राष्ट्रीय एकात्मता - राम पुनियानी
राम पुनियानी हे आय आय टी पवई इथे प्रोफेसर होते. मूळात ते MBBS, MD झालेले डॉक्टर आहेत. १९९२ च्या घटनांनंतर ते अधिक सक्रिय झाले. भारताची राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी ते देशभर हिंडत असतात.
त्यांचे विचार आपण पाहूया...
भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात. यामुळे भारतात ते(पुनियानी) मुस्लिमांवर होणार्या अन्यायाबद्दल बोलतात. पाकिस्तानात हिंदूंवरचे अत्याचार हा त्यांच्या काळजीचा विषय असतो.
आपल्या सगळ्या इतिहासाकडे पाहण्याची त्यांची हीच दृष्टी आहे. गझनीच्या महमदाने सोरटी सोमनाथाचे देऊळ लुटले. का लुटले असे विचारले असता इथले अनेक लोक सांगतात ते हिंदूंचे देऊळ होते म्हणून. पाकिस्तानातही अनेक लोक त्याने मूर्ती फोडल्याबद्दल त्याचा गौरव करताना दिसतात. त्यांना ते धर्मकार्य वाटते.
पण पुनियानी याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. महमूद गझनीहून सोमनाथाला आला. अंतर असेल काही हजार किमी. वाटेत असंख्य देवळे होती. ती त्याने तोडली नाहीत. मूलतानच्या बादशहाला त्याने त्याच्या राज्यातून जाण्याची परवानगी मागितली. पण मूलतानच्या बादशहाने मेहमूदाला तो एवढे मोठे धर्मकार्य करायला चालला आहे तर त्याच्याबरोबर आपलेही काही सैनिक द्यायला हवे होते. पण तसे न होता त्याने मेहमूदाला आपल्या राज्यातून जाण्याचीच परवानगी नाकारली. यामुळे दोघांमधे युद्ध झाले. मूलतानची एक मशिद त्यात उध्वस्त झाली. त्यामुळे सोमनाथाचे देऊळ तोडण्यामागे धर्माचा आधार नव्हताच. केवळ संपत्तीची लूट हे एकच कारण होते.
पुढच्या काळात मेहमूदाचा मूलगाही अरब दिशेला गेला. तिथे त्याने एक मशिद संपवली हा इतिहास आहे. धर्म ही प्रेरणा असती तर आपल्याच धर्माची धर्मस्थळे उध्वस्त केली नसती. असे पुनियानी म्हणतात.
औरंगझेब बादशहाला गोवळकोंड्याचा बादशहा कर देत असे. एके वर्षी त्याने दुष्काळाचे कारण सांगून कर दिला नाही. शेवटी औरंगझेबाने कुतुबशहाची एक मशिद खणून काढली ज्याच्याखाली प्रचंड संपत्ती लपवून ठेवली होती. तात्पर्य त्याच्याही कृतीच्या प्रेरणा या धर्माच्या नव्हत्या.
संभाजीमहाराजांचा शेवट - पुनियानींच्या मते हेही कृत्य धर्माच्या शिकवणीमुळे झालेले नसून ते केवळ लोकांमधे दहशत निर्माण करण्यासाठी झालेले होते.
आपण असे मानतो की धर्माचे पुस्तक अति पवित्र. ते साक्षात भगवंतानीच लिहिलेले. इतके पवित्र की त्यासाठी आम्ही रक्तपातही करायला तयार होतो. असे असते आपले धर्मवेड...
आपल्याकडे एक संगीतकार आहे त्याचे मूळ नाव होते दिलीपकुमार. त्याच्या वडिलांना आजारपणात मुस्लिमांनी फार मदत केली त्यामुळे भारावून जावून त्यांनी इस्लाम कबूल केला. तो संगीतकार म्हणजे ए आर रेहमान. धर्म हा जबरदस्तीने लादताच येत नाही. काही लोक म्हणतात. भारतात इस्लाम आला तो एका हातात तलवार आणि दुसर्या हातात कुराण घेऊन. एका हातात कुराण असेल तर घोडा कसा चालवणार ? ही साधी गोष्टही इस्लामच्या टिकाकारांच्या ध्यानात येत नाही.
