गेल्या शनिवारी दिल्ली पब्लिक लायब्ररीत गेलो होतो. सहज म्हणून ऋग्वेदाचा एक खंड उचलला, काही पानें चाळली. एका सुक्तावर वर नजर पडली:
वा: कपोत इषितो यदिच्छन् दूतो निऋर्त्या इदमाजगाम I
तस्मा अर्चाम कृणवाम निष्कृतिं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे II
शिव: कपोत इषितो नो अस्त्व नागा देवा: शकुनो गृहेषु I
अग्निर्हि विप्रो जुषतां हविर्न: परि हेति: पक्षिणी नो वृणक्तु II
(ऋ. १०/१६५/१-2)
ऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे. या ऋचांचा साधारण अर्थ (अध्यात्मिक अर्थ वेगळे ही असू शकतात) कपोतरुपी दूताचे स्वागत केले पाहिजे. अन्न व दुग्ध अर्पण करून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपोतरुपी दूताचा अपमान किंवा त्या वर प्रहार नाही केला पाहिजे. तो मंगल करणारा असो. अमंगलकरी बातमी आणणारा कपोत उदा: शत्रू सैन्याचे आक्रमण इत्यादी, लवकरात लवकर घरातून दूर निघून केला पाहिजे.
या वरून काही गोष्टी निश्चित कळतात, वैदिक युगात ही कबुतरांचा उपयोग संदेश देण्यासाठी होत होता. कबुतर बोलून संदेश देऊ शकत नाही. सांकेतिक रुपात का होईना, लिखित भाषेचा जन्म ही त्या काळी झाला असेलच. शिवाय दूत हा अवघ्य असतो.
मुगल काळात संदेशवाहक म्हणून हजारोंच्या संख्येने कबूतर बादशाह पाळायचे. गेल्या दोन्ही महायुद्धात कबुतरांचा उपयोग सैन्य संदेश देण्यासाठी युद्धरत देशानीं केला होता. आज ही जासूसी साठी कबुतरांचा उपयोग होतोच, विशेषकर सीमा प्रांतात. जुन्या दिल्लीत आज ही लोक कबुतरे पाळतात. कबूतरबाजीच्या प्रतियोगिता ही होतात. या खेळात जो कबूतर जास्त वेळ आकाशात राहतो, तो विजेता ठरतो.
जुन्या हिंदी सिनेमांमध्ये प्रेयसी आपल्या प्रियकराला सन्देश पाठविण्यासाठी कबुतरांचा उपयोग करायची. त्यांचा मीलनात कबुतरांचा मोठा वाटा असे. लग्नानंतर सौ. सोबत मैने प्यार किया" हा सिनेमा बघितला होता.(प्रेम विवाह नसूनही). कबूतर जा जा जा, हे त्या सिनेमातले अत्यंत लोकप्रिय गाणे. त्या वेळी गाण्याचा खरा? अर्थ समजला नाही.
आज दिल्लीत कबुतरांची संख्या भयंकर रीतीने वाढते आहे. मांजर, कुत्रे, माकडां पासून सुरक्षित असे २०-२० फूट उंच मेट्रोचे पिलर हे कबुतरांच्या राहण्यासाठी सुरक्षित स्थान झाले आहे. या शिवाय टोलेगंज सरकारी इमारती ही दिल्लीत भरपूर आहेत. लोकांनी पक्ष्यांसाठी टाकलेला सर्व दाणा-पाणी कबुतरेच चट करून जातात. त्या मुळे मैना (साळुंकी), चिमणी इत्यादी लहान पक्ष्यांचे जिणे दूभर झाले आहे. त्यांची संख्या कमी होत चालली आहे. दिल्लीत जिथे पहा तिथे केवळ कबुतरे आणि कावळेच दिसतात.
प्रथमदर्शनी कबुतर अत्यंत निरुपद्रवी पक्षी वाटतो. पण खंर म्हणाल तर, कबुतरांच्या विष्ठे आणि पिसांमुळे अलर्जी, निमोनिया इत्यादी अनेक रोग पसरतात. रोगराई व घाण पसरविणारी कबुतरांना आता शहरातील लोक कंटाळली आहे. आज दिल्ली, मुंबईतल्या लोकांना खरोखरंच अमंगलकारी कबुतरे शहरातून दूर निघून गेली पाहिजे असे वाटते. लोक ही कबुतरांच्या विरुद्ध आवाज उठवू लागले आहेत. पण सध्यातरी कुठल्या ही सरकारी यंत्रणेने या बाबत दखल घेत नाही आहे. जर कबुतरांना हाकलणे शक्य नसेल तर किमान सरकारी यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर कबुतरांना राहण्यायोग्य झाडे इत्यादी लावली पाहिजे. त्याना दाणा-पाणी घालण्यावर ही काही निर्बंध लावली पाहिजे. एवढे केलेतरी काही प्रमाणावर कबुतरांचा त्रास कमी होईल.
