विवाह: परंपरा आणि प्रतिष्ठा

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Jun 2017 - 4:59 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

विवाह कसे छोटेखानी असावेत, लग्न खर्च कसा कमी असावा, हुंडा घेणे बेकायदेशीर आहे अशा चर्चा नेहमी ऐकू येतात. पण प्रत्यक्षात परंपरा टाळण्याची उदाहरणे क्वचितच पहायला मिळतात. हा लेख दुसर्‍याला सांगण्यासाठीचा केवळ उपदेश नाही. आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी माझ्या मुलीच्या विवाहाबद्दल बोलतो. (आधी केले मग सांगतोय):
माझ्या मुलीचा विवाह ठरवताना मुलीच्या संमतीने मी काही अटी घातल्या होत्या. हुंडा देणार नाही, सोने-नाणे नाही, मानपान नाही, वरमाया नाही, वाजंत्री नाही, मिरवणूक नाही, घोडा नाही, पत्रिका नाही, गर्दी नाही, आहेर नाही, फटाके नाहीत आणि लग्न साध्या पध्दतीने फक्‍त दोन कुटुंबातील माणसांत लावायचे. ज्या ज्या कोणाला ह्या अटी मान्य असायच्या त्यानांच फक्‍त घरापर्यंत येऊ दिले.
अटी ऐकून नातेवाईक आणि मित्र म्हणायचे, ‘असे शक्य होणार नाही. तुम्हाला माघार घेऊन तडजोड करावी लागेल.’ मी ठाम राहिलो. शेवटी माझ्या अटी मान्य करणारे चांगले स्थळ मिळाले. चांगली माणसं मिळालीत. मुलीने साथ दिल्यामुळेच मला असे करता आले.
मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मी मांडव घातला नाही. म्हणून एक वा अर्धे हिरवंगार झाड वाचले. वाजंत्री लावली नाही. म्हणून आजूबाजूच्या भागात ध्वनी प्रदुषण झाले नाही. नवरदेवाकडचे लोक सायखेडं घेऊन येतात त्यांना नाही म्हणालो. त्यांची दगदग वाचली. नातेवाईकांना आणि मित्रांना मांडव आणि लग्नासाठी दोन दिवस द्यावे लागले असते. त्यांचा एक दिवसाचा वेळ वाचला. घरच्या घरी हळद लावली. (हळद लावण्याचा कार्यक्रम आता कमर्शिअल झाला आहे). अशा बारीक सारीक अनेक बाबी सागंता येतील. असो.
पूर्वी तीन दिवसाचे लग्न असायचे. तिसर्‍या दिवशी नवरदेव- नवरी तोंड धुवायला जाणे, मांडवफळ (आहेराचा कार्यक्रम), घरोघर चहापाणीला जाणे, गावभर मिरवणूक वगैरे. लग्नातला हा तिसरा दिवस आता लुप्त झाला. त्याप्रमाणे लग्नाआधीच्या दिवसाचा मांडव कार्यक्रमही बंद व्हायला हवा.
हुंडा विरोधी कायदा 1961 ला झाला आणि हुंडा घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे, हे प्रत्येकाला माहीत असलं तरी छुप्या पध्दतीने सौदे केले जातात. (मुलीच्या विवाहानंतरही काही वर्ष प्रथेच्या नावाखाली अनेक प्रकारच्या न परवडणार्‍या बोळवणी करत रहाव्या लागतात. हा ही एक हुंड्याचाच प्रकार आहे.) वधू आणि वर यांचे सामाजिक स्थान एकच असताना वराकडील लोकांना मानपान देण्याचा प्रकार कधीपर्यंत चालणार. आज काळ बदलला. मुलींची संख्या घटली. (मुलींचीं संख्या कमी होण्यामागे अशा फालतू प्रथाच कारणीभूत आहेत!) मुलांप्रमाणे मुलींचे उच्च शिक्षण केले जाते. शिक्षणाला पैसा लागतो. स्त्रियाही आयुष्यभर पुरूषांसारख्याच नोकर्‍या- व्यवसाय करून कुटुंबासाठी पैसे कमवतात, (तरीही स्वयंपाक, धुणी, भांडी, झाडझुड, स्वच्‍छता, मुलांचे संगोपन अशी बरीच कामं फक्‍त महिलांचीच). समजा हुंड्याची प्रथा उलटी करण्यात आली. म्हणजे मुलाने मुलीला हुंडा द्यायचा, तर वधूपिता हुंडा घेईल का? नाही घेणार. त्याला ते लज्जास्पद वाटेल. तसे वराकडील लोकांना हुंडा घेणे कमीपणाचे वाटले पाहिजे. (मुलांकडून मुलीने हुंडा घेतला पाहिजे अशी टोकाची भूमिका न घेता मुलाने मुलीकडून हुंडा घेऊ नये.)
विवाह खर्च वधूच्या वडलांनीच का करावा? लग्नात भरमसाठ खर्च करू नये. थोडाफार करायचा झाला तर तो दोन्ही कुटुंबांनी का करू नये. मुलगी आणि मुलगा असा आज भेद करायचा नसेल तर यापुढे आजपर्यंत चालत आलेल्या चुकीच्या प्रथांविरूध्द ठाम राहून बंड करायला हवे.
लग्नाच्या पंक्‍तीत जेवणावर प्रंचड खर्च केला जातो. पण वाया जाणार्‍या अन्नावर कोणीच बोलत नाही. पत्रावळीत मावत नाही इतके पदार्थ बनवले जातात. अन्न तसेच टाकून लोक निघून जातात. बफे जेवणामध्ये अन्न वाया जात नाही असा समज आहे. पण सर्वात जास्त अन्न बफे जेवणात वाया जाते. लोक हवे तसे प्रचंड वाढून घेऊन उरलेले अन्न टाकून देतात. भारतात वीस कोटी लोक रोज अर्धपोटी वा उपाशी झोपून जातात. या पार्श्वभूमीवर लग्नातल्या जेवणावळीकडे पहावे म्हणजे यातली भयानकता दिसून येईल.
काही पैसेवाले लोक आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्नात भरमसाठ पैसा खर्च करतात. समाजात त्यांचा कित्ता गिरवत ज्यांची ऐपत नाही ते लोकही शेती विकून- कर्ज काढून मुलींचे लग्न करतात. समाजातल्या अशा वाईट प्रथा घालवण्यासाठी प्रत्येकाने आपल्यापासून सुरूवात करायला हवी.
(या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

