अंजलीची गोष्ट - आनंदयात्री

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
30 Mar 2017 - 12:25 pm

"हाय" त्या ओळखीच्या आवाजाने चमकून तिने दरवाज्याकडे पाहिलं. अपूर्वाला पाहून ती चकितच झाली. "अपूर्वा, तू इथे? सगळं ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारलं.
"खरं म्हणजे ठीक नाहीये. ठीक असताना कोणी डॉक्टरकडे कशाला येईल?" अपूर्वाने हसत हसत म्हटलं.
"ते ही खरंच. अगं पण घरी यायचस, बोल काय म्हणतेस?" अंजलीने विचारलं. 

"आमची न्यूज तुझ्या कानावर आली की नाही?"क्षणभर विचार करून अंजली म्हणाली, "हो, आई म्हणाली की तुझं आणि तुषारचं पटत नाहीये म्हणून" 

"हो त्याचबद्दल बोलायचं होतं" अपूर्वाने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट पाणी पिऊन मग तिने सांगायला सुरुवात केली, "आमच्या लग्नाला आता नऊ वर्ष झाली. सुरुवातीपासूनच आमचं पटत नव्हतं, पण आधी आई वडलांना काय वाटेल आणि मग मुलांचं कसं होईल या कात्रीत सापडून निर्णय घेता येत नव्हता. पण शेवटी असं वाटतं की आईवडील, मुलं वगैरे सगळं ठीक आहे पण शेवटी माझं स्वतःचं सुद्धा आयुष्य आहेच ना? मग मी किती कॉम्प्रमाइज करू आणि का? ज्या माणसावर माझं प्रेमचं नाही त्याच्याशी हा खोटा खोटा संसार किती करायचा....."
"प्रेमचं नाही म्हणजे?" अंजलीच्या तोंडून आपसूकच प्रश्न आला. 

"आमचं लग्न अरेन्ज मॅरेज होतं. मी मुंबईची, तुझी मावशी , तुषार सगळे सुरतचे. पण खूप मोठा बिझनेस, चागलं स्थळ म्हणून माझ्या आईबाबांनी घाई केली. दोनचार भेटींत स्वभाव काय कळतो! मी इथे मुंबईत मित्रमैत्रिणींच्या ग्रूपमधे वाढलेय. तुषार नुसता एकलकोंडा! पैसे आहेत पण कसल्या आवडी निवडीच नाहीत. शनिवार रविवार जरा मजा करावी , बाहेर पिक्चरला जावं तर तेव्हा तर शोरूम आणखीनच बिझी असतं. हा घरीच नसतो. फिरायला काय जाणार! शिवाय ही ..... एवढी मोठी फॅमिली. प्रत्येकाला वेगवेगळा फ्लॅट आहे पण जेवण सगळ्यांचं एकत्र. त्यामुळे सासू सासऱयांचा सतत वाॅच. बाहेर जाताना सुद्धा सांगून जावं लागतं का तर म्हणे त्याप्रमाणे जेवण करायला."

"तूसुद्धा जॉब करतेस ना?" अंजलीने विचारलं.
"हो, नशीब! आठवडाभर सतत सकाळ संध्याकाळ मला यांना बघावं नाही लागत. म्हणून मी अजून वेडी नाही झालेय"
"पण मग मुलं?"
"मुलं तर काय दिवसभर आजी आजोबांकडे असतात. झोपण्यापुरती येतात. आमची मुलं, दीराची मुलं, सगळी तिकडेच असतात. त्यामुळे त्यांची मजा चालते" 

"आणि एकत्र जेवण म्हणजे तुम्ही दोघी सुना आळीपाळीने करता का?"
"नाही ग! सगळा स्वयंपाक सासू सासर्यांच्या कॉमन किचनमधे होतो. स्वयंपाकाला बायका आहेत. पण मला वाटतं कशाला रोज सगळ्यांनी खाली एकत्र जाऊन जेवायला पाहिजे? जेवण म्हटलं की एकत्र, हॉलिडे म्हटला की एकत्र! गेल्या नऊ वर्षांत नऊ वेळीसुद्धा आम्ही दोघेच असे बाहेर गेलो नाहीये. जिथे जातो तिथे अक्ख्या खानदानाबरोबर जावं लागतं."

