माझ्या घराच्या भिंतीला
रंग गायीच्या शेणाचा
नाही भय जरीही
आला अणुबाँब कुणाचा...
माझ्या घराच्या खोलीत
यज्ञकुंडाचे भूषण
नाही पर्वा कधीही
असो किती प्रदूषण...
माझ्या घराच्या दारात
काळ्या घोड्याची हो नाळ
घर संपन्न होणार
नाही कशाची आबाळ...
माझ्या घरी प्रत्येकाच्या
गळ्यामधे गंडेदोरे
नाही भय कशाचे
कुणी करी काळेबेरे...
माझ्या घरी कपाटात
पोथ्यापुराणांचा संचार
त्याच्या पलीकडे व्यर्थ
सुखी जीवनाचे सार...
माझा घरी विज्ञानाला
नाही जरासाही थारा
कसा जगतो मी ते
शेजाऱ्यालाही विचारा...
प्रतिक्रिया
10 Aug 2016 - 11:16 am | अभ्या..
माझा घराच्या दाराला
नेमप्लेट यनावाला
कसा लिहितो मी ते
मिपाकरांना विचारा.
.
(सॉरी यनाकाका, पण तुमची फार आठवण आली.) ;)
10 Aug 2016 - 10:52 pm | ज्योति अळवणी
कथेचं कार्यकारणभाव नाही लक्षात आला
12 Aug 2016 - 11:28 am | लालगरूड
अंधश्रद्धा विरोध .. अज्ञानातच सुख असते
12 Aug 2016 - 11:48 am | प्रसाद गोडबोले
अर्ध्य हळकुंडाने पिवळे झाले की अशा कविता सुचतात .
एकतर पहिले म्हणजे घराला गायीच्या शेणाचा रंग असल्याने , किंव्वा यज्ञ कुंड असल्याने , किंव्वा उंबर्यावर घोड्याची नाळ असल्याने हातात गंडे दोरे बांधल्याने आजवर कोणाचे नुकसान झालेले आठवत नाही . एखाद्याची निरुप्रवी कृती जर त्याला आनंद / समाधान / निश्चिंती देत असेल तर त्यावर टीका करायचा तुम्हाला काय अधिकार ?
जरा "द वर्ल्ड " आंणि "माय वर्ल्ड " ह्यातला फरक सम्जुन घ्यायचा प्रयत्न करा , जरा लोगॉस आणि मिठॉस मधील फरक समजायचा प्रयत्न करा https://www.youtube.com/watch?v=I7QwxbImhZI हे पहा ,
माझेच मत तेवढे खरे अन बाकीचे करतात तो म्हणजे गाढवपणा मीच एक काय तो हुच्च विज्ञान जाणणारा , बाकीचे करतात त्याला काहीच अर्थ नाही ही असली स्वमतांध दाभिकता उपयोगाची नाही.
कोणी नुसते पोथ्या पुराणे वाचुन सुखी होत असेल अन तुम्हाला खंडीभर पुस्तके वाचुन पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे सिध्द करता येत नसेल तर तुमच्या दु:खमय अज्ञानापेक्षा त्या माणसाचे सुखमय अज्ञान कित्येक पटीने श्रेष्ठ आहे !
अवांतरः उगाचच उपप्रतिसादाची पिंक टाकण्या पुर्वी पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे तुम्हाला सिध्द करता येते का ? आणि नसेल येत तर ज्या विज्ञानाचे आपण तुणतुणे वाजवले त्याविषयीचा आपला अज्ञानवाद किती खोल आहे ह्याची चिकित्सा करुन पहा , ह्यावर एकदा चिंतन करुन पहा !!
12 Aug 2016 - 12:58 pm | संदीप डांगे
पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे तुम्हाला सिध्द करता येते का
^^^ हा काय प्रकार आहे? म्हणजे शालेत खोटं शिकवतात?
12 Aug 2016 - 3:16 pm | प्रसाद गोडबोले
तसं नाही संदीप.
मला इतकंच म्हणायचं आहे की विज्ञानाच्यानावाने स्वतःची लाल करुन घेणार्यांना अन इतरांना अज्ञानी कॅटेगरीत ब्सवणार्या बहुतांश लोकांना खुद्द विज्ञानाविषयीच अज्ञान असते !
अशा स्वमतांध दांभिक लोकांना त्यांचे अज्ञान उघड करुन दाखवण्यासारखी मजा कशात नाही !
