"दाह" चा धागा वाचला "कर्वेनगरात" नावाचा. जॉबच्या सुरुवातीच्या काळातलं बरच काही आठवलं. आठवतच गेलं.
हा ज्या काळात तिथे होता* जवळपास त्याच काळात मीही त्याच भागात होतो. २००९ च्या शेवटाचा तो काळ. पण तिकडे नंतर येउ. मुळात मी तिथवर कसा पोचलो ते सांगतो.
२००६ जुलै. डिग्रीचा निकाल हाती लागला आणि दोनच दिवसात , ऑगस्ट २००६ मध्ये आय टी कंपनीत रुजु झालो. कॅम्पसमध्येच निवडलो गेलो होतो. तिसर्या वर्षाच्या शेवटी ज्या उन्हाळी सुट्ट्या असतात; तेव्हा निवडलो गेलो. इंजिनिअरिंगचं चौथं वर्ष त्यामुळे जॉबच्या बाबत निश्चिंत होतो. उरलेले सर्व सेमिस्टर व्यवस्थित पास होणं इतकच उद्दीष्ट होतं. सतत अतिचिंतित असलेल्या माझ्यासाठी मोठाच दिलासा. अर्थात आता एकजरी विषय राहिला; तरी हातातला जॉब जाइल; अशी उलट धास्ती वाटायला लागली. जोरात अभ्यास केला. शेवटच्या वर्षी बराच चांगला स्कोर आला मागील तीन वर्षांच्या मानानं.
पुण्यात आलो ऑगस्ट २००६. इथे रग्गड पाऊस प्रथमच पाहिला. मी दुष्काळी विभागातल्या शहरातून आलेला. इतका पाऊस इतका सतत पहायची सवय नाही. गोंधळून गेलो. नजर भिजलेली. नजरेला सर्दी व्हायची वेळ आली.
सलग पंधरा दिवस; तब्बल दोन आठवडे सूर्य दिसलाच नाही; इतका पाऊस होता. वातावरण ओलं चिंब. पण डोक्यात सतत जॉब टिकवण्याचे विचार. पहिल्यांदा फ्रेशरचं ट्रेनिंग दोन तीन महिने असणार होतं; आणि त्यानंतर त्यावर आधारित टेस्ट्स असणार होत्या. त्यात तगलो तरच प्रोबेशन पूर्ण; नोकरी पक्की होणार; प्रोजेक्ट मिळणार. इथे आल्यावर रहायचं कुठे हा प्रश्न पडला. आल्या आल्या अ ब चौकातल्या एका मिडलक्लास लॉजवर उतरलो. खिशात फारतर तीन हजार रुपये. ट्रेनिंग सी एम सी म्हणून वाकडेवाडी इथं एक क्लासेस आहेत; त्यांच्याकडे कंपनीने औटसोर्स केलेलं. (आअम्ची औटसोर्सवाली शेवटची बॅच. आमच्या नंतर जितके जॉइन झाले त्यांचं सगळ्यांचं इन हाउस ट्रेनिंग झालं.) ह्यांच्या ट्रेनिंगमध्ये नापास होउन बरेच जण बाहेर पडतात म्हणून कंपनीच्या नावाचा दरारा फ्रेशर लोकांमध्ये. खुद्द आमच्या बॅचची युनिवर्सिटी टॉपर नापास झाली. मुंबै मध्ये ज्यांचं ट्रेनिंग व जॉइनिंग होतं; त्यातले साठ सत्तर टक्के नापास झाले असं ऐकण्यात आलं. मुंबैवाल्यांनंतर दोनेक आठवड्यानं पुण्याची बॅच रुजू झालेली होती.
