माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली.
हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच आलेला एक अनुभव. परवाच माझे एक जवळचे नातेवाईक गेले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्यावर आई-बाबा गावी रवाना झाले. दुसर्या दिवशी दुपारी मी निघणार होतो. ऑफिसला रजा टाकली. तिकडे त्या अत्यवस्थ माणसाच्या सख्ख्या साडूचा वेगळाच चॅनल लागलेला. त्याने बाबांकडे गळ घातली. त्याचा मुलगा आणि सून पुण्याला रहायला होते आणि त्यांच्या राहत्या जागेचा भाडेकरार संपत आलेला होता. आमची जुनी जागा भाड्याने देणे असल्याने त्यांना ती जागा हवी होती. त्या नातलगाने प्रचंड घाई करत बाबांना मला सकाळीच फोन करायला लावला. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी या माणसाला आपली जागा देणार नाही असं निक्षून बजावलं आणि तिरमिरीतच फोन कट केला. अरे एक माणूस आता जाईल की नंतर अशा परिस्थितीत मृत्यूशय्येवर पडलेलं आहे, आणि या माणसाला जागेची पडलेली आहे? जरा कळ काढता येत नाही? इतकी खाज की सगळे भयानक ताणाखाली असताना स्वतःचा स्वार्थ साधावासा वाटतो? लोकांना प्रसंगाचं गांभीर्य आणि पोच नामक गोष्ट का नसते? इतका नीचपणा लोकांच्यात का असतो? हा प्रसंग काही मित्रांना सांगितल्यावर आणखी भयानक किस्से ऐकायला मिळाले. घरोघरी मातीच्याच चुली असणार म्हणा. हे किस्से संबंधित मित्रांच्या नावाचा उल्लेख न करता पुढे देतोय.
सौ. "अ" यांनी सांगितलेला किस्सा:
आमच्या घरी माझ्या सासर्यांच्या आजोळकडुन त्यांना मिळालेल्या श्री स्वामी समर्थांच्या खडावा आहेत. सासरे गेल्यावर एक बाई आम्हाला भेटायला आल्या आणि म्हणू लागल्या "काका जाताना पादुकांविषयी काही बोलले का?" त्यांनी असं विचारलं आणि त्याक्षणी त्या बाईबद्दलचा मनातला सगळा आदर नष्ट झाला.
श्री. "ब" यांचे एका व्यक्तीबद्दलचे दोन किस्से:
वडील गेल्यावर शेजारची एक गुजराथीण आईला म्हणाली. "तुम्हाला आता नऊ सबसिडाईझ्ड सिलेंडर लागणार नाहीत. त्यातले तुम्हाला न लागणारे सिलेंडर आम्हाला कमी किंमतीत द्याल का?"
समोर आई होती म्हणून ती वाचली. माझा चेहरा आणि हावभाव पाहून ती जी सटकली ती पुन्हा मी भारतात तिथे घरी असेपर्यंत फिरकली नाही.
वडील गेल्यावर चार महिन्यातच आई गेली. त्यावेळी तीच गुजराथीण दुसर्याच दिवशी,
"तुम्हाला फ्लॅट विकायचा आहे का? माझ्या ओळखीचे एक गुजराथी आहेत. त्यांना हवा आहे. मी तुम्हाला चांगलं डिल मिळवून देईन!"
तिच्या सुदैवाने त्या दिवशी माझी बायको आणि मावशी समोर होत्या. मावशीने तिला अक्षरशः हात धरुन घराबाहेर काढायचं फक्तं बाकी ठेवलं होतं.
माझा आणखी एक किस्सा:
आमच्या नात्यातल्या एक आज्जी गेल्या. त्यांच्या बाराव्याला जेवणाची एक पंगत उठून दुसरी बसताना त्या आज्जींची सून बडबडली, "चला आता खर्या खवैय्यांची पंगत बसली."
बसलेल्यांपैकी एक नातलग ताडकन् म्हणाला "आम्ही दिवसांचं जेवतोय, बारशाचं नाही."
"क" अणि "ड" या दोन बहिणींनी सांगितलेली हकिकतः
आम्ही आजोबा गेल्यावर त्यांना घेऊन सातारला निघालो होतो अंत्यसंस्कारांसाठी तेंव्हा एकाने फोन करुन सांगितलेलं "सांभाळून जा - अशा गाड्यांचे अपघात होऊन सगळेच्या सगळे मेल्याच्या अनेक घटना ऐकल्यात आपण".
