शंकराचार्य नामक तळपत्या सूर्यासमोर माझे काजवे चमकवणे

धनंजय's picture
धनंजय in काथ्याकूट
24 Sep 2007 - 8:19 am
गाभा: 

आदी शंकराचार्य म्हणजे भारतीय आध्यात्मिक विचारसृष्टीतला तळपता सूर्यच. त्याच्यासमोर डोळे दिपून अंधेरी यायला लागली, म्हणून आता थोडे काजवे चमकवतो.
शंकराचार्यांनी वेद, उपनिषदे वगैरेंवरती बरेचसे किचकट लेखन केले आहे, पण आज त्यांच्या शब्दांची ओळख "भज गोविन्दम्" या अत्यंत मधुर गीतामुळे लोकांत आहे.
त्याचे धृवपद असे :
भज गोविन्दं भज गोविन्दं
गोविन्दं भज मूढमते |
संप्राप्ते सन्निहिते काले*
नहि नहि रक्षति डुकृ़ञ् करणे ॥

भज गोविंदा भज गोविंदा
गोविंदा भज मूर्ख जणा
येतां विधिलिखिताच्या काळें
नाही रक्षित "डुकृ़ञ् करणे" ॥

इथे "डुकृ़ञ् करणे" हा काय प्रकार आहे? हा कुठल्यातरी तांत्रिक शब्दकोशातला असंबद्ध उतारा आहे. म्हणजे आज एखाद्या पाद्र्याने येऊन गणितकाराला सांगणे "तुझ्या dy/dx ने मरणाच्या काळी रक्षण होणार नाही, ते सोड, येशूचा पंथ धर," किंवा एखाद्या सी-प्रोग्रॅमरला सांगणे झाले "तुझ्या '# include stdio.h' ने मरणाच्या काळी रक्षण होणार नाही, ते सोड, येशूचा पंथ धर".

अरे बाबा, गणितज्ञ "dy/dx" आणि प्रोग्रॅमर "# include stdio.h" मरणाच्या काळी वापरतो आहे का? किंवा शब्दकोशातल्या तळटिपा लिहिणारा "डुकृ़ञ् करणे" मरणाच्या काळी वापरतो आहे का? पण तंत्रशिक्षण नसलेल्या पण विचारी माणसास शंकराचार्यांचे (किंवा माझ्या पाद्रीचे) गाणे ऐकून तसे वाटल्यास काय नवल! आपल्या मधाळ जिभेचा पाचर बनवून या प्रतिभावंत आचार्यांनी तंत्रज्ञ -वैज्ञानिकांना सामान्य माणसापासून तोडले.

अहो, इ.स.५व्या शतकात भारतात ज्योतिषशास्त्रात पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा विचार सुरू झाला होता. पण तेवढ्यावर विज्ञान थांबून चालत नाही - ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी शेकडो वर्षे कोणालातरी किचकट गणिते आणि निरीक्षणे करावी लागतात. ती कोणी केली नाहीत, मग अजूनही कुंडल्या "पृथ्वी विश्वाचा मध्य" असे मानून मांडतात - (घाटपांडे सर, चुकले असेल तर सुधारा). इ.स.पूर्व ७०० ते इ.स.७०० पर्यंत आयुर्वेदातले महारथी सुश्रुत, चरक आणि वाग्भट होऊन गेले. त्यानंतर सूक्ष्म निरीक्षण करून वैद्यकात संशोधन करणारे भारतात निपजणे बंद का झाले? साधारण त्या काळात स्वतंत्र विचार करणार्‍यांना लोकात भाव मिळेनासा का झाला?

यात शंकराचार्य एकटेच नाहीत, पण त्या काळात अवघ्या हिंदू/हिंदी विचारधारेने एका टोकाचे तंत्र-विज्ञान-द्वेष्टे रूप घेतले. म्हणून या रसाळ गोड गाण्याचे धृवपद ऐकतो तेव्हा मी भारतीय विज्ञानाच्या हजार वर्षांच्या निद्रेची, आणि अफगाण-ते-इंग्रज या सर्वांकडून येणार्‍या हिंददेशाच्या पारतंत्र्याची नांदी ऐकतो.