पुण्यात रुम शोधायचा काही अनुभव नव्हता. वर्गातल्या इतर एक दोघांना माझ्यासोबत पुण्यात जॉब मिळालेला. त्यातले दोघं माझ्याच कंपनीत; बाकीचा एकजण हींजवडीतल्या कंपनीत. आठवडाभरात शोधाशोध करुन आम्ही सांगवी मध्ये एका दाढीवाल्या काकांकडे रहायला गेलो. ते शिवाजी महाराजांसारखे दिसत. पण औरंगजेबासारखे वागत. भरपूर दरडावत.
सांगवी हा एकाकी, निर्जन एरिया. आख्ख्या महानगरापासून पूर्णतः तुटलेला. सांगवी आणि पुणे, सांगवी आणि पिंपरी चिंचवड ह्यामध्ये समुद्र अथवा समुद्राची खाडी असती तरी फरक पडला नसता. कारण ते स्वतंत्र असं आख्ख्या पुण्याहून तुटलेलं एखादं संस्थान असावं तसं होतं.
शिवाजीनगर, युनिव्हर्सिटी, औंध सांगवीफाटा असा थेट सरळसोट जबरदस्त रहदारीचा रस्ता. सांगवी फाट्यानंतर तो पुढे कुठेतरी पिंपरी चिंचवडला जातो म्हणे अजून आठ दहा किमी गेल्यावर. पुणे नावाच्या गावाहून पिंपरी चिंचवड गावांना प्रवास करणारे लोक हा रस्ता वापरत.
सांगवी फाट्यातून लगेच आतमध्ये सांगवी असेल; असं वाटत असेल तर ते साफ चूक आहे. जसं पौड रोड पासून तब्बल वीस बावीस किमीनंतर पौड नावाचं गाव आहे; तसच हे आहे. सांगवी फाट्यापासून पुढे पुढे दोन तीन वेडीवाकडी वळणं घेत निर्जन निर्मनुष्य सुस्त एकाकी रस्ता चार पाच किलोमीटर पुढे गेल्यावर कुठे एक पाण्याची मोठी टाकी लागते. ह्या रस्त्याच्या आसपस संपूर्ण सरकारी जमीन का मिलिटरीची जमीन. एकच एक लाबलचक भिंत्/कम्पाउण्ड एका बाजूला. आणि दुसर्या बाजूला एक आळशी मैदान; माळरानासारखं. तिथे एक दोन कंटाळलेली एखाद दोन झाडं कडुनिंव आणी वडाची जोराड झाडं. आख्ख्या पाच सात किमीच्या भागात हे एवढच.
असो. तर खूप पुढे गेल्यावर ती तिथे पाण्याची टाकी. तिथेही वस्ती अशी नाहिच. टाकी लागली की डावीकडे वळायचं. सलग दीड दोन किलोमीटर आत गेल्यावर गावासारखी वस्ती. तो भाग "नवी सांगवी". तिथेच शंभर दोनशे मीटरच्या अंतरात साई चौक आणि क्रांती चौक. पण तिथल्या वस्तीत गजबजाट खूप. पुण्यातल्या एफ सी रोड, जे एम रोड, कर्वे रोड सारखा टकाटाक सोफिस्टिकेटेडपणा इथे नाही. मॉल मल्ट्प्लेक्स नाहित. महामार्गाच्या रस्त्यावर असलेलं एखादं गावं असेल; त्या टाइपचं वातावरण. "देऊळ" पिच्चर नंतर पाहताना त्यातल्या काही काही दृश्यात मला सांगवीचा भास होइ.
.
तर अशा ह्या भागातल्या शिवाजीसारख्या दिसणार्या आणि औरंगजेबासारख्या वागणार्या काकांकडे आम्ही दोन खोल्या घेतल्या. चार नवखे मुलं तिथं राहायला आलेलो. गच्च पावसाळी वातावरण. आम्ही प्रथमच पहात होतो इतका पाऊस.
