नुकताच डोंबिवलीच्या एम आय डी सी च्या क्षेत्रातील एका कारखान्यात प्रचंड स्फोट होऊन डझनभर लोक मरण पावले आणि शेकडो जखमी झाले. शिवाय अनेक इमारतींना भेगा पडून मोठे नुकसान झाले आहे.
एकेकाळचे रम्य, सुसंस्कृत शहर आज रासायनिक ज्वालामुखीच्या जवळ जाऊन बसले आहे. खुद्द एम आय डी सीत पाहिले तर घरांच्या आसपास कारखाने आहेत का कारखान्यांच्या आसपास घरे आहेत ते कळत नाही. घातक रसायने, वायु वगैरे वापरले जातात अशा कारखान्यांकरता कडक नियम असतात. त्यांच्या आसपास पुरेशी मोकळी जागा, प्रशिक्षित कामगार असणे वगैरे. पण डोंबिवलीची एम आय डी सी केवळ पैसे खाऊन हवी ती कागदपत्रे बनवते. तपासणी करणे, नियमन करणे वगैरे कामे हा विभाग आजिबात करत नाही. छोटे मोठे स्फोट होतच असतात. ते झाले की आपले हप्ते वाढवून घेणे इतकेच काम हा विभाग करतो. असे ऐकून आहे.
ह्या मोठ्या स्फोटामुळे ह्यात काही बदल होईल का? भाजपाचे सरकार आल्यामुळे परिस्थिती सुधारेल का जैसे थे रहाणार?
मागे हिरवा पाऊस झाला तेव्हाही प्रदूषणाची थोडी चर्चा झाली होती. आताही होईल पण दीर्घकाळाकरता उपाय होईल का?
लोकांना घाणेरडा वास येणे ह्या गोष्टी तर रोजच्याच आहेत. त्याबद्दलही काही होताना दिसत नाही.
इथे कुणी डोंबिवलीकर आहेत का? त्यांचे काय अनुभव आणि मत?
प्रतिक्रिया
30 May 2016 - 3:00 am | गामा पैलवान
लोकहो,
थोडी चिकित्सा करतो. ज्याअर्थी स्फोट होऊन मोठा खड्डा पडला, त्याअर्थी तो जमिनीखाली झाला आहे. आजूबाजूंच्या इमारतींच्या काचा फुटल्या. म्हणजे हवेतून वायुघाव (= शॉकवेव्ह) गेला. तसेच छप्परांची हानी झाली व भिंतींनाही तडे गेले. याचा अर्थ जमिनीतून देखील घनघाव (= मेकॅनिकल शॉकवेव्ह) गेला. दोन्ही प्रकारचे घाव उत्पन्न होणे साध्यासुध्या स्फोटात दुर्मिळ मानले जाते.
वृत्तपत्रांत माहिती (वा अफवा) आलीये की बंब (= बॉयलर) फुटला नसून प्रक्रियक (= रीअॅक्टर) फुटला आहे. तर या आस्थापनात असा कोणता प्रक्रियक होता, जो फुटल्याने दुहेरी घाव उत्पन्न होईल? आस्थापनाचे मालक आणि त्यांचे मुलगा व सून असे जवळचे नातेवाईक ठार झाले आहेत. जर मालकाने सुरक्षानियम धाब्यावर बसवून उत्पादन चालवलेले असते तर त्या वेळेस स्वत: इमारतीत राहण्याचा धोका पत्करला नसता.
एकंदरीत असे वाटते की हा मुद्दाम घडवून आणलेला घातपाती स्फोट तर नव्हे? कृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
आ.न.,
-गा.पै.
30 Jun 2016 - 8:30 am | कैलासवासी सोन्याबापु
आपण प्रमाणपत्र प्राप्त स्फोटपश्चात तपासनीस (पोस्ट ब्लास्ट इन्वेस्टीगेटर) आहात काय सर??
30 May 2016 - 8:59 am | हुप्प्या
भारतातील सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करताना कुणाच्या जिवाची पर्वा करत नाहीत. काही पैसे खिशात घालण्याकरता ते कुठल्या थराला जातील ह्याला काही सीमा नाही. कारण अशा लोकांवर कुठली कारवाई झालेली नाही, होत नाही आणि होणार नाही. ही एक व्यवस्थित पोसलेली समांतर व्यवस्था आहे. पार वरपर्यंत मलिदा पोचत असल्यामुळे कुणी ही व्यवस्था उध्वस्त करू इच्छित नाही.
