नमस्कार मंडळी
कालपरवाच गोव्याहून परतत असताना वाटेत सावंतवाडीला थांबलो होतो. बरोबरच्या ३-४ मित्रांना नाश्ता करायचा होता शिवाय सावंतवाडीमध्ये काही लाकडी खेळणी किंवा इतर लाकडी वस्तू मिळाल्या तर खरेदी करायची होती.
वाटेत एक दोन ठिकाणी विचारत विचारत चितारी आळीत पोचलो.सकाळचे ९-१० वाजले होते त्यामुळे फारशी दुकाने उघडलेली नव्हती.आम्हीही काही घाई नसल्याने रमत गमत पूढे चाललो होतो.कुठे काही चांगले दिसले, आवडले कि त्या दुकानात शिरायचे आणि वस्तू बघायच्या , भाव पटला तर विकत घ्यायच्या असे चालले होते.
खरेदी करता करता असेच एका दुकानात शिरलो आणि निरनिराळ्या वस्तू बघायला सुरुवात केली. एक लाकडाची जीप उचलून किंमत विचारली तर दुकानदार म्हणाला ३०० रुपये. दुसरी जरा वेगळी जीप बघितली तर किंमत ८०० रुपये. तीच तऱ्हा कार मध्ये सीटवर घालायच्या मण्यांच्या कव्हरची. एकाची किंमत वाजवी तर दुसऱ्या तशाच दिसणाऱ्या कव्हरची किंमत १००० रुपये . हे काय गौडबंगाल आहे ते कळेना. जरा खोलात जाऊन विचारू लागलो तसा दुकानदार मोकळेपणाने माहिती देऊ लागला.
पुढचा संवाद काहीसा असा झाला
मी- का हो? वस्तू तर सारखीच दिसतेय मग किंमतीत इतका फरक का?
दु- अहो तो चायनाचा माल आहे. म्हणून स्वस्त पडतो.
मी- कसे काय ?
दु- आता असे बघा.आम्ही जी वस्तू हाताने तयार करतो ती बनायला एका कारागीर ३-४ दिवस लावतो. त्याचा पगार ,लाकडाचा खर्च आणि नफा वगैरे धरून ती वस्तू मला ८०० रुपयाला विकायला लागते.पण जर मी ती वस्तू चायनाला पाठवली तर तो नमुना बघून तिकडून तशीच वस्तू ३० रुपयात बनून इकडे येते. मग ती मी ३०० ला जरी विकली तरी फायदा होतो.अट फक्त एकच, ऑर्डर निदान एका कंटेनरची पाहिजे. तरच ते लोक ऑर्डर घेतात.
मी- म्हणजे तुमचे चायनाच्या व्यापारी वर्गाशी कॉन्टॅक्ट असतात ?
दु- त्याची काय गरज आहे ?मुंबईला बरेच एजंट लोक आहेत. ते आमच्याकडे येतात आणि हे काम करतात.
मी- म्हणजे तुमच्या दुकानातील सर्व वस्तू चायनीज आहेत?
दु- नाही नाही, काही ठराविक वस्तू इथल्या लोकलचा असतात जसे कि भातुकलीची खे ळणी, फणी करंडा ,बैलगाडी ह्या वस्तू फार खपत नाहीत त्यामुळे हाताने बनवूनच विकतो. ज्या वस्तूंना मागणी फार त्या आम्ही तिकडून बनवून घेतो.
मी- चायनाचा माल स्वस्त आहे, पण टिकाऊपणाचे काय?
दु- अहो आपले गिर्हाईक टिकाऊपणा कुठे बघते? परवाच एकजण माझ्याशी या वस्तूंवरून अतिशय घासाघीस करू लागला. मी त्याला ३०० रुपयाची चायना मेड वस्तू दाखवून ३० रुपये किंमत सांगितली,त्यावर तो म्हणाला कि २५ ला देता का? एकदम ६ वस्तू घेतो. आता बोला.
मी-असे किती दिवस चालणार ?
दु- चालेल की. मी सरळ सांगतो कि हि वस्तू इथली आहे आणि हि चायना मेड आहे ,तसे सर्व दुकानदार कबूल करत नाहीत.शिवाय कितीही सुंदर कारागिरी असली तरी महागड्या वस्तू घेणारे गिर्हाईक इथे फार कमी.मग आम्हीसुद्धा मागणी तसा पुरवठा करतो.बरे वाटत नाही पण काय करणार?धंदा तर चालला पाहिजे?