झाले. टाकली पिंक. चर्चेचा विषय हा : भारतीय विज्ञानाच्या दीर्घ योगनिद्रेचे कारण त्या काळात झालेला हिंदूधर्मातील बदल आहे, हे तुम्हाला पटते का? नसल्यास तुम्हाला कुठली कारणमीमांसा पटते?
---
*या ओळीत "प्राप्ते सन्निहिते मरणे" वगैरे पाठभेद आहेत. या चर्चेत ते न काढले तर चर्चा सुसूत्र राहील.

(संपादन : याच्याआधी ती टाकलेली पिंक माझ्यावर परत पडणार होती वगैरे जरा कसेसे वाटायला लावणारे शब्द होते. ते आता संपादून काढून टाकले.)

प्रतिक्रिया

सहज's picture

24 Sep 2007 - 8:57 am | सहज

मला वाटते की ज्ञानाचा प्रसार सामान्यांपर्यंत गेला नाही. तसेच धर्मसत्ता, राजसत्ता ह्यांच्या वर्चस्वाखाली ज्ञानाची मुस्कटदाबी झाली असावी. जे काही ज्ञानी होऊ शकतील असे लोक होते, त्यांना कर्मकांडात, लोकांना नियंत्रणात ठेवण्यात त्या ज्ञानाचा वापर करावयाचा होता, विज्ञानाकडे जाण्यात कदाचीत तेवढा फायदा दिसला नसेल. (उलट कशाला कडेलोट करून घ्यायचा, कुटूंबीयांना देशोधडीला लावायच्या पेक्षा हा नाद नको.)

सामान्य माणसाचे भौतीक आयुष्य कसे सुखी होईल ह्या बाबीकडे कोणी गंभीरतेने पाहीले नाही. उलट युरोपात ज्ञानाचा --> विज्ञानाकडे --> सर्वांना फायद्याचे भौतीक प्रश्र सोडवण्याकडे कल दिला गेला. कदाचीत भारतात उत्तम हवामान असेल की जेणे करुन खाओ-पिओ-ऐश करो वृत्ती सहज रुळली असावी. युरोपात आहे त्या ज्ञानाचा वापर करून भोवतालचे हवामान, वातावरण ह्यावर मात कशी करावी.

आपल्याकडे अगदी मूठभर लोक वेगवेगळ्या विषयात संशोधन करीत होती, त्यांच्या म्हणावे इतके को-ऑर्डीनेशन नव्हते. एखादे संशोधन त्या व्यक्तिनंतर पूढे चालू हे प्रकार कमी.

तसेच त्या काळात आक्रमणे, रोगराई, मर्यादीत ज्ञानोपासना, पराकोटीचे राजकारण ह्यामूळे ...

असे लहानपणा पासून ऐकले आहे की गरज ही शोधाची जननी आहे. मग आम्हाला कशाची गरज भासली नाही? आमचा भात, आंबे, नारळ, पोफळी, समुद्रातील खाद्य... अजून कशाला काय पाहीजे म्हणतो मी असे तर झाले नसेल?... :-)

हे सर्व वरवर विचार करता आलेले फेस बुडबूडे आहेत, ठाम निर्ष्कष नाहीत. खोडून काढण्यात श्रम घालू नयेत, त्यापेक्षा वेगळे मूद्दे मांडावेत

