गाभा:
1. 108 क्रमांक दाबून तुम्ही रुग्णवाहिका मागवू शकता व ही रुग्णवाहिका तुम्हाला कुठले ही शुल्क न देता सेवा देते.
2. टोल भरलेल्या पावतीवर हेल्पलाईन क्रमांक असतो, त्यावर तुम्ही त्या त्या टोल झोन मध्ये रस्तावर दगड असो, अपघात असो, किंवा तुमचे टोल रक्कम भरलेले वाहन बंद पडले असेल तर त्यासाठी लागणारी क्रेन वा इतर सुविधा तुम्हाला मुफ्त उपलब्ध असतात.
इत्यादी... अश्या अनेक गोष्टी असतात, पण आपल्याला याची माहिती नसल्याने आपली आर्थिक फसवणूक होते, तेव्हा अश्या अनेक सेवा, गोष्टी असतील ज्या अनेकांना माहिती नाहीत पण तुम्हाला माहिती आहे.. तर कृपया येथे लिहा जेणे करून त्याचा अनेकांना उपयोग होईल.
प्रतिक्रिया
10 Aug 2017 - 11:06 pm | विशुमित
खरे आहे हे??
जबरदस्त माहिती आहे.
धन्यवाद..!!
10 Aug 2017 - 11:14 pm | एस
१०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा निःशुल्क असते. ती आपल्याला जवळच्या सरकारी वा निमसरकारी रुग्णालयात पोहोचवते. खासगी रुग्णालयात पेशंटला नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर बहुधा माझ्या माहितीप्रमाणे करता येत नाही.
10 Aug 2017 - 11:28 pm | विशुमित
याला पण कंडिशन्स अप्लाय आहेत तर?
10 Aug 2017 - 11:38 pm | दशानन
http://bvgindia.com/emergency-medical-service/
गरजेची माहिती येथे उपलब्ध आहे.
10 Aug 2017 - 11:36 pm | दशानन
असे नसून जवळचा उत्तम! हा नियम आहे, माझ्या माहितीनुसार.
11 Aug 2017 - 11:57 am | मोदक
निशुल्क सेवा आहे, त्यामध्ये एक डॉक्टर आणि एक हेल्पर कम ड्रायव्हर असतो. आपण सांगू त्या खाजगी / सरकारी दवाखान्यात सोडतात.
कोणतीही अट नाही.
स्वानुभव.
11 Aug 2017 - 12:00 pm | मोदक
आता लगेच "कोल्हापूरातल्या पेशंटला दिल्लीला सोडतील का..?" अशा शंका काढू नयेत. ;)
11 Aug 2017 - 12:30 pm | एस
अरे वा! हे फारच छान आहे.
11 Aug 2017 - 1:39 pm | इरसाल
सोसायटी मधील एक वयस्कर गृहस्थ (ज्या घरात ते धरुन ३ जण) रात्री १०/१०:३० ला अत्यवस्थ झाले. १०८ ला कॉल करुन अॅम्बुलन्स आली. सध्या गाडीचा ड्रायव्हर कम मदतनीस त्याने येवुन तपासले म्हणे गेले. मोबाईल सदृश्य उपकरणाला छातीवर ठेवुन हार्ट्बीट सेन्स करण्याचा प्रयत्न केला पण काहीच नाही. तो म्हणे गेले हे कन्फर्म.
त्यांच्या कुटुंबियांच्या परिस्थीतीला आणी वेळेची गरज पहाता त्याला रुग्णालयात न्यायची विनंती केली. त्यानुसार त्याने जवळच्या खाजगी रुग्णालयात सोडले. (कारण त्यांचा इलाज पुर्वी पासुन तिथेच होत होता हे एक कारण). सगळी सेवा फुकट.
रुग्णालयात सोडतात परतीची योजना/अरांज्मेंट आपल्याला बनवायची असते.
11 Aug 2017 - 2:03 am | रेवती
अरे, ग्रेट माहिती.
11 Aug 2017 - 10:03 am | बार्नी
काही उपयुक्त लाईफ हॅक
१) अभ्यास करताना किंवा काम करताना मन लागत नाहीये ? , मग कानात हेड फोन टाका आणि " Coffitivity " ह्या साईट वर जा . एम्बिएन्ट साउंड ने सर्जनशीलता व एकाग्रतेमध्ये सुधारणा होत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. मी नेहमी अभ्यास करताना व्हाईट नॉइज ऐकतो. कॉफी शॉप , पाऊस असे विविध ऑपशन्स इथे उपलब्ध आहेत. . तसेच Soundcloud वर इतरही लिस्ट्स उपलब्ध आहेत .