प्रतिक्रिया
29 Jan 2015 - 9:47 pm | रेवती
कबूतरांच्या त्रासाबद्दल अगदी सहमत.
29 Jan 2015 - 11:05 pm | अत्रन्गि पाउस
सुरुवात वाचून जे वाटले ते शेवट वाचून हुश्श झाले ...
अत्यंत पीडू पक्षी...पण त्याला दाणा पाणी देणे हे काही पंथांमध्ये पुण्य समजले जाते त्या मुळे नवनवीन कबुतर खाने तयार होताहेत ...
व्याप आहे झालं !!
30 Jan 2015 - 10:55 am | पैसा
कबुतराचा वेदातला उल्लेख रोचक आहे! कबुतरांच्या सध्याच्या उपद्रवाबद्दल मात्र पूर्ण सहमत. आमच्या रत्नागिरीच्या फ्लॅटची गॅलरी ही या क्षुद्र पक्ष्यांनी संडास म्हणून मुक्रर केली आहे. तिथे जायचे ते फक्त सफाईकामगार म्हणूनच. वैताग आलाय नुसता.
30 Jan 2015 - 11:37 am | उगा काहितरीच
कर्वे नगरला एक व्यक्ती कबुतरांना अगदी १५-२० किलो मक्याचे दाणे टाकताना पाहीला कबुतरांचा उच्छाद ५ मिनीटात एकही दाणा शिल्लक नाही ठेवला !
30 Jan 2015 - 12:18 pm | स्वामी संकेतानंद
घाण उच्छाद मांडलाय कबुतरांनी दिल्लीत. माझ्या मेट्रो स्टेशनवर पायर्या चढताउतरताना आणि सिक्युरिटि चेकसाठी उभे राहताना भीतीच वाटत असते. वरती कबुतरे रोमान्स करत असतात... घरात तर खिडकी उघडी ठेवता येत नाही.
30 Jan 2015 - 12:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
पिजन्स आर फ्लाइंग रैट्स!!, बुबोनिक प्लेग वगळता उंदरा पासुन होणारे समस्त रोग (उदा. टायफस वगैरे) कबुतरांपासून ही पसरतात, खाद्य संस्कृति मधे कबुतराचं मांस अतिशय तेलकट उष्ण पण रुचकर असे मानल्या जाते, अस्थमा वर देशी इलाज ही मानतात बरेच लोकं त्याचे मांस, इजिप्त मधे मसालेभात भरुन रोस्ट केलेली कबुतरे ही एक प्रसिद्ध डीश आहे, अमेरिका मधे एकदा फिलाडेलफ़िया मधे एक आमदार/खासदारा चे संमेलन होते, ही मंडळी ज्या होटल मधे उतरली होती तिथल्या वाटर प्यूरीफ़िकेशन सिस्टम मधे अन एयर वेंट्स मधे कबुतरा ची विष्ठा असल्यामुळे तिथे एक रोगाची साथ आली ज्याच्यामुळे ही नेतेमंडळी अन होटल स्टाफ आडवा झाला! त्याला आज "लेजिनीयर्स डिजीज आउटब्रेक" असे म्हणतात बहुतेक!(ही ऐकिव घटना आहे!, सत्यासत्य पारखलेलं नाही!)
30 Jan 2015 - 12:33 pm | योगी९००
कबुतर जा जा जा असेच म्हणावे वाटते.
कबुतरांची विष्ठा आणि पंखावरच्या धुळीमुळे श्वसनाचे रोग होण्याची शक्यता असते. आमच्या खिडकीत कबुतरांनी छोटे घर केले होते. कितीही हाकलले तरी जात नव्हते. शेवटी बाहेरून माणसाला बोलावून साफसफाई केली आणि कबूतर जाळी बसवुन घेतली. आता त्रास कमी झालाय.