नंदन's picture

24 Sep 2007 - 12:01 pm | नंदन

"राष्ट्रात जे विचारी व कर्ते पुरुष निर्माण होतात त्यांच्या विचाराचे व कर्तृत्वाचे धन ग्रंथबद्ध झाले, की पुढील पिढीवर त्याचे संस्कार होतात व त्या पिढीत कर्ती माणसे निर्माण होतात. त्यांचे तत्त्वज्ञान पुन्हा ग्रंथबद्ध झाले, की ते पुढील पिढीस उपयोगी पडते आणि अशा रीतीने राष्ट्राचे ज्ञानधन वाढत जाऊन त्यातून अनेक प्रकारची शास्त्रे निर्माण होऊन समाज बलशाली होतो. बाराव्या शतकापासून युरोपात नेमका हाच प्रकार सुरु झाला.
...
पण या पंडितांनी आपले विचार लिहून ठेवले नसते तर हे कार्य घडून आले नसते. तेराव्या शतकातील पंडितांच्या तत्त्वज्ञानाचा पत्ता चौदाव्या शतकातील पंडितांना लागला नसता. त्यांना पुन्हा पायापासून सुरुवात करावी लागली असती आणि दर शतकात, दर प्रांतात हेच होऊन प्रत्येकाचे ज्ञान वातावरणात विरुन गेले असते आणि मग त्यातून राजकीय किंवा धार्मिक असे कोणतेच तत्त्वज्ञान निर्माण होणे शक्य झाले नसते. महाराष्ट्रात व भरतखंडात नेमके हेच झाले. "
-- 'माझे विचार', डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे.

मला वाटतं, यामागे केवळ एकच एक कारण असे नसावे. धनंजयराव आणि सहज यांनी सांगितलेली कारणे, पु. ग. सहस्रबुद्धे यांनी केलेली कारणीमीमांसा आणि काही प्रमाणात जेअर्ड डायमंड या लेखकाने 'गन्स, जर्म्स अँड स्टील' या पुस्तकात विशद केलेली कारणे; या सार्‍यांचा हा एकत्र परिपाक असावा.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

चित्तरंजन भट's picture

24 Sep 2007 - 11:46 am | चित्तरंजन भट

"डुकृ़ञ् करणे" चा अर्थ संस्कृत व्याकरणाचे धडे गिरवणे असा काहीसा आहे का? माझ्या एक सु-संस्कृत मित्राने असे काहीसे सांगितल्याचे आठवते. शंकराचार्यांना एक वृद्ध प्रातःकाली "डुकृ़ञ्" करताना दिसले. एवढे वय उलटल्यावर "डुकृ़ञ्" करून काही मिळायचे नाही त्यापेक्षा गोविंदाचे नाव घे, असे आदी शंकराचार्य म्हणतात. चू. भू. द्या. घ्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2007 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"डुकृ़ञ् करणे" चा अर्थ घोकत राहा असा असावा ! गिरवणे हे बरोबरच !

दिवस आणि रात्र,सकाळ्-संध्याकाळ,शिशिर ऋतु,वसन्तऋतु पुनःपुनः येतात व जातात या प्रमाणे काळाचा प्रवास चालत आहे आणि आयुष्य निघून जात आहे. परंतु आशारुपी वायू हा देह सोडत नाही. हे मूढा ! गोविंदाला भज,शरण जा. मृत्यु जवळ आल्यावर "डुकृ़ञ् करणे" घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.

(स्वाध्याय परिवाराच्या प्रार्थना प्रीतीत चर्पटपंजरिकास्तोत्रमात वरील अर्थ आहे )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय's picture

24 Sep 2007 - 6:59 pm | धनंजय

व्याकरणाचे धडे गिरवणे हा अर्थ बरोबर आहे.
पण आजच्या काळात कोणीच संस्कृत व्याकरणाचे पाठ गिरवीत नाही, आणि शंकराचार्यांच्या काळात बहुधा सर्व ब्राह्मणसुद्धा संस्कृत व्याकरणाचे पाठ शिकत नसणार. म्हणून या लोकप्रिय गाण्यात, "कुठलाही तांत्रिक अभ्यास" गिरवत बसू नये असा अर्थ समर्पक वाटतो. गंमत म्हणजे, "डुकृ़ञ् करणे" हा तपशील ज्या शब्दकोशात आहे, त्याचे खुद्द शंकराचार्यांना चांगले अभ्यासून ज्ञान होते! म्हणजे फक्त तो विशिष्ट व्याकरणकोश कोणी घोकू नये असे त्यांचे मत नव्हते, "कुठलाही तांत्रिक अभ्यास" गिरवत बसू नये असा अर्थ अधिक समर्पक वाटतो.