२) नेहमी , नेहमी फोन चेक करण्याची, इंटरनेट वर जाण्याची सवय असल्यास , " Forest " हे अँप डाउनलोड करा . ह्या अँप मध्ये तिने सेट करून एक झाड लावले जाते . जर आपण मध्येच फोन वापरला तर ते झाड मरून जातं.
3) आपल्या जवळची महत्वाची कागतपत्रांची स्कॅन केलेली कॉपी ड्रॉपबॉक्स किंवा Digilocker मध्ये ठेवा. अडचणीच्या वेळी उपयोगी ठरेल.
४) जर गेली काही दिवस तणावात असाल , कुणाकडे तरी मन मोकळे करायचे असल्यास " Yourdost" इथे जा . इथे कॉउंसलर्स शी फ्री संवाद साधण्याची सोय आहे .
5) फोन वर येणारे फालतू मेसेज बंद करायचे आहेत ?. " Spamzee" हे अँप वापरा . हे अँप आपली तक्रार सरळ TRAI ला कळवते.
वेळ मिळाल्यास अजून लिहीन .
11 Aug 2017 - 12:12 pm | सुबोध खरे
फारच छान माहिती आहे.
धन्यवाद
12 Aug 2017 - 8:37 am | आगाऊ म्हादया......
coffitivity हे भारीच आहे प्रकरण, थँक्स.
yourdost वापरून पाहिलं, लिहून, टंकन करून बोलावं लागतं, मी सहज वापरून पाहिलं होतं. विशेष कौतुकास्पद वाटलं नव्हतं पण मन मोकळं करायला उत्तम पर्याय.
12 Aug 2017 - 9:26 am | गुल्लू दादा
खूपच उपयुक्त माहिती.
11 Aug 2017 - 11:49 am | arunjoshi123
१०८ हा नंबर मोबाईलबरून कसा डायल करतात? म्हणजे फक्त १०८ इतकंच डायल केलं तरी ...?
11 Aug 2017 - 12:27 pm | दशानन
हो मोबाईलवर 108 डायल करून.
11 Aug 2017 - 1:33 pm | नन्दादीप
मोबाईल वरून १०८ ला नुसता मिसकॉल जरी दिलात तरी पुढच्या मिनीटाला त्यांचा कॉल येतो. आणिबाणि च्या वेळी उपयोगी पडते ही सुविधा. तसेच त्यांचा Fire Brigade, Police यांच्याशी सुद्धा सम्पर्क असतो. म्हणजेच एका फोन वर तिन्ही सेवा उपलब्ध होवू शकतात.
11 Aug 2017 - 1:29 pm | नन्दादीप
१०८ - मोफत रुग्णवाहिका. अपघात स्थळ अथवा ईच्छित स्थळा पासून जवळील सरकारी रुग्णालय तसेच परिस्थितीनुसार जवळील उपलब्ध रुग्णालय (शक्यतो शासकीय अथवा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (आधीची राजीव गान्धी जीवनदायी आरोग्य योजना) अन्तर्गत असलेली खाजगी रुग्णालये या ठिकाणी नेले जातात.) येथे नेले जातात. या रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षीत डॉक्टर असतो. थोडक्यात ICU On Wheels.
१०४ - मोफत वैद्यकीय सल्ला .
१०२ - गर्भवती मातांसाठी मोफत रुग्णवाहिका. प्रसूती करिता जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी तसेच प्रसूति पश्चात घरपोच सोडण्यासाठी १०२ डायल करावा. तसेच प्रसूति दरम्यान काही गुन्तागुन्त झाल्यास Higher Center (शासकीय रुग्णालयात) ला नेण्यासाठी देखील मोफत रुग्णवाहिका मिळते.
(१०२ व १०८ या दोन्ही टोल फ्री क्र.वरून गरोदर मातेला दवाखान्यात नेण्यासाठी मोफत रुग्णवाहिका मिळते)
PCPNDT : १८०० ११० ५०० गर्भलिंग निदान जर केले जात असेल तर त्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी टोल फ्री नम्बर.