त्यानंतर बाबांचं आणि आईचं चित्त सातार्याला पोहोचेपर्यंत थार्यावर नाही. भयानक ताणाखाली काढलेले ते काही तास आजही आठवतात.
लोकहो पोच नसलेले काही महाभाग आपल्याही परिचयाचे असले तर असल्या नगांचे किस्से इथे सांगा.
प्रतिक्रिया
23 Aug 2014 - 9:18 pm | कवितानागेश
हम्म...
23 Aug 2014 - 9:30 pm | नानासाहेब नेफळे
'पोच' नसलेले लोक 'पोचलेले' असतात, परंतु त्यांना 'पोचवायची' वेळ येते तेव्हा त्यांच्यासाठी कुणीच'पोचत' नाही--नानामृतातून साभार.
23 Aug 2014 - 10:06 pm | बहुगुणी
दुर्दैवाने असे अनुभव वरचे वर गाठीला येतात, त्यामुळे प्रतिसादांत आणखी काही उदाहरणं नक्कीच मिळतील.
हा धागा बर्याच जणांनी वाचून त्याची चर्चा झाली तर कधी-काळी लोक आधिक तारतम्याने वागतील अशी आशा ठेवायला हरकत नाही.
माझ्या परिचयाच्या एकाच्या आईच्या अंत्ययात्रेच्या वेळची कथा: या काकू अपघाताचं निमित्त होऊन अचानक गेल्या. मित्र काही महिन्यांसाठी परदेशी गेलेला असल्याने ही दु:खद वार्ता कळताच धडपड करीत आईच्या अंत्य-संस्कार संपता-संपता पोहोचला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत धाकट्या भावाने अग्नि दिला, पण चिता शांत होता-होता तरी मोठा भाऊ पोहोचला.
त्याचे अनेक नातेवाईक तसेच शाळेपासूनचे मित्र उपस्थित होते. अशा प्रसंगांमध्ये बांबू आणण्यापासून सर्व गोष्टींत पुढाकार घेणारी काही मंडळी आवर्जून असतातच, अशांपैकीच त्याचा एक मित्र. त्याने इतरांना सहज कानावर जाईल अशा आवाजात मित्राला ऐकवलं; "अरे बरं झालं एका दृष्टीने उशीरा पोहोचलास ते, काकुंच्या शवाची अवहेलना झालेली तुला पाहवली नसती. पोट मोठं रे, त्यामुळे डोक्यावर लाकडं ठेवली की पाय वर, आणि पायावर ठेवली की डोकं वर, अशी सगळी अवस्था!"…।
23 Aug 2014 - 11:38 pm | रमेश आठवले
पुण्यात १८९६-९७ साली प्लेग ची साथ आली होती आणि बरीच माणसे लागण झाल्यावर पटापट दिवंगत होत होती. या काळात घडलेला एक अभावित विनोद वाचला आहे. एका घरातील नातेवाईक मंडळी लागण झालेल्या व्यक्तीस नेहमीच्या परिचित डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांकडे पेशंटची वर्दळ होती. ओळखीच्या पेशंटला औषध देताना डॉक्टर उद्गारले -औषध देतो आहे पण खांदा द्याला येऊ शकणार नाही.
24 Aug 2014 - 1:33 am | प्रभाकर पेठकर
पुण्यात मंगेशकर रुग्णालयात दाखल असताना रात्री दिड दोनच्या सुमारास एक मधमवयीन स्त्री पेशंट माझ्या शेजारच्याच बेडवर आणण्यात आली. डॉक्टर-नर्स ह्यांची धावपळ चालली होती. कार अपघात झाला होता. बाई विव्हळत होती. डॉक्टरांनी एक्स-रे मशीन वगैरे आणून एक्स-रे काढले. कांही ठिकाणी हाडे मोडली होती. तिला ताबडतोब शस्त्रक्रिया कक्षात नेण्यात आलं. पहाटे केंव्हा तरी तिला परत आणलं. मला कांहीच दिसत नव्हतं पण शस्त्रक्रियेच्या गुंगीतच ती कण्हत होती. सकाळी शुद्धीवर आली तेंव्हा डॉक्टरांबरोबर झालेल्या संभाषणातून समजलं महामार्गावर फार गंभीर अपघात होऊन नवरा-बायको दोघेही गंभीर जखमी झाले होते. सकाळी भेटायला आलेल्या पहिल्या कांही व्यक्तींमध्ये तिच्या नवर्याच्या कचेरीतील सहकारी होता. त्याने आल्या-आल्या (त्या बाईच्या तब्येतीची चौकशी करायच्या आत) सांगितले, 'काळजी करू नका. गाडीचा विमा आहे. मी साहेबांशी बोललो आहे. तुम्हाला कांही तोशीश पडणार नाही.' इकडे मी कपाळाला हात लावला. ती बाई म्हणाली, 'अहो गाडीचं काय घेऊन बसला आहात? प्राण वाचले हे मोठे नशिब आहे.'
दूसरी एक नट्टापट्टा केलेली बाई आली होती. डोळ्यात नक्राश्रू आणून म्हणाली, 'अगं मी काल रात्रीच येणार होते. पण हे म्हणाले आत्ता ICUत सोडणार नाहीत. सकाळी जाऊ. काय करणार? आमचे हे, राज्य सरकारात, एव्हढ्या मोठ्ठ्या हुद्द्यावर आहेत. कमिश्नर लेव्हलची माणसेही ह्यांच्या पुढे थरथर कापतात. ह्यांना कोणाची हिम्मत आहे इथे अडवायची? पण नाही. स्वभाव असा आहे नं कुठेही आपल्या हुद्द्याचा वापर करीत नाही. दूसरा एखादा असता तर आख्ख इस्पितळ डोक्यावर घेतलं असतं. अमेरिकेत अव्याला (बहुतेक तिचा मुलगा असावा) सकाळीच कळवलं. तिथे रात्र होती पण उठवलं मी त्याला. काळजी वाटते ग पोरांची. अमेरिकेत एव्हढ्या दूर राहतात. त्याला म्हंटल, 'बघ मावशीला गंभीर अपघात झालाय. तू नीट चालव बाबा गाडी तिथे. बाकी तब्येत कशी आहे तूझी. जास्त लागलं वगैरे तर नाही नं?' ही बाई बहुधा 'आंधळी' असावी. तिला प्लॅस्टरमधले तिचे शरीर दिसत नव्हते. मागे (बापुडवाणा) नवरा उभा होता. सज्जन गृहस्थ. हळूवार आवाजात म्हणाला, ' तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. तब्येतीला जपा. तुमच्या मिस्टरांना आम्ही भेटून आलो. त्यांची तब्येत ठिक आहे. काळजी करू नका.'
तिसरी एक बाई आली होती, ती म्हणाली, 'अगं बाई, बघवत नाही गं तुझ्याकडे. काय अवस्था झालीय तुझी? आणि ह्या कुठल्या हॉस्पिटलात आणलयं तुला. इथून पेशंट जीवंत आपल्या घरी परतत नाही असं रेप्यूटेशन आहे ह्यांचं.' ती बाई हसून क्षीण आवाजात म्हणाली, ' नाही गं, चांगली आहेत माणसं. डॉक्टर्स, नर्सेस अगदी वॉर्डबॉय पासून सर्व जणं काळजी घेताहेत.'
सगळेच मूर्ख नव्हते. येणार्यांमध्ये चांगली माणसेही होती. पण वरची तीन माणसे लक्षात राहिली.
नुसते बोलणेच नाही, वागणेही पोचपाच नसलेले पाहिले आहे. माझे वडील इस्पितळात असताना मी तिथे ICU बाहेर बसलेलो असायचो. एक दोन कुटुंब अशी आली होती की विचारू नका. उंची साडी, दागदागिने आणि सेंट वगैरे लावून एक बाई आली होती. तिचा ७-८ वर्षाचा मुलगा थ्री-पीस सूट मध्ये होता. नवर्याने आपला कोट हातावर घेतला होता. ज्या पेशंटला भेटायला आले होते त्यांच्या एका नातेवाईकाशी बोलत होते. 'अरे इथेच त्या अमुक-अमुक हॉल मध्ये माझ्या एका भाच्याचं लग्न होतं, तिथे आलो होतो. तर ह्यांना म्हंटलं आलोच आहोत इथपर्यंत तर त्या ह्यांनाही भेटून जाऊ हॉस्पिटलात.' असो.
Common Sense is not so common. हेच खरं.
24 Aug 2014 - 1:37 am | प्यारे१
>>>> माझ्या शेजारच्याच बेडवर
तुम्ही का नि कशाला?
कधीची गोष्ट म्हणे? आमा सब खैरियत ना चिच्चा?