खरा विज्ञान जाणलेला माणुस विज्ञानाच्या नावाने डोंबार्याचा खेळ करताना तुम्हाला कधीच दिसणार नाही कारण तो विज्ञानाच्या अभ्यासातच मग्न असेल. अर्धे भरलेली मडकीच जास्त गोंगाट करतात :)
अवांतर : मी स्वतः भारतातील एका अतिषय प्रतिष्ठित संस्थानामधुन हुच्च लेव्हलचे विज्ञानाची शाखा अभ्यासली आहे आणि मला एक कळाले आहे की आयुष्याचे मुख्य ध्येय्य हे आनंद असुन तो मिळवण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असतेच असे काही नाही ! गाढ श्रध्दा आनंद मिळवण्यासाठी पुरेशी आहे :)
12 Aug 2016 - 7:10 pm | संदीप डांगे
समजले आणि पटलेही!!! हा 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' प्रकार पटत नाही.
12 Aug 2016 - 2:53 pm | अमितदादा
अरे वा, हा काय प्रकार आहे। आमच्या माहितीनुसार बहुतांश देशी विदेशी पुराणमध्ये सूर्य पृथ्वी भवती फिरतो हे लिहलं आहे। विज्ञान मात्र पृथ्वी सूर्यभावती फिरते हे सांगतो आणि सिद्ध हि करतो। खालील लिंक पहा त्यात जुने कन्सेप्ट काय होते आणि विज्ञानाने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे स्टेप बी स्टेप समजावून सांगितलं आहे। लिंक न वाचता प्रतिवाद करू नका।
http://www.wired.com/2014/04/how-do-we-know-the-earth-orbits-the-sun/
तसेच गूगल केल्यास हजारो वैज्ञानिक पुरावे सापडतील तुम्हाला। बाकी आमच्या म्हणण्यानुसार पृथ्वी सूर्यभावती फिरते हे पुराणे सिद्ध करत नाहीत तुमच्या म्हणण्यानुसार विज्ञान सिद्ध करत नाही, मग हे सिद्ध कुणी केलं तुम्ही? जर हे विज्ञान सिद्ध करत नसेल तर आजपासून तुम्ही सूर्य पृथ्वी भवती फिरतो हे मानून चाला।
बाकी तुमच्या प्रतिसादातील पहिल्याया भागाशी सहमत आहे श्रद्धा हा भाग वैयक्तीक आहे त्यावर टीका करायचा अधिकार नाही। आस ऐकलेलं कि इसरो चे प्रमुख मंगळयान पाठवण्यापूर्वी तिरुपती ला जाऊन आलेले। वैज्ञानिक पण श्रादालू असू शकतात। एक मात्र खरं श्रद्धा फक्त मनात हवी त्याच्या बाहेरच्या खऱ्या जगात फक्त विज्ञान।
12 Aug 2016 - 3:23 pm | प्रसाद गोडबोले
अमितदादा , माझा वरील प्रतिसाद पहा : सदर कवी इतरांना अज्ञानी कॅटेगरीत बसवत आहे पण त्याला तरी पुर्ण ज्ञान झाले आहे की नाही ह्या बद्दल शंकाच आहे.
बहुतंश स्वमतांध दांभिक लोकं स्वतःचे दुकान चालवण्यासाठी विज्ञानाचा वापर करतात , त्यांना स्वतःचे अज्ञान दिसत नाही , आणि आपण दाखवुन दिले तर राग येतो असेच आजवर दिसुन आले आहे .
12 Aug 2016 - 3:28 pm | प्रसाद गोडबोले
आणि एक महत्वाचे :
मी स्वतः भारतातील एका अतिषय हुच्च लेव्हलच्या वैज्ञानिक संस्थानातुन शिक्षण घेतले आहे , आणि पृथ्वी सुर्या भोवती फिरते हे मी सिध्द करु शकतो :)
( पण मला चार वैज्ञानिक गोष्ठी कळाल्या म्हणुन इतरांच्या निरुपद्रवी श्रध्दांवर टीका करायचा मला काही विशेष अधिकार प्राप्त होतो असे मी मानत नाही इतकेच :) )
12 Aug 2016 - 3:34 pm | अमितदादा
समजलं।
12 Aug 2016 - 12:47 pm | अत्रुप्त आत्मा
@
›››
सुंदर उपहास केलाय.. अप्रतिम!
अगदी झोंबेल इतका तिखट आहे हो हा शेवट!
टनाटन फ्रायच अगदी. ;)
12 Aug 2016 - 12:58 pm | बाळ सप्रे
काही काही शब्द मात्रेबाहेर जातायत यमक जुळवताना पण छान जमलीय कविता..
अधिकार वगैरे जास्त लक्ष देउ नका..
12 Aug 2016 - 5:45 pm | पगला गजोधर
कविता वाचताना, मला तरी तुमच्या कवितेत वावगे काही आढळले नाही. की तुमच्याकडून स्वमतांत दांभिकता हि काही दिसली नाही, की कुणा पेक्षा आपण श्रेष्ठ असा भाव जाणवला नाही.