11 Aug 2017 - 5:43 pm | रेवती
हा धागा वाचनखूण म्हणून साठवतिये.
चांगली माहिती आहे.
11 Aug 2017 - 5:53 pm | भीडस्त
ही सेवा भारत विकास ग्रुप या हणमंतराव गायकवाड यांच्या उपक्रमामार्फत दिली जाते . रहिमतपूरचा साध्या घरातला हा मुलगा.
विचारांची योग्य दिशा, नियोजन, परिश्रम यांच्या बळावर गगनाला गवसणी घालता झाला आहे.
परवाच एक विडिओ पाहिला त्यांचा. 'एबीपी माझा'च्या यू ट्यूब चॅनेलवर होता.
इथे
हॅट्स ऑफ.
11 Aug 2017 - 6:30 pm | मोदक
11 Aug 2017 - 6:22 pm | त्रिवेणी
हो abp माझा वर होती मुलाखत. शेतीच्या ते खतांच्या नॅनो technology तर मस्त माहिती सांगितली.
12 Aug 2017 - 9:07 am | आगाऊ म्हादया......
१०८ ही संपूर्ण नि:शुल्क सेवा आहे. भारत सरकार द्वारे (राष्ट्रीय आरोग्य मिशन) अंतर्गत ही सेवा पुरवण्यासाठी BVG कडे ५ वर्षाचे कंत्राट आहे. डॉ. शेळके, डॉ. टिळेकर, डॉ. कुमार ह्यांनी हे कंत्राट मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. १०८ हा नंबर कुठल्याही मोबिल अथवा landline वरून फिरवा, रुग्णवाहिका दारात येईल. Pre-hospital care हा ह्या सेवेचा पाया आहे. म्हणजे, ह्या इस्पितळातून त्या इस्पितळात एक्स रे काढायला नेणार नाहीत. मात्र मेडिकल इमर्जन्सीसाठी ही व्यवस्था आहे, घर ते इस्पितळ.
गाडीवर प्रशिक्षित ड्रायवर आणि डॉक्टर आहेत. हे डॉक्टर फक्त BAMS अथवा BUMS नसून, त्यांना इमर्जन्सी मेडिकल टेक्नीशिअन advanced ह्या कोर्स चे प्रशिक्षण "सिंबायोसिस विद्यापीठाकडून व महाराष्ट्र EMS" च्या प्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. ट्रेनिंग डिपार्टमेंट हे एक स्वतंत्र स्क्रीनिंग डिपार्टमेंट आहे. ज्ञान, soft skills, EMSसाठी योग्यता हे पाहूनच डॉक्टर ला certify केले जाते. केवळ प्रशिक्षण आहे म्हणून कुणालाही नियुक्त न करता त्या डॉक्टरांच्या इतर बाबीही ओळखल्या जातात जेणेकरून रुग्णाला व नातेवाईकांना त्रास होऊ नये.
ह्यातून बाहेर पडलेल्या डॉक्टर साठी रीफ्रेशर ट्रेनिंग पण असते. ज्ञान सतत अद्यतनीत केलं जातं.
आता आणखी माहिती सांगतो. तुम्हाला, तुम्ही म्हणाल त्या रुग्णालयात न्यायला आम्ही बांधील आहोत. अहमदनगर ते पुणे, कोल्हापुरातून कर्नाटक मधील हॉस्पिटल असे कॉल दिवसाला एक ह्या दराने होत असतात. खाजगी हॉस्पिटल मध्येही नेले जाते. रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक परवानगीचा फॉर्म भरून घेतला जातो.
भारतात सगळीकडे १०८ हा नंबर लागू करण्याच्या ते प्रयत्नात आहेत. त्यामुळे सेवेचा लाभ घेण सोपं होईल. महाराष्ट्रात हे कंत्राट BVG कडे आहे मात्र इतर राज्यात GVK वगैरे कंपन्या चालवतात. फायर dept., पोलीस ह्या सर्वांना आपोआप कॉल १०८ तर्फेच केला जातो. त्यामुळे तीही काळजी नाही.