किंबहुना कोणताही धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही यावर पुनियानींचा विश्वास आहे.
हिंदू म्हणतात कृण्वन्तो विश्वम आर्यम...
ख्रिश्चॅनिटी म्हणते - लव्ह दाय नेबर
ईस्लाम म्हणतो - पडोसी से प्यार करो. पडोसी भूखा रहेगा तो आपको जन्नत नही मिलेगी. कुठेही असं म्हटलेलं नाही की शेजारी तुमच्या धर्माचा असेल तरच त्याच्यावर प्रेम करा.
त्यामुळे सर्व धर्माचे तत्त्वज्ञान सारखेच आहे. भांडणे त्यावरून होतच नाहीत. भांडणे आयडेंटिटीवरून होतात. आपण धर्म बाहेरून समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
औरंगझेबाच्या राज्यामधे ३४% सेवकवर्ग हा हिंदू होता.
शिवाजी महाराजांच्या राज्याला हिंदवी स्वराज्य म्हटले जाते. मग औरंगझेबाकडून स्वराज्यावर चाल करून जाणारा मिर्झा राजे जयसिंग हा हिंदूच होता ना...
अकबराच्या दरबारात नवरत्ने होती. त्यापैकी अनेक हिंदूच होते. मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल, तानसेन इ. तो जर हिंदू राजा महाराणा प्रतापाविरुद्ध लढत होता आणि अकबराची लढाई हिंदू धर्माविरुद्ध होती तर अकबराच्या राजवाड्यात एक कृष्णाचे देऊळ कसे काय होते.
लगान चित्रपटात सगळे गावकरी कृष्णाच्या देवळात जातात आणि गाणे म्हणतात. ओ पालनहारे... याचे कवि आहेत जावेद अख्तर. ते मुस्लिम आहेत.
मन तडपत हरि दर्शन को आज... कवि शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, गायक रफी सगळेच मुस्लिम आहेत ना
महत्त्वाची गोष्ट - अनेकदा लोक हजार वर्षांची गुलामगिरी असा उल्लेख करतात. तोही कसा चुकीचा आहे हे सांगताना पुनियानी विचारतात. इंग्रज इथे कशासाठी आले ? उत्तर व्यापार करायला. त्यांनी लुटलेली संपत्ती कुठे नेली ? इंग्लंडमधे.
आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ?
त्यामुळे पारतंत्र्य हे इंग्रजांपासून सुरु झाले. १२०० वर्षांचे पारतंत्र्य मानणार्यांना हे सांगण्याची गरज आहे.
७००, ८०० वर्षापूर्वी हिंदूची काही देवळे उध्वस्त करण्यात आली. तेव्हा तर मुस्लिम भारतात आले नव्हते. मग हे कुणी केले ? हिंदू राजे जिंकलेल्या प्रदेशातील हिंदू देवळे (त्या राजाच्या कुलदेवतेचे देऊळ) तोडत आणि तिथे आपल्या कुलदेवतेचे देऊळ उभारत असत हे दुसर्या राजाला अपमानित करण्यासाठी होत असे. अशी अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. त्यामुळे इथे एका धर्माला दुसर्या धर्माविरुद्ध उभे करण्यात काय अर्थ आहे...
देशाची फाळणी झाली त्याबाबतदेखील त्यांची काही मते आहेत. एका बाजूला गांधीजी(पक्ष - इंडियन नॅशनल काँग्रेस), आंबेडकर(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) हे भारताचा विचार करतात. तर दुसर्या बाजूला जीना - मुस्लिम लीग, स्वा सावरकर -हिंदू महासभा हे धर्माच्या आधारावर विचार करतात. आणि हेच विचार घातक आहेत. बाकी गोध्रा, गुजरात २००२ असे संदर्भही त्यांना प्रसंगा प्रसंगाने आठवत राहतात. विवेचन पुढे चालू राहते.
प्रतिक्रिया
13 Oct 2014 - 4:36 pm | संचित
मी पय्ला.
13 Oct 2014 - 4:56 pm | प्यारे१
बरेच विचार अजिबात पटण्यासारखे नाहीत.
