एकदाचा फॅण्ड्री पाहिला. फेसबुकवर रोज येणारी परीक्षणं पाहून फॅण्ड्री पाहीलेले लोक आपल्याला खिजवतात असं वाटू लागल होतं. मग ज्या जिद्दीने सिनेमाबद्दल खूप काही कळत नसतानाही पाहीला त्याच जिद्दीने गद्यात लिहीणं जमत नसतानाही लिहायचं ठरवलं. लिहायचं ठरवलंच आहे तर तांत्रिक गोष्टी कळत नसताना काय लिहायचं ?
तर एक गोष्ट खरी की हा सिनेमा असा आहे की तो पाहीलेल्यांना त्याबद्दल चांगलं वाईट इतरांना सांगावंसं वाटत राहतंं हे खर आहे. एक अॅव्हरेज प्रेक्षक म्हणून मला काय वाटलं हे सांगण्याचा घटनादत्त अधिकार बजावण्यासाठी लिहायचंच असं ठरवलं (मिपावर वाभाडे काढले गेले की दुरुस्त्या करून फेसबुकवर लिहायचं हे पण अभिव्यक्तीस्वातंत्र्यच ). इतरांनी बरंच काही लिहीलं आहे त्यामुळे ते सगळं पुन्हा सांगण्याचं काम कमी झालं हा सर्वात शेवटी लिहीण्याचा फायदा. :)
सिनेमा पाहताना आपल्याला त्याच्याबद्दल लिहायचं आहे अशा अभिनिवेशात काही स्वयंघोषित समीक्षक नेटकर सिनेमा पाहतात. मग ते धड एंजॉयही करत नाहीत आणि दुस-याला एंजॉयही कऊ देत नाहीत. तर एकदा थेटरात गेलं आणि खुर्चीत बसलं की आधी खुर्चीखाली कुणी पिशवी ठेवलीय का हे पहायचं. खुर्ची स्वच्छ आहे का हे ही पहायाचं हा शिरस्ता पार पाडायचा. मग आपलंही डोकं स्वच्छ करायचं. सगळी परीक्षणं झाडून झटकून साफ करायची हे सगळं आवर्जून केलं. मगच सिनेमा पाहीला.
नेहमीच्या चटपटीत संवादांना संपूर्ण फाटा, वेगळं पार्श्वसंगीत हे जाणवणारे ठळक मुद्दे वाटले. नेहमीच्या आयुष्यात आपण मसालेदार संवाद वापरून (खेडवळ किंवा शहरी भाषेत) एकमेकांशी बोलत नाही. काही सिनेमात किंवा मालिकांमधे प्रत्येक पात्रं हे साहीत्यिक असल्याप्रमाणे लच्छेदार गोडगोड सवाद असतात. अंगावर कपडे जितके भरजरी तितकेच संवादही बोजड. नेहमी नेहमी पाहून कंटाळलेल्या माझ्यासारख्यांना आपण जसं बोलू तसे संवाद सिनेमात पाहणे हा एक सुखद धक्का होता. तसंच खेड्यात घडणा-या घटना आहेत तशा दाखवणे हा एक छान अनुभव होता.
हा सिनेमा पाहताना तो एखाद्या आत्मचरित्रासारखा पहायला पाहीजे. तो कुणाचा तरी अनुभव आहे हे लक्षात ठेवायला पाहीजे. एखाद्याचा अनुभव आपण बदलू शकत नाही. नागराज मंजुळे स्वतः कवी आहे, त्याचा पहिलाच सिनेमा असला तरी त्याने सिनेमा या विषयाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. त्याची याआधीची एक पिस्तुल्या ही शॉर्टफिल्मही पुरस्कार मिळवणारी ठरलेली आहे. अनेक जण म्हणतात तसा हा समाजव्यव्स्थेवर भाष्य करणारा सिनेमा आहे असं मला अजिबात वाटलं नाही. ही एक त्या वयातली प्रेमकथाच आहे. काहींचं प्रेम सफल होतं तर काहींचं असफल होतं. असफल होण्यामागे प्रेम व्यक्त न करता येणं असतं. त्याची अनेक कारणं असतात, त्यातलं एक न्यूनगंड हे एक कारण आहे हे सिनेमा पाहताना ठळक होतं. अशी अनेक मुलं असतात ज्यांना एखाद्या मुलीकडे पाहत राहणं आवडतं पण जाऊन सांगणं जमत नाही. त्याची कारणे फॅड्री सांगतो तेव्हां जंब्याची भूमिका पटत जाते. कोवळ्या वयात कुणाला कोण आवडावं याबद्दल बंदी घालता येत नाही. पण ते सांगता न येणं हे दुर्दैव सिनेमात जाणवत राहतं. पण त्याबद्दल सहानुभूती नको असल्याचं दिग्दर्शकाचं म्हणणं असावं असं वाटत राहतं. जंब्याचं पात्र तिला जाऊन का सांगू शकलं नाही हे सिनेमा पटवून सांगतो.