महाराष्ट्रात ९३७ गाड्या आहे बर का, बेसिक लाईफ सपोर्ट आणि advanced लाईफ सपोर्ट मिळून. खरच जवळपासच्या इस्पितळात दिसली तर आतून बघून घ्या. काय काय आहे ते कळेल. १०८ च app डाउनलोड करा. म्हणजे गरजेच्या वेळी app वरून फोन लावला की पत्ता सांगण्यात वेळ जात नाही, डायरेक्ट GPS लोकेशन कळते. अभिमानास्पद बाब अशी की दिल्लीच कंत्राट BVG कडेच आहे आणि आंध्र प्रदेश मिळण्याच्या वाटेवर आहे. ऑफीसला पळतो आत्ता. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा.
गल्लीबोळात सोपं जावं म्हणून मुंबईत बाईक अॅम्बुलंस पण launch केल्या आहेत. ते आधी जातील, उपचार सुरु करतील तोवर मोठी अॅम्बुलंस पोहोचेलंच.
आगाऊ म्हदया
ट्रेनिंग कोऑर्डीनेटर (महाराष्ट्र)
महाराष्ट्र EMS.
13 Aug 2017 - 8:10 am | फारएन्ड
तुम्ही फार चांगले काम करत आहात. धन्यवाद.
11 Sep 2017 - 8:22 pm | दशानन
तुम्ही खरंच महत्वाचे काम करत आहात.
आणि याच प्रतिसादात एक कळकळीची विंनती, कृपया रुग्णवाहिका मागून येत असेल तर त्याला पुढे जाण्यासाठी जागा अवश्य द्या पण त्याचा उपयोग करून तिच्यामागे आपले वाहन दामटण्याचा प्रयत्न देखील करू नका. तुमच्या एका चुकीमुळे कोणाचा तरी जीव धोक्यात येऊ शकेल, प्लिज असे करू नका.
12 Aug 2017 - 11:53 am | arunjoshi123
मला बीव्हीजी कंपनीचा अत्यंत अभिमान आहे. उभ्या देशात मिनिमम वेजेस अॅक्ट अत्यंत प्रामाणिकपणे पाळणारी ही एकमेव कंपनी आहे (तितक्या प्रमाणात लेबर पुरवणारी) . भारतात सर्वच कंपन्या अशा झाल्या तर ५-१० वर्षांत देश जगात प्रत्येक देशाला मागे टाकेल.
===============
ज्यांना मराठि गोष्टींचा अभिमान करून घ्यायला आवडतं त्यांना हे एक नाव रिकमेंड करीन.
12 Aug 2017 - 12:15 pm | कुमार१
चांगला धागा.
आता जरा १०३ बद्दल.
'१०३' हे मराठी नाटक पाहिले. मस्त आहे. नाटकाच्या शेवटी सर्व कलाकार मंचावर उभे राहतात तेव्हा सुमीत राघवन यांनी त्या क्रमांकाचे स्पष्टीकरण दिले. हा क्र. महिला व बाल अत्याचार होत असल्यास आपण पोलिसांना त्यावरून बोलावू शकतो. सुमारे ८ मिनिटात पोलिस तेथे पोचतील अशी ती यंत्रणा आहे.
या नाटकाच्या निमित्ताने १०३ चा प्रचार करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी निर्मात्याला केलेली आहे.
12 Aug 2017 - 12:23 pm | arunjoshi123
हे नाटक मनुस्मृतीची अज्ञानी बदनामी आहे. पण असो, ती फॅशनच आहे.
13 Aug 2017 - 8:09 am | फारएन्ड
धन्यवाद हे इथे लिहील्याबद्दल.
व्हॉट्सअॅप मधून सुद्धा हे फिरवायला हवे.
13 Aug 2017 - 12:01 pm | कुमार१
आपण रेल्वेतून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींसाठी १३८ हा मदत क्र. आहे. त्याबद्दलचे माझे दोन अनुभव :
१. एकदा मला दिवसा प्रवास करताना बाजूचे आसन मिळाले होते. त्याच्या पाठीचा हूक मोडला असल्याने ते सीट धाडकन खाली पडे. तेव्हा स्थानकावर एक पोलीस मला म्हणाला, “ १३८ फिरवा, त्यांचा माणूस पळत येईल”. मी तो क्र. खूप वेळा फिरवला – कधी नुसता १३८ तर कधी त्याला आधी तिथला STD कोड जोडून. पण छे! दर वेळेस मला ,”हा क्रमांक अस्तित्वात नाही” अशीच टेप ऐकायला मिळाली.