काही विचार, विचार करण्यासारखे वाटतात.
13 Oct 2014 - 5:02 pm | एस
फारच सरधोपटपणा आहे, पण राष्ट्रीय एकात्मता साधणार असेल तर पाठिंबा असेल. राम पुनियानींची ओळख करून दिल्याबद्दल आभार.
13 Oct 2014 - 5:07 pm | संचित
आपल्या सगळ्या इतिहासाकडे पाहण्याची त्यांची हीच दृष्टी आहे. गझनीच्या महमदाने सोरटी सोमनाथाचे देऊळ लुटले. का लुटले असे विचारले असता इथले अनेक लोक सांगतात ते हिंदूंचे देऊळ होते म्हणून.
फार जुन्या काळात बघण्याची गरज नाही. तालिबान ने २००१ मध्ये बुद्धांचा पुतळा उध्वस्त केला, ते धर्माचे कार्य म्हणून. मूळ धर्मात जरी हिंसेचा उद्देश नसला तरी अनेकदा मुस्लिमांनी त्याचा अर्थ तसा लावला आहे. अफझल खानाने तुळजापूर च्या देवीचे मंदिर उद्वस्त केले. ते एवढे श्रीमंत देवस्थान असेल असे वाटत नाही.
औरंगजेबने झिझिया कर फक्त हिंदुंवर लावला होता. तेव्हा उगीच एखाद सुसार्या उदाहरणावरून वेगळे तात्पर्य काढण्याचा प्रयत्न करू नये.
आपल्याकडे एक संगीतकार आहे त्याचे मूळ नाव होते दिलीपकुमार. त्याच्या वडिलांना आजारपणात मुस्लिमांनी फार मदत केली त्यामुळे भारावून जावून त्यांनी इस्लाम कबूल केला.
ए आर रेहमानची आई मुस्लीम होती. तेव्हा त्यांनी इस्लाम कबुल केल्याचे फार आश्चर्य नाही.
भारतात इस्लाम आला तो एका हातात तलवार आणि दुसर्या हातात कुराण घेऊन. एका हातात कुराण असेल तर घोडा कसा चालवणार ?
कुणास ठाऊक. driver ठेवला असेल. खी खी .
अकबराच्या दरबारात नवरत्ने होती. त्यापैकी अनेक हिंदूच होते. मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल, तानसेन इ
शहाजी राजेही आदिलशाह च्या दरबारात काम करत होते. याचा अर्थ असा नव्हे कि ते स्वखुशीने करत होते.
मन तडपत हरि दर्शन को आज... कवि शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, गायक रफी सगळेच मुस्लिम आहेत ना
शितावरून भाताची परीक्षा इथे नाही करता येणार. इथे कोणी हेही म्हणू शकतो कसाब , ओसामा, अफझल गुरु हे सगळेच मुस्लीम आहेत न.
आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ?
शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अमाप कर लावून मिळालेली संपत्ती कुठे हि ठेवली तरी त्याच समर्थन करता येणार नाही.
थोड विचार करा. मूळ धर्माला विरोध नसला तरी जे झाल त्यात धर्माच आंधळेपणान केलेलं आचरण कारणीभूत होत.
13 Oct 2014 - 5:26 pm | प्यारे१
बिरबल खरंच होता काय?
त्याला भेटायचं राहूनच गेलं सालं.
13 Oct 2014 - 5:54 pm | बॅटमॅन
बिरबल खराच होता.
13 Oct 2014 - 5:59 pm | प्यारे१
त्याच्या किश्श्यांसकट? नुसता बिरबल कामाचा नाही.
- सालांशिवाय आंबेप्रेमी. :)
13 Oct 2014 - 6:29 pm | बॅटमॅन
तो होता याला पुरावा आहे. बहुधा अफगाणिस्थान साईडला स्वारीवर जाताना तो शत्रूकडून किंवा त्याच्यावर जळणार्या दरबार्यांकडून तो मारला गेला. त्याने लिहिलेले एखादे हस्तलिखितही अस्तित्वात आहे बहुधा. पण एवढे वगळता ते किस्से नक्की कधी प्रचलित झाले काय माहिती. या अकबर बिरबलच्या गोष्टी तोंडातोंडी कदाचित चालत आलेल्या असाव्यातही, पण पहिला लिखित उल्लेख कधीचा आहे ते पाहणे गरजेचे आहे असे वाटते.