चित्तरंजन भट's picture

24 Sep 2007 - 1:26 pm | चित्तरंजन भट

इ.स.पूर्व ७०० ते इ.स.७०० पर्यंत आयुर्वेदातले महारथी सुश्रुत, चरक आणि वाग्भट होऊन गेले. त्यानंतर सूक्ष्म निरीक्षण करून वैद्यकात संशोधन करणारे भारतात निपजणे बंद का झाले?

वैज्ञानिक असो वा वैद्यकीय, कुठल्याही प्रगतीसाठी विचारांची देवाणघेवाण महत्त्वाची असते. इ. स. ७०० नंतर भारत संकुचित (insular) होत गेला. भारताचा इतर देशांसोबत असलेला व्यापार कमी होत गेला. परदेशगमन करणे, म्लेच्छांच्या देशात२ जाणे १ धर्माच्या विरुद्ध मानले गेले. त्यामुळे ज्ञानाचे, माहितीचे आदानप्रदान हळुहळू कमी होते गेले आणि खुंटले. (ह्याचवेळेस फ्यूडलिझम किंवा सरंजामशाही फोफावण्यास सुरुवात झाली.) वरील कारणांमुळेच बहुधा वैज्ञानिक, वैद्यकीय संशोधनाला पूरक, पोषक वातावरण नाहीसे व्हायला सुरवात झाले. आणि अंततः वैज्ञानिक, वैद्यकीय संशोधन करणारे भारतात निपजणे बंद झाले असावे३.

१. ब्रिटिश-अफगाण युद्धाच्या वेळी ब्रिटिश सैन्यात असलेले काही भारतीय सैनिक जेव्हा कसेबसे प्राण वाचवून भारतात परतले तेव्हा इथल्या धर्मलंडांनी त्यांनी परदेशगमन केलेले असल्यामुळे धर्माबाहेर केल्याचे दाखले वाचलेले आठवतात.
२. जिथे मुंजा गवत उगवत नाही तो म्लेंच्छाचा देश अशी काहीशी व्याख्या होती.
3. हा प्रतिसाद १०-१२ वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकांवर आधारित आहे. चू. भू. द्या. घ्या.

विसुनाना's picture

24 Sep 2007 - 1:41 pm | विसुनाना

बा धनंजया! चेहरा कोरडा पडला असेल तर आउ दे कोलोन लाव.
पण उगाच एरंडाचे तेल मिसळीच्या कटात ओतू नकोस.

शंकराचार्यांचा आणि तंत्रज्ञान मागे पडण्याचा काय संबंध?
'डुकृञ् करणे' चा अर्थ वरच चित्तर यांनी सांगितला आहेच.
शिवाय त्या काळातील समाज रचना आणि मानसिकता पाहता शंकराचार्यांनी भज गोविंदम म्हटले त्यात त्यांची मुळीच चूक नव्हती असेच म्हटले पाहिजे. समाजाला वैदिक धर्माकडे घेऊन जाण्याचा जो वसा त्यांनी उचलला होता तो पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

धनंजया, पाच मिनीटात वरून अणूध्वम पडणार आहे आणि समस्त समाज नष्ट होणार आहे अशी स्थिती असेल तर
# include "stdio.h" किंवा
OldFont=dc.SelectObject(&Smallfont1);
float BMI=(float)Pt_Wt*10000/(Pt_Ht*Pt_Ht);

असले निरर्थक शब्द लिहिण्यात काय हशील?