काय बोलावे ते मला समजेनासे झाले.मला वाईट पण वाटत होते, पण त्यांचे बोलणे पटत हि होते.खरेदी करताना सामान्य माणूस त्या त्या वेळची गरज आणि खिशाची सोय बघतो. पण त्या पाठचे मोठे राजकारण बघायला त्याला कुठे वेळ असतो? उद्या जर आपण अशाच चायनीज वस्तू स्वस्त आणि मस्त मिळतात म्हणून खरेदी करत राहिलो तर सावंतवाडीची खेळणी ,येवल्याची पैठणी, शिवकाशी चे फटाके, आणि गोव्याची फेणी सुद्धा चायना मधून आलेली असेल. स्थानिक कारागीर मरतीलच पण सगळ्यात दुःख म्हणजे ती कलाच मरेल कारण कारागीर ती पुढच्या पिढीला कदाचित शिकवणार नाहीत. आणि मग चेन्नई ,जयपूर,कलकत्ता,लखनौ,म्हैसूर सगळीकडे एकसारख्याच दिसणाऱ्या चायनीज वस्तू विकत घ्याव्या लागतील.
म्हणून म्हणतो -एकवेळ आपले सैन्य सीमेवर चायनाशी जिंकेल, पण देशातील बाजारपेठ जर त्यांनी काबीज केली तर आपण तसेही हरलेले असू. तुमचे काय मत ?
प्रतिक्रिया
11 Oct 2017 - 3:57 am | सौन्दर्य
तुम्ही खेळण्यांची गोष्ट करता, इथे 'युएस'मध्ये हिंदू देवदेवतांची चित्रे, तसबिरी, मुर्त्या ह्या सुध्दा 'मेड इन चायना' मिळतात. मराठमोळे दिवाळीचे कंदील (आकाश कंदील), समया, उदबत्त्या, रांगोळ्यांची डिझाइन्स, हे देखील पूर्णपणे 'मेड इन चायना'च आहे. अश्या वस्तूंची किंमत इतकी कमी असते की त्या काही दिवस, महिने चालल्या तरी पैसे वसूल होतात. मला भारतातील चायना प्रोडक्ट्सच्या गुणवत्तेविषयी फारशी माहिती नाही, पण इथल्या मेड इन चायना वस्तू बऱ्यापैकी टिकतात.
अमेरिकेतील शेकडा ७५ ते ८० टक्के वस्तू मेड इन चायनाच आहेत. कपडे, खास करून सुती (कॉटन) हे बांगला देश, नेपाळ, इंडोनेशिया, थायलंड वगैरे देशात बनलेले असतात. कित्येक प्रसिद्ध ब्रांड त्यांचे कपडे अश्याच देशात बनवून घेतात. २०१२ साली बांगलादेश मधील एका बिल्डींगला आग लागली होती ज्यात जगप्रसिद्ध कंपन्यांचे रेडीमेड कपडे शिवले जात होते, त्यात ११२ कामगार मृत्युमुखी पडले. त्या बिल्डींगमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा प्रणाली नव्हत्या, कित्येक गाळे हे गैरकायदेशीर होते. टीव्हीवर ह्या बातम्या आल्यावर काही काळ लोकांनी अश्या सर्व रेडीमेड ब्रांडवर बहिष्कार टाकला होता, पण आता ते सर्रास विकले जात आहेत.
माझ्या परिचयातील अनेक गोऱ्यानी 'मेड इन चायना' प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकला आहे आणि शक्यतो त्याचे पालन केले जाते. जेथे अगदीच अशक्य होते तेथेच फक्त 'मेड इन चायना' वस्तू विकत घेतली जाते. देशाविषयी असणारे प्रेम हेच त्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आपल्या देशातील अज्ञान, गरीब-श्रीमंतातील दरी, साधारण मानसिकता, इम्पोर्टेड वस्तूंचे आकर्षण, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशी उत्पादकांनी आत्तापर्यंत अमुक एक वस्तूची आकारलेली अव्वाच्या सव्वा किमत बघता (किंवा केलेली पिळवणूक बघता), चायनाच्या वस्तूंवर सार्वजनिक बहिष्कार घातला जाईल ह्याची शक्यता तशी कमीच दिसते.
