मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

४८ तास

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हि गोष्ट माझ्या मित्राची आहे.(सर्जन लेफ्टनंट शिवा नायर याने प्रत्यक्ष अनुभवलेली.)ऑपरेशन ब्रासटांक्स १९८६-८७ मधील गोष्ट आहे. हा लष्करी सराव दुसर्या महायुद्धानंतर झालेला सर्वात मोठा सराव होता.तो नौदलाच्या शंकुश या HDW कंपनीच्या जर्मन पाणबुडी मध्ये डॉक्टर म्हणून पोस्टेड होता.त्या सरावासाठी त्यांनी ती पाणबुडी मुंबई बंदराच्या बाहेर काढली आणि त्यानंतर ते पाण्याखाली डुबकी मारून पाकिस्तान च्या दिशेने रवाना झाले.war patrol वर जेंव्हा पाणबुड्या जातात तेंव्हा त्या एक महिना भर पूर्ण पाण्याखालीच राहतात. त्यावेळेला सूर्याचे दर्शन एक महिना भर होत नाही.दिवसभर पाण्याखाली राहून गस्त घालायची आणि रात्री जेंव्हा पूर्ण अंधार असतो तेंव्हा पाण्याच्या खाली ४-५ मीटर राहून टोर्पेडो टयूब ने हवा घेऊन आपल्या बेंटर्या चार्ज करायच्या असा एक महिना काढायचा असतो.माणशी १५ लिटर पाणी दिवसाला मिळते.कपडे धुण्याचा प्रश्नच नसतो. कपडे वापरा आणि फेकून द्या.(disposable) (अंतरवस्त्रांसहित). कावळ्याची अंघोळ ३ दिवसात एकदा. बाकी पाणी पिणे आणि भांडी धुणे या साठी जास्त वापरले जाते.पाण्याचा साठा फारच थोडा असतो बाकी पाणी RO (रिवर्स ओस्मोसीस) या पद्धतीने मिळवले जाते त्यासाठी उर्जा कमीत कमी वापरावायासाठी पाण्याचे रेशनिंग करायला लागते.असो. त्यांची पाणबुडी मुंबई बंदराच्या बाहेर निघाली आणि डुबकी मारून पाकिस्तानच्या हदीत शिरली.५-६ दिवस गस्त घातल्यावर त्यांच्या gps (गोल्बल पोसीशनिंग सिस्टीम )मध्ये काहीतरी गडबड असावी असे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी एके दिवशी पहाटे ६ वाजता पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस त्यांना आपण नक्की कोठे आहोत याची खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी पाणबुडी अगदी हळूहळू वर आणण्याचा निर्णय घेतला होता.परंतु जेंव्हा ते पाण्याच्या पृष्ठभागा वळ आले तेंव्हा त्यांना जवळून जाणारया जहाजाची चाहूल लागली. त्यांनी आपला पेरीस्कॉप वर केला तर अगदी जवळ (नजरेच्या टप्प्यात एक पाकिस्तानी नौदलाचे जहाज "बाबर" दिसले (PNS बाबर). त्यांनी पेरीस्कॉप मधूनच आपली परिस्थिती जाणून घेण्यासाठी आजूबाजूला रडार आणि सोनार ने चाचपणी केली असता अजून दोन जहाजे असावीत असा अंदाज आला. एकदम त्यांना असे जाणवले कि आपण पाकिस्तान च्या हद्दीत खोलवर घुसलो आहोत.पाकिस्तानच्या हद्दीत घुसणे हा एक फार मोठा गुन्हाच होता. दुसर्या देशाच्या सागरी हद्दीत परवानगी शिवाय शिरणे ते सुद्धा तुमच्या कट्टर शत्रू असणाऱ्या पाकिस्तानच्या म्हणजे युद्धालाच निमंत्रण. त्या पाणबुडीच्या कॅप्टन च्या लक्षात हि गंभीर बाब ताबडतोब आली.त्याने ताबडतोब पाणबुडीत गंभीर प्रसंग असल्याचा घोष केला. सर्व सैनिक आपापल्या कामाच्या जागेवर ताबडतोब हजर झाले. कॅप्टन ने पाणबुडीला परत बुडी मारण्याचा आदेश दिला.