समस्त (हिंदु) समाज अधोगतीस जाऊन नष्टप्राय झालेला असताना उगाच भास्कर,सुश्रुत, चरक आणि वाग्भट यांच्या नावाची पारायणे करण्यात काय अर्थ होता?
उलट, शंकराचार्यानी 'भज गोविंदम' असे म्हटल्याने भास्कर,पाणिनी, मैत्रेयी, गार्गी, सुश्रुत, चरक आणि वाग्भट यांची नावे तरी
आपण घेऊ शकतो. नाहीतर ते कधीचे कालवश झाले असते.

विसूनाना, शंकराचार्यांविषयी कमालीचा आदर असल्यामुळे त्यांच्याविषयी थोडेसुद्धा उलटेसुलटे बोलताना आपलीच लाज काढतो आहे, ते मला पहिल्या वाक्यापासून माहिती आहे!
पाच मिनीटात वरून अणूध्वम पडणार आहे आणि समस्त समाज नष्ट होणार आहे अशी स्थिती असेल तर
> # include "stdio.h" किंवा ... असले निरर्थक शब्द लिहिण्यात काय हशील?

अर्थातच काहीच हशील नाही. मीदेखील त्या "नहि नहि रक्षति" ओळीचा असाच अर्थ लावतो. म्हणूनच विचारतो आहे "पाच मिनीटात वरून अणूध्वम पडणार आहे..." त्यामुळे ऐहिक विचार सर्वच सोडून द्यायचे, ही विचारसरणी भारताला भोवली का?

माझ्या विद्यापीठापुढच्या रस्त्यावर एक प्रचारक कंपू (वेगवेगळे लोक असतात) अधूनमधून उभे राहातात. त्यांचे एक वाक्य आहे - "तुमचा आत्मा जर्जर आहे. मरण जवळ आले आहे, आणि तुम्ही शरिराच्या व्याधीवर औषधे शोधण्यात वेळ का व्यर्थ घालवता?" या वाक्यात "नहि नहि रक्षति डुकृञ् करणे" चा गोडवा आणि काव्यसौंदर्य नाही हे किती माझ्या विद्यापीठाचे सौभाग्य! कारण आशय साधारण तसाच आहे. (पुढे अर्थात ते प्रचारक कृष्णाऐवजी ख्रिस्ताच्या भक्तीबद्दल बोलतात.)

शंकराचार्यांमुळे आज लोकांत वैदिक धर्म पाळतात हे फारसे खरे वाटत नाही. थोडेसे आर्यसमाजी सोडले तर वैदिक धर्म फार अपवादाने पाळताना आपल्याला दिसतात. लहानपणी माझा आवडता सण चतुर्थी - हा देव वेदातला नाही. त्या पूर्ण मजेमजेत एकच वेदमंत्र पाठ म्हणायचो. "यज्ञेन यज्ञमयजन्त...". यज्ञ करण्याचा धर्म सर्वात आधी होता असे वेदवाक्य घोकल्यामुळे आमचे घर काही याज्ञिक नाही झाले. (गणपती अजूनही आवडतो, म्हणून याज्ञिक नव्हतो याचे वाईट वगैरे वाटत नाही!)

माझ्यासारख्या सामान्याच्या तोंडात "भज गोविंदम्" आहे. शांकरभाष्याची दोन-चार पाने चुकून वाचली असतील. "साप की दोरी" असा शंकराचार्यांचा एकच दृष्टांत आम्हा सामान्यांना माहीत असला तर असेल. "माया" हा एक अत्यंत विचार करण्यासारखा प्रकार आहे, एका दृष्टांतात खपणार नाही, पण त्याअधिक शंकाराचार्य लोकांत ठाऊक आहेत काय? धड त्यांचे सखोल आध्यात्मिक विचारही लोकांत माहीत नाहीत ही शंकराचार्यांची चूक नाही. पण त्यांनी तांत्रिक अभ्यासाचे केलेले विडंबन मात्र सर्वश्रुत आहे.