किशोर कदमांचा अभिनय अतिशय संयत आणि नैसर्गिक झाला आहे. विशेषतः अजिजीचे भाव आणि शेवटच्या प्रसंगात मुलावर राग व्यक्त करणारा बाप खूप मस्त. राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हां. राष्ट्रगीताला उभं राहतात इतपत जनरल नॉलेज असणारा पण राष्ट्रगीतापेक्षा डुक्कर हातातून निसटतंय हे भाव किशोर कदमांनी जबरदस्त उभे केले आहेत. कुणी म्हणतं या प्रसंगात हसू नये, पण तो ब्लॅक कॉमेडीचाच प्रकार वाटला. विषण्ण करणारा विनोद. शेवट शेवटी सर्वच पात्रांच्या बाबतीत तो विनोद पडदा व्यापून टाकतो, ज्याची खबर जंब्याच्या घरच्यांना नसते, पण जंब्याच्या संवेदनशीलतेला असते. जंब्याच्या घरचे, गावातले हे सगळे एका बधीरतेचे प्रतिनिधी आहेत तर जंब्याच्या संवेदनशीलतेमधून त्याची होणारी घुसमट आणि त्यातून परिस्थितीला मनाविरुद्ध शरण गेल्याने एका क्षणी त्याचा होणारा विस्फोट हे एखाद्या कवितेसारखं उलगडत जातं. त्याच्या उलगडण्याच्या पद्धतीने फॅण्ड्री हा प्रत्येकासाही वेगळा अनुभव असू शकतो. प्रेक्षकाला विचार करता येतो हे दिग्दर्शकाने गृहीत धरलेलं असल्याने त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अनेक गोष्टी बिटवीन द लाईन्स येतात. पण त्या बिटवीन द लाईन्स नाहीत. तिथे पडद्यावर सूचक प्रतिमा किंवा ध्वनी यांचा वापर आहे. जंब्याच्या घरी अठरा विश्वे दारीद्र्य आहे, ज्याची त्यांना सवय आहे. बुडालेला अभ्यास विचारायला जंब्या जातो तेव्हां त्याच्या वर्गातला हुषार मुलगा बाहेर येऊन त्याला काय शिकवलं होतं हे सांगतो तेव्हां कार्टून सिरीयल्सचे आवाज येत राहतात. हे खूप आवडलं. इतकं की त्याबद्दल विस्कटून सांगावंसं असंही वाटत नाही. ज्यांना अशा जागा टिपता आल्या नाहीत त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. शेअटी एखादी कलाकृती पाहताना आपली अनुभूतीही महत्वाची. प्रेक्षकांना काहीच समजत नाही असं समजून काढलेले राऊडी राठोड किंवा बायको चुकली स्टँडवर पाहील्यानंतर एके दिवशी अचानक कहानी पाहण्यात येतो तेव्हां बरं वाटतं. वळू पाहताना खूप बरं वाटतं. तर फॅण्ड्री पाहताना सिनेमा आवडणे किंवा न आवडणे या पलिकडची काही तरी गोष्ट आहे हे जाणवायला लागतं. आवडनिवड या पलिकडे एक अनुभवणे असतं त्याबद्दल नेमकं कसं सांगायचं ?
