तापमान मोजण्याच्या यंत्रा बाबत तर सर्वाना माहित आहे, पण थंडीचे मीटर हा काय प्रकार आहे , कुणी शोध लावला आणि याने थंडी कशी काय मोजतात, ही उत्सुकता मनात जागृत होणारच. जीवाची मुंबई या महानगरात आमचे एक जिवलग (?) नातेवाईक राहतात. बेचारे सीधे-साधे सरळमार्गी चालणारे, सरकारी कर्मचारी. सकाळी नऊ वाजता घरातून नौकरीसाठी प्रयाण करणारे आणि संध्याकाळी घरातल्या भिंतीवर लटकलेल्या घड्याळानी साडेपाचचा टोळा देत्याच क्षणी, घरात पुनरागमन करणारे. एकदम शिस्तबद्ध सरकारी कर्मचारी सारखी त्यांची साधी राहणी. अर्धा डिसेंबर उलटताच मुंबईत गुलाबी थंडी पडते. पण मुंबईत पडणार्या या गुलाबी थंडीचा, संध्याकाळच्या गुलाबी वातावरणात, गुलाबी अनुभव घेण्याचा प्रयास संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधी केला नव्हता. पण मुंबईकरांना भगवंतानी मोठ अर्थात सुपीरिअर माइंड दिल्या मुळे त्यांनी 'थंडीच्या मीटरचा' शोध लावला. त्याचीच ही कथा.
चार-पाच दिवस आधी दिल्लीत ढगाळ वातावरण होत. पाऊस पडत होता. दिवसाचे तापमान कमाल १६ आणि किमान १४ डिग्री होते. दुसर्या दिवशी आभाळ स्वच्छ झाल, सकाळी चहूकडे धुकं पसरले आणि पारा खाली पडला. थंड वाऱ्यामुळे शरीरात हुडहुडी भरली. मला थंडीच्या मीटरचा शोध लावणाऱ्या मुंबईकर नातलगाची आठवण झाली.
काही सरकारी कामानिमित्त त्यांना दिल्लीत यायचे होते. त्या पूर्वी दिल्लीत कधी ही आले नव्हते, कदाचित मुंबईच्या बाहेर ही ते कमीच फिरले असेतील. त्या वेळी सुद्धा, असेच काही वातावरण होते. शुक्रवारी ढगाळ वातावरण होते, पाऊस पडला होता. शनिवार आकाश स्वच्छ झाले. पहिल्यांदाच ते दिल्लीत येत असल्यामुळे रविवारी सकाळी त्यांना घ्यायला मी नवी दिल्ली स्टेशनवर गेलो. थंडगार वारे सुरु असल्यामुळे धुंक नव्हते, पण भयंकर थंडी होती. अंगावर अर्धे स्वेटर घालून आमचे मुंबईकर पाहुणे गाडीतून उतरले, त्यांना भयंकर थंडी वाजत होती, थंडीमुळे त्यांचा शरीराला कंप फुटला होता. मुंबैकरांबाबत काहीशी कल्पना होती, स्वेटरवर जेकेट घालूनच घरातून बाहेर पडलो होतो. आपले जेकेट त्यांना दिले. मुबैकाराना थोड बंर वाटले. आटो घेऊन घराकडे निघालो. आटोत बसतात त्यांनी प्रश्न विचारला परवातर तर दिल्ली आणि मुंबईच्या किमान तापमानात फक्त एका डिग्रीचा फरक होता, मग आज एवढी थंडी कशी काय? मुंबैकरांनी हा प्रश्न का विचारला हे मला समजले नाही. काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून म्हणालो दिल्लीत पाऊस आणि हिमाचल प्रदेशात बर्फ पडली कि दुसऱ्या तिसर्या दिवशी दिल्लीत भयंकर थंडी राहतेच. पण माझ्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाले नाही. घरी आल्यावर सर्वप्रथम मार्केट मध्ये जाऊन त्यांच्या साठी एक स्वेटर आणले. सोमवारी नेहमी प्रमाणे मी कामावर गेलो, ते ही आपल्या कामावर गेले. मुंबैकरांचे दिल्लीतले काम लवकरच पूर्ण झाले. चार-पाच वाजे पर्यंत ते घरी परतले होते.
नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात वाजता घरी पोहचलो. पाहतो, समोर सोफ्यावर मुंबैकर पाहुणे बसलेले होते, वर्तमानपत्रांचा ढीग त्यांच्या समोर पडलेला होता. एका वर्तमान पत्रावर ते काही आंकडेमोड करत होते. हात-तोंड धुतल्यावर सौ. चहा नाश्ता (रोज संध्याकाळी घरी आल्यावर चहा सोबत काही न काही खायला सौ आणतेच) घेऊन आली. सोफ्यावर बसताच, मुंबैकर गंभीर चेहरा करीत म्हणाले, विवेक (वयाने माझ्यापेक्षा मोठे होते) काल थंडीमुळे मला जो त्रास झाला त्या बाबत विचार करीत होतो. गेल्या आठवड्याची वर्तमान पत्रे चाळली, दिवसांचे कमाल आणि किमान तापमानांची नोंद घेतली. आंकडे तपासले निष्कर्ष काढला. काल थंडीमुळे मला जो त्रास झाला, तो पुन्हा आता होणार नाही. माझ्या सारख्या अज्ञानी माणसाला त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय कळणार. प्रश्न वाचक मुद्रेने त्यांच्याकडे पहिले. मुंबैकर म्हणाले दिल्लीला निघण्यापूर्वी शनिवारी सकाळी ७ वाजता दूरदर्शन वाहिनी वर तापमान बघितले, शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १५ डिग्री होते तर दिल्लीचे १४ डिग्री. विचार केला दोन दिवसांसाठी दिल्लीत जात आहो, उगाच गरम कपडे का घ्यायचे. तापमानात थोडासाच तर फरक आहे. एक अर्धे स्वेटर अंगावर चढविले आणि निघालो. पण आता कळले, मुंबईचे कमाल तापमान ३० डिग्री होते आणि दिल्लीचे १६ त्याकडे लक्ष दिले नाही म्हणून घोळ झाला. सरासरी तापमानात एक डिग्रीचा नव्हे तर चक्क १०-१२ डिग्रीचा फरक होता. माझ्या सारखे अनेक लोक कुठे निघताना, हिवाळ्यात किमान आणि उन्हाळ्यात कमाल तापमानाकडे बघतात, सरासरी तापमान किती आहे, याची दखल घेत नाही, त्या मुळे त्यांना त्रास होतो. मी म्हणालो, च्यायला, उन्हाळ्यात दिल्ली आणि नागपूरचे अधिकतम तापमान एकच असले तरी ही नागपूरचा उन्हाळा का सहन होत नाही, तुमच्या या काय म्हणावे याला -थंडीच्या मीटर मुळे मला हे कळले. आश्चर्याचा धक्का लागल्या सारखे ते म्हणाले, थंडीचे मीटर, युरेका युरेका, मी थंडीच्या मीटरचा शोध लावला. एखाद्या शास्त्रज्ञासारखा त्यांचा चेहरा उजळून निघालेला होता. अश्यारितीने आमच्या बुद्धिमान मुंबैकराने थंडीच्या मीटरचा शोध लावला.
प्रतिक्रिया
20 Dec 2014 - 2:50 pm | पा पा
वा वा
20 Dec 2014 - 3:15 pm | ज्ञानोबाचे पैजार
हुंबैकर असतातच बुध्दीमान हो. पण भलतेच लाजरेबुजरे असल्याने त्यांच्या अजोड प्रतिभेचे प्रदर्शन करण्यात थोडे मागे पडतात. आज तुमच्या या लेखामुळे हुंबैकरांच्या अचाट प्रतिभासागराचे विलोभनिय दर्शन संपूर्ण जगाला झाले.
(मुंबईकर मुलीच्या प्रेमात पडलेला) पैजारबुवा,
20 Dec 2014 - 4:50 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह!!! मजा आया.
20 Dec 2014 - 5:23 pm | कंजूस
आग्रा, दिल्लीत, डिसेंबरात थंड पाण्यानेच आंघोळ करावी म्हणजे कोणतीही आकडेमोड न करता थंडीला गंडवता येते.
20 Dec 2014 - 6:11 pm | विवेकपटाईत
प्रतिसादाबाबत धन्यवाद, ही घटना सत्याचा जवळपासच आहे...
20 Dec 2014 - 6:18 pm | कंजूस
टिंगल नाही हा माझा अनुभव आहे .
21 Dec 2014 - 6:27 am | मुक्त विहारि
हलकाफुलका लेख आवडला...
22 Dec 2014 - 9:42 am | योगी९००
लेख आवडला...