वैद्यक टिकायला शंकराचार्यांच्या भारतविजय आवश्यक नव्हता असे वाटते. भारताच्या पूर्वेकडील बौद्ध देशांत साधारण तशा प्रकारची चिकित्सापद्धती टिकूनच आहे. खरे म्हणजे सुश्रुत, चरक, आणि वाग्भट ही नावे मिटून आयुर्वैद्यकात प्रगती करण्याची त्यांची धमक टिकून राहिली असती तरी त्यांचा अधिक मान राहिला असता. शंकराचार्यांच्या काळापर्यंत बौद्ध पूर्णपणे संस्कृताळलेले होते. पाणिनींची (त्या परंपरेतली) न्यास व्याख्या लिहिणारे जिनेंद्रबुद्धी वैदीक नव्हते.

गार्गीने स्वतः काय लिहिले आहे ते इनमिनतीन अभ्यासकांना माहीत आहे - एका सभेत उठून तिने कठीण प्रश्न विचारले असे ही कथा माहीत असली तर बर्‍याच लोकांना माहिती असेल. पण ते तिचे लिखाण नव्हे. शिवाय त्या गोष्टीत तिचा शेवटी पाणउतारा होतो.

अशा प्रकारे प्राचीन विचारवंतांची भारतात फक्त नावे उरली आहेत, विचार लुप्त झाले आहेत. तेही चालेल, कारण विचार चुकतात, किंवा कालबाह्य होतात. पण विचार पुढे चालवण्याची धमक बाद झाली. हे वाईट झाले.

विसुनाना's picture

24 Sep 2007 - 6:20 pm | विसुनाना

धनंजयराव, हा विषय चर्चेला ऐरणीवर घेण्यापूर्वी आपण अर्थातच चांगला तावून सुलाखून घेतला असणार यात शंका नाही.
"तुमचा आत्मा जर्जर आहे. मरण जवळ आले आहे, आणि तुम्ही शरिराच्या व्याधीवर औषधे शोधण्यात वेळ का व्यर्थ घालवता?"
"माया" हा एक अत्यंत विचार करण्यासारखा प्रकार आहे, एका दृष्टांतात खपणार नाही"
"पण त्यांनी तांत्रिक अभ्यासाचे केलेले विडंबन मात्र सर्वश्रुत आहे."
"शंकराचार्यांच्या काळापर्यंत बौद्ध पूर्णपणे संस्कृताळलेले होते. पाणिनींची (त्या परंपरेतली) न्यास व्याख्या लिहिणारे जिनेंद्रबुद्धी वैदीक नव्हते."
"भारताच्या पूर्वेकडील बौद्ध देशांत साधारण तशा प्रकारची चिकित्सापद्धती टिकूनच आहे. "

यासारख्या वाक्यातून आपला गाढा व्यासंग दिसून येतो.
आपले विचार पटले. परंतु विषयाला स्फोटक शीर्षक देऊन त्याला लक्षवेधी करण्याचा खटाटोप केला नसता तरी बरे झाले असते.
पण -
"शंकराचार्यांविषयी कमालीचा आदर असल्यामुळे त्यांच्याविषयी थोडेसुद्धा उलटेसुलटे बोलताना"
असे म्हणण्याऐवजी "शंकराचार्यांचे विचार आपल्या समाजाने समजून न घेता वर्तन केले काय? " असा प्रश्न आपण विचारला असतात तर ते अधिक योग्य ठरले असते.
कारण इव्हन गौतम बुद्धाचेही 'स्वतःला पटेल तसे करा' अशा स्वरूपाचे विचार त्याच समाजाने सोयीनुसार घेतले (त्यांची असे विचार समजण्याचीच लायकी नव्हती) आणि सर्वस्वी ऐहिकता आणि सुखलोलुपतेच्या आहारी गेल्याने समाजाचा र्‍हास झाला (इतका की सख्ख्या बहिण-भावांची लग्ने होऊन वंशनाश होण्याची वेळ आली.) कोणत्याही तत्त्वज्ञानाचा पाया त्याला मानणार्‍या लोकसंख्येची वृद्धी करणे हा असतो हे आपण जाणताच. त्यामुळेच आदि शंकराचार्याना पुनः सनातन धर्माची द्वाही फिरवावी लागली.
'दारू पिऊ नये' हे सांगणे वेगळे आणि ते पाप आहे हे धर्माने ठरवणे वेगळे. शंकराचार्यप्रणित नव्या धर्माने पूर्वीच्या वैदिक धर्मातील मदिरा-मांशासनाला पूर्णपणे निषिद्ध ठरवले कारण त्यावेळच्या समाजाचे रसातळाला पोचलेले चालचलन. त्यामुळेच संन्यस्त वृत्तीचा उद्घोष करावा लागला.

