत्व हे मिळालेलेच नाही बघा”. मग त्यांनी आपल्या देशाच्या पहिल्या ते आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांवर सडकून टीका केली. मी त्यांना म्हणालो, “तुमच्या म्हणण्यात तथ्य असू शकेल; पण मला असे वाटते की कुठल्याही पंतप्रधानाला आपल्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा राजकारणातले अधिक कळते, एवढे तर नक्की. म्हणून तर तो त्या उच्च पदावर पोचतो आणि आपण फक्त क्रियाहीन टीकाकार राहतो”.

कोणत्याही राजवटीत देशाचा संथ का होईना पण काहीतरी विकास हा होतच असतो. परिपूर्ण असा नेता (किंवा माणूस) कोणीच नसतो. तेव्हा आपणच बहुमताने निवडून दिलेल्या नेत्यांना सतत दूषणे देणे कितपत बरोबर आहे? पण होतय काय, की आपण जो चष्मा आपल्या डोळ्यांवर चढवलेला असतो त्यातून आपल्याला फक्त ‘रिकामा पेलाच’ नेहमी ठळकपणे दिसतो. पेल्याचा भरलेला भाग आपण जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतो.

एकदा अशीच दूध उद्योगावर चर्चा चालू होती. आता दुधाचा दर्जा हा त्यामध्ये पाणी मिसळले आहे की नाही यावर ठरतो.( पाणी सोडून इतर जे काही मिसळले जाते ते तूर्तास बाजूला ठेवूयात !). काही मोजके दूध उद्योग ग्राहकांना शुद्ध दूध देण्याबाबत प्रसिद्ध आहेत. या चर्चेत एकजण कौतुकाने म्हणाले, की ‘क्ष’ उद्योगाचे दूध खरोखरच शुद्ध असते. त्या गृहस्थांना याची मनापासून खातरी होती व म्हणून त्यांनी हे मोठ्या उत्साहाने सांगितले .झाले, त्यांच्या उत्साहावर पाणी टाकायला दुसरे महाशय टपलेलेच होते. ते म्हणाले, “काय घेऊन बसलायत राव, सगळे दूधवाले सारखेच. अहो, दुधात पाणी न मिसळणारा गवळी अद्याप जन्माला यायचाय!” एखाद्या गोष्टीबाबत आपल्यात नकारात्मकता किती टोकाची असते, याचे हे उदाहरण. किमान एखादा तरी उद्योग सचोटीने चालला असेल हे मानायला आपण तयार नसतो.

दरवर्षी आपला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होतो. त्यानंतर लगेच त्यावर विविध लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागतात. अर्थसंकल्प तयार होण्याआधी देशातील अनेक अर्थतज्ज्ञ त्यासाठी राबत असतात व त्यांच्या सखोल अभ्यासातूनच तो तयार होतो. परंतु, एकदा का तो सत्ताधारी पक्षाच्या अर्थमंत्र्याने सादर केला, की सर्व विरोधी पक्षांचे नेते त्यावर कडाडून टीका करत राहतात. आतापर्यंत एकाही विरोधी पक्षनेत्याने, सत्ताधाऱ्यांनी मांडलेला अर्थसंकल्प अंशतः तरी चांगला आहे, असे म्हटल्याचे मला काही आठवत नाही. ही सर्व मंडळी आपले ‘विरोधीपण’ दाखवण्यासाठी अर्थसंकल्पातील चांगल्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यातील दोष काढण्यातच मग्न असतात. आणि मग, ‘’हा अर्थसंकल्प श्रीमंतांची पाठराखण करणारा व गरिबांना मात्र अधिक गरीब करणारा आहे’’ अशी ठरलेली हाकाटी पिटत राहतात. आपल्या नकारात्मक वृत्तीचे सार्वजनिक पातळीवरील हे एक मोठे उदाहरण ठरेल.