"पण तुषारचा स्वभाव शांत आहे ना गं ?" तुषार जरी अन्जलीचा मावसभाऊ असला तरी अंजलीची मावशी सुरतला राहात असल्याने त्यांच्या गाठीभेटी फार कमी होत्या.
"असल्या शांतपणाचा काय उपयोग!" अपूर्वा वैतागून सांगू लागली, "याने ठणकावून सांगायला काय हरकत आहे की आम्हाला सगळं एकत्र नाही आवडत म्हणून. मी सांगायला म्हटलं तर मलाच म्हणतो की मी का सांगू, मला तर एकत्र आवडतं!"

"सासरचे लोक सासुरवास करतात का तुला?" अंजलीने विचारलं. "सासुरवास असा नाही पण त्यांच्या सतत जवळ असण्याने मला घुसमटायला होतं"

"पण तुझी मुलंसुद्धा सांभाळतात ना ते?"
"हो ते एक आहे. खरं सांगायचं तर त्यांचा असा विशेष त्रास नाहीये. प्रॉब्लेम तुषारचाच आहे. या सगळ्या लोकांच्या गराड्यात आमच्या दोघान्मधलं प्रेम कधी उमललच नाही. प्रेमात जसं क्लिक होतं ना तसं कधी झालंच नाही आमच्यात. लग्ना आधी मी किती रोमँटिक होते. काय काय कल्पना होत्या माझ्या ! पण प्रत्यक्षात फक्त या मोठ्ठ्या फॅमिलीशी आणि बँक बॅलन्स शी लग्न लागल्यासारखं वाटतं मला. वरवर पैसा छान दिसतो. पण आत माझ्या मनाला समाधान जराही नाही. गेली नऊ वर्ष आम्ही असेच ढकलतोय. संसार टिकायला मुळात प्रेम असायला नको का?"

"आणि तुला तुषारबद्दल प्रेम वाटतच नाही?"
"सॉरी टू से पण मला वाटतच नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टीची चीड येते मला. सारखं सारखं घरच्यांचच ऐकणं, दिवसरात्र बिझनेस, ना हौसमौज, ना आवडीनिवडी..... अगदी विरुद्ध आहोत आम्ही एकमेकांच्या"

"खरंतर तुला काय सांगावं ते मला कळतच नाहीये. हे असं आहे ह्याची कल्पना तुला लग्नाआधीच होती. लग्नाच्या वेळी मोठा बिझनेस, मोठं घर हे जे तुषारचे प्लस पॉईंट्स होते तेच आता निगेटिव्ह पॉईंट्स वाटतायत. आणि प्रेम वाटत नाही हे तर माझ्या समजण्या पलीकडे आहे. लग्नाला नऊ वर्ष झाली. दोन मुलं आहेत. प्रेम नाही हे कळायला इतका वेळ
लागला? त्या दोन मुलांचं आयुष्य आता खराब होणार ते? तुझी बाजू मला समजते पण पूर्ण पटत नाही. सासू सासर्यांच्या सतत सोबतीचा तुला त्रास वाटतो, कबूल आहे पण त्यांच्याच कडे मुलं ठेऊन तू नोकरी करतेस हेसुद्धा तेवढंच खरंय. आणि तुषारचीही काहीतरी बाजू असेलच. कदाचित त्याचं चुकतही असेल पण त्याच्याकडून काही न ऐकता मी जर या गोष्टीबद्दल माझं मत बनवलं तर ते चुकीचं असण्याची शक्यताच अधिक नाही का!"
अपूर्वाला अंजलीचं बोलणं जराही आवडलं नाही. तिची नाराजी तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. "तू बोल त्याच्याशी. माझी काही हरकत नाहीये" तिने म्हटलं.
"पण तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? नेमकं काय ठरवून तू माझ्याशी बोलायला आली होतीस?" अंजलीने रोखठोक प्रश्न केला.

क्षणभर घुटमळून अपूर्वाने विचारलं, "तू त्याला मुंबईला बोलावून घेशील का? मी गेला महिनाभर मुंबईला आलेय आईबाबांकडे. पण तो काही येत नाही. आला तर आम्ही मॅरेज काउन्सेलिंग किंवा डिवोर्स काहीतरी प्रोसिजर सुरु करू शकतो."

