Schluchsee हे गाव एका विस्तीर्ण तलावाकाठी वसलं आहे.अप्रतिम निसर्ग सौंदर्य हि युरोपियन देशांना मिळालेली मोठी देणगी आहे.आणि अर्थातच येथील लोक तिचा पुरेपूर उपयोग करतात पण त्याचबरोबर त्या निसर्गाची जपणूक देखील करतात.अत्यंत आखीव रेखीव नगररचना असूनदेखील निसर्ग सुद्धा पावलोपावली साथ देत असतो.जर काही ठिकाणी नवीन बांधकाम करण्यासाठी झाडं तोडावी लागत असतील तरी दुसरी कडे त्याची भरपाई होते.त्यामुळे इतर आधुनिक सुविधांबरोबरच निसर्ग देखील इथे उपभोगायला मिळतो.
हे गाव ज्या तलावाकाठी वसलं आहे तो खूप विस्तीर्ण आहे.गोड्या पाण्याच हे तळ अगदी स्वच्छ आहे.त्यात बोटिंगची,मासेमारी वगैरे सुविधा आहेत.छोट्या बोटी दिवसाच्या किंवा अगदी तासाच्या सुद्धा भाड्याने मिळतात.तसे नको असेल तर मोठी क्रुझ पण असते ज्यात कधी नुसताची तासाभराची राइड असते तर कधी लंच किंवा डिनर देखील उपलब्ध असतो.पर्याय निवडीच स्वातंत्र्य अर्थातच आपल.
आम्ही साधारण ३ वाजण्याच्या सुमारास हॉटेल मधून आवरून बाहेर पडलो.मालकाकडे जुजबी चौकशी केली.मग गावातून हळूहळू भटकत तलावापाशी गेलो.आम्ही गेलो तेव्हा "तुरिस्त सिझन "संपत आला होता.आम्ही इथल्या उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये गेलो होतो.ऑटम सुरु झाला होता.पण सुरवात असल्याने फक्त झाडांचे रंग बदलले होते.पानगळ झाली नव्हती.आम्हाला नेमके हेच अपेक्षित होते.आम्ही तलावापाशी गेलो तेव्हा २/३ प्रवासीच आसपास भटकत होते.बाकी नीरव शांतता होती.तिथून दर तासाला १ ट्रेन शहराकडे जायची त्यामुळे तासातून एकदाच फक्त स्टेशन वरील सूचनेच आवाज यायचा.बाकी मुळात वस्तीच कमी असल्याने गाड्या,लोकांचा कलकलाट वगैरे गोष्टी अजिबात नव्हत्या.
आम्ही तलावाशेजारील एका बाकड्यावर जाऊन बसलो.छोट्या छोट्या बोटी नांगरून ठेवल्या होत्या पण त्यांचा मालक काही आसपास दिसेना.म्हणून मग जरा वेळ वाट पाहत तिथेच थांबलो.अतिशय सुंदर अशी शांतता आम्ही अनुभवत होतो कि आम्हाला एकमेकांशी सुद्धा बोलायची गरज वाटली नाही.निसर्गाने जणू जादू केली.माझ्या नवर्याला असे ट्रान्स मध्ये जायला फार आवडते.पण मी मुलखाची बडबडी.पण माझी देखील अवस्था पहिल्यांदाच अशी झालि.जवळजवळ अर्धा तास आम्ही दोघही शांत बसलो होतो.मनात कोणतेही विचार नाही,आजूबाजूला कोणी शांततेचा भंग करायला नाही.समोर जलाशय पसरलेला.नाजुकशा त्याच्या लाटा किनार्यावर येत होत्या.समुद्रासारख्या किनार्यावर येउन फुटत नवत्या तर अलगद येउन किनार्याशी एकरूप होत होत्या.इतक्या अलगद कि त्यांचा देखील आवाज होत नव्हता.मधूनच लाब अंतरावर कोणीतरी एकटाच बोटीतून फिरताना किंवा मासे पकडताना दिसत होता.मन त्यावेळी इतक रिकाम होत आणि त्यामुळेच खूप शांत आणि प्रसन्न वाटत होत.समोर सूर्य देखील शांत होता.त्याच तेज लखलखत होत पण त्या तेजाने चटके बसत नव्हते.हवा खूपच प्रफुल्लीत होती.
थोड्या वेळाने त्या बोटींचा मालक कुठूनसा उगवला.छानसा म्हातारा आजोबा होता.सुदैवाने त्याला इंग्लिश येत होते (युरोपात आडगावात जायचे म्हणजे भाषेची बोंब होते.)मग त्याला भाडं वगैरे विचारलं.आणि मग एक छोटीशी दोघांची बोट तासाभराकरिता भाड्याने घेतली.बोट पायाने चालवायची होती(नेमका शब्द सुचत नाहीये)
आम्ही थोडे अंतर गेलो आणि मग माझ्या पोटात पोटात गोळा आला.मी हळूच मागे वळून बघितलं तर तो म्हातारा बाबा निघून गेला होता.आसपास एकही छोटी अगर मोठी बोट दिसत नव्हती.आणि भिण्याच नेमक कारण म्हणजे आम्हा दोघानाही पोहत येत नाही.मी हळूच नवर्याला हि भीती बोलून दाखवली.पण तो अजूनही ट्रान्स मधेच होता.तुलनेन मी लगेचच माणसात आले होते.समोरची प्रक्टीकल भीती मला दिसत होती.मग हळूहळू त्यानेच मला रीलाक्स केले.आपल्याला काही होणार नाही याचा दिलासा दिला.आता आलेला क्षण मनापासून जगण्याची नवी उमेद दिली.आणि मग तो तासाभराचा प्रवास फारच रोमान्च्कारी ठरला.आजूबाजूला कोणीच नव्हते.नाही म्हणायला आम्ही आपले थोड सेफ म्हणून किनार्याचा कडेकडेने जात होतो.त्यामुळे तिथून क्वचित का होईना पण जाणारी येणारी एखादोन माणस नजरेला पडत.एकमेकांच्या हातात हात घालून केलेला तो प्रवास केवळ अविस्मरणीय.