1 Jun 2017 - 10:46 pm | संजय क्षीरसागर

आमचं लग्न कोणताही मुहूर्त न बघता एका रविवारी ठेवलं. एकही विधी नाही. सकाळी १० वाजता मॅरेज रजिस्ट्रार कार्यालयात आले. स्टेजवर आम्ही सर्वांच्या साक्षीनं, रजिस्टरवर सह्या केल्या. सर्व आप्तेष्टांना भोजनाचं निमंत्रण होतं. सगळे आवर्जून आले आणि आम्ही सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला. मी कुणाही कडून काहीही आहेर घेतला नाही. पत्नीनं नातेवाईकांचं मन राखण्यासाठी यथेच्छ आहेर घेतले (ते मात्र मी अजून फेडतोयं :) !) दुपारी ३.३० वाजता कार्यालयानं चहा ऑफर केला. लग्नाच्या निम्या खर्चाचा चेक सासरेबुवांना प्रदान केला. लग्न संपन्न ! त्यावेळी रेल्वेत फर्स्ट-क्लासला कपल्ससाठी कुपे असायचा (टू-इन-अ-कंपार्टमेंट) तो बुक केला होता. रात्री दोघं मधुचंद्राला रवाना झालो.

संजय क्षीरसागर's picture

1 Jun 2017 - 10:54 pm | संजय क्षीरसागर

या प्रतिसादाचा कुणाला कुठेही वापर करायचा असला किंवा स्वतः आचरणात आणायचा असला तर कसलाही संदर्भ देण्याची किंवा नामोल्लेखाची आवश्यकता नाही.

कुंदन's picture

2 Jun 2017 - 12:30 pm | कुंदन

अभिनंदन सं सर.

पैसा's picture

1 Jun 2017 - 11:02 pm | पैसा

आधी केले मग सांगितले. खर्चाला फाटा द्यावा हे फारच चांगले काम केलेत. तुमचे पाहून अजून काहीजणांना तरी हे असे लग्न लावायची स्फूर्ती मिळाली असेल!

सुचिता१'s picture

1 Jun 2017 - 11:52 pm | सुचिता१

abhinंदन ,, अगदि मनापासुन अभिनंदन !!!
लयल आपल्या मुलीचे कौतुक वाटले ,
आणि अश्य प्रयत्नां ना प्रसीद्धी मिलणे पण आवश्यक च आहे.

अत्रे's picture

2 Jun 2017 - 9:28 am | अत्रे

अभिनंदन.

पुंबा's picture

2 Jun 2017 - 10:34 am | पुंबा

अभिनंदन साहेब!

सुबोध खरे's picture

2 Jun 2017 - 10:40 am | सुबोध खरे

आमचं लग्न तर दुपारी झालं. ऑफिस वाल्यांची पंगत हा प्रकारच नाही. दोनला मंगल कार्यालयात, अडीच वाजता विधी सुरु झाले सव्वाचारला लग्न.पाच ला बायको ब्युटी पार्लरला. सहा ते नऊ स्वागत समारंभ आणि इच्छा भोजन. ज्यात फक्त "जवळचेच" नातेवाईक. आहेर किंवा पुष्पगुच्छ सुद्धा अजिबात नाही. जेवणाचा आणि सजावटीचा खर्च २८००० रुपये. बाकी कपडे आणि दागिने. दीड लाख दोन्ही बाजूंचा मिळून खर्च
रात्री दहा वाजता चालत घरी आलो. दुसऱ्या दिवशी विमानाने कुणूर (उटी) ला. चार दिवस कुणूरला नंतर पुण्यात बायकोसकट (नोकरीवर रुजू)
हाच कित्ता माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नात गिरवला जाईल अशी शिकवण मुलांना दिलेली आहे.
वृथा वृष्टी समुद्रेषु
वृथा तृप्तस्य भोजनं
वृथा दानं समर्थस्य
वृथा दीपो दिवापि च.

संजय क्षीरसागर's picture

2 Jun 2017 - 12:16 pm | संजय क्षीरसागर

माझा दागिन्यांवर खर्च शून्य ! आजीनं दिलेली माझीच अंगठी पत्नीला देऊन टाकली :) ! पत्नीला एक फँटास्टिक सलवार कुर्ता घेतला होता. स्वतःसाठी एक मोतीया रंगाचा सिल्कचा शर्ट आणि सलवार (माझ्याच खर्चानं) शिवून घेतली होती. मी स्वतः स्कूटरनं ९.०० वाजता ( इतरांच्या लग्नाला जातात तसा) कार्यालयात आलो आणि सर्वांबरोबर ब्रेकफास्ट घेतला. आप्तेष्ट मात्र झाडून सगळे बोलावले होते. च्यायला, आपण त्यांच्या लग्नाची फुल मजा घेणार आणि त्यांना आपल्या लग्नाची मजा घेता आली नाही तर काय उपयोग ?

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jun 2017 - 9:29 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! सलाम!

कुंदन's picture

2 Jun 2017 - 12:31 pm | कुंदन

अभिनंदन खरे साहेब.

सटाण्यासारख्या भागात खोट्या मोठ्याईकी साठी लोक वाट्टेल ते करण्यात पटाईत आहेत ( उदा. १ लाख हुंडा द्यायचा/घ्यायचा आणि ५ लाख दिलेत/घेतलेत म्हणून बोंबलत फिरायचे ....ईत्यादी ईत्यादि ...) अश्या भागात राहून तुम्हाला हे श्यक्य झाले तर कुणालाही होऊ शकते फक्त इचछाशक्ती असली पाहिजे ... तुमचे अभिनंदन !!

त्रिवेणी's picture

2 Jun 2017 - 4:13 pm | त्रिवेणी

बहुतेक सटाणा म्हणजे बागलाण आणि धुळे म्हणजे खानदेश.हुंडा,मानपान या तिकडच्या प्रथां बद्दल तर बोलायलाच नको.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jun 2017 - 5:30 pm | डॉ. सुधीर राजार...

आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे.

जेम्स वांड's picture

3 Jun 2017 - 7:18 am | जेम्स वांड

सुंदर लेखन,

आता धाग्याची दृष्ट काढून ठेवा, साहनाताई येतील नाहीतर, तुम्ही कसे धर्मबुडवे वगैरे आहात ते अतिशय हिडीसपणे व्यक्त करायला.

मनिमौ's picture

3 Jun 2017 - 9:16 am | मनिमौ

तुमचे विचार कौतुकास्पद आहेत. मुलीने देखील साथ दिली ह्याबाबत तिचेही अभिनंदन