"तू एक महिना मुंबईत आहेस तर मग मुलं कुठे आहेत?" अंजलीने जरा आश्चर्याने विचारलं.
"मुलं तिकडेच. त्यांना सुरतलाच आवडतं" अपूर्वाने नाईलाजाने उत्तर दिलं, "मी मुंबईला हेड ऑफिसला ट्रान्स्फर घेतेय. ती एकदा झाली की मुलांना इकडेच बोलवून घेईन"
"मी फोन करते तुषारला. बोलते मी त्याच्याशी." अंजलीने अपूर्वाला म्हटलं. 

अपूर्वा निघाली. पुढे चार पाच पेशंट्स येऊन गेले. दुपारी मधल्या वेळात अंजली घरी आली. पण तिच्या डोक्यातून हे जात नव्हतं. सगळ्या दुःखाची सुरुवात अपेक्षाभंगात आहे ना, ती विचार करत होती. प्रेमाबद्दल, जोडीदाराबद्दल प्रत्येकाने मनात एक चित्र रंगवलेलं असतं. कधी आयुष्यात येणारी व्यक्ती तशी असते तर कधी अपेक्षेच्या अगदी विपरीत. मग अश्या वेळी अपेक्षाभंगाचं दुःख पचवावं, तडजोड करावी की सगळं सोडून पुन्हा नवी सुरुवात.... आणि पुन्हा तेच झालं तर.... पर्फेक्शनच्या शोधात किती धावणार? आणि अशी परफेक्ट व्यक्ती सापडलीही तरी जर त्यांचासुद्धा असाच पर्फेक्शनचा शोध चालला असेल तर आपण त्यात फिट होणार का? शिवाय आपल्या निर्णयांमुळे आणखी लहानग्यानचं आयुष्य बदलणार असेल तर किती काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा. केवढी ही गुंतागुंत नात्यांची....

"अंजू , सुशीलाच्या हाताला बरीच सूज आलीये. बघतेस का तिला जरा?" आईच्या प्रश्नाने अंजलीची तंद्री भंगली. "हो चल ना" म्हणत ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. सुशीला अंजलीच्या घरी धुणीभांडी करायला येत असे. "बघू" म्हणत अंजलीने सुशीलाचा हात तपासला. चाफेकळीला बरीच सूज आली होती. "बराच सुजलाय की हात! कसं काय लागलं ?" अंजलीने विचारलं. "काल रातच्याला शिडीवरून पडली मी". "दुखतंय का खूप? गोळी देते ती घे दुखलं तर"
"दुखतंय तर खरं"
"कुठची शिडी चढत होतीस रात्री?" अंजलीने विचारलं. बायकांच्या इजा होण्याच्या केसमध्ये छळ होत नाहीये ना याची खात्री करण्यासाठी ती नेहमी बरेच प्रश्न विचारीत असे.
"आम्ही पोटमाळ्यावर झोपतो ना, शिडीवरून चढावं लागतंय"
"मी क्लिनिकला निघतेच आहे. चल माझ्याबरोबर. एक्सरे काढून घेऊया. फ्रॅक्चर वगैरे नाहीना बोटाचं ते बघून घेऊ." सुशीलाला घेऊन अंजली निघाली. सुशीला गाडीत अंग चोरून बसली होती. तिला मोकळं वाटावं म्हणून अंजलीने गप्पा मारायला सुरुवात केली. "कोण कोण आहे तुझ्या घरी?" "माझा नवरा, दोन मुली, एक मुलगा, सासू, सासरे, दीर, भावजय, दिराची पोर आणि मी. सगळे मावत न्हाईत म्हणून तर आमी माळ्यावर झोपतोय"
"तू तर नेहेमी छान खूष दिसतेस, मला वाटलं तुमचं आपलं आपलं घर आहे." अंजलीने म्हटलं.
"न्हाई ताई, सगळे हायेत म्हणून तर खुशी. ते पोरान्ला बगतात तवा तर मी कामाला जाते, चार पैसं मिळतात. हां थोडी गर्दी हुते. अधनं मधनं भाण्डनबी हुतं पन कोन दोन लोक भांडत न्हाईत सांगा!"
"भांडण कोणाशी? नवर्याशी?"
"न्हाई बा... त्याच्या तर तोंडातून शबुद्च येत न्हाई. कामाशिवाय जराबी बोलत न्हाई त्यो. इचारलं की हो न्हाई एवढंच. त्याच्यापुढं काई न्हाई" सुशीलाने म्हटलं.
"हो? तू तर बडबडी आहेस.... तुला आवडतं असं शांत शांत?" अंजलीने न राहावून विचारलं. सुशीला थोडीशी लाजली आणि हसून म्हणाली, "आवडतं मला. त्यानला मी आवडते की न्हाई ते न्हाई ठावं पन मला आवडतं. माझं लगीन व्हायच्या वख्ताला माज्या मायने मला सांगितलेलं मी पक्कं ध्यानात ठेवलं , माय बोलली 'जे हाये ते बघत जा नि जे न्हाई ते सोडून दे, हाये ते बगशील तर हसत र्हाशील, न्हाई ते  शोधशील तर रडत बसशील.' मी पक्की गाठ बांधून टाकली की जे मिळंल तेच ग्वाड मानून घिईन आनी हळूहळू खरंच तसंच आवडायलाबी लागलं...."