२. आता बरा अनुभव. माझ्या पहिल्या ट्रेनला जोडून दुसऱ्या ट्रेनने प्रवास करायचा होता. दोघांमधला वेळ ४० मिनिटे होता. पहिली ट्रेन बराच उशीर करत होती. तिच्या निर्धारित वेळेनंतरची ३५ मिनिटे उलटून गेली होती. माझी दोन्ही तिकीटे ‘इ’ होती. आता जर पहिली खूप उशीरा पोचली तर अर्थात माझी पुढची हुकणार. पुढचे तिकीट मी रद्द करू शकत नाही कारण त्याला मुदत प्रवासाआधी ४ तासांपर्यंत ही(.नवा अन्यायकारक नियम). त्यामुळे पहिली ट्रेन उशीरा पोचणे ही माझी चूक नसूनही मला मनस्ताप व भुर्दंड दोन्ही पडणार.
मग मी १३८ ला फोन लावला. चक्क उचलला गेला. त्याने मला PNR विचारून खात्री करून घेतली. मग मी त्याला पुढची ट्रेन १०-१५ मिनिटापर्यंत रोखण्याची विनंती केली. त्यावर तो, “बघू, काय करता येते ते” असे म्हणाला. सुदैवाने या पहिल्या ट्रेन ने दहाच मिनिटांचा उशीर केला व मला पुढची मिळाली.
13 Aug 2017 - 3:52 pm | संजय पाटिल
मग मी त्याला पुढची ट्रेन १०-१५ मिनिटापर्यंत रोखण्याची विनंती केली.
कहर! अशी विनंती करून ट्रेन रोखता येते? (अर्थात आपण जर व्हिआयपी वगैरे असाल तर गोष्ट वेगळी)
13 Aug 2017 - 4:41 pm | कुमार१
होय, विनंती करू शकतो. मला तेव्हा हे माझ्या डब्यातील रेल्वे अधिकाऱ्यांनी च सांगितले. अर्थात हे 10-15 मिनिटा पुरतेच शक्य असते. एकदा तर 40 जणांच्या चमूला याच गाडीत। अशी वेळ आली होती. तेंव्हा खुद्द TTE नेच असा फोन केला होता !
13 Aug 2017 - 11:23 pm | पैसा
माहितीपूर्ण धागा
14 Aug 2017 - 4:40 am | रेवती
ही माहिती इथे शेअर करावी की नाही याची कल्पना नाही पण सुरक्षिततेचा इशारा म्हणून करतिये.
माझी वहिनी ट्रेनने प्रवास करत असताना तिचा एसी डबा हा शेवटचा होता. त्यानंतर स्लीपर डबा होता. लोकांची खच्चून गर्दी होती.
स्वच्छतागृह वापरताना आपल्या बाजूचेच वापरावे असा संकेत असतानाही ती स्लीपर बाजूच्या स्व. गृहात गेली. दहा वर्षीय भाच्याला "दोन मिनिटात येते, कुठे जाऊ नकोस" हे सांगून गेली होती. तो पुस्तक वाचत बसला होता. वेळ रात्रीची होती. वहिनी अगदी दोन मिनिटात परत येईस्तोवर पोलिसांनी मधील शटर बंद केले होते. वहिनीनी बरेचदा वाजवून, आवाज देऊनही उघडले नाही. एसी बाजूकडील लोक पोलिसाला विनंती करीत होते की कोणाला तरी गरज असू शकते तुम्ही एकदा चेक करा पण ते नाही म्हणाले कारण रात्रीच्यावेळी तसे न करण्याच्या सूचना असतात. आजूबाजूला अत्यंत किळसवाण्या लोकांनी घेराव घालण्यास सुरुवात केली व एकही महिला किंवा पुरुष मध्ये पडायला तयार नव्हता. पुढील स्टेशन दोन तासांनी येणार होते. 'अमूक क्र. डायल करा' किंवा 'साखळी ओढा' या पर्यायांपाशी टवाळ कंपूने वहिनीने न जाण्याची व्यवस्था केली.