त्यांनी ती पाणबुडी सागर तळाच्या वर ५० मीटर वर आणून पाणबुडीची सर्व यंत्रे बंद करण्याचा आदेश दिला. पाणबुडी उत्तर दक्षिण अशी उभी केली जाते.(पाणबुडीच्या लोखंडी आवरणामुळे आणि त्यात असलेल्या मोटार जनरेटर इत्यादी विजेच्या उपकरणांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात फेरबदल होतात.प्रत्येक जहाजात एक mad (magnetic anomaly detector) बसवलेला असतो त्यामुळे पाणबुडीने होणारे चुंबकीय बदल कळू शकतात.सगळी active सोनार बंद केली गेली.(active सोनार मध्ये तुम्ही ध्वनी लहरी सोडता आणि त्याचा येणारा प्रतिध्वनी तुम्ही "ऐकता") फक्त बाहेरून येणारे आवाज ऐकण्यासाठी passive सोनार चालू होते. म्हणजे बोलणे बंद होते आणि ऐकणे चालू होते. इकडे पाकिस्तानी जहाजांची हबेलंडी उडाली होती.भारतीय पाणबुडी कुठेही शोध न लागता एकदम पाकिस्तानी पण हद्दीत शिरते हि गोस्त त्यांच्या दृष्टीने नामुष्कीची आणि अत्यंत होती.ताबडतोब तिकडे रेड अलर्ट जाहीर झाला होता त्या भागात फिरणारी सर्व पाकिस्तानी जहाजाना पाचारण केले गेले शंकुश ला असे जाणवले कि बाबर बरोबर पाकिस्तानी नौदलाची आणखी तीन जहाजे आजूबाजूला फिरत होती आलमगीर,शहाजहान आणि खैबर.ते अतिशय काळजीने(desparately) भारतीय घुसखोर पाणबुडीचा शोध घेत होते. शंकुशमध्ये सर्व लोक पूर्ण तणावाखाली होते. जर त्यांचा शोध लागला असता तर पाकिस्तानी नौदलाने त्यांना जलसमाधी दिली असती. आणि हि गोष्ट जगाला कळली सुद्धा नसती.पाणबुडीचा शोध लागला तर तिला बुडवणे एकदम सोपे असते. शत्रूची विमाने त्याच्या आसपास डेप्थ चार्जस (खोलवर फुटणारे पाण सुरुंग) टाकतात. त्याच्या स्फोटामुळे होणार्या लहरींनी पाणबुडीचे कवच(hull) फाटते आणि पाणबुडीला जलसमाधी मिळते. पाणबुडी पाण्याच्या खाली फार वेगाने पळू शकत नाही आणि वर आली तर ताबडतोब बॉम्ब टाकून तिला बुडवले जाते शत्रूच्या भूमीवर मरण येणे ते सुद्धा जगाला न कळता. प्रेताला अंत्यसंस्कार नाही. कुटुंबाला अर्धा पगार सात वर्षे पर्यंत काही बातमी नाही कुठे गेले केंव्हा येणार ? सर्व नौसैनिकांच्या काळजाचे ठोके चुकत होते. वर थोड्याथोड्या वेळाने एखादे पाकिस्तानचे जहाज आवाजाच्या टप्प्यात येत होते आणि जात होते. लोकांना जेवणाची शुद्ध होती न झोपेची.त्यातून काही शूर सैनिक्म्हणु लागले नाहीतरी मरायचे आहे तर एकदोन पाकिस्तानी जहाजांना बुडवून मरुया. टोरपेडो किंवा क्षेपणास्त्रे डागुया.अशा परिस्थितीत कॅप्टन च्या नेतृत्वाची कसोटी लागते.आपला तणाव दूर ठेवून सर्न सैनिकांना डोके थंड ठेवण्यास सांगायला लागते.एक एक क्षण एका एका वर्षासारखा भासत होता. ऑफ द्ड्युटी माणसाना झोप येत नव्हती कूक ला स्वयंपाक सुचत नव्हता जेवणार्यांना भूक नव्हती.करण्यासारखे काहीच नव्हते. आय सी यु च्या बाहेर असणार्या लोकांसारखी परिस्थिती होती. फक्त फरक एवढाच होता कि इथे स्वतः च आय सी यु मध्ये होते. क्रमश