आपले परिचित, मित्रपरिवार आणि एखाद्या कार्यालयातील सहकारी यांसारख्या संबंधांमध्येही गप्पांमधली नकारात्मकता सतत उफाळून येत असते. माझ्या माहितीतील एक महाराष्ट्रस्थित गृहस्थ येता जाता दुसऱ्यांना दूषणे देत असतात. त्यांचे बरेचसे समकालीन मित्र अमेरिकादी प्रगत देशांत स्थायिक झालेले आहेत व तेथे उच्च पदांवर कार्यरत आहेत. या गोष्टीचा न्यूनगंड या गृहस्थांच्या मनात आहे. एकदा अशीच परदेशस्थ भारतीयांबाबत चर्चा चालू होती. तेव्हा ते मला म्हणाले, “NRI म्हणजे काय, माहिती आहे ना?” मी हसून म्हणालो, “हो, अर्थातच Non Resident Indians”. त्यावर ते उपहासाने हसून म्हणाले, “ हँ, NRI म्हणजे Non Required Indians !”
त्यांनी या व्याख्येने सर्व एन आर आयना अगदी निकालातच काढले. पुढे गमतीचा भाग असा, की या बोलण्यानंतर पाच वर्षांनी त्याच गृहस्थांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना झाला. आता ते स्वतःच्या मुलाला ‘Non resident” समजतात की तो ही ‘Non required’ ठरलाय, हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे!

नात्यागोत्यातील गप्पांमध्येही नकारात्मकता खूप जाणवते. विशेषतः दुसऱ्याचे दोष हे ठळकपणे दाखवले जातात. सासू-सून संबंध हे या संदर्भातील चपखल उदाहरण आहे. या दोघी लोकांसमोर दाखवताना सामंजस्याचा कितीही आव आणू शकतात. परंतु, एकमेकींच्या गैरहजेरीत मात्र एक दुसरीच्या तक्रारींचाच पाढा वाचते; एकमेकींच्या चांगल्या गुणांबद्दल बोलायचे शक्यतो टाळले जाते.

ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती वा यंत्रणा ही गुण व दोषांनी युक्त असते. दोषांची चर्चा जरूर व्हावी, जेणेकरून त्या व्यक्तीस सुधारण्यास प्रेरणा मिळेल. परंतु, एखाद्याची चांगली बाजू अथवा गुण पूर्णपणे दुर्लक्षून त्याची वाईट बाजू अथवा दोषच उगाळत राहणे हा मानवी स्वभाव असतो. आणि बऱ्याच जणांचा तो लाडका उद्योग असतो. त्यामुळेच समाजात दोष गाणारी तोंडे उदंड दिसतात, पण शाबासकीचा सूर मात्र शोधावा लागतो.
**********************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक )

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

असा सगळा प्रकार झाला तर

वरुण मोहिते's picture

19 Jun 2017 - 3:52 pm | वरुण मोहिते

के

एस's picture

19 Jun 2017 - 3:54 pm | एस

अच्छा!

मोदक's picture

19 Jun 2017 - 4:16 pm | मोदक

माझ्या माहितीतील एक महाराष्ट्रस्थित गृहस्थ येता जाता दुसऱ्यांना दूषणे देत असतात. त्यांचे बरेचसे समकालीन मित्र अमेरिकादी प्रगत देशांत स्थायिक झालेले आहेत व तेथे उच्च पदांवर कार्यरत आहेत. या गोष्टीचा न्यूनगंड या गृहस्थांच्या मनात आहे. एकदा अशीच परदेशस्थ भारतीयांबाबत चर्चा चालू होती. तेव्हा ते मला म्हणाले, “NRI म्हणजे काय, माहिती आहे ना?” मी हसून म्हणालो, “हो, अर्थातच Non Resident Indians”. त्यावर ते उपहासाने हसून म्हणाले, “ हँ, NRI म्हणजे Non Required Indians !”

यांना एकदा मिपावर आणा..