जॉब टिकवण्यासाठी मी फारच अधीर झालो होतो. ट्रेनिंगनंतरची टेस्ट म्हणजे ऑनलाइन प्रोग्राम लिहायचे होते. नेटवर्क मध्ये काय घोळ झाला माहित नाही. माझा युनिक्सचा पेपर अगदि झकास सोडवूनही साठवला गेलाच नाही; सेव्ह झालाच नाही. युनिक्सच्या पेपरात शून्य मार्क मिळाले. अर्थात पहिल्या राउण्डमध्ये नापास झालेल्यांसाठी दुसरा राउण्ड होताच. पण मी अडून बसलो. म्हटलं मी कशातही नापास होइन; प्रोग्रामिंग मध्ये होणार नाही. कारण हे फारच सर्वसाधारण पातळीचं आहे; माझ्या सरावातलं आहे. हवं तर आत्ता लागलिच समोर बसून आख्खा पेपर अर्ध्या वेळात सोडवून दाखवतो. पण उपयोग नव्हता. शिक्षकांनी ऐकलं नाही. दुसर्या राउण्डमध्ये अर्थात पास झालो. पण दुसरा राउण्ड होण्यास मधे दोन चार आठवडे गेले त्यात बर्राच तणावात होतो. दरम्यान बाहेर पाऊस पडतच होता. कित्येक जॉब शोधणारे सहपाठी आमच्याकडे कौतुकानं बघत जॉब पटकावलेला म्हणून. आज त्यातले बहुतांश कुठच्या कुठे पोचलेत. मी तितकासा प्रगती करु शकलेलो नाही. कित्येक मुलीही विचारयाला येत; मित्रांच्या मैत्रिणी होत्या त्या. मला मुलींशी बोलावंसं वाटे. पण काय बोलायचं समजत नसे. समोर मुलगी आल्यावर मी आक्रसून जात असे. मला सख्खी बहीण नाही.
मुली बोलायला लागलयवर त्यांच्या चेहर्याकडे पाहणं टाळत असे. कुठेतरी खाली जमिनीकडे, वर आकाशात किंवा मुलींच्या खांद्यावरुन मागे बघत; पण नजरानजर टाळत बोलत असे. हे लोकांना विचित्र वाटे. बहुतेक सदर इसम सायकिक आहे; असा समज होत असावा (किम्वा त्यांना त्याचा पत्ता लागत असावा; माहिती होत असावी ;) ). शिवाय भाषा विचित्र पुस्तकी होती. साठीच्या दशकात वरवर वाचन करणारे लोक जे वाचत त्या पुस्तकातली भाषा . म्हंजे यदुनाथ थत्ते, विनोबा भावे, ना सी फडके , वसंत कानिटकर ह्यांच्या सर्वांच्या भाषेचं ते एकत्रित कॉकटेल होतं. शिवाय मी त्यापूर्वीची सलग दहा बारा वर्षं रोज चार मराठी वर्तमानपत्रं वाचत होतो. एक इंग्लिश. त्यामुळे एक विचित्र अपराधगंड नि भयगंड घेउन फिरत होतो. पेप्रात रोजच सर्वत्र आगी लागलेल्या आहएत. सतत कुणी ना कूणी कुणावर काही अत्याचार करतय; व्यवस्था कोलमडून पडलिये; असं चित्र होतं. भारतातले टिपिकल पेपर हे असेच प्रो- गरिब आणि मध्यमावर्गीयास अपराधगंड देणारे. ते सगळे माझ्या वाचनात. लोकमत, सकाळ, म टा आणि लोकसत्ता.
दरम्यान सोबतचे दोस्त पाहून मी बावचळलो. त्यातले दोघे फारच विचित्र वाईट वाईट्ट होते. ते चक्क ......चक्क....