हो, मात्र जर चायनाशी युद्धच झाले तर आपली जनता एकजूट होऊन चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालेल ह्यात शंका नाही.
11 Oct 2017 - 10:13 pm | साधा मुलगा
नागपूरच्या मेट्रो चे डबे चीनहून आयात होणार आहेत, आपण लाख बहिष्कार टाकू, एवढ्या मोठ्या invetsment ला आपल्याकडे पर्याय आहे का?
पर्याय असायला हरकत नाही, तर मग भारतीय बनावटीचे डबे का नाही वापरले? हे मला कळले नाही.
11 Oct 2017 - 11:05 pm | उदय
लेखाचा एकंदर सूर असा आहे की चायनीज मालाला काही क्वालिटी नाही. चायनीज म्हणजे स्वस्त पण फडतूस. माझा अनुभव अगदी उलट आहे. चायनीज मालाची क्वालिटी मोजलेल्या पैशाच्या तुलनेत चांगली असते. याउलट पैसे जास्त द्यायची तयारी असूनही, चांगल्या दर्जाची भारतीय वस्तू सहजासहजी मिळत नाही, किमान भारतात तरी.
12 Oct 2017 - 3:18 pm | गंम्बा
उदय यांच्याशी सहमत दर्जा बद्दल.
ग्राहक मूर्ख नसतो. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करु न शकणारे व्यवसाय टिकत नाहीत. सरकारनी पण ते टिकवायच्या मागे लागु नये.
12 Oct 2017 - 3:07 pm | साहना
विकत घेणारे लोक मूर्ख आहेत असा सूर वाटतो पण प्रत्यक्षांत लोक आपला पैसा खर्च करताना विचार करूनच खर्च करतात. त्यामुळे इथे काही करण्याची गरज आहे असे वाटत नाही. ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी खुशाल चिनी माल घ्यावा आणि पैसा वाचवावा. त्यांत काहीही गैर नाही .
17 Oct 2017 - 1:23 am | राजेंद्र मेहेंदळे
साहना, गम्बा आणि लोकहो
लेखाचा विषय चायनीज ते ते फडतुस किवा अल्पजीवी असा नाहिये.किवा आजकालच्या जागतिक बाजारपेठेला विरोध करणे हा पण हेतु नाहिये. भारत, बांगलादेश्,श्रीलंका सुद्धा वस्तु एक्स्पोर्ट करतातच की.किवा आपणही सॉफ्टवेअरची कामे भारतातुन स्वस्तात करुन देतोच.
प्रश्न असा आहे कि पिढ्या न पिढ्या जोपासलेल्या कला या गदारोळात लोप पावत चालल्या आहेत. जेव्हढा खप जास्त तेव्ह्ढा उत्पादन खर्च कमी या गणिताप्रमाणे आज लाकडी खेळणी,उद्या आकाशकंदील आणि पणत्या, परवा देवादिकांच्या मुर्ती आणि असे अजुन काय काय आपण चायनाकडुन बनवुन घेत गेलो तर पुढच्या पिढीला नईलाजने फक्त चायनीज एकसुरी दिसणार्या वस्तुंचाच पर्याय उरेल. शिवाय स्थानिक कारागिर मरतील, आणि पैशाच्या दृष्टीनेही आपले चलन बाहेर जातेय.
चलनाच्या मुद्द्यावर जाणकार अधिक प्रकाश टकु शकतील.
12 Oct 2017 - 5:01 pm | वेल्लाभट
मुळात सरकार च आपली इतकी लूट करत आलीयत की चायना चं काय घेऊन बसलात.
किमतीच्या तुलनेत क्वालिटी मोजायची? आणि कराच्या तुलनेत सुविधांचं काय?
तो कैक पटीने मोठा लॉस नाही का आपला? या सरकारला नाही हं मी ओव्हर ऑल मानसिकतेला म्हणतोय. ही आजची कथा नव्हे. हे असले मुद्दे पसरवून कोटी कोटी लोकांची यूं दिशाभूल होत आलीय कोण समजलं का कधी. चायनीज माळांवर मोठ्या हिरीरीने बहिष्कार वगैरे घातला लोकांनी. अगदी नाक्या नाक्यांवर वाद झाले. 'साल्या हॉटेलमधे १००० रुपये अस्से मोजतोस मग इंडीयन माळेसाठी ५० रुपये जास्त का नाही?' वगैरे. बरं ती इंडीयन गोष्ट इंडियनच आहे कोण हमी देणार?