तुमच्या मनातले विचार तुम्ही विवेकी पद्धतीने मांडले, तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्हिव मांडला, आणि तो जर कुणाला पटला नसेल तर
त्या व्यक्ती, तुमच्या सारख्याच विवेकी पद्धतीने त्यांची मते मांडतील, असं काही मला वाटत नाही.
असो मिपावर अशी कविता लिहिताना, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सिद्ध करता यायला पाहिजे, अशी पूर्व अट आहे, असे कुठेही मिपा नियमावलीत मी वाचले नाही. असो ...
तुम्हाला विज्ञानातील सर्व काही माहिती आहे/नाही , अशी जर कोणाला पृच्छा करायचीच असेल, तर व्यक्तीने/नीं सुद्धा त्यांना विज्ञानातील सर्व विषयामध्ये मास्टरी आहे हे सिद्ध करावे लागेलच. किँवा किमानपक्षी त्यांच्या सर्व तथाकथित धर्मशास्त्र वैगरे वर मास्टरी हवी, त्यांनी तरी सर्व धर्मग्रंथ , वेद उपनिषदे वाचली असावीत काय ? त्यांना ती समजली उमजली असेल काय ?
'नवसे कन्या पुत्र होती, तरी का कारणे पती' असा सवाल संत तुकारामांनी कधीच विचारुन ठेवला आहे. आता काही मनोवृत्तीची लोकं त्यावेळी कदाचित त्यांच्यावर सुद्धा 'अर्ध्य हळकुंडाने पिवळे झाले' किँवा 'स्वमतांध दांभिक' अश्या पिंक टाकत असतील काय ? तसे जर इतिहासात झाले असेल, तर तुमची हि कविता तुम्हाला इंद्रायणीत बुडवायला लावतीलही खचित !
अतिशय कष्ट करून / जीव धोक्यात घालून केलेल्या यात्रे दरम्यान आणलेले गंगाजल, वेशीबाहेर मरणासन्न पडलेलया गाढव प्राण्याला (मनुष्य नव्हे) पाजणारे संत, म्हणजे या टीका करणाऱ्या लोकांच्या मते देहांत प्रायाश्चिताचे लायक असावेत.
चार्वाकांचा विवेकवाद सुद्धा 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान' या स्वरूपाचा होता. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान याच्या आधारावर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. जीवनात जे सत्य आपल्याला शोधायचं आहे, त्याचं उत्तर प्रत्यक्ष प्रमाण आणि त्याच्या आधारावर केलेले अनुमान यातूनच आपल्याला मिळणार आहे किंवा तसं सत्य आपल्याला शोधता येणार आहे, या पद्धतीची चार्वाकांची मांडणी होती. हे या लोकांच्या गावी असेल काय ?
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत कर्म करणारे (व जीवनात कधीही पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन न घेणारे) कर्मयोगी संत, म्हणजे या लोकांच्या मते भक्तीमार्गातील धोंडाच असावा कदाचित.
12 Aug 2016 - 7:19 pm | प्रसाद गोडबोले
अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी सुधारावी ह्यावर तुमचे काय मत आहे ?
12 Aug 2016 - 8:10 pm | पगला गजोधर
हेचि थोर भक्ति आवडते देवा l संकल्पावी माया संसाराची ll
ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll
वाहिल्या उद्वेग दुखःची केवळ l भोगणे ते मूळ संचिताचे ll
तुका म्हणे घालू तयावरी भार l वाहू हा संसार देवापाशी ll
12 Aug 2016 - 8:27 pm | प्रसाद गोडबोले
असो तुम्हाला माझा प्रश्न कळाला नाही =))))
पण असो, तुम्ही क्वोट केलेला अभंग प्रचंड आवडला !
तुकोबा ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll असे म्हणतात म्हणुन त्यांना कोणी अज्ञानवादी म्हणत असेल तर म्हणो बापडे , त्याने तुकारामांना फरक पडत नाही . ते त्यांच्या अवस्थेत सुखी समाधानी रहातात !
तसेच आहे : कोणी शेणाने सारवलेल्या घरात राहिले किंव्वा घरात अग्निहोत्र केले म्हणुन किंव्वा उंबर्यवर घोड्याची नाल लावली म्हणुन खुश रहात असेल तर त्याला अज्ञानवादी म्हणुन हिणवायचा कोणालाच काहीच अधिकार नाही !
जर कोणी हिणवत असेल तर तुकोबा म्हणतात तसे भले तरी देवु गांडीची लंगोटी | नाठाळाचे माथी हाणु काठी ||
असो.
12 Aug 2016 - 10:48 pm | पगला गजोधर
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
12 Aug 2016 - 10:54 pm | प्रसाद गोडबोले
+1
हेच म्हणतो।
12 Aug 2016 - 8:36 pm | तिमा
आम्ही अत्यंत खालच्या दर्जाच्या सुमार संस्थेतून विज्ञानाची सर्वोच्च पदवी घेतली असल्यामुळे आम्हाला विज्ञानही कधी कळले नाही आणि अध्यात्माशी आमचा चुकुनही संबंध न आल्यामुळे, त्याबद्दल तर आम्ही घोर अज्ञानी आहोत. तस्मात पास.
12 Aug 2016 - 9:13 pm | प्रसाद गोडबोले
वाह ,
आपला प्रांजळपणा आवडला तिमा :)
एकदा का माणसाला स्वतःच्या अज्ञानाची खोली ( डेप्थ ह्या अर्थाने ) लक्षात आली की आपोआपच त्याला अन्य लोकांच्या मतांबाबत , श्रध्दांबाबत सहानुभुती , समअनुभुती निर्माण होते ! आणि मग कोणी घर शेणाने सारवतो म्हणुन किंव्वा हातात गंडेदोरे बांधतो म्हणुन त्याची थट्टा मस्करी करावी हा विचार त्याच्या मनाला शिवतही नाही !
आपल्याला बर्याच विषयात प्रचंड अज्ञान आहे , किंबहुना सर्वज्ञात ज्ञानाच्या केवळ कणमात्र अंशाचा आपल्याला स्पर्ष झालेला आहे आणि आयुष्यभर शिकत राहिलो तरीही केवळ कणमात्रच ज्ञान आपण आकलन करु शकणार आहोत हे लक्षात येणे ही ज्ञानी होण्याच्या मार्गावरची पहिली पायरी आहे :)
शुभेच्छा :)
13 Aug 2016 - 7:58 am | मुक्त
चार्वाकाने लिहीलेले ग्रंथ गूढरित्या गायब झालेत म्हणे....
13 Aug 2016 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा
खरं आहे... सगळ्या धर्मांमधले टनाटनी चार्वाकांची साहित्य संपदा आणी कधीकधी त्यांन्नाही कपटी व्रुत्तीनी जाळत, मारत होते.. कारण चार्वाक त्यांचाधर्माच्या बुरख्या खालून चाल्लेला नीचपणा जगा समोर आणायचे..
टनाटनी कपट्यांना चार्वाकांना वादात कधीच पराभूत करता येत नसे ... म्हणून मग ते स्वत:च्या मूलभूत भेकड प्रव्रुत्तीला अनुसरून त्यांच्या तत्वद्न्यानावर असे हल्ले करीत असत.
13 Aug 2016 - 7:18 pm | उडन खटोला
गुर्जी, नंबर हरवलाय, देता का?
लवकरच सत्यनारायणाची पूजा घालायची आहे
13 Aug 2016 - 8:29 am | उडन खटोला
असा एकंदर प्रकार झाला तर!
13 Aug 2016 - 12:45 pm | एस
वाळूत तोंड खुपसून स्वस्थ बसण्याच्या प्रवृत्तीवर तिखट भाष्य केलंय. कविता आवडली.
13 Aug 2016 - 12:54 pm | सिरुसेरि
छान कविता .
माझ्या घराच्या बाहेर
लावलाय दिष्टी बोम्मा
संकटे ती दुरवर
पळतात हम्मा हम्मा
13 Aug 2016 - 4:57 pm | अभ्या..
पंचधारा बोम्मा बोम्मा,
पोत्तूको वोड्डाणकम्मा,
13 Aug 2016 - 9:27 pm | यशोधरा
अज्ञान की ज्ञान ह्या वादात मला पडायचे नाहीये पण गायीच्या शेणाच्या भिंती आणि सारवलेल्या जमिनी पूर्वी कोकणात कित्येक घरांच्या असत, अजूनही अगदी आतल्या भागात असतात, ह्या बऱ्यापैकी टेम्परेचर कंट्रोलचे काम करतात असे वाटते. उकाड्यात सारवलेल्या जमिनीवर चटई पसरून झोपण्यासारखे सुख नाही. सुरेख सारवलेली स्वच्छ खळी, त्यावर घातलेल्या रांगोळ्या बघितलेत कधी? कधी कधी ह्या तांदळाच्या पिठानेही काढतात, किडे मुंग्या, लहान सहान पाखरे येऊन अशी रांगोळी दिवसभरात खातात निसर्गाशी जवळीक साधण्याचाच हा प्रकार आहे. आणि नैसर्गिक रीत्या जे उपलब्ध आहे, त्याचा हा यथायोग्य उपयोग आहे, असे वाटते. प्रत्येक पद्धतीत नकारात्मक का बघायला हवे? हा अट्टाहास समजत नाही...
अग्निहोत्राबद्दलही लिहायचे आहे, मग लिहिते, फोनवरून लिहायला जमत नाही खूप.
15 Aug 2016 - 2:43 am | अभिजीत अवलिया
छान आहे कविता.