सिगारेटी पीत; वीकेण्डला दारुही पीत !! पण अजून एक जण जो होता; तो खुप चांगला होता. त्याला सावरकरांच्या विचारांची चाड होती. तो काही दिवस शाखेतही गेला होता. विनोबांबद्दल त्याला आदर असला तरी तो त्यांचा पंखा वगैरे नव्हता. त्याचं आणि माझं दोघांचंही वाचन वगैरे फार नव्हतं. (समग्र सावरकर वाचले; गांधींची आत्मकथा वाचलेली; पण त्याहून अधिक काही नाही). प्रसार मध्यमांत जी माहिती येते; जे काही लहान मोठे लेख येतात; तितकच आमचं बौद्धिक भांडवल. पण त्यातून देशाला नक्की कशाची गरज आहे; ते आम्ही दोघे ठरवत असू. प्रसंगी राष्ट्रिय पातलीवरच्या मुद्द्यावरुन मतभेद वगैरेही होत.
पण लोकं आपलं काहिच का ऐकत नाहित; ते समज्त नसे.
मग आम्हाला शिवाजी महाराजांचं कौतुक वाटे; तसच मावळ्यांचंही वाटे. कारण त्या काळात राजाम्चा थोर विचार ऐकणारे; मानणारे मावळे होते. आज आम्ही राजांच्याच विचारांवर चालायचं ठरवलं तरी आम आदमी; म्हणजे मावळे काही आमचं ऐकत नाहित म्हणून आम्ही निराश होत असू.
असो. तर मी मुलींशी बोलत नसे आणी राष्ट्रोद्धाराच्या विचारांत गढून गेलला असे. पण समोरुन आकर्षक मुलगी गेल्यावर तिच्यावर लक्ष सहजच जाइ. मग असं लक्ष गेलं म्हणून फार अपराधी वगैरे स्वतःलाच वाटे.
घर सोडून दोन तीन महिने होत आले. माझ्याकडे मोबाइल नव्हता. घरच्यांनी संपर्क केलाच तर रुममेट्सच्या मोबाइलवर अधून मधून करत. मी स्वतःहून फारसा संपर्क केला नाही. ह्यापूर्वी मी सलग वीस बावीस वर्षे त्या एकाच शहरात होतो. सलग वीस बावीस वर्षे मी ऑल्मोस्त शहराबाहेर कधीच पडलो नव्हतो. माझ्या आजोबांना एकुलता एक मुलगा म्हणजे माझे वडील. त्यामुळे फारसे सख्खे नातेवाइक नाहित.
मी असा अचानक बाहेर आल्यावर कसा राहिन; मला सवय आहे का, वगैरे सगळ्यंना प्रश्न. पण सावरकर कसे त्या अंदमानच्या काळ्या ठिक्कर काळ कोठडितही एकटेच राहिलेत; तसा मीही राहिन; असा माझा निश्चय होता. उलट मला तर सोबतीला मित्र होते कॉलेजातले; नवे दोस्त भरपूर मिळणार होते.
मग चिंता कसली. आपण आता टफ झालेलो आहोत हे दिसावं मह्णून मी घरी स्वतःहून एकदाही कॉल केल नाही.
* तो आणि मी सारख्याच वयोगटातले दिसतोय; म्हणून थेट एकेरी लिहितोय
** उर्वरित पुढच्या भागात.
प्रतिक्रिया
9 Jan 2017 - 10:16 pm | प्रचेतस
मस्तच रे मनोबा
9 Jan 2017 - 10:37 pm | खेडूत
मनोबा, आवडले. :)
फक्त एक गडबड आहे-- दाह यांचा ''कर्वेनगरात" धागा तिक्डे पलिकडे मन१ यांनीच लिहीलाय ना..
13 Jan 2017 - 6:34 am | मन१
माफ करा, समजलं नाही. दाह ह्यांचा धागा मी ( मनोबा) कसे लिहिन ??
9 Jan 2017 - 10:53 pm | एस
वा. मनातून उतरलेलं, सहज आणि मनमोकळं. पुभाप्र.
10 Jan 2017 - 2:56 am | रेवती
छान लिहिलय्त. अगदी अकृत्रीम. पुढे काय झाले ते लवकर लिहा.