- संध्या
(टीप :सिनेमा पाहील्यानंतर आणि हा लेख इथपर्यंत लिहील्यानंतर नागराज मंजुळेचं निवेदन वाचलं. त्याने सिनेमात अभिनय करणे अपेक्षित नसल्याचं सांगितलं आहे. किशोर कदमला जेव्हां जेव्हां तो अभिनय करतोय असं वाटलं तेव्हां त्याने तसं सांगितलं. म्हणूनच सर्वांचा वावर नैसर्गिक आहे. जसं काही आजूबाजूला वावरणारी माणसंच पडद्यावर आहेत असं वाटतं).
प्रतिक्रिया
28 Feb 2014 - 7:27 am | यशोधरा
आवडलं प्रकटन.
28 Feb 2014 - 8:03 am | खटपट्या
आत्तापर्यंत आलेल्या फॅण्ड्री च्या परीक्षणातील सर्वात आवडलेल परीक्षण.
28 Feb 2014 - 9:49 am | शैलेन्द्र
+११११
1 Mar 2014 - 3:30 pm | राजाभाउ
असेच म्हणतो
28 Feb 2014 - 8:09 am | मुक्त विहारि
छान लिहीले आहे.
मुळात चित्रपट.कथा,नाटक आणि कविता ह्या त्या त्या कलांचा आस्वाद घेणार्यांच्या नजरेवर अवलंबूब असतात.
एकाच सिनेमाकडे विविध नजरेने पाहता येतं.
तुम्ही हा सिनेमा कुठल्या नजरेने पाहीलात, ते योग्य शब्दांत मांडले आहे, असे मला वाटते.
28 Feb 2014 - 9:32 am | नवनाथ पवार
परीक्षण आवडलं
28 Feb 2014 - 9:59 am | वेताळ
तुम्हाला शिट्या,इतरांचे मोठ्याने बोलणे,सॉक्सचा वास,पानाच्या पिचकार्या,गलिच्छ कमेंट पलिकडे जावुन हा चित्रपट आवडल्याबद्दल मला आनंद वाटला.तुम्ही कुठेही व्यवस्थित राहु शकता ह्याबद्दल मला गॅरण्टी आहे.
28 Feb 2014 - 10:57 am | आत्मशून्य
कमेंटो.
28 Feb 2014 - 10:18 am | मंदार दिलीप जोशी
टाईमपास काय किंवा फॅन्ड्री काय, ब्राह्मणांना नावे ठेवायला सिनेमा हे आता उत्तम माध्यम सिद्ध होऊ पाहत आहे.
28 Feb 2014 - 5:26 pm | धर्मराजमुटके
टाईमपास काय किंवा फॅन्ड्री काय, ब्राह्मणांना नावे ठेवायला सिनेमा हे आता उत्तम माध्यम सिद्ध होऊ पाहत आहे
फॅन्ड्री चित्रपट आपण पाहिला नसावा असे दिसते. ब्राह्मणांना नावे ठेवली आहेत असे दिसतं नाही.
28 Feb 2014 - 5:40 pm | गवि
सहमत. अत्यंत कटाक्षाने अभिनिवेश, बटबटीत जातीयवादाचे फिल्मी प्रदर्शन, आक्रस्ताळेपणा, सर्वद्न्याप्रमाणे भाष्य हे सर्व सर्व पूर्ण टाळून अतिशय सुंदर सटल पद्धतीने हाताळणी आहे कथेची.
प्लीज कोणीही पूर्वग्रह सोडून एकदा बघावाच. मीही आधी बराच स्केप्टिक होतो..पाहण्याआधी थीमविषयी ग्रुहीतके धरुन बसलो होतो.
अगदी आजरोजी खेड्यात जितकी आणि जशी जातीयता आहे तितकीच ..एक कणही मनचा न घालता समोर ठेवली आहे..
शिवाशिव, आउटडेटेड कल्पना पूर्ण दूर ठेवून जिथे ते विषमतेचं सूक्षम अस्तित्व आहे तिथे अन तेवढेच दिसले आहे. तेढ, द्वेष निर्माण करण्याचा किंवा एकूणच कसलाच अभिनिवेश नाही..
नागराज मंजुळे ..जियो...
28 Feb 2014 - 9:09 pm | प्रसाद गोडबोले
गेल्या कित्येक वर्षात इतका सुंदर मराठी चित्रपट पाहिला नव्हता ! नागराज रॉक्क्स !!
मंदार , आपली चांगली जुनी मैत्री आहे , सो , ट्र्स्ट माय वर्ड , पुर्वग्रह सोडुन आवर्जुन न विसरता हा चित्रपट थेटर मधे जाऊन पहा ...
आय बेट यु , तु स्वतःच नागराज कौतुक करणारे समीक्षण लिहिशील :)
3 Mar 2014 - 4:12 pm | मंदार दिलीप जोशी
टिव्ही वर आला तर नक्की बघेन
3 Mar 2014 - 4:18 pm | मंदार दिलीप जोशी
प्रसाद, एक जरा वेगळे मत नोंदवतोच.
एखादा विषय समजायला किंवा एखाद्या विषयाच्या बाबतीत संवेदनशील असण्याचे सिद्ध करायला सिनेमा बघावाच लागतो असे नाही. तर ते असो.
28 Feb 2014 - 10:50 am | तुषार काळभोर
अजून फॅण्ड्री नाही पाहिला. पण पाहताना जर काही दॄश्ये विनोदी 'वाटल्याने' हसू आलं, तर ती चांगली गोष्ट आहे की वाईट?
मी हसलो तर 'असंवेदनशील' ठरेल की गंभीर चेहरा ठेवून पाहत राहिल्याने 'विनोदाची जाण नसलेला' ठरेल?
मला जे करावसं वाटलं ते केलं (म्हणजे विनोद समजून हसणं किंवा गर्भितार्थ समजून घेऊन गांभिर्याने पाहणं)(इतरांना त्रास होईल असं न वागता) तर 'येडचापला-सिनेमातलं-काहीच-कळत-नाही' असा ठरेल?
वास्तवदर्शी सिनेमा मला 'इंटरेस्टिंग' नाही वाटत. म्हणजे मी असभ्य-असंस्कॄत-अशिक्षित-पिटातलं पब्लिक आहे का?
इ. इ. ......
28 Feb 2014 - 10:54 am | मंदार दिलीप जोशी
फॅन्ड्री पाहिला. आतून हललो. अजून सावरतो आहे. नंतर लिहेन
असं लिहा. म्हणजे मत तुम्ही संवेदनशील, पुरोगामी, वगैरे :P
28 Feb 2014 - 6:34 pm | धन्या
तुम्ही जग फक्त काळ्या आणि पांढर्या अशा दोनच रंगांमध्ये पाहता असं दिसतंय.
या चित्रपटात सवर्ण आणि मागासवर्ग याच्या पलिकडचं माणुस पातळीवरचं खुप काही असं अतिशय सुक्ष्म पद्धतीने मांडलं आहे, फक्त त्यासाठी आपले पुर्वग्रह बाजूला ठेवण्याची गरज आहे.
3 Mar 2014 - 4:14 pm | मंदार दिलीप जोशी
अहो तेच तेच पाहून कंटाळा आलाय. म्हणून म्हणालो.
3 Mar 2014 - 4:23 pm | मंदार दिलीप जोशी
आणखी एक नोंदवतो.
या चित्रपटात सवर्ण आणि मागासवर्ग याच्या पलिकडचं माणुस पातळीवरचं खुप काही असं अतिशय सुक्ष्म पद्धतीने मांडलं आहे, फक्त त्यासाठी आपले पुर्वग्रह बाजूला ठेवण्याची गरज आहे.
ते जे काही सूक्ष्म आहे ते एक तर मी जगतो आहे किंवा ते सिनेमात बघण्याची गरज मला वाटत नाही. संवेदनशील माणूस असण्याचा किंवा ते सूक्ष्म जे काही आहे ते मला समजलं आहे याचा पुरावा मला सिनेमा बघून द्यावा लागत असेल तर त्यासारखी दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठली नाही.
28 Feb 2014 - 6:20 pm | प्रसाद१९७१
अमेरिकेत निर्वासित म्हणुन आलेले आणि अत्यंत वाईट परिस्थितीत झगडुन झगडुन सिमेमात आलेले दिग्दर्शक, नट त्यांची गरिबीतली दुख कुरवाळत त्याच्या वर सिनेमे काढत नाहीत.
28 Feb 2014 - 6:28 pm | धन्या
पण भारतात जर कुणी असे सिनेमे काढत असेल तर बाकीच्यांच्या पोटात का दुखावं?
ज्याला सिनेमा पाहायचा असेल त्याने पाहावा, नसेल पाहायचा त्याने पाहू नये. कुणी जबरदस्ती करुन तर सिनेमा पाहायला थियेटरात नेत नसतं. :)
1 Mar 2014 - 12:04 am | मुक्त विहारि
+ १
ह्यालाच लोकशाही म्हणतात
28 Feb 2014 - 6:40 pm | रेवती
लेखन आवडलं.
28 Feb 2014 - 7:01 pm | अत्रुप्त आत्मा
@(मिपावर वाभाडे काढले गेले की दुरुस्त्या करून फेसबुकवर लिहायचं हे पण अभिव्यक्तीस्वातंत्र्यच ) >>> =))
@वळू पाहताना खूप बरं वाटतं. तर फॅण्ड्री पाहताना सिनेमा आवडणे किंवा न आवडणे या पलिकडची काही तरी गोष्ट आहे हे जाणवायला लागतं. आवडनिवड या पलिकडे एक अनुभवणे असतं त्याबद्दल नेमकं कसं सांगायचं ? >>> वाह!
@पाहीला त्याच जिद्दीने गद्यात लिहीणं जमत नसतानाही लिहायचं ठरवलं. >>> निष्कर्ष चुकला आहे. गद्यात लिहिणेही जमते आहे. असे नवे निरिक्षण नोंदवितो! :)
28 Feb 2014 - 7:10 pm | कवितानागेश
छान लिहिलय. :)
28 Feb 2014 - 11:39 pm | सांजसंध्या
सर्वांचे आभार. नाही म्हटलं तरी बरं वाटलं :)
सिनेमा न पाहताच प्रतिक्रिया देऊ शकणा-यांचं कौतुक, लेख न वाचता प्र दे. विशेष कौ.
3 Mar 2014 - 4:25 pm | मंदार दिलीप जोशी
(संपादित)
वर एका प्रतिसादात लिहीले आहे ते वाचा.
"ते जे काही सूक्ष्म आहे ते एक तर मी जगतो आहे किंवा ते सिनेमात बघण्याची गरज मला वाटत नाही. संवेदनशील माणूस असण्याचा किंवा ते सूक्ष्म जे काही आहे ते मला समजलं आहे याचा पुरावा मला सिनेमा बघून द्यावा लागत असेल तर त्यासारखी दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठली नाही."
5 Mar 2014 - 12:04 pm | बॅटमॅन
तुच्छतावादी मनोवृत्तीचे एक उत्तम उदाहरण दिसले. धन्यवाद.
5 Mar 2014 - 2:22 pm | मंदार दिलीप जोशी
बॅटमॅन, यात तुच्छतावादी प्रवृत्ती काय? :(
या प्रतिसादाने दुखावलो हे नक्की.
5 Mar 2014 - 2:27 pm | बॅटमॅन
पिक्चर बघणे हेच्च्च सार्थक आहे असे जर कुणी म्हणत असेल तर ते चूकच आहे.
मात्र पिच्चर पाहून जे लोक विचार करत असतील त्यांवर पास केलेले हे जजमेंट वाटले अन म्हणूनच तुच्छतावादी वाटले.
तसे नसेल तर लैच भारी, माझा आक्षेप मागे घेतो.
5 Mar 2014 - 2:36 pm | मंदार दिलीप जोशी
नाही नाही. पिक्चर विचार करायला लावत असेल लोकांना तर सिनेमाचे ते यशच आहे, चांगलेच आहे की. त्याबद्दल काही म्हणायचे नाही.
पण आपण संवेदनशील आहोत आणि आपल्याला मागास/पीडीत लोकांविषयी कळवळा आहे हे मला माहित असणे पुरेसे आहे आणि ते सिद्ध करायला मला सिनेमा बघायची गरज नाही असे मला म्हणायचे होते.