जोवर इथला माणूस अन माणूस संप करत नाही, जे कधीच होणार नाही, तोवर काहीही बदलंत नाही. निवांत रहा.
13 Oct 2017 - 12:35 pm | दुर्गविहारी
बरेच चर्वित चर्वण करण्यासारखा विषय आहे हा. यात दोन्ही बाजु नक्कीच आहेत.
दर खेपेला आपली गरज एखादी वस्तु खुप काळ वापरण्याची नसते. उदा. एक ड्रॉईंग वाचण्यासाठि मला भिंग हवे होते, नंतर मला कदाचित त्याचा काहिही उपयोग नसेल तर मी विनाकारण भारतीय बनावटीचे १५०/- रु ला खरेदी करण्यापेक्षा ४०/- चायनीज खरेदी करेन.
त्या उलट दिवाळीची माळ जी कदाचित पाच, सहा वर्ष वापरण्यासारखी आहे, त्यासाठी भारतीय बनावटीची खरेदी करेन. माझा अनुभव तरी भारतीय बनावटीच्या वस्तु दर्जेदार असतात असाच आहे. त्यामुळे थोड्या महाग असल्या तरी भारतीय बनावटीच्या वस्तुच्या खरेदीला प्राधान्य देईन.
शेवटी गरजेप्रमाणे व्यक्तिनुरुप या बाबी बदलतील असे वाटते.
14 Oct 2017 - 8:52 am | सुखीमाणूस
स्वस्तातल्या वस्तु, use and throw, अशा चीनी मालामुळे कचरा खुप वाढतो
त्यामुळे आवश्यकता असेल तेथेच चीनी माल वापरावा.
नेहमीच आपल्याकडुन प्रदुषणात भर पडणार नाही याची काळजी घ्यावी
14 Oct 2017 - 6:42 pm | नितिन थत्ते
मुळात लोकल वस्तू ३०० रुपयांना का बनू/विकता येऊ शकत नाही हा प्रश्न आहे. कामगारांचे पगार हे एवढे काही जास्त नसतात.
आपल्याकडे दोन डेटा पॉइंट्स आहेत. चायनाची गाडी ३०० ला आणि स्थानिक गाडी १००० ला.
समजा कामगाराचा पगार शून्य झाला तर जी भारतीय वस्तू १००० रुपयांना पडते ती ३०० ला देता येईल का?
नसेल तर का नाही?
15 Oct 2017 - 11:02 pm | टर्मीनेटर
सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, म्हणजे पर्यायाने कोकणातला प्रदेश. जिथल्या लोकांची मानसिकताच "माझं नुकसान झालं तरी चालेल पण इतरांचा फायदा नाही झाला पाहिजे" ह्या टाईप ची असते तिकडे अजून वेगळे काय अपेक्षित असणार? माफ करा माझी प्रतिक्रिया थोडी बोचरी वाटेल पण जवळपास सगळा भारत फिरून झाला आहे आणि काही विदेशही... पण कोकणातल्या सारखा घाणेरडा अनुभव कुठेही आला नाहीये, अगदी खाण्या पिण्या पासून वस्तू खरेदी परेंत सगळ्याच बाबतीत.
16 Oct 2017 - 11:19 am | टवाळ कार्टा
एकदा पुण्यात फेरी मारा ;)
16 Oct 2017 - 11:41 am | पगला गजोधर
पुण्यातल्या एखाद्या पोरीने तुला रिजेक्ट मारलेला काय !
16 Oct 2017 - 9:31 pm | टर्मीनेटर
टका... पुण्याला खूपच वेळा जाणे येणे होते, पण जेवढे विनोद पुण्यावर होतात (बऱ्याच अतिशयोक्ती सोडल्यातर) तेवढा वाईट अनुभव नक्कीच नाही आलाय. कोकणातल्या सारखी मनोहर निसर्गसंपदा तारकर्ली, देवबाग, मालवण पासून मुरुड, अलिबाग, किहीम, नागाव मांडवा पर्यंत गोव्यात पण नाहीये तरी तिथे देश-विदेशातले पर्यटक येतात, त्यांना इथे आणणे सहज शक्य आहे पण संकुचित मानसिकता आडवी येते. उदाहरणार्थ एखादा पर्यटक तिथे येतो तेव्हा त्याला रोज मालवणी जेवण खायला घालू बघाल तर कसे चालेल? कोंबडी वडे आणि अनेक मालवणी पदार्थ कितीही रुचकर असले तरी जर पर्यटकांना खाण्या पिण्याचे मल्टिपल ऑप्शन्स दिले नाहीत तर कसे पर्यटक तिथे येतील? दुसऱ्या राज्यांतून आलेल्या पर्यटकांशी बोलताना ह्या समस्या प्रकर्षाने जाणवतात. विशेषतः: शाकाहारी लोकांचे खूप हाल होतात असे जाणवते. अरे ज्याला जे खायचे असेल ते पर्याय उपलब्ध करून द्या कि... मग बघा कसा पर्यटन व्यवसाय बहरतो कोकणातला ते.
16 Dec 2017 - 11:08 am | पैसा
२५ वर्षांपूर्वी रत्नागिरीत पांढरा समुद्र नामक एक सुमारे ३ किमी लांब चंद्रकोरीच्या आकाराचा अगदी सुरेख, सुरक्षित आणि स्वच्छ किनारा होता. मिरामारच्या धर्तीवर विकसित करून प्रचंड प्रमाणात पर्यटक आकर्षित करता आले असते. पण रत्नागिरीकरना त्याचे काही महत्त्व नाही. तिथे मच्छिमार जेट्टी बांधकामे सुरू झाली.
कालच गेले तर एकूण चार जेट्या दिसल्या. पाण्याकडे प्रचंड उतार तयार झाला आहे. मच्छिमार जेटी सुद्धा महत्त्वाची आहे, पण जरा पर्यावरण वगैरेचा विचार करून किनारा वाचवता आला असता.
आता स्थानिक लोकही तिकडे फिरकत नाहीत. याचे एक कारण म्हणजे खोल झालेले पाणी, किनाऱ्याला समांतर रस्त्याला लागून प्रचंड मोठी झोपडपट्टी आणि त्याहूनही वाईट म्हणजे या ३ किमी वाळूच्या प्रचंड किनाऱ्यावर अंदाधुंद चालू असलेला वाळूचा उपसा.
या अशा वाळूच्या विहिरीचा फोटो काढायलाही भीती वाटली. आजूबाजूला सगळे अमराठी लुंगीवाले. किनाऱ्याजवळ घरे असलेले स्थानिक लोक इथली वाळू काढत नाहीत, तेही नाराजीने बोलत होते, पण मोठ्याने बोलायची हिम्मत कोण करणार?
5 Jan 2018 - 7:33 pm | राजेंद्र मेहेंदळे
रत्नागिरिच कशाला, जरा आजुबाजुला नजर टाकली तर नैसर्गिक साधन सामुग्री लुटण्याचे प्रकार ईथे शहरातही सापडतील. मग ते टेकडीफोड करुन जमिनी बळकावणे असो किवा झाडे तोडणे असो, किवा वाळु उपसा करणे असो.
कात्रज-देहुरोड बायपासवर बावधनच्या आसपास मागच्या ४-५ वर्षात बघा किती ठिकाणी भराव घालुन जमिनी केल्यात आणि आता तिथे हॉटेल्स आणि गॅरेजेस चालु झालीत. शिवाय दुसर्या बाजुला डोंगरफोडही जोरात आहे. मागच्या ३ महिन्यातच ३-४ नवीन हॉटेल्स आणि ग्रॅनाईटची दुकाने उभी राहिली आहेत.
16 Dec 2017 - 7:58 am | babu b
भारतातील लोक त्यांचे ज्ञान विकायला परदेशात जातात. आपल्या देशातूनही माल निर्यात होतो.
पुर्वीच्या काळी गावचाच कारागीर अन गावचेच गिर्हाइक .. त्यामुळे ३ दिवसात एक वस्तू तयार होणे चालायचे. आता असे करून कसे चालेल ?
स्वस्त दर्जाच्या बनावट वस्तू भारतातही तयार होतात.
5 Jan 2018 - 7:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण स्थानिक कला वगैरे काही आहे कि नाही?
आणि जर थांबायची तयारी नसेल तर नकली पैठणी, नकली दागिने यावर ज्यांना समाधान मानायचे त्यांनी मानावे.
उत्तम वस्तूसाठी वाट पहावी लागली तरी चालेल या मताचा मी आहे.