सांगवीच्या वर्णनाशी सहमत. तुम्ही २००६ म्हणजे १० वर्षांपूर्वीचं सांगताय. मी १९९४-९५ साली मैत्रिणीला भेटायला दोन चार वेळा गेले होते. आपण पुन्हा आपल्या घरी पोहोचू की नाही असे वाटायचे. वाटेत कुठे बस बंद पडली तर काय होणार असा प्रश्न पडायचा. दुपारी चार वाजण्याच्या आसपासची बस घेऊन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला उतरले की हुश्श्य व्हायचे. त्यावेळी जीपीपीसमोर फ्लायओव्हर्स नव्हते. आजकाल गणेशखिंड रस्ता ओळखू येत नाही.
आता सांगवी किती बदललेय. शिवाय भरपूर बसेस असतात. सांगवीप्रमाणेच लोहगावास एका मैत्रिणीच्या वडिलांनी घर बांधल्यावर मी एकदाच तिकडे गेले होते. घरे बांधण्यासाठी ही ठिकाणे लोकांना कशी समजतात? असा प्रश्न पडायचा. आता पसरलेले पुणे पाहताना विश्वास बसत नाही. चला. आता निदान तासभर तरी पुण्याची आठवण येणार आहे.
10 Jan 2017 - 8:46 am | चावटमेला
हम्म... वाकडेवाडी, २००६.. ट्रॅक्टरवाली कंपनी का? मी पण त्याच कंपनीचा ब्रँड आहे म्हणून विचारलं.. बाकी लेख आवडला.. पुलेशु
10 Jan 2017 - 10:15 am | रातराणी
ट्रेनिंग, ट्रेनिंग मध्ये नापास होण्याची भीती म्हणजे भारतातील आद्य सॉफ्टवेयर कंपनीत होतात बहुतेक :) पुभालटा.
10 Jan 2017 - 11:19 am | IT hamal
छान लेखन....पण सांगवी फाट्यापासून ३/४ वेडीवाकडी वळणे घेतली कि सांगवी येते...फार तर १-१.५ कि.मी . च आहे......५/७ कि.मी नाहीये .....
10 Jan 2017 - 12:13 pm | आनन्दा
नेमके कोणत्या वळणाने जाणारे कळत नाहीये.. बघू.. पुभाप्र.
10 Jan 2017 - 4:45 pm | सूड
वाचतोय.
10 Jan 2017 - 5:40 pm | पुंबा
काय बोलू! फारच मनाला भिडणारे, सच्चे लिखाण. पुभाप्र.
10 Jan 2017 - 5:44 pm | सिरुसेरि
प्रामाणीक कथन आवडले . पुभाप्र .
तुम्ही तुमच्या प्रगतीबद्दल समाधानी नाही आहात का ?
13 Jan 2017 - 6:40 am | मन१
सर्व वाचक , प्रतिसादकांचे आभार.
@ रेवती तै --
सांगवी १९९५ ला किती वेगळं असेल ह्याची फक्त कल्पनाच करु शकतो. खरं तर अजूनही मुख्य गाव तितकसं बदललेलं माझ्या नजरेला तरी जाणवलं नाही. तिथे जायचे रस्ते मात्र फार फार बदललेत. मोठे झालेत. ट्राफिक बराच वाढलाय. पण गावात पोचल्यावर त्याचं ते मुख्य पुण्यापेक्षा वेगळं असणं जाणवतय.
हा हा. अगदि अगदि.
.
.
@ चावटमेला
ओह्हो! काय म्हंटा ? हो हो. ट्रॅक्टारवालेच.
.
.
@ IT hamal
काय की मोजलं नै. नजर थकायची लांबट्ट प्रवासात. १-१.५ किमीच असेल मग.
.
.
सर्वांचेच पुन्हा एकदा आभार.