त्यामुळे हा घातपात नसून सुरक्षा व्यवस्थेतली अक्षम्य हेळसांड आहे असे माझे मत आहे. अगदी भाजपा/शिवसेना सत्तेवर असली तरी ह्यात काही बदल होईल असे वाटत नाही. आणि माझे हे भाकित चुकीचे निघाले तर मला आनंदच होईल!
30 Jun 2016 - 8:32 am | कैलासवासी सोन्याबापु
हे पटण्यासारखे आहे! एकंदरीत जर भारतात आज अतिशय कायदेशीरपणे सिक्युरिटी ऑडिट केल्यास बहुतांशी SME युनिट्स बंद पडतील!
30 May 2016 - 10:12 am | तिमा
डोंबिवलीत झालेला स्फोट अक्षम्य निष्काळजीपणामुळे झालेला आहे असे वाटते. नायट्रेशन वा नायट्रो रसायनांच्या रिअॅक्शन करताना तापमान व त्यामुळे प्रेशर वाढले तर अशा प्रकारचे स्फोट होऊ शकतात.अशा रिअॅक्शनमधे बाहेरुन थंड करण्यासाठी सर्क्युलेशनची व्यवस्था असते, ती कधी काम करेनाशी होते, अशा अनेक शक्यता आहेत. परन्तु, नक्की काय केमिकल्स वापरत होते, ते कळल्याशिवाय त्यावर मतप्रदर्शन करणे योग्य होणार नाही. हे झाले अपघाताबद्दल.
पण मूळ प्रश्न असा आहे की जेंव्हा एखादी रासायनिक प्रक्रिया करणारी औद्योगिक वसाहत बसवली जाते तेंव्हा त्याच्या आसपास काही किलोमीटरपर्यंत कोणातीही मनुष्यवस्ती करायला परवानगी नसते. पण आपल्या भ्र्ष्ट देशांत हे नियम पायदळी तुडवून अशा वस्त्यांना पैसे खाऊन परवानगी दिली जाते. हे काम राजकारण्यांच्या आशीर्वादानेच होते. त्यानंतर अशा दुर्घटना झाल्यावर, उद्योग व ते उद्योजक यांच्या नांवे ओरडा सुरु होतो, लोकांच्या भावना भडकावून दिल्या जातात आणि त्या उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी जोर धरु लागते. महाराष्ट्रातल्या अशा कितीतरी एम.आय.डी.सी.चे गळे शासनानेच, याप्रकारे घोटले आहेत.
एखाद्याने आपल्या आयुष्याची कमाई लावून उद्योग उभारायचा, सतराशेसाठ सरकारी इन्स्पेक्टर्सचे लाड पुरवायचे, अनेकांना रोजगार पुरवायचा आणि जवळपास अशी एखादी घटना झाली की आता इथून पुन्हा हलावे लागते की काय, याची चिंता करायची. मग कोणाला उद्योजक व्हावेसे वाटेल ?
30 May 2016 - 10:53 am | रघुनाथ.केरकर
सुमारे १९६५ ७० च्या दरम्यान डोंबीवली मध्ये सेट अप झाली. आणी डोंबीवली नीवासी हा रहीवासी भाग हल्लीच्या १० १५ वर्षात वसवला गेला.
अशीच एक घटना आमच्या अम्बरनाथ मध्ये २००८ ला झाली. डिएनसी कंपनीतल्या प्रक्रीये मुळे आजुबाजुच्या लोकांना त्रास होउ लागला. त्यानी त्यबद्दल न्यायलयात धाव घेतली. पण न्यायलयाने डिएनसीकंपनी हि अम्बरनाथ वसायच्या आधीपासुन तेथे आहे. अस काहीसं सांगुन नीकाल डिएनसी च्या बजुने दीला.
जाता जाता
डोंबीवली एम आय डी सी गुजराथ ला गेली तर नवल वाटुन घेउ नये.
