अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मी माझ्यापरीने काहीतरी करावे म्हणून शेतकरी साहित्य चळवळ स्थापन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता.
गेली ७ महिने मी अनेक मित्रांशी, साहित्य क्षेत्रातील जाणकारांशी, व्यवस्थापकीय तज्ज्ञांशी या विषयावर सल्लामसलत करत आलो आहे. प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याने पहिला टप्पा यशस्वी झाला असे म्हणता येईल. आता दुसर्या टप्प्यात आंतरजालावरील कवींशी, लेखकांशी, मित्रांशी, जाणकारांशी व तज्ज्ञांशी चर्चा करायची आहे. आपले सहकार्य अपेक्षित आहे. या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी कृपया abmssc@shetkari.in या मेलवर एक मेल करावी जेणेकरून त्यांच्यांशी संपर्क साधणे आणि सहकारी मंडळाच्या यादीत त्यांचा समावेश करणे शक्य होईल.
आजवर मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलने झालीत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. या दिशेने गतकाळात कुणी प्रयत्न केल्याचे निदान मला तरी ज्ञात नाही म्हणूनच या दिशेने पाऊल टाकण्याचा मानस आहे. हे कार्य किती कठीण आहे याची जाणीव असली तरी हे कार्य अशक्यप्राय नाही याचीही खात्री आहे. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून पुढील चार महिन्याच्या आत अ.भा. स्तरावर मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करायचे ठरवले आहे आणि त्यानंतर दरवर्षी मराठी शेतकरी साहित्य संमेलन भरवणे शक्य व्हावे म्हणून संघटनात्मक बांधणी करायचे सुद्धा ठरवले आहे. हे कार्य जोखिमेचे असले तरी ऐतिहासिक आहे. एकूणच शेतीविषयाला व साहित्यक्षेत्राला कलाटणी देण्याची ऐपत बाळगणारे आहे. मात्र प्रयोग नवा असल्याने अत्यंत विचारपूर्वक पावले टाकावी लागतील कारण या निमित्ताने शेतीसाहित्य चळवळीचा पाया रचला जाणार आहे.
यासंदर्भात खालील विषयावर विचारमंथन अपेक्षित आहे.
१) संघटनात्मक बांधणीचे स्वरूप
२) कार्यक्षेत्राची भौगोलिक व्यापकता
३) वर्षभर राबवायच्या कार्यक्रमांचे/उपक्रमांचे स्वरूप
४) स्वतंत्र संकेतस्थळ (http://www.shetkari.in/ निर्माण केले आहे.)
५) पहिले संमेलन (केव्हा व कुठे)
६) संमेलनाचे प्रारूप/आराखडा
७) मासिक/त्रैमासिक/विशेषांक काढणे
८) लोगो/Logo
९) याखेरीज आणखी संबंधित विषय
या कामात मला मार्गदर्शक आणि सहकार्यांची प्रचंड आवश्यकता आहे. या निमित्ताने मी आपल्यासमोर मार्गदर्शन आणि सहकाराची अपेक्षा करतो आहे. जाणकारांनी आणि स्वेच्छूक मंडळींनी स्वतःहून समोर यावे. ही विनंती.
सहकार्याच्या अपेक्षेत...!
आपला नम्र
गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
17 Oct 2014 - 6:03 pm | कपिलमुनी
तुम्ही हाती घेतलेले कार्य उत्तमरीत्या पार पडो ही शुभेच्छा
18 Oct 2014 - 4:27 pm | गंगाधर मुटे
आभारी आहे.
19 Oct 2014 - 12:03 pm | एस
मिपावर फारसे कुणी शेतकरी नाहीत. त्यामुळे फारसे प्रतिसाद मिळणार नाहीत. पण मिपाकरांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत.
18 Oct 2014 - 4:30 pm | गंगाधर मुटे
पहिले शेतकरी साहित्य संमेलन केव्हा आणि कुठे : अभाशेसाच-२
नमस्कार मित्रांनो,
अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीसाठी 'आपुलकीचे' श्री अभिजित फाळके यांनी 'लोगो' तयार करून द्यायचे मान्य केले आहे. Thanks Abhijeet Arunrao Falke sir!
कालच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आज आपण शेतकरी साहित्य संमेलन केव्हा आणि कुठे घ्यावे याविषयी चर्चा करुया.
पहिले शेतकरी साहित्य संमेलन केव्हा :
- फेब्रुवारीच्या आधीचा काळ हा कडाक्याच्या थंडीचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीच्या हंगामाचा काळ असतो. आणि फेब्रुवारीच्या नंतरचा काळ शालेय परीक्षांचा असतो. त्यामुळे फेब्रुवारी महिना अधिक सोईचा ठरेल, असे मला वाटते.
पहिले शेतकरी साहित्य संमेलन कुठे घ्यावे :
- याविषयी मात्र भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. काही पर्याय मी आपल्यासमोर ठेवत आहे. काही पर्याय आपण सुचवावेत.
१) राज्याची राजकीय राजधानी अर्थात मुंबई.
२) विद्येचे माहेरघर अर्थात पुणे.
३) ग्रामस्वराज्याच्या आणि सुराज्याच्या संकल्पनेचे आणि म. गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेले सेवाग्राम.
४) एखादे मध्यम लोकसंख्येचे खेडेगाव.
आपल्या सुचना इथेच किंवा abmssc@shetkari.in या मेलवर आमंत्रित आहेत.
आपला नम्र
गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------------------------------------
20 Oct 2014 - 2:54 pm | कपिलमुनी
१.जाणे - येणे सोयीचे असावे ( मुंबई एका टोकाला आहे) .
२. राहणे महाग नसावे. खुप छोटे गाव असेल तर रहायच्या जागा मर्यादित असतात.
३. प्रायोजक मिळवण्यासाठी खटपट करावी लागेल , खत , बियाणे , पाईप कंपन्या यांच्याशी बोलावे लागेल पण मिळू शकेल ( आर्थिक बाजू मजबूत होइल )
सुचेल तसे टाकतो इथे
3 Feb 2015 - 8:26 pm | गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------
14 Feb 2015 - 1:31 pm | गंगाधर मुटे
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करावयाच्या "सारस्वतांचा एल्गार" स्मरणिकेचे मुखपृष्ठ