24 Aug 2014 - 2:05 am | प्रभाकर पेठकर
७-८ वर्षे झाली. एकदा चक्कर आली, घाम आला म्हणून डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी लगेच ईसीजी काढून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात गेल्यावर त्यांनीही ईसीजी काढला आणि 'अंडर ऑब्झरवेशन' नांवाखाली ५-६ दिवस आय.सी.यू. त ठेवून वेगवेगळ्या तपासण्या करून ६५०००/- उकळले आणि तुम्हाला कांहीही झालेले नाही असे सांगून घरी पाठवून दिले. जुनी गोष्ट आहे. मला विशेष कांही झालेले नसल्यानेच मी सदासर्वकाळ शुद्धीत आणि आजूबाजूचे निरिक्षण करीत असायचो.
24 Aug 2014 - 12:15 pm | प्यारे१
>>> ६५०००/-
आँ?????? ७-८ वर्षांपूर्वी ?
तुम्ही फॉर्म भरताना 'येनाराय' म्हणून सांगितलं असेल. काही 'पोच' नाही बघा तुम्हाला. (हलकं घ्या.) ;)
अशा 'विशेष' प्रसंगी कापड दुकानात मापं काढतो म्हणून सांगायला बंदी नाही. त्याला खोटं म्हणत नाहीत. डॉक्टर 'कशाला त्रास करुन घेताय, टेन्शन घेऊ नका, थोडं तेल, नॉन्व्हेज कमी खा' म्हणून सांगतात. असो!
24 Aug 2014 - 1:05 pm | दादा कोंडके
मंगेशकर इस्पितळातच वडिलांवर एक छोटीशी शस्त्रक्रिया करायची होती. डॉक्टरने वडिलांच्या माहितीपेक्षा माझीच माहिती जास्त विचारली. आणि शस्त्रक्रियेला नेताना माझ्याकडून कसल्याश्या फोर्मवर सही घेतली. :)
24 Aug 2014 - 2:39 pm | प्रभाकर पेठकर
>>>>तुम्ही फॉर्म भरताना 'येनाराय' म्हणून सांगितलं असेल.
नाही हो. त्या काळी ३-४ वर्षे मी पुण्यातच होतो. पण आय.सी.यू.त वगैरे टाकून, ६ दिवस तेथेच ठेवून महागातली कसली कसली इंजेक्शन्स दिली आणि बिलाचा आकडा फुगवला. अशा बिलांमधून ४० ट्क्के रिफर करणार्या डॉक्टरांना मिळतात असं ऐकलं आहे. खरं खोटं इस्पितळ आणि तो डॉक्टर जाणे.
24 Aug 2014 - 6:40 pm | एसमाळी
मंगेशकराच रुग्णालय नावापुरतच धर्मदायी आहे.बाकी सगळीच लुट आहे.याची पोच ते बाळगत नाहीत.
25 Aug 2014 - 12:28 pm | प्रसाद१९७१
प्रचंड लुट आहे. जनते च्याच पैश्यानी हे हॉस्पिटल बनवून सुद्धा लूट चालते
25 Aug 2014 - 10:54 am | ज्ञानव
न स ले ल्या माणसांची आठ्वण न काढ्ता जे प्र संगानुरुप वागले त्यांची आठवण ठेवणे आवश्यक आहे.
"पोच" नसलेल्या माणसांची आठ्वण (स्वतंत्र धागा) काढुन आपण त्यांची दखल घेतोय; पण जे प्रसंगानुरुप वागले त्यांचा उल्लेख हि नाहि!!!!!
25 Aug 2014 - 11:06 am | मंदार दिलीप जोशी
ज्ञानव, प्रसंगानुरूप वागणे हे अपेक्षित असते. काही जणांनी अपेक्षेबाहेर चांगली वर्तणूक दाखवली तर ते लिहेनच. पहिला परिच्छेद वाचलात का? :)
25 Aug 2014 - 11:29 am | ज्ञानव
वाचला. माझा मुद्दा हा होता कि जे असे "पोच नसलेले" असतात त्यांचा उल्लेखच का करावा ? त्यांच्यात असे काय आहे कि आपण त्याना हि पोच पावती द्यावी ? प्रयोजन काय? कर्मणुक?
कदाचित माझा विचार / मत चुकत असेल; पण जे चागले आहे ते शेअर करावे असे वाट्ले म्हणुन लिहिले.
25 Aug 2014 - 11:30 am | मंदार दिलीप जोशी
नाही नाही, तुमचे तसे बरोबरच आहे. प्रयोजन असे आहे की वाचकांपैकी कुणी तसे वागत असल्यास आणि त्यांनी आपल्या वर्तणुकीत बदल केल्यास चांगलेच होईल.
25 Aug 2014 - 8:37 pm | आदिजोशी
पोच नसलेल्या लोकांवर लेख लिहिलेला असल्याने त्यांचेच उल्लेख येणार. तुम्ही 'सद्गुणाचे पुतळे' असा दुसरा लेख लिहून तिथे चांगल्या अनुभवांविषयी लिहा. धन्यवाद.
26 Aug 2014 - 2:37 pm | मंदार दिलीप जोशी
आदि ;)
25 Aug 2014 - 10:30 pm | विजुभाऊ
या लेखात एका गोष्टीत गुजराथीण असा उल्लेख कशासाठी केलाय?
त्याजागी कोणीही चालला असता. उदा स.पेठी सानुनासीक बोलणारांचा उल्लेखही चपखल बसला असता.
( हा प्रतिसाद सम्पादीत झाला ( उडाला ) तर मूळ लेक्खातील गुजराथी पणाचा उल्लेखदेखील उडवला जाईल अशी अपेक्षा असलेला....)
26 Aug 2014 - 2:37 pm | मंदार दिलीप जोशी
ती गुजराथीणच असल्याने तसा उल्लेख केलाय. ती गुजराथीण असताना कानडी असा उल्लेख कसा करणार? :P
26 Aug 2014 - 2:50 pm | प्रसाद१९७१
स.पेठी सानुनासीक बोलणारांचा उल्लेखही चपखल बसला असता.>>>>>>> अजीबात बसला नसता ( चपखल सोडाच दुरुन सुद्धा )
26 Aug 2014 - 4:57 pm | शेखर
विजुभाऊ, तुमचा ब्रिगेडीपणा वाढत चाललाय बरका ! :)
26 Aug 2014 - 5:15 pm | सौंदाळा
माझे वडील आयसीयु मधे असताना.. त्यांच्याबरोबर १५ वर्षापुर्वी काम केलेले एक गृहस्थ भेटायला आले होते.
वडीलांची परिस्थिती खुप नाजुक असल्यामुळे मला बोलणे सुचत नव्हते आणि हा माणुस विचारतोय.. काय रे लग्न कधी झाले? (माझे नुकतेच लग्न झाले होते), बायको कुठली?, काय करते?.. एक ना दोन. शेवटी असह्य होऊन मी मोबाईल कानाला लावुन चक्क पळ काढला आणि अर्ध्या तासाने आलो, तोपर्यंत स्वारी गेली होती.
माझा एक ऑफीसमधील सहकारी त्याची आजी शेवटच्या घटका मोजत होती (हे त्यानेच सांगितले होते) तेव्हाच मृत्यु दाखला कसा मिळवायचा, मृत व्यक्तीचे बँक खाते बंद करायची काय पध्द्त आहे वगैरे विचारत होता. आजी पुढे २ महीन्यांनंतर वारली.
26 Aug 2014 - 6:07 pm | रेवती
माझे काका गेले तेंव्हा काही लांबचे नातेवाईक येऊन हळू आवाजात त्यांचे पैशाचे जुने हिशोब मिटवत बसले होते असे ऐकले होते. मनुष्य गेल्यावर असे पाचपोच नसलेले नजरेत येतात पण लग्नकार्ये, घरातील कुळधर्म कुळाचार आदी कार्यक्रमांनाही बसल्याजागेवरून न उठणारे लोक असतातच! अगदी शेवटी दमल्या भागल्या घरच्या लोकांची पंगत बसली आणि मीठ चुकून घ्यायचे राहिले तर समोर दहाजण बसलेले असतात पण एकहीजण उठून मी आणतो/आणते म्हणत नाही. याबाबतीत माझे दीर सगळ्या (म्हणजे आमंत्रण असलेल्या जवळच्या) कार्यांमध्ये, घरगुती समारंभांमध्ये शेवटी जयमान जेवायला बसले की जातीने हजर असतात व हवं नको ते आपणहोऊन वाढतात ती आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
26 Aug 2014 - 7:07 pm | बॅटमॅन
असले नातेवाईक ही एक नंबर भिकारचोट आणि हरामखोर जमात आहे. कुणी जवळचं माणूस गेलं की जन्मभर ढुंकून न पाहणारे सोने-दागिन्यांच्या वाटपाला मात्र जिभल्या चाटत हजर असतात. काहीजण माणूस मेलं की दहावा-बारावा कसा करायचा याच्या चर्चांमधून आपलं धर्ममार्तंडपण साजरं करतात. या भोसडीच्यांचा फार त्रास होतो. असो.