ती सतत शटर वाजवत होती कारण आपल्या मुलाला आईबद्दल प्रश्न पडल्यास तो कुठे जाईल ही काळजी होती. अशावेळी अर्धातास हा जीवघेणा वेळ असतो. एका मनुष्याने पोलिसाला दरडावून शटर उघडण्यास भाग पाडले व हिची सुटका झाली. पोलिसांचे लेक्चर ऐकावे लागले पण ते परवडले. कृपया कोणीही (खासकरून महिलांनी, मुलींनी, बालकांनी) आपल्याबाजूची दोन स्वच्छतागृहे सोडता दुसरी वापरू नयेत किंवा बरोबर नवरा, भाऊ, वडील, किंवा दुसरे मनुष्य असल्यास त्याला उभे करावे. लहान मुले बरोबर असताना एकट्या आईची/ वडिलांचीही पंचाईत होते पण ईलाज नाही. खाकरून ट्रेन लेट झाल्यास आजूबाजूच्या लोकांना नस्ते उद्योग सुचतात हे मी मागील वर्षी दुरंतोला अनुभवले आहे. साडेसहा तास लेट झालेल्या ट्रेनमध्ये शेवटी मी पडदा ओढून मुलाला समोर बसवून पुण्यापर्यंत आले. वहिनीची ट्रेनही आठ की दहा तास लेट झाली होती.
14 Aug 2017 - 6:59 am | अत्रे
धन्यवाद, उपयुक्त माहिती. http://www.misalpav.com/node/३९८६२
या माझ्या धाग्यात टाकता येईल.
14 Aug 2017 - 6:07 am | कंजूस
आपल्या मोबाइलवर येणारे जाहिरातींचे कॅाल्स आणि sms थांबवता येतात. बँकेचे येणारे sms बंद होत नाहीत
१) लिंक:http://www.nccptrai.gov.in/nccpregistry/
२)How to Activate Do Not Disturb (DND) India Registration - All Networks। लिंक:http://www.techsiren.com/how-to-activate-do-not-disturb-india-registration/
14 Aug 2017 - 9:06 pm | दशानन
1909
वर फोन करुन देखील ही सेवा चालू / बंद करता येते.
15 Aug 2017 - 1:56 pm | रुस्तम
ही सेवा काही कामाची नाही. Full DND activate करून सुद्धा फालतू कॉल आणि sms येतंच आहेत. आता 1909 वर रिपोर्ट करून पण कंटाळा आला आहे. रोज रोज किती कॉल करणार....
14 Aug 2017 - 10:52 am | अजया
फार छान धागा.
धन्यवाद.
15 Aug 2017 - 2:11 am | पद्मावति
उत्तम माहीतीपुर्ण धागा. धन्यवाद.
18 Aug 2017 - 8:22 pm | दशानन
181 हा स्त्रियांच्या उपयोगाचा क्रमांक असून, तात्काळ मदत उपलब्ध केली जाते, सेक्ससुल अबुज, घरगुती अत्याचार संबंधात येथे तक्रार करता येते.
********
1800-180-1104 हा नॅशनल हेल्थ हेल्पलाईन नंबर आहे. अचानक शारीरिक / स्वास्थ संबधी काही अडचण आल्यास येथे तुमची मदत केली जाते.
20 Aug 2017 - 2:20 am | पिलीयन रायडर
हे खरे आहे का?
#अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी
Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)
जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील ३ वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या १० पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.
हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे.
(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे)
उदाहरण दाखल: अपघात झालेल्या माणसाची मागील ३ वर्षांची वार्षिक मिळकत आय : ४ लाख, ५ लाख, ६ लाख असा असेल.
तर त्या ३ही वर्षांचे सरासरी होणार ५ लाख रूपये आणि त्याच्या १०पट म्हणजेच ५० लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणार्या व्यक्तिच्या परिवाराला आहे.
बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही
पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे.
मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.
जरी सलग ३ वर्ष ITR returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर ३ वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती. जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील १० वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या १० पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषणही केले असते.
आपल्यापैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही.
अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.
माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत अपघाती मृत्यू अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे.
- आनंद कुलकर्णी (A.K.)
-----------------------------------------------------------------------
Source - Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.
-----------------------------------------------------------------------
टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. जर आपण आता पर्यंत नोंदणी केली नसल्यास, एकत्रित ३ ही वर्षाचे पण फायलिंग करू शकतो.