वाचन 24077 वाचनखूण प्रतिक्रिया 44

शुचि Fri, 01/18/2013 - 21:38
अतिशय थरारक वर्णन आहे. पाणबुडीवरील जीवनाची माहीती तर मिळालीच तसेच उत्कंठा खूप वाढली आहे आपल्या जवानांचे काय झाले, ते कसे शत्रूगोटातून परतले हे वाचण्याची. खरे सर आपले हे अनुभव खरच अतिशय रंजक आणि धाडसी वर्णनाचे आहेत. खरच मेजवानी आहे.

चिर्कुट Fri, 01/18/2013 - 21:47
जबरदस्त अनुभव आणि तितकीच उत्तम लेखनशैली.. पुढे वाचण्यास उत्सुक. लौकर पुढचा भाग टाका आणि अजून मोठा भाग येउद्या.

श्रीरंग_जोशी Fri, 01/18/2013 - 21:49
युधस्य कथा: रम्या:..! प्रत्यक्षात हि चकमक घडलीही नसेल पण परिस्थिती युद्धसदृश्यच होती. प्रथम भागात जोरदार वातावरणनिर्मिती झालेली आहे. पु. भा. प्र. काही महिन्यांपूर्वीच मी हॅरीसन फोर्डचा के-१९ द विडोमेकर हा चित्रपट पाहिला होता त्यामूळे तुम्ही लिहिलेले वर्णन डोळ्यासमोर आणणे शक्य झाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

सुबोध खरे Sat, 01/19/2013 - 11:47
साहेब वरील घटना १००% सत्य आहे. फक्त मी त्याचा साक्षीदार नाही. सर्जन लेफ्टनंट शिवा नायर हा माझा मित्र त्या पाणबुडीत प्रत्यक्ष हजर होता आणि हि त्याने सांगितलेली खरी गोष्ट आहे. दुर्दैवाने माझी कल्पना शक्ती/ प्रतिभा तोकडी असल्याने मला कोणतेही लेख आपल्या प्रतिभेने लिहिता येत नाहीत. अगोदर लिहिलेले तिन्ही लेख हे माझे स्वतःचे (first hand) अनुभव आहेत. हा चौथा माझा स्वतः चा अनुभव नसला तरी मी पहिल्यानेच तसे नमूद केले आहे.

In reply to by रेवती

विकास Fri, 01/18/2013 - 22:11
कृपया पुढचे लेखन लवकर करा. भयंकर उत्सुकता आहे. सहमत! लेखनशैली देखील आवडली. पाणबुडीबद्दल बरीच नवीन माहिती या निमित्ताने समजली.

जेनी... Fri, 01/18/2013 - 22:14
खुप सविस्तर लिहिलय त्यामुळे वाचता वाचता पडणार्‍या प्रश्नांचीहि उत्तर लगेच दुसर्‍या ओळीत मिळतायत ... हल्ली मी तर तुमचे लेख शोधुन शोधुन वाचतेय पूढचं लवकर लवकर लिहा

अग्निकोल्हा Fri, 01/18/2013 - 22:14
प्रेताला अंत्यसंस्कार नाही. कुटुंबाला अर्धा पगार सात वर्षे पर्यंत काही बातमी नाही कुठे गेले केंव्हा येणार ?
समजले नाही. ७ वर्ष बातमी नाही व अर्धा पगार येतोय म्हटल्यावर कुशंका तयार होणारच की ?

In reply to by अग्निकोल्हा

जेनी... Fri, 01/18/2013 - 22:22
अर्धा पगार सात वर्षापर्यंत , काहि बातमी नाहि , कुठे गेले ? केव्हा येणार ?? असं वाचा म्हणजे बहुतेक तुम्हाला क्लिअर होइल

जेनी... Sat, 01/19/2013 - 00:09
सुब्बु काका अगदि योग्य ठिकाणी क्रमश टाकलायत . इथल्या लोकांचं कसय माहितिय का ? ... जास्त लिहिलत कि मग लांबडाय लय लेख , एकाचे दोन भाग करायला हवे होते .... असल्या प्रतिक्रिया देतात ... त्यापेक्षा तुम्ही सावध राहुन क्रमशः टाकल्यामुळे तुमचं खरच कौतुक .

In reply to by जेनी...

बॅटमॅन Sat, 01/19/2013 - 01:11
सुब्बु काका
शब्द काळजाला भिडला गो बहिणाबाई. सुब्बूच्या मिश्या आठवल्या उगीच. चांगल्या धाग्यावर हे नाव कशाला काढलेस ;)

स्पंदना Sat, 01/19/2013 - 09:02
जबरदस्त! मुख्य म्हणजे सार्‍या तांत्रिक बाबी तुम्ही उलगडुन सांगताय. त्यामुळे काहीही गोंधळ न उडता या गोष्टीतला थरार जाणवतो आहे. जान हथेली पे गेउन आपले सैनिक कसे जगले हे वाचायची उत्सुकता.

तिमा Sat, 01/19/2013 - 12:24
आले की मिपाचे सदस्य आहोत याचा अभिमान वाटतो. इथल्या अनेक चांगल्या लेखकांच्या पंक्तीत शोभता आहात खरे साहेब. पुढील भागाचीच काय, तुमच्या अनेक अनुभवांची वाट पहात आहे.

कवितानागेश Sat, 01/19/2013 - 13:12
कठीण परिस्थिती आहे. अश्या वेळेस घरच्यांची आठवण काढायचे देखिल सुचत नसेल.... फक्त १-१ क्षण आता काय होईल, आणि आता काय करायचे...याचाच विचार.

खबो जाप Mon, 02/11/2013 - 19:55
अप्रतिम,थरारक,उत्कंठावर्धक,मस्तच.... वाचत वाचत शेवट पर्यंत आलो ......... आणि तोंडातून अचानक निघाले च्यायला क्रमशः आलेच का .... हीच तुमच्या लिखाणाची ताकत आहे;येवुद्यात पुढचा भाग जरा लवकर .........