जो विसावा,जो बदल आम्हला अपेक्षित होता तो आम्हाला पहिल्याच दिवशी मिळाला.आम्हाला गर्दीत मिसळायचे नव्हते.कुणाचाही interference/disturbance नको होता.शिवाय जागेचा बदल महत्वाचा होता.कामाचा ताण नको होता.या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे पहिल्याच दिवशी मिळाल्या.आम्ही दोघही मनाने एकदम ताजेतवाने झालो.आणि मनाने एकदा उभारी घेतली कि पुढच्या सगळ्याच गोष्टी एकदम सहज सोप्या होतात.
(फोटो चिकटवता येत नाहीत :( क्षमस्व)
प्रतिक्रिया
11 Nov 2014 - 3:53 am | अनन्त अवधुत
स्वत: साठी थोडा आराम म्हणून आम्ही सुद्धा गेल्या महिन्यात एक छोटेखानी सहल केली होती. जागेचा आणि वातावरणाचा बदल फार महत्वाचा होता. त्यामुळे तुम्हाला कसे वाटले असेल मी समजू शकतो.
फोटो नसल्याने मला काही फार फरक पडला नाही
11 Nov 2014 - 4:21 am | बहुगुणी
फोटो पहायला आवडलं असतं, पण
जो विसावा,जो बदल आम्हला अपेक्षित होता तो आम्हाला पहिल्याच दिवशी मिळाला.आम्हाला गर्दीत मिसळायचे नव्हते.कुणाचाही interference/disturbance नको होता.
असं लिहिलंत, तेंव्हा फोटोसाठी कॅमेरा हे देखील 'तिसरं कुणीतरी' ठरलं असतं :-) तेंव्हा फोटो न टाकणं माफ!बाकी तुमचं खालील वर्णन वाचलं:
अतिशय सुंदर अशी शांतता आम्ही अनुभवत होतो कि आम्हाला एकमेकांशी सुद्धा बोलायची गरज वाटली नाही.निसर्गाने जणू जादू केली......जवळजवळ अर्धा तास आम्ही दोघही शांत बसलो होतो.मनात कोणतेही विचार नाही,आजूबाजूला कोणी शांततेचा भंग करायला नाही.समोर जलाशय पसरलेला.नाजुकशा त्याच्या लाटा किनार्यावर येत होत्या.समुद्रासारख्या किनार्यावर येउन फुटत नवत्या तर अलगद येउन किनार्याशी एकरूप होत होत्या.इतक्या अलगद कि त्यांचा देखील आवाज होत नव्हता......मन त्यावेळी इतक रिकाम होत आणि त्यामुळेच खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं.
आणि 1942 Love Story मधलं हे गाणं आठवलं:
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल, थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ बस एक तुम हो
कितने गहरे हल्के, शाम के रंग हैं छलके
पर्वत से यूँ उतरे बादल जैसे आँचल ढलके
सुलगी सुलगी साँसें बहकी बहकी धड़कन
महके महके शाम के साये, पिघले पिघले तन मन
तुमच्या लेखाने उत्सुकता चाळवून Schluchsee हे ठिकाण कुठे आहे ते शोधलं तर बरेच सुंदर फोटो पहायला मिळाले. No wonder you 'found peace'!
(पायाने चालवायच्या बोटीला पॅडल बोट म्हणायचं होतं बहुतेक...)
11 Nov 2014 - 5:19 am | मुक्त विहारि
सहमत...
11 Nov 2014 - 5:19 am | मुक्त विहारि
पण हरकत नाही...(आमच्या सारख्या हावर्या वाचकांची त्यामुळे फार पंचाईत होते.)
(फोटो चिकटवता येत नाहीत क्षमस्व)... व्य.नि. केला आहे....ह्या आपल्या मिपाचे वैशिष्ट्य म्हणजे, न लाजता किंवा संकोच न बाळगता मदत मागा.नक्कीच मदत मिळेल...
11 Nov 2014 - 10:01 am | वेल्लाभट
वर्णन सुंदरच झालंय; पण फोटो नसल्याची खंत मात्र आहे. एनिवेज.
ग्रेट !
11 Nov 2014 - 10:13 am | विजुभाऊ
खूप सुंदर लेख. वाचतानाच तीथली शांतता तुमच्या बरोबर आम्हिही अनुभवली.
इतक्या थेट आणि सर्वार्थाने सुंदर अनुभवासाठी तुम्हाला शतशः धन्यवाद