30 May 2016 - 11:20 am | हुप्प्या
काही वर्षांपूर्वी एक प्रकरण उघडकीस आले होते की गुजराथमधील काही रासायनिक उद्योग (बहुधा वापी व आसपासच्या भागातील) आपल्या कारखान्यातील टाकून द्यायची घातक रसायने टँकरने डोंबिवली एम आय डी सी भागात पाठवायची. अत्यंत अपरात्री पहाटे २ ते ३ च्या आसपास टँकरवाले ही रसायने तिथल्या नाल्यात सोडून देत असत. पहाटे त्या भागात भयानक घाणेरडा वास सुटायचा. लोक एम आय डी सीच्या कंपनीच्या नावाने खडे फोडायची. अनेक वर्षे हा प्रकार चालत होता. पोलिस व अन्य यंत्रणांचे हात ओले केले जात असणार याबद्दल मला शंकाच नाही. नंतर कधीतरी तो उघडकीस आला. तेव्हा गुजराथच्या विकासात डोंबिवलीचा असाही हातभार लागलेला आहे! (अर्थात ते करत असताना डोंबिवलीकरांनी श्वसनाचे, त्वचेचे अनेक विकार सहन केले ते अलाहिदा!).
30 May 2016 - 12:11 pm | अत्रन्गि पाउस
-करकचून हात पाय आवळनारे नियम
-प्रत्येक नियम / कायद्यातून शोधली जाणारी पळवाट
-४ आणे वाचवण्यासाठी वाट्टेल त्या क्लृपत्या योजण्याची असोशी
-संपूर्णपाने मूल्यरहित होत जाणारी सामाजिक/कौटुंबिक/शैक्षणिक व्यवस्था
त्यामुळे आपल्याकडे काहीही शक्य आहे
30 May 2016 - 1:30 pm | कंजूस
मालकापैकी एकजण केमिकल एंजिनिअर आहे त्याने प्रॅाडक्शन वाढवण्यासाठी काही प्रयोग थेट मेन लेवलि केले असतील आणि तिथेच चुकलं.
केमिकल फॅक्ट्यय्रांत बरेच तंत्रज्ञान मागवून कारखाना सुरू करतात त्यात दोष नसतो कारण टाइम टेस्टेड रचना दिलेली असते.पण नंतर फेरफार करणे धोकयाचे असते.
आणखी एक मुद्दा अर्धवट ज्ञानी मालक प्रॅाफिट वाढवण्यासाठी कामकाजात जबाबदार असणाय्रा पगारी माणसास बाजूस सारून ढवळाढवळ करतात.एखादी टेस्ट करण्याची प्रथा टंगवून घाई करून प्रोसेस सुरू करायला लावतात.
हायड्रोकार्बन्सच्या टाक्या वेल्डिंगचे काम आल्यास आठ दिवसच्यावर प्राडक्शन बंद राहाते.ती रिकामी करणे ,हवेने फ्लश करणे चार चार तासाने आतला वायु स्फोटक आहे का हे हे एका डिवाइसने तपासणे,ते डिवाइस माहित असलेल्या स्फोटक मिश्रणाला टेस्ट करून खात्री करणे पुन्हा पाहाणे वगैरे .टाकीच्या आत हवेचे गॅसचे मिश्रण फारच स्फडटक असतं.वेल्डिंगचा आर्क / ठिणगी झाली कि स्फोट होतो.परंतू या पद्धतीत घाई करून चालत नाही.पगारी इंजिनेर व्यवस्थित काम करत असतो.त्याच्या डोक्यात सुरक्षितता हा एकच विचार असतो.मालकाच्या डोसक्याततला प्रॅाफिट त्या प्रोसिजरची वाट लावतो.ते टेस्टिंग डिवाइस टेसट्टच्या अगोदर आणि नंतर स्टँडर्ड मिक्शरने टेस्ट केल्यावरच विश्वास ठेवायचा असतो.
30 May 2016 - 1:39 pm | गामा पैलवान
लोकहो,
दैनिक सकाळमधल्या या वृत्तानुसार मालकांच्या सुनेचा मृतदेह शंभर फूट दूरवर उडालेला आहे. यावरून १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांची आठवण झाली. प्रभादेवीस सेंच्युरी बाजाराजवळ झालेल्या स्फोटात एक दुमजली बसच्या पूर्णपणे ठिकऱ्याठिकऱ्या उडाल्या. चालकाचा मृतदेह असाच बाजूच्या सहामजली इमारतीच्या छपरावर फेकला गेला होता. तसेच प्रभादेवी परिसरातल्या इतर वास्तूंचे डोंबिवलीप्रमाणेच नुकसान (भिंतींना तडे, काचा फुटणे, इत्यादि) झाले होते. शिवाय प्रभादेवीच्या मुख्य रस्त्यावर खड्डाही पडला होता.