बादवे अशा सर्व नकारात्मक लोकांची निंदा करण्यासाठी लेख हा लिहिला का? त्यांच्यातही काहीतरी पॉझिटिव्ह असेल नाही :)

नकारात्मक बोलत वागत असलेल्या लोकांविषयी लेखाने एकही सकारात्मक वाक्य लिहीलेले नाही. त्यांना समजुन धेण्याचा प्रयत्न तर दुर की बात.
विम्याच्या धंद्याचा संपुर्णपाया नकारात्मक विचारसरणीवर आहे ?
कमळ सुंदर आहे चिखलाकडे बघुच नका ? यात चिखलातुनच उमललेल्या त्याशी असलेल्या कमळाच्या अतुट जैविक संबंधाचे अनुबंधाचे काय मित्रा ?
पॅाजीटीव्ह निगेटीव्ह च्या द्वैता पलीकडे ॲाब्जेक्टीव्ह सत्याचा ही प्रांत असतो ना ?
ते ही असो तुम्हास पॅाजीटिव्ह थिंकिंग वरील अगदी ताजा रीसर्च कदाचित माहीत नसावा
हा असा शाळकरी लेख अंतरनाद मध्ये आला हे कळल्यावर शांततेच नोबेल ओबामा ला भेटल्यावर जसा नोबेल विषयी नकारात्मक विचार आला तसाच अंतरनाद च्या घसरलेल्या
दर्जाविषयी ही पुर्ण नकारात्मक विचार आला
असो

हतोळकरांचा प्रसाद's picture

19 Jun 2017 - 7:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

सुंदर लेख! आवडला!

जेम्स वांड's picture

19 Jun 2017 - 7:19 pm | जेम्स वांड

चुकचुकण्याशिवाय आपण तरी काय करू शकणार. इथेच उदाहरण मिळते. अखिल मिपावरचे एकुलते एक डॉन चांगले एमटीएस वगैरे दिलेले अन बोर्ड फक्त ३ गुणांनी हुकलेले तरी ते दशानन ब्वा त्यांसी सर्वर स्पेस अन एरर मॅसेज वगैरे सांगीत बसले, कौतुक म्हणून नाहीच मेलं.

तुमचं,

“अहो, हे लेखबिख विसरा. आपल्या झोपडपट्ट्या बघा, भिकाऱ्यांच्या पोरांची लाईन बघा. तुम्ही-आम्ही मूठभर सुशिक्षित आपापले कुटुंब मर्यादित ठेवतो. पण, हे असले लोक लोकसंख्या सतत वाढती ठेऊन आपल्या देशाची वाट लावतात.”

हे वाचून एकदम १२ अँग्री मेन ह्या हॉलीवूडपटावर स्वैरपणे आधारित 'एक रुका हुआ फैसला' ह्या उत्तम बॉलीवूडपटाची आठवण झाली जागी. त्याबद्दल आभार.

ज्योति अळवणी's picture

20 Jun 2017 - 9:10 am | ज्योति अळवणी

सक्रीय राजकारणापासून स्वतःला कायम दूर ठेवणारे पण येता जाता प्रत्येक राजकारणी व्यक्तीसंबंधी वाईट बोलणारे असंख्य लोक आपल्याला आढळतात.

या मुद्याला सहमत. हे खरं आहे की बहुससंख्य राजकीय व्यक्तींनी राजकारणाला बदनाम केलं आहे. म्हणूनच कदाचित आजची सुशिक्षित पिढी राजकारण करियर ऑपशन म्हणून नाही निवडत. कदाचित म्हणूनच आहे या राजकीय परिस्थितीतून बाहेर पडायला आपल्याला वेळ लागेल.

शहाण्या लोकांनी सतत निंदा करीत रहावे. सगळेजण एकमेकांची खुसपटे काढत गेले तरंच बरेच प्रॉब्लेम्स समजतील. फक्त निंदा करताना पुराव्यांच्या आधारे करावी, अभ्यासपूर्ण करावी. उगा तुपाळ हसत ग्गोड ग्गोड बोलत राहून सगळ्यांच्या गुडबुकात राझण्यापेक्षा प्रामानिकपने टिका करत राहणं बरं.

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार ! लेखावरील टीकेचेही स्वागत आहे.

लेख पटला, खरच अस सारख नकारात्मक बोलल्याने जगण्यातील सर्व मजाच जाईल.

कुमार१'s picture

28 Jun 2017 - 7:15 am | कुमार१

palambar , प्रतिसादाबद्दल आभार.