आजही अमेरिकेसारख्या देशात सुबत्ता आणि वैचारीक स्वातंत्र्याचा अतिरेक झाल्याने तीच परिस्थिती दिसते आणि ते लोण आपल्याही समाजापर्यंत पोचलेले आहेच. थोडे विषयांतर होत आहे याची कल्पना आहे. पण
"पण विचार पुढे चालवण्याची धमक बाद झाली. "
याचे कारण समाजमानसातील ऐहिक अतिरेक पुढे त्याच्याच र्‍हासाला कारणीभूत ठरतो.

ईस्लाममधील कट्टरपंथीय विचारधारेकडे (संपूर्ण वैचारिक शरणागती - मामेकं शरणं व्रज) आकृष्ट होणार्‍या सुशिक्षित वर्गाचे कारण हाच पराकोटीचा ऐहिकवाद असावा असे वाटू लागते.ईस्लाम सांगताना त्यातील कठोर शिक्षा याही अशाच रसातळाला गेलेल्या समाजाला ताळ्यावर आणण्यासाठी दिल्या आहेत हेही विसरून चालणार नाही.

ऐहिकता आणि परमार्थ यांचे संतुलन हाच यावरचा उपाय आहे. पुन्हा कधीतरी सविस्तर...

टिकाकार's picture

24 Sep 2007 - 2:22 pm | टिकाकार

जेव्हा बुध्दांनी मुर्तीपूजा आणि कर्मकांडापुरत्या मर्यादित झालेल्या हिंदुधर्मा ला पर्यायी निरिश्वर वादि बौद्ध धर्म स्थापला तेव्हा बरेच हिन्दु बुद्धिनिष्ठ त्याकडे आकर्षित झाले आणि हिंदुधर्माला अवकळा आली.
शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताच्या तत्वद्यानाच्या सहाय्याने हिंदूधर्माला लॉजिकल बैठक दिली आणि धर्माचे पुनरुथ्थान केले.
त्यामुळे ,
"यात शंकराचार्य एकटेच नाहीत, पण त्या काळात अवघ्या हिंदू/हिंदी विचारधारेने एका टोकाचे तंत्र-विज्ञान-द्वेष्टे रूप घेतले. "
हे अत्यंत चुकिचे विधान आहे.

टिकाकार

टिकाकार's picture

24 Sep 2007 - 2:28 pm | टिकाकार

"उलट युरोपात ज्ञानाचा --> विज्ञानाकडे --> सर्वांना फायद्याचे भौतीक प्रश्र सोडवण्याकडे कल दिला गेला. कदाचीत भारतात उत्तम हवामान असेल की जेणे करुन खाओ-पिओ-ऐश करो वृत्ती सहज रुळली असावी. "

सहमत.

तसेच युरोपात झलेल्या महायुध्दामुळे तेथे औद्योगिक प्रगतिला चलना मिळाली.