असो :)
5 Mar 2014 - 2:37 pm | बॅटमॅन
:)
1 Mar 2014 - 4:22 pm | साळसकर
वाह ! सुंदर परीक्षण !!
प्रत्येक जण आपापल्या परीन हा सिनेमा उलगडत नेतोय.
मराठी चित्रपटसृष्टीचा खरा काळ आता चालू होणार..
1 Mar 2014 - 10:10 pm | पैसा
मस्त! रूढ अर्थाने हे सिनेमाचं परीक्षण नव्हे. सिनेमा पाहून मनात आलं ते इथे आमच्याबरोबर वाटून घेतलं आहे. धन्यवाद!
1 Mar 2014 - 11:27 pm | निनाद मुक्काम प...
सिनेमा पाहताना आपल्याला त्याच्याबद्दल लिहायचं आहे अशा अभिनिवेशात काही स्वयंघोषित समीक्षक नेटकर सिनेमा पाहतात. मग ते धड एंजॉयही करत नाहीत आणि दुस-याला एंजॉयही कऊ देत नाहीत.
खल्लास
बाजार उठला नेटकर समीक्षकांचा
परदेशात राहत असल्याने ,
ही जाहिरात नाही , ती आमच्या नावातच आहे.
हा सिनेमा अजून पाहण्यास मिळाला नाही,
हा सिनेमा पाहून अनेकांच्या प्रतिक्रिया , हललो आहे , निशब्ध झालो , अश्या धाटणीच्या होत्या , एरवी मेळघाटात कुपोषणाने बालमृत्य वैगैरे बातम्या चेहऱ्यावरची रेघ सुद्धा न हलवता ट्रेफिक सिग्नल वर दिसणारी विषमता सराईतरीत्या डोळेआड करणाऱ्या लोकांना हा सिनेमा पाहून संवेदशीलतेचा पान्हा फुटला.
त्यांच्या प्रतिक्रिया एखादा गोरा जेव्हा भारतात पहिल्यांदा येतो तेव्हा रस्त्यावर दिसणारे दारिद्र्य पाहून अनेकांच्या जीवाची घालमेल होते तश्या होत्या ,
एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेणे काय हे जातीच्या फिल्मबाज व्यक्तीस कळते. हे ह्या परीक्षणावरून कळून आले.
सोशल मिडीयावर आभासी जगतात कार्यरत असणाऱ्या मंडळीच्या सामाजिक संवेदनांची गळवे टरारून फुगली असतात , एक निमित्त हवे असते ,
फॅण्ड्री ने ते निमित्त दिले,
ता . क
कुठल्याही अग्रगण्य वृत्तपत्रात एवढे सकस समीक्षण वाचण्यात आले नाही,
त्यांना हे समीक्षण छापणे परवडणार सुद्धा नाही.
गांधीच्या देशात जातीयता हे चलनी नाणे आहे , त्यावर तोडगा काढण्यापेक्षा चर्चा करणे हा अनेकांचा आवडीचा विरंगुळा आहे ,
2 Mar 2014 - 1:25 pm | स्पंदना
शांत संयत समिक्षण.
बरेच बारकावे टिपलेले दिसताहेत.
चित्रपट पाहायला जरा उशीर होइल्,पण तरीही एखाद्या चित्रपटाबद्दल एव्हढ लिहावस वाटत लोकांना, अन ते ही मराठी म्हणजे अप्रुप वाटतय.
3 Mar 2014 - 10:30 pm | देव मासा
चित्रपट पण आवडला आणि आपले परीक्षण सुद्धा आवडले
4 Mar 2014 - 1:42 pm | सांजसंध्या
रूढ अर्थाने परीक्षण नाहीच.
(मंदार दिलीप जोशी यांचे इथले असंबद्ध प्रतिसाद काढून टाकावेत ही विनंती).
23 Jul 2014 - 8:22 pm | एसमाळी
च्याआयला जब्या ने मारलेला दगड काही लोकापर्यंत पोहचलाच नाही.
24 Jul 2014 - 11:37 am | प्रभाकर पेठकर
कालच फँड्री बघण्याचा योग आला. आवडला चित्रपट. विशेषतः किशोर कदमांच्या अभिनयातील सहजता, चेहर्यावरील दलित वर्गाची लाचारी, आपण दलित आहोत, गरीब आहोत वगैरे सामाजिक आणि नशिबाने वाट्यास आलेल्या परिस्थितीला त्याने मनोमन स्विकारल्याचे चित्र व्यवस्थित साकारले आहे.
त्या मानाने त्याचा पौगंडावस्थेतील मुलगा कृतीतून नाही तरी विचारातून बंडखोरी दाखवतो. त्याच्या संवेदनशील चेहर्यावर आणि डोळ्यात शालू बद्दल वाटणारे प्रेम आणि आकर्षण त्याने अत्यंत उत्तम रित्या साकारले आहे. मधे मधे त्याच्या चेहर्यावरचे भाव डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या चेहर्याची आणि डोळ्यांची आठवण करून देतात.
फँड्री ही सामाजिक जातीव्यवस्थेच्या काट्याकुट्यांमध्ये अडकलेली शाळकरी प्रेमकथा आहे. त्यातील प्रसंग, अभिनय, समज-गैरसमज, मैत्री आणि प्रेम सर्वच अगदी नैसर्गिक पद्धतीने आपल्यासमोर येते.
>>>>हा समाजव्यव्स्थेवर भाष्य करणारा सिनेमा आहे असं मला अजिबात वाटलं नाही. ही एक त्या वयातली प्रेमकथाच आहे.
हा चित्रपट थेट कशावरच भाष्य करीत नाही. तरीपण शाळकरी प्रेम किंवा आकर्षणाच्या साहाय्याने मांडलेले दलित-सवर्ण चित्र अस्पष्ट नाहीये. अगदी सुस्पष्ट आहे.
>>>>तेव्हां कार्टून सिरीयल्सचे आवाज येत राहतात. हे खूप आवडलं. इतकं की त्याबद्दल विस्कटून सांगावंसं असंही वाटत नाही. ज्यांना अशा जागा टिपता आल्या नाहीत त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते.
खूप आवडलं म्हणून विस्कटून सांगावंसं वाटत नाही हे कांही पटलं नाही. माझ्यासारख्या ज्यांना अशा जागा टिपता आल्या नाहीत आणि आपल्या सहानुभूतीचे लाचार धनी व्हावे लागले त्यांच्यासाठी तरी विस्कटून सांगितल्यास भविष्यात चित्रपट पाहण्याची एक नवी दृष्टी प्राप्त होईल.
'फँड्री' शब्दाचा अर्थ 'डुक्कर' असल्याचं कुठेतरी पुसटसं वाचनात आलं आहे. पण हा शब्द नक्की कुठल्या भाषेत आणि मराठीत असेल तर कुठल्या प्रदेशात, जातीत वापरला जातो हे जाणून घ्यायला आवडेल.
25 Jul 2014 - 5:35 am | खटपट्या
सहमत !!
24 Jul 2014 - 11:37 am | मराठी कथालेखक
मला फँड्री ठीक ठाक वाटला. अगदी फार काही आवर्जुन बघावा अशातला नक्किच नाही.
"सामाजिक विषयावर भाष्य करणारा" न वाटता गावतली , कोवळ्या वयातली एक प्रेमकथा (खरंतर प्रेमापेक्षा आकर्षणाचाच भाग त्या वयात जास्त असतो) असा हा चित्रपट मला वाटला. ग्रामीण, गरीब आणि विशिष्ट जमातीतील मुलाची व कुटुंबाची जीवनशैली टिपण्यात फँड्री यशस्वी होतो. मी शहरात राहिलेला, वाढलेला असल्याने मला वेगळी जीवनशैली बघण्यातला आनंद मिळाला.
पण चित्रपट फारसा रंजक नाही वाटला , शिवाय एकाच ठिकाणी कथा घुटमळत राहत आहे असेही वाटले. ग्रामीण जीवनशैलीचे चित्रण करणारे वळू आणि देऊळ जास्त रंजक वाटलेत.
मला वाटतय की दिग्दर्शकाने जे काही सांगायचं आहे ते स्पष्टच सांगावे , प्रेक्षकांवर सोडून देण्याची पद्ध्त मला तरी फारशी पटत नाही. अशा दिग्दर्शकांना मी म्हणेन की "तुम्ही आधी काय सांगायच ते सांगा ना भौ, मग आम्ही त्यावर (आमचे मत वगैरे ठरविण्यासाठी )विचार करु. पण तुम्हाला काय सांगायचय हे समजायलाच जर आम्हाला विचारशक्ती ताणावी लागत असेल तर तुम्ही दोन-अडीच तासांचा चित्रपट बनवून काय तीर मारले ?" शिवाय प्रत्येकच प्रेक्षक थिएटरमध्ये जावून सिनेमा बघत नाही. छोट्या, अतिछोट्या स्क्रीनवरपण तो बघितला जातो. मी फँड्री सात इंची टॅबलेट वर पाहिलाय. काही सिनेमे तर मी मोबाइलवर पण पाहिलेत. हिंदी सिनेमात अनेकदा संवाद पुटपुटण्याचा प्रकार असतो तो मला अजिबात आवडत नाही. अरे तुम्ही संवाद म्हणताय कुणासाठी ? आमच्यासाठीच ना ? मग नीट ऐकायला तरी येवू द्या की. सुदैवाने मराठीत असा प्रकार नाही. मराठी सिनेमात संवाद छान खणखणीत आवाजात म्हंटले जातात ते मला आवडते.
बाकी फँड्रीबद्दल आणखी सांगायचं तर - हे नाव मला अजिबात आवडलं नाही कोणत्यातरी भाषेत डुकराला फँड्री म्हणतात म्हणून तेच सिनेमाचे नाव ? सिनेमा डुकराचा आहे की जब्याचा ?
आणि शेवटचे दृश्य - जब्या प्रेक्षकांच्या दिशेने दगड फेकतो ... का रे भाऊ आम्ही काय घोडं (किंवा डुक्कर) मारलं तुझं ? उगाच काहीतरी वेगळेपणं, संवेदनाशून्य समाजाला चपराक वगैरे का ? आलेला प्रेक्षक संवेदनाशून्य(च) आहे का ?
24 Jul 2014 - 8:19 pm | नर्मदेतला गोटा
नाव मंदार त्यामुळे आडनाव वाचायची गरज पडली नाही
http://www.misalpav.com/node/20133 हे पहा
25 Jul 2014 - 6:45 am | आशु जोग
>> मी शहरात राहिलेला, वाढलेला असल्याने मला वेगळी जीवनशैली बघण्यातला आनंद मिळाला.
मराठी कथालेखक साहेब तुम्हा शहरी लोकांच्या तोंडावर मारायला आणि फसवायला शहरी लोकांनी काढलेले ग्रामीण चित्रपट काढले जातात. पण ते खरे नसतात.
देऊळ, वळू, लगान ज्यांना ग्रामीण म्हणून आवडतात त्यांना ग्रामीण माहीतच नसते.
http://www.misalpav.com/node/18444
25 Jul 2014 - 11:26 am | मराठी कथालेखक
तसंही असेल कदाचित. पण माझा सांगायचा मुद्दा इतकाच की (खरे/खोटे कसेही चित्रण असेल) ग्रामीण जीवनशैली आणि कुमारवयातली प्रेमकथा ह्याच दोन गोष्टीपुरता फँड्री मर्यादित आहे.
25 Jul 2014 - 11:30 am | आशु जोग
कथालेखक साहेब
http://www.misalpav.com/node/18444
हे पघा की वाइच
(पघा आणि वाइच एकत्र ?)
25 Jul 2014 - 11:45 am | इरसाल
पहाण्यापुरता ठीक आहे म्हणावं लागेल.
माझ एक इलुसं आबजरवेसन....डुक्कर पकडायला पकडायला जी दोरी वापरतात तो इतकी कळकट्ट असते की ज्याच नाव ते आणी ती दोरी ज्या काठीला बांधुन पकडतात ती काठी हलकी, बारीक पण लवचिक नी मजबुत असते.
पिच्चर मधे दोरी एकदम चकाचक नी काठी मरुमरु-मरतुकडी दाखवलीय.