13 Oct 2014 - 5:46 pm | आनन्दा
हल्ली एका हातात कुराण आणि एका हातात घोडा असतो.. तलवार आता इतिहासजमा झालीय.
13 Oct 2014 - 6:32 pm | आशु जोग
लाईकचे बटण शोधतोय आपल्या प्रतिसादासाठी
13 Oct 2014 - 6:19 pm | प्रसाद१९७१
बीरबल आणि तानसेन ना मुसलमान होयला भाग पाडण्यात आले.
13 Oct 2014 - 6:30 pm | बॅटमॅन
पुरावा? अकबराच्या काळातला मुघल दरबार आदर्श म्हटले तरी चालेल- विशेषतः नंतर नंतरच्या काळात तर लैच.
13 Oct 2014 - 6:33 pm | प्रसाद१९७१
कोण सुखासुखी धर्म बदलायला तयार झाले असेल असे तुम्हाला वाटते का?
का तुम्हाला बीरबल आणी तानसेन मुसलमान झालेच नव्हते असे वाटते?
13 Oct 2014 - 6:38 pm | बॅटमॅन
अशी भावनिक आव्हाने करून टाळ्या अन लाईक्स मिळवायची केविलवाणी युक्ती रोचक आहे बाकी.
पण ते नंतर पाहू, अगोदर तुम्ही पुरावा द्या मग पुढचे बोला.
13 Oct 2014 - 6:47 pm | प्रसाद१९७१
नक्की कशा बद्दल पुरावे देउ?
मुसलमान झाल्या बद्दलचे का
मुसलमान होयला भाग पाडल्याचे?
13 Oct 2014 - 6:48 pm | बॅटमॅन
दोहोंपैकी कशाचेही द्या.
13 Oct 2014 - 7:03 pm | प्रसाद१९७१
तानसेन ची मजार आहे, त्याला हिंदू पद्धतीने जाळले नव्हते. त्याची सर्व मुले त्याच्या हयातीतच मुसलमान होती.
बीरबल ने अकबराचा दिन्-ए-इलाही नावाचा पंथ स्वीकारला होता. तो मुसलमान झाल्याचे पण खूप पूर्वी वाचले होते. आणि त्यात काही अशक्य वाटत नाही.
13 Oct 2014 - 9:46 pm | बॅटमॅन
अच्छा, धन्यवाद.
13 Oct 2014 - 6:37 pm | आशु जोग
तालिबान बुद्धमूर्ती याबद्दलही त्यांचे मत आहे. मूर्तीच फोडायच्या तर सोमनाथापर्यंत यायची काय गरज होती. बामियानच्या मूर्ती त्याने तेव्हाच फोडल्या असत्या. का त्याने आपल्या वंशजांसाठी हे काम शिल्लक ठेवले. तो आला तो संपत्ती लूटण्यासाठी. धर्माचा काहीही संबंध नाही.
13 Oct 2014 - 6:39 pm | बॅटमॅन
थोडे थोडे दोन्हीही होतेच.
25 Oct 2014 - 11:14 pm | आशु जोग
सावरकर यांचा उल्लेख जे इंग्रज सरकारची माफी मागून बाहेर पडले असा होतो
13 Oct 2014 - 5:13 pm | विजुभाऊ
राष्ट्रीय एकात्मता यात जेंव्हा भाषा हा विषय येतो त्यावेळेस तुम्ही हिंदी भाषेवर टीका केली की तुम्ही कोते ठरवले जाता.
फार काय हिन्दी भाषीकांचा आव असतो की तुम्ही हिन्दी धार्जीणे असाल तर आणि तरच तुम्ही राष्ट्रीय एकात्मता या बद्दल बोलायला पात्र ठरता
13 Oct 2014 - 6:49 pm | प्रसाद१९७१
शुद्ध हिंदी भाषेबद्दल फारच तिरस्कार आहे मला. अगदी ऐकवत नाही.
हिंदूस्थानी ( उर्दू मिश्रीत ) चांगली वाटते.
3 Mar 2015 - 3:36 pm | आशु जोग
मराठीतही काही जण अकारण सदनिका, संगणक असे शब्द हट्टाने वापरतात तेव्हा आश्चर्य वाटते.
13 Oct 2014 - 5:15 pm | संचित
कोणी उद्या पासून तुमच्या घरी राहायला आले, तुम्हाला त्यांनी आपल्या इच्छेने राहण्यास भाग पाडले आणि तुमची संपत्ती वापरण्यापासून वंचित केले. तर मग त्यांनी तुमच्या घर लुटले अथवा नाही हा प्रश्न दुय्यम होतो. ती गुलामगिरीच.
13 Oct 2014 - 5:28 pm | प्रसाद१९७१
हे वाक्य अतिशय बालिश आहे. असा माणुस महत्वाच्या ठीकाणी प्रोफेसर म्हणुन काम करतो हे दुर्दैवी आहे.
13 Oct 2014 - 5:36 pm | विकास
(जन्माने हिंदू असलेल्या) डाव्या विचारवंतांना स्वतःस हिंदू म्हणायचे नसते इतपर्यंत समजू शकते आणि त्यात काहीच हरकत नाही, ते त्यांचे विचारस्वातंत्र्य आहे. पण ते स्वतःस डावे विचारवंत आहोत, कम्युनिस्ट आहोत असे स्पष्ट म्हणण्यास पण का तयार नसतात? हे अवांतर नाही तर राम पुनियानी पण याच पठडीतले वाटतात म्हणून विचारत आहे.
13 Oct 2014 - 5:49 pm | प्यारे१
अगदी हेच डोक्यात आलं होतं.
'आधी बाण मग वर्तुळ' स्टाईलमध्ये हल्ली बहुसंख्य लोक सापडतात.
13 Oct 2014 - 6:33 pm | आशु जोग
म्हणजे निष्कर्श आधीच तयार असे म्हणावयाचे आहे का...
13 Oct 2014 - 5:54 pm | बॅटमॅन
कोण राम पुनियानी?
धन्यवाद.
13 Oct 2014 - 6:52 pm | बोका-ए-आझम
राम पुनियानी असो किंवा इतर कोणताही डावा विचारजंत, हे सगळे लोक विरोधी विचारांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असतात असं एक निरीक्षण आहे. एखाद्या इस्लामधर्मीय माणसाने जर हिंदूविरोध केला तर त्यांना फरक पडत नाही पण जर एखादा हिंदू इस्लामविरोधात बोलला किंवा हिंदू धर्माच्या बाजूने जरी बोलला तरी त्यांना त्यात धर्मनिरपेक्षतेला धोका दिसतो. हे चुकीचं आहे. ही बेगडी आणि दिखाऊ धर्मनिरपेक्षता आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातली जवळजवळ सर्व विद्यापिठं आणि इतिहास संशोधन केंद्रं ही डाव्यांच्या ताब्यात होती.परिणामी डावा विचार प्रसारित केला गेला - विरोधी विचार दडपला गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा ज्या विद्वानांना भारताचं प्रतिनिधी समजलं जातं, ते सगळे डाव्या विचारांचे आहेत उदाहरणार्थ अमर्त्य सेन. नोबेल पारितोषिक पण डाव्या विचारांच्या अर्थतज्ज्ञांना जास्त वेळा मिळालं आहे. १९८० च्या दशकात ब्रिटन आणि अमेरिका यांनी उजव्या आर्थिक विचारांचा स्वीकार केला. त्यांचं राजकारणही उजव्या बाजूचं होतं. भारतात तसं झालं नाही. आपल्याकडे उजव्या विचारांना निर्विवाद बहुमत हे आत्ता २०१४ मध्ये मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे असा डावा प्रचार होतो आहे. प्रत्यक्षात ही आपल्या विचारांच्या आणि पर्यायाने आपल्या भवितव्याच्या भीतीतून आलेली असुरक्षिततेची भावना आहे.या कोणाही विचारजंताला जर खरीखुरी धर्मनिरपेक्षता हवी असती तर त्यांनी विश्व हिंदू परिषदेला विरोध केला असता पण
जबरदस्तीने धर्मांतर करण्यालाही केला असता. पण तसं करताना ते तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. यावरून ही धर्मनिरपेक्षता कशी वरवरची आहे तेच दिसून येतं.
13 Oct 2014 - 7:39 pm | प्रदीप
राष्ट्रीयच काय, जागतिक पातळीवर व्हावयास हवी, खरे तर. मुस्लिम धर्मातील कडव्यांचे तेच प्रयत्न चालू असतात, आणि त्यात चूक ते काय? वास्तविक अत्यंत शांतताप्रिय अशा ह्या धर्माच्या अगदी टोकाच्या कडव्या अनुयायांना सर्व इतरेजन उगाच नावे ठेवून त्यांच्यावर सर्वेसर्वा अन्याय करतात.
निकोलास क्रिस्तॉफ हे 'न्यू यॉर्क टाईम्स' ह्या नामांकीत वर्तमानपत्राचे स्तंभलेखक आहेत. त्यांनीही असेच मत अलिकडे त्यांच्या स्तंभातून मांडले आहे. ते म्हणतातः
"First, historically, Islam was not particularly intolerant, and it initially elevated the status of women. Anybody looking at the history even of the 20th century would not single out Islam as the bloodthirsty religion; it was Christian/Nazi/Communist Europe and Buddhist/Taoist/Hindu/atheist Asia that set records for mass slaughter".
ह्या इतरांची कत्तल करणार्या धर्मांच्या यादीतून जैन व पारसी बहुधा अनवधानाने सुटले आहेत.
राम पुनियानी ह्या पलिकडे जाऊन क्रिस्तॉफची 'चूक' दुरूस्त करतील, अशी वेडपट आशा करतो.
(जग सध्या उग्गाच ISS च्या तथाकथित कत्तलींबद्दल काळजी व्यक्त करत आहे. बहुधा ही आवई कुणीतरी उठवली असणार. अधिक माहितीसाठी भेटा अथवा लिहा: श्री. राम पुनवानी व श्री. निकोलास क्रिस्तॉफ).
14 Oct 2014 - 12:27 am | मुक्त विहारि
जय राम...
26 Oct 2014 - 1:17 am | विनोद१८
आत्ता एव्हढेच या माणसाबद्दल बोलता येइल, त्यांनी मांडलेली मते ही केवळ वेडगळ व वांझोटी वाटतात. आपाण जरी त्यांच्या मतस्वातंत्र्याचा अधिकार मान्य केला तरी विचारावेसे वाटते कि या विचारांमागे असलेला तर्क, हेतु व आधार कोणता ??? अधिकार आहे म्हणुन ही असली ठिसूळ विधाने त्यांनी केलेली दिसतात.
उदा. भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात.
जर इतिहास तपासला व वस्तुस्थिती पाहीली तर आपल्याला कोणते चित्र दिसते ?? असले विचार, ते केवळ एका तथाकथित उच्चशिक्षित व एका नामांकित शिक्षणसंस्थेत काम केलेल्या माणसाने मांडले म्हणुन समाजाने जसेच्या तसे स्वीकारुन त्यावर विश्वास ठेवावा काय ?? हेच त्यांच्या याविषयीच्या इतर मतांबद्दल बोलता येइल.
केवळ बेधुंद व एकांगी विचार आहेत ते.
हा माणुस खरा कोण आहे ??? ते शिक्षणाने डॉक्टर व पेशाने प्रोफेसर आहे हे समजले पण जो उद्द्योग त्यांनी आरंभलाय त्याचे खरेखुरे प्रयोजन काय ?? कोणाच्या व कोणत्या हेतुने प्रेरीत होउन ते हे सगळे करताहेत याबद्दलच माझ्या मनात शंका आहे. या असल्या तथाकथित डाव्या विचारवंतांची डि.एन.ए. टेस्ट कधीतरी व्हायलाच हवी असे माझे स्पष्ट मत आहे.
राम पुनियानी हे नाव यापुर्वी कधी कुणी 'भारताची राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी देशभर हिंडणारे केवळ एकमात्र मक्तेदार / ठेकेदार ' म्हणुन ऐकले आहे काय ??