कालच आई म्हणाली आज रामनवमी आहे जरा नमस्कार कर तो चांगली बुद्धी देईल. आता आम्ही कधी तिचा सल्ला ऐकतो कधी नाही ऐकत पण आज काही तरी वेगळेच होते. चेहरे पुस्तकावर एक श्लोक वाचला आणि कळले की हे गीत रामायणातील राम जन्माचे गीत आहे. गीत रामायणातील काही गीते मधून मधून ऐकली होतीच पण निदान माझ्या पिढीला तरी गीत रामायण काय आहे हे कमीच माहिती आहे. ग दि मा आणि सुधीर फडक्यांनी रचलेली गीते आहेत एवढे माहिती होते. मग काय शोधाशोध सुरु झाली आणि हाती लागला खजिना. गीत रामायणाच्या सुवर्ण महोत्सवासाठी सकाळ ने आयोजित केलेल्या सुश्राव्य कार्यक्रमाचे चित्रीकरण तू-नळीवर सापडले. आणि मी ते ऐकण्यात हरवून गेलो.
१ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणीवर या महायज्ञाची सुरुवात झाली आणि एका वर्षानंतर एप्रिल १९५६ मध्ये शेवटचे गीत प्रसारित झाले. महाभारत आणि श्रीकृष्ण दूरदर्शन वर पाहिल्यामुळे दर आठवड्याला नवीन भाग पाहण्याची किंवा ऐकण्यातली जी हुरहूर सर्व घराला असते ती मी अनुभवली आहे. म्हणून फक्त कल्पना करू शकतो त्यावेळेस सर्वजण किती आतुरतेने नवीन भागाची वाट पाहत असतील. गीत रामायणाची कीर्ती इतकी वाढली की नंतर वर्तमानपत्रेही नवीन गीत दर आठवड्याला छापू लागली. ग दि मांची रसाळ भाषाशैली आणि बाबूजींचे श्रवणीय संगीत असा एक दैवी संग गीत रामायणात घडून आला. त्याचबरोबर गायला सुधीर फडके, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर आणि अजूनही बरच प्रथितयश गायक मिळाले.
चैत्र मास त्यात शुद्ध नवमी हि तिथी,
गंध युक्त तरीही वाट उष्ण हे किती.
दोन प्रहरी का ग शिरी सुर्य थांबला …
राम जन्मला ग सखे …राम जन्मला
राम जन्माचे किती सुंदर वर्णन आहे यात. अशीच सुंदर संपूर्ण ५६ गाणी ग दि मांनी लिहिली. ज्यांनी खरच त्याकाळी आकाशवाणीवर ऐकले त्यांचा थोडा हेवा वाटतो आहे पण जे अटल बिहारी वाजपेई म्हणत होते "आपण सर्व तर या काळात विरून जाऊ पण गीत रामायण असेच वर्षानुवर्षे टवटवीत राहील". मला महिती नाही माझ्या पिढीतील आणि माझ्या नंतरच्या किती लोकांना हा सुंदर ठेवा माहिती आहे - म्हणून हा एक छोटा प्रयत्न पुनश्च ओळख करून देण्याचा.
प्रतिक्रिया
20 Apr 2013 - 1:48 am | श्रीरंग_जोशी
गीतरामायण - एक अनमोल ठेवा आहे. आकाशवाणीवरील प्रसारणाच्या या कहाण्या अगोदरच्या पिढीतील लोकांकडून अनेकदा ऐकल्या आहेत.
20 Apr 2013 - 1:49 am | अर्धवटराव
गीत रामायण खरच अद्भूत आहे. प्रासादीक आहे.
अर्धवटराव
20 Apr 2013 - 3:31 am | स्पंदना
होय! गीत रामायण अतिशय रसाळ, भावपूर्ण आहे.
20 Apr 2013 - 6:56 am | जुइ
पुण्यात श्रीधर फडकेंचा गीतरामायणाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला त्याची अनुभुती काही औरच होती.
20 Apr 2013 - 7:00 am | शुचि
रसाळ, भावपूर्ण, अनमोल, अद्भुत व सर्वात आवडलेले, अर्धवटरावांनी दिलेले विशेषण प्रासादिक!!!!
20 Apr 2013 - 10:29 am | अक्षया
आई कडुन लहानपणा पासुन नेहमीच गीतरामायणाचे कौतुक आणि गाणी ऐकत आले आहे.
गदिमां चे शब्द आणि जोडीला सुधीर फडके याच्या चाली. प्रत्येक गाणे अप्रतीम आहे.
प्रत्येक गाण्याचा एक धागा होऊ शकेल.
हे गाणे विशेष आवडते. आमचा घराजवळ एक जुने रामाचे मंदीर होते. दरवर्षी तिथे रामनवमीचा उत्सव असायचा. रामजन्माचा वेळी दुपारी १२ वाजता 'राम जन्मला ग सखे' हे गाणे ऐकायला मिळायचे. खुप प्रसन्न
वातावरण असायचे. रामाची सुदर मुर्ती, तो पाळणा,आजीने दिलेला सुंठवडा, दवण्याचा सुगंध..सगळे डोळ्यासमोर आले. त्या दिवसांची आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद..:)
20 Apr 2013 - 11:21 am | मदनबाण
गीतरामायण खरचं अद्भुत आहे. :)
काल रामनवमीच्या निमित्त्याने किर्तन ऐकण्याचा योग आला,बर्याच दिवसाने चांगल्या किर्तनाचा आस्वाद घेतला,आणि मस्त पैकी जोरदार आवाजात शंख देखील वाजवुन घेतला. :)
भजो रे भैया राम गोविंद हरी ।
राम गोविंद हरी भजो रे भैया राम गोविंद हरी ॥
जप तप साधन नहिं कछु लागत, खरचत नहिं गठरी ॥
संतत संपत सुख के कारन, जासे भूल परी ॥
कहत कबीर राम नहीं जा मुख, ता मुख धूल भरी ॥
संत कबीर