अंजलीने  सुशीलाकडे हसून बघितलं, तिला पाडगावकरांचं गाणं आठवलं

'प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री'

तिच्या विचारांचा सगळा गुंता एका क्षणात सुटला. कोण म्हणतं हवं असलेलं मिळ्वण्यातच फक्त आनंद आहे? मिळालेलं गोड मानून घेण्यात सुद्धा सुख आहे.

डॉ. माधुरी ठाकुर

 https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

कथाजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

हेमंत८२'s picture

30 Mar 2017 - 1:18 pm | हेमंत८२

'जे हाये ते बघत जा नि जे न्हाई ते सोडून दे, हाये ते बगशील तर हसत र्हाशील, न्हाई ते शोधशील तर रडत बसशील.>>> या एका वाक्यात सुखी संसाराची सर्व सूत्रे आहेत.
खरंच खूप आवडली

शलभ's picture

30 Mar 2017 - 2:05 pm | शलभ

मस्त. आवडली.

लाडू's picture

30 Mar 2017 - 2:48 pm | लाडू

आवडली!

सुमीत's picture

30 Mar 2017 - 5:39 pm | सुमीत

तुमच्या कथेची. मानवी भावनांचि गोफ सुंदर गुंफता

लेखकासाठी याहून वेगळी आनंदाची गोष्ट कुठली!!!! मी आभारी आहे

जगप्रवासी's picture

30 Mar 2017 - 6:16 pm | जगप्रवासी

तुमच्या कथेत नेहमी एक रडवे व्यक्तिमत्व असते जे नकारात्मक आहे आणि दुसरे सकारात्मक, त्यामुळे कथेचा आशय नेमक्यारीतीने वाचकापर्यंत पोहोचतो. पण सुंदर असतात कथा तुमच्या, खूप आवडतात वाचायला.

हेमंत, शलभ, लाडू, जगप्रवासी आणि सुमीत प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार!

निमिष ध.'s picture

30 Mar 2017 - 10:23 pm | निमिष ध.

लेख / कथा आवडली नाही - पटली नाही असे म्हणता येईल. आधीच्या काही चांगल्या वाटल्या होत्या. यामध्ये बेसिकच चुकीचे आहे असे वाटते. उगीचच अ‍ॅपल्स टू ऑरेंजेस कंपॅरिजन चालली आहे असे वाटले. त्यातही नात्यांमध्ये कम्युनिकेशन कसे आवश्यक आहे असे सांगण्याऐवजी अपूर्वा कशी चूक आहे असा तुमच्या कथेचा सूर वाटतो.

स्रुजा's picture

31 Mar 2017 - 2:26 am | स्रुजा

+१ .

वेगळा फ्लॅट , मुलं सांभाळायला लोकं, भरपूर पैसा वर कुणाचं सुख तोलणं पटलं नाही अजिबात. नवरा बायकोचा संवाद , आपल्या मोजक्या चार माणसांचं आपण जेवण खाण बघणे, त्यांचं थोडंसं आपल्यावाचून अडणे, आपल्याला कधी नको वाटल्यास बाहेर जाणे, त्यांनी कधी स्वैपाक करणे, स्वतःच्या सोयीने घर अस्णे , किचन असणे या कितीही छोट्या वाटल्या तरी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सतत लोकां बरोबर फिरायला जाणं हे ही जाचकच आहे. नातेवाईक सोडा , सतत अगदी आवडीच्या मित्रांच्या गराड्यात राहुन पण एका मर्यादेनंतर आपला आपल्याला वेळ मिळायला हवा असं नवरा बायको ला वाटतंच, ते तसं वाटणंच नॉर्मल आहे. नवर्‍याला जर सहवास नको असेल , सतत बाकीचे करतीलच या नावाखाली बायकोसाठी , मुलांसाठी आवर्जुन वेळ काढणे, चार गोष्टी करणे टाळायचं असेल , मुलं सांभाळतो या नावाखाली जर किचन सुद्धा एकत्र ठेवायचा अव्यवहार्य आग्रह असेल तर तो आधुनिक सासुरवास च आहे. त्यामुळे तो शांत आहे ना गं, सासुरवास नाही ना वगैरे सूचक प्रश्न आणि त्या वरुन काढलेला निष्कर्श या वेळेस पटला नाही, सॉरी !

पिढ्यानपिढ्या चालत आलेली पित्रुसत्ताक समाजव्यवस्था आणि कुटुंब हे एका व्यक्तीपेक्षा म्हणजे स्त्री पेक्षा मोठं असतं या अट्टाहासातून पोसलेला पिंड आहे आपला. बाई असुनही नकळत असे विचार मनावर पगडा ठेवतातच .

स्रुजा's picture

31 Mar 2017 - 2:34 am | स्रुजा

पितृसत्ताक *

प्राची अश्विनी's picture

31 Mar 2017 - 8:04 am | प्राची अश्विनी

कथेची शैली छान आहे, पण मुद्दे फारच बाळबोध, एकांगी वाटले. स्त्रुजाताईशी सहमत.

तुमची मतं कळवल्याबद्दल खूप आभार. 'नात्यांमध्ये संवाद हवा' हा एक महत्वाचा मुद्दा माझ्ह्याकडून गोष्टीत अधोरेखित करायचा राहून गेलाय.

मला असं अजिबात नाही म्हणायचंय की अपूर्वाचा नवरा बरोबर वागतोय. त्याचीही चूक आहेच. पण अपूर्वाचंसुद्धा वागणं बरोबर आहे असं नाही. नातं तोडण्यापेक्षा काय केलं तर ते जगेल हे पाहणं महत्वाचं आहे, स्पेशली मुलं असली तर, असं मला वाटतं. हा विचारसुद्धा आई आणि वडील दोघांच्याही मनात यायला हवा. 'मला तो आवडतच नाही' हे कारण मला घर मोडायला अयोग्य वाटतं. सिनेमा वगैरेमुळे कधीकधी लोकांच्या जोडीदाराकडून आणि प्रेमामधून भन्नाट अपेक्षा असतात. पण जिथे हिरो हिरोईन हॅप्पिली मॅरीड म्हणून गाडीत बसून जातात तिथेच तर संसार सुरु होतो याची जाणीव असली पाहिजे.

अपूर्वा आणि सुशीला दोघींच्याही आयुष्यात संवाद नसण्याचा आणि इतरांच्या गर्दीचा प्रॉब्लेम आहे. पण एकीने तो हसत स्वीकारला आहे आणि दुसरी कुढते आहे. कोण बरोबर आणि कोण चूक हा माझ्यासाठी मुद्दाच नाही आहे. एक समाधानी आयुष्य जगणार आहे आणि दुसरी दुःखात राहाणार आहे एवढंच मला म्हणायचंय.

मला जो मेसेज गोष्टीतून द्यायचा होता तो मे बी या वेळी मला नीट जमला नाहीये पण मला सांगायचं होतं की

Peace does not mean to be in a place where there is no noise, trouble or hard work. It means to be in the midst of those things and still be calm in your heart.

सुमीत's picture

31 Mar 2017 - 4:36 pm | सुमीत

सहमत

पैसा's picture

1 Apr 2017 - 12:45 pm | पैसा

आवडले