यावरून प्रभादेवी आणि डोंबिवलीच्या स्फोटांत तिहेरी साम्य दिसतं. प्रभादेवीचा स्फोट दहशतवादी कृत्य होतं. डोंबिवली स्फोटही असाच मुद्दाम घडवून आणला गेला असेल काय?
आ.न.,
-गा.पै.
31 May 2016 - 11:21 am | आनंदी गोपाळ
वाकडं बोलायचं काम नै.
भाजपाच्या राज्यात टेररिस्ट सफोट वगैरे काय होत नाह्य. अजाबात खोट्या अफवा पसरवू नका.
30 May 2016 - 1:40 pm | mandarbsnl
खट्टा मीठा चित्रपटातील एक दृश्य आठवले की ज्यात टीनु आनंद ला बळीचा बकरा बनवले जाते...ज्याचा काशाशीही काहीही संबंध नाही अशा माणसाला पकडून मारले जाते...असेच काहिसे पाहायला मिळेल आता..कोणाला तरी पकडून उभे केले जाईल आणि त्यालाच दोषी मानून कारवाईचे नाटक केले जाईल..
30 May 2016 - 2:04 pm | राही
अत्यंत दुर्दैवी घटना.
आता संपूर्ण एमायडीसीच हलवा अशी मागणी सुरू होईल. इकडे दक्षिण मुंबईत ससून डॉक्सचे मासळीबंदर हलवा (लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.) मुंबई बंदरातले कामकाज हलवा (ती जागा लोकांच्या स्वास्थ्यासाठी वापरा-उदा. यॉट क्लब, बोट रेसिन्ग, स्कूबा डाय्विन्ग इ. आणि शेपूट किंवा मधाचे बोट म्हणून 'परवडणारी' घरेनिर्मिती आहेच.) राणीच्या बागेतली जनावरे हलवा, अख्खी राणीची बागच हलवा, आरे कॉलनीतल्या गायी हलवा, आरे कॉलनीच हलवा, कृष्णगिरी उपवनातले बिबटे हलवा किंवा नॅशनल पार्कच हलवा, समुद्रकिनारे हलवा म्हणजे दूर न्या, मिठागरे हटवा, आणि सगळीकडे सेंट्रल पार्क, थीम पार्क, वॉटर स्पोर्ट्स, अम्यूझ्मेंट पार्क्स, साहसक्रीडा आणि मधाचे बोट म्हणजे परवडणारी घरे बांधा. अगदी विमानतळाची जागासुद्धा 'परवडणार्या' गृहनिर्मितीसाठी वापरा.
वेड पांघरून पेडगावला चाललेत सगळे.
30 May 2016 - 3:56 pm | सतीश कुडतरकर
rahi +1
31 May 2016 - 11:32 am | अत्रन्गि पाउस
बेसिकली विकल्या जाणार्या वास्तू बनवा आणि विका ...
29 Jun 2016 - 10:01 pm | नितीनचंद्र
वाढते उद्योग, फॅक्टरी लायसन्स ला परवानगी दिल्याशिवाय होणारा विद्युत पुरवठा किंवा सेल्स टॅक्स इत्यादी चे मिळणारे रजिस्ट्रेशन आदी ची नियमावली यामुळे आज महाराष्ट्रात काय अनेक राज्यात अनेक कारखाने त्याच्या तपासणी व परवानगी शिवाय कार्यरत आहेत. फॅक्टरी नियमात असलेले अनेक क्लॉज, फॅक्टरी निरीक्षकांची अपुरी संख्या, तंत्र सुधार आणि अनेक कारणे आहेत जसे एम आय डी सी नसलेल्या भागात फॅक्ट्री उभी रहाते. याला इमारतीची परवानगी ग्रामपंचायत देते तर बांघकाम गोडाऊन म्हणुन केले जाते इत्यादी.
थोडक्यात या कारखान्यात कोनती रसायने आणि कोणती प्रक्रिया केली जाते व त्यावर सुरक्षीतता कशी द्यावी या बाबत कारखाने निरीक्षक यांचे नियंत्रण फारसे नाही. त्यांची कारवाई अपघातानंतरच होते.
बरेच वेळा निरीक्षण आणि परवानगी ही प्रक्रिया त्याच्या कागदपत्रात अडकुन तंत्रीक बाबीकडे दुर्लक्ष होते आणि असे अपघात होतात.