30 Jan 2015 - 2:59 pm | इशा१२३
गेल्याच महिन्यात सात वर्षाच्या लेकिला न्युमोनिया झाला.तीला झालेल्या न्युमोनियाचे कारण डॉ.नी घरात पाळीव पक्षी आहे का?असे विचारले.तसे काहि नसल्याने कबुतरांची विष्ठा हे कारण असु शकते असे सांगितले.हा त्रास अकरा दिवस हॉस्पिटल,अनेक सलाइन्स हेवी अँटिबायोटिकस,अशक्तपणा,काळजी आणि शाळा बुडणे असा सहन करावा लागला.
त्यामुळे या कबुतरांना धान्य खाउ घालताना कोणी दिसले कि भयंकर राग येतो.बिल्डिंमधील वरच्या मजल्या वरच्या लोकांनी टेरेसला जाळ्या लावुन घेतल्यात आता कबुतर बाहेर आणि हि लोक पिंजर्यात अस झालय.उच्छाद मांडलाय कबुतरांनी.
30 Jan 2015 - 3:21 pm | विभावरी
भर दुपारी शांत वेळी ही कबुतर घशातून जो आवाज काढतात आणि घुमतात ना अगदी अैकवत नाही .
30 Jan 2015 - 3:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
कबुतरांचे घुमणे अन गुटर्घुंम चा आवाज कित्येक भयकथा, साहित्य अन सिनेमांत वातावरण निर्मिती करत असते!!
30 Jan 2015 - 3:48 pm | सस्नेह
काय हे ? तुम्ही त्यांची जंगलं तोडली, झाडं पाडली, घरं मोडली, आणि आता त्यांनाच 'जा जा जा' म्हणता ?
उठाले, भगवान , बिच्चारे कबुतरोंको ! !
30 Jan 2015 - 7:19 pm | विजुभाऊ
कबुतराना दाणे घालणारे विशिष्ठ धर्माचे लोक असतात. अहिंसेच्या अतीरेकी आग्रहामुळे त्याना स्वतःला त्याचे फार पवित्र कृत्य वाटले तरी त्याचा त्रासच होतो. आमच्या बिल्डिंग मधे अशाच एका कुटुंबाने अक्षरशः धुमाकुळ घातला होता. शेवटी त्या घरातील मंडळीना " माझ्या घरात मुलाना किंवा कोणाला आजार वगैरे झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल आणि तुम्ही कबुतराना दाणे टाकले तर येणार्या सर्व कबुतराना मी एअर गन ने मारून टाकेन. मला शिकार आणून दिली म्हणून त्याचे पाप तुम्हालाच लागेल " तेंव्हा कुठे ते गप्प झाले. त्या लोकाना त्यांच्या प्रार्थनाघरात जावून कबुतराना खायला घातले तर काय होते कोण जाणे.
हे कबुतराना दाणे खायला घालून पुण्य कमावणारे मात्र खेडोपाडी सावकारे करून लोकांचे पिळवणूक करन्यात मात्र आघाडीवर असतात.
31 Jan 2015 - 2:01 pm | आनंदराव
सगळ्यात महत्वाचे म्हणजे पक्षीतज्ञांच्या मते शहरातील हे पक्षी कबुतरे नसुन पारवे आहेत.
आणि ह पारवे कधीही झाडांवर घरटी करत नाहीत. वळचणी मधेच घरटी करतात. त्यामुळे झाडांची संख्या वाढवुन काहीच उपयोग नाही.थोडे निर्दय बनुन एअर गन ने या पारव्यांना मारणे हाच उपाय आहे. शेवटी दवाखान्याला पैसे घालवण्यापेक्षा हे बरे.
आणि इतर पापांमधे अजुन थोडी भर !
31 Jan 2015 - 3:01 pm | जागु
ही समस्या सगळीकडेच आहे कबुतरांची.
31 Jan 2015 - 4:51 pm | विजुभाऊ
आसपास मणीपुरी लोक रहात अस्तील तर या पक्ष्यांची संख्या कमालीची घटते म्हणे.
त्यांचे ते अन्न आहे.
31 Jan 2015 - 8:12 pm | सिद्धेश महाजन
कबुतरमास मणिपुरमधे पाठवणे (के एफ सि रेडिमेड चिकन सारख) हा धन्दा कसा वाट्तो. पुढे चिन, जपान, मन्गोलिया इ किडे मुन्ग्या खाणार्यान्चे देश आहेतच.
31 Jan 2015 - 9:07 pm | फर्स्टमॉन्क
खुप वैतागुन सोडलं आहे या कबुतारणी इतका त्रास आहे त्यांचा आमचा घरी टेर्रेस वर सगळीकडे घन करतात आणि त्यांचा विष्ठेचा खुप घन वास आणि कीळस येते शी