टिकाकार

टिकाकार's picture

24 Sep 2007 - 2:31 pm | टिकाकार

"मला वाटते की ज्ञानाचा प्रसार सामान्यांपर्यंत गेला नाही. तसेच धर्मसत्ता, राजसत्ता ह्यांच्या वर्चस्वाखाली ज्ञानाची मुस्कटदाबी झाली असावी. जे काही ज्ञानी होऊ शकतील असे लोक होते, त्यांना कर्मकांडात, लोकांना नियंत्रणात ठेवण्यात त्या ज्ञानाचा वापर करावयाचा होता, विज्ञानाकडे जाण्यात कदाचीत तेवढा फायदा दिसला नसेल. (उलट कशाला कडेलोट करून घ्यायचा, कुटूंबीयांना देशोधडीला लावायच्या पेक्षा हा नाद नको.)"

अतिशय चुकिचे लॉजिक. बहुतेक ब्राम्हण द्वेष्ट्या पूर्वग्रह दूषीत मनोव्रुत्तीतून आलेले विचार.

टिकाकार

सहज's picture

24 Sep 2007 - 2:36 pm | सहज

तुम्ही कात टाकली. देर आये दुरूस्त आये. :-) असेच चांगले लिहीत चला.

टिकाकार's picture

24 Sep 2007 - 2:40 pm | टिकाकार

" देर आये दुरूस्त आये."

म्हणजे काय? मराठीत प्रतिसाद द्या.

टिकाकार

सहज's picture

24 Sep 2007 - 2:49 pm | सहज

फक्त एकाच ओळीचा अर्थ विचारलाय म्हणुन वाटतेय की बाकीच्या दोन ओळीचा अर्थ झेपलाय तुम्हाला. तर असो ३ पैकी २ जमले काही वाइट नाही. " देर आये दुरूस्त आये." हे तुम्हाला आत्ता समजले नाही तरी चालण्यासारखे आहे. नंतर कधीतरी बघूया. सगळे आत्ताच शिकायचा हट्ट नको. दमून जाल. फारच जर कसे कसे होत असेल तर हाच आजचा गृहपाठ आहे असे समजा व उद्या सांगा.

टिकाकार's picture

24 Sep 2007 - 3:08 pm | टिकाकार

त्या ओळीतलं "...आये... आये" हे मराठी तेवढ कळलं... :ड

टिकाकार

सहज's picture

24 Sep 2007 - 3:17 pm | सहज

हं बरोबर आहे वत्सा तुला फक्त "आये"ची भाषा येते ना म्हणून तुझे असे झाले. गृहपाठ कर हो.

तसेच झाले तेवढे विषयांतर पुरे. बाहीचे काही असल्यास खरडवही, व्यं नि. चा वापर कर. अजून इथे तुझी शिकवणी नको.

टिकाकार's picture

24 Sep 2007 - 3:20 pm | टिकाकार

विषयांतर तुम्ही प्रथम केले हे मान्य करून माफी मागून मोकळे व्हा..

टिकाकार

टिकाकार's picture

24 Sep 2007 - 3:00 pm | टिकाकार

प्राचीन काळी समाज व्यवस्था ही अघोषितपणे "डिवीजन ऑफ लेबर "या तत्वावर चालत असल्याचे दिसते.
१२ बलुतेदार आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेले पिढिजात व्यवसाय हे त्याचेच एक रूप म्हणावे लागेल.
त्याच व्यवस्थेचा एक भाग म्हणून ब्राम्हण समाजाकडे द्यानार्जनाचे काम आले आसे दिसते. त्यांना ज्ञानार्जनासठी राजाश्रय आणि धन (ज्याला आपण भिक्षा म्हणतो) मिळत असे.
पुढे समाजिक परिस्थिती बदलल्यावर अर्थर्जनासाठी दुसरे कोणतेही साधन आणि कौशल्य नसलेल्या ब्राम्हण समजाला नंतर भिक्षुकीशिवाय पर्याय राहिला नाही . