उडता पंजाब....

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
28 Jun 2016 - 4:44 pm

चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे वगैरे एक समज आहे, निदान भारतात तरी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट इतकी आणि इतकीच व्याख्या असलेल्या आपल्याकडच्या अनेक दिग्दर्शकांमुळे आपल्यालाही हिच सवय लागली आहे, कि चित्रपट हे फक्त वेळ घालवण्याचं माध्यम आहे. आपला एक गोड समज झाला आहे जो समज आहे कि गैरसमज हे ज्याने त्याने ठरवावं. परंतु या सगळ्यात बर्‍याच गोष्टी दुर्लक्षीत होतात. बरेच उत्तम प्रयत्न नजरेआड जातात. अन चुकुन एखादं वास्तव जर चित्रपट माध्यमातुन समोर आलच तर ते बहुतांश वेळा नाकारलं जातं. कलाक्रुती हा या नाण्याचा दुसरा मुद्दा पण मानसिकता अजुन पक्वतेकडे पोचली नाही हे नक्की. दुसरी बाजु म्हणजे कलाक्रुतीचं रेखाटन, तिची मांडणी हा मुद्दा समजण्याएवढा आपल्याकडे चित्रपट कलेचा अभ्यास झाला आहे हे पटण्यासारख नाही. पण वास्तव जेव्हा कलाक्रुतीमधुन समोर येतं किंवा आणलं जातं तेव्हा ती कलाक्रुती म्हणुन जर व्यवस्थीत नसेल तर?....प्रश्न गहन आहे. बर्‍याच कलाक्रुतींमधे हा प्रश्न आपल्यासमोर येतो. पण 'उडता पंजाब" या बाबतीत वेगळा ठरतो.

"अब चाय कौन पिता है, पडे रहते हैं खंडरों मे साले नशिली नशा पी कर....

हे वास्तव आहे पंजाबच. आपल्याला ठाउकच नाही आणि असेल तरी आपल्याला काय करयचय? हाच मुद्दा घेउन हा चित्रपट बनवला गेला असावा अस चित्रपट बघताना जाणवत राहतं. ज्या पद्धतीनं कथा फ्रेम्स आणि अभिनयद्वारे आपल्या समोर उलगडत जाते त्याच वेगात ती अंगावरही येते. पटकथेची कमाल आहे ही. मुळात या चित्रपटची कथा ही एक प्रवाही नाही त्यामुळे पटकथा हा मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतो. इथे एकाच वेळी समांतर ट्रॅकवर तीन कथा धावतात. कथा-पटकथा या दोन्ही जबाबदार्‍या सुदीप शर्मा आणि स्वतः दिग्दर्शक अभिषेक चौबे या द्वयींनी अगदी व्यवस्थीत सांभाळल्या आहेत.या दोघांनी ज्या सहजतेनं तीन कथा एकसंध पटकथेत बांधल्या ती सहजता चित्रपट पाहताना जाणवते. जे मी सैराट च्या समिक्षेत म्हणालो होतो स्वतः दिग्दर्शक हाच पटकथाकार असल्याचा फायदा जो अपेक्षीत असतो तो इथे दिसतो. पडद्यावर कथा व्यक्त होताना जेवढी लेखनी महत्वाची तेवढीच कात्री ही महत्वाची. लिखाणाएवढचं संकलनाच अवघड काम मेघना सेन उत्तमपणे पार पाडतात.
वास्तव चित्रपट म्हणुन मांडताना एक विशिष्ट प्रकारची क्रुत्रिमता चित्रपटात बर्‍याच वेळा येते. परिणामी चित्रपट थोडा मंदावतो. हे बर्‍याच चित्रपटांत आढळतं पण इथे आढळात नाही हे विशेष. दिग्दर्शक म्हणुन आपल्याला काय दाखवायच आहे हे नीट माहीत असल्याने बहुदा अभिषेक चौबे चित्रपट व्यवस्थित हाताळतो. स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून त्याचा हा तिसरा चित्रपट.. इश्किया आणि देढ इश्किया सारख्या वेगळ्या ढाटणीचे चित्रपट करण्याची परपंरा त्यानं कायम ठेवली.
त्याच्या मनात हा चित्रपट करताना काय चालु असेल हे आपण चित्रपट पाहताना आपण समजु शकतो यातच त्याचं यश आहे. पंजाबच दाहक दर्शन घडवणारा राजिव रवीचा कॅमेरा काहीसा संयमी वाटतो. अनुभव हा प्रकार कशाशी खातात हे त्यांच्या छायाचित्रणाच्या शैलीवरुन कळतं. अमित त्रिवेदीच संगीत असलेली गाणी आणि बेनडिक्ट टेलर-नरेन चंदवणकर या द्वयींच पार्श्वसंगीत आपापल्या ठिकाणी उत्तम काम करतात. जो प्रभाव कथा-पटकथा आपल्यावर निर्माण करते तो संगीत टिकवून ठेवतं यातच सगळ आलं..
अभिनय हा इथला दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. वास्तवातला पंजाब दाखवताना तिथली पात्र खरी दिसणं महत्वाचं होतं. पंजाबी लोकांचे दोन भिन्न स्वभाव दाखवण्यात शाहीद कपूर आणि दलजीत दोसंज यशस्वी होतात. टॉमी सिंगच्या लूक मधला शाहीद पात्राला उत्तम शोभतो तर पोलिस व्यक्तिरेखेत दलजीत सुरेख. त्याची व्यक्तिरेखा ही थोडीशी लवरबॉय सारखी आहे आणि त्यात तो उत्तम दिसतो. करीना कपूरला डॉ. प्रिती सहानी साकारताना तिच मुळात पंजाबी असणं खूप फायद्याच ठरतं. तिचा अभिनय उत्तम आहे. आलिया ज्या सहजतेने मजुर मुलगी साकरते ते एक उत्तम अभिनेत्री असण्याच लक्षण आहे. इम्तिआज अलिच्या 'हायवे' नंतर तिचा हा सर्वोत्तम अभिनय. या चौघांच्या निवडीच श्रेय दिग्दर्शकाला दिल पाहिजे. या सगळ्यांबरोबर सतिश कौशिक, हरप्रीत सिंग, सुहैल नायर आपापली काम नीट पार पाडतात. विशेष दखल म्हणजे बल्ली हे पात्र प्रभज्योत सिंग व्यक्तिशः जगतो अस वाटत. त्यात कोणताही क्रुत्रिमपणा जाणवत नाही हे विशेष.
लेखक-दिग्दर्शक म्हणुन अनुराग कश्यप आपणाला परिचित आहेच पण त्याच निर्मिति असलेला हा चित्रपट त्याच्या स्वभावाला धरणारा आहे. त्याचि व्यक्त होण्याची एक पद्धत आहे, एक शैली आहे, ती यातही आढळते. भले दिग्दर्शन हे अभिषेक चौबेच असलं तरी अनुरागची छाप या वर दिसते. प्रेक्षक कोणिही असो हे सत्य प्रत्येकाला जाणवनारं आहे हे नक्की.
प्रिन्सिपली एखादा विचार मांडाताना कलाक्रुतीचा पोत कसा सांभाळावा हे इथे उत्तम दिसुन येतं. हा चित्रपट आपल्या रोजच्या मसाला चित्रपटांसारखा नाही किंबहुना तो अनुरागच्या याधिच्या चित्रपटांसारखा तर नक्कीच नाही. याच कारणासाठी,तो एक उत्तम कलाक्रुती म्हणुन आणि आजच्या पंजाबच वास्तव म्हणुन जरूर पहावा.
उत्क्रुष्ट अभिनय, उत्तम कथा, नीट दिग्दर्शन आणि बरीच संकट येउन ही हा चित्रपट उत्तमरित्या प्रदर्शित करणार्या निर्मात्यांना सलाम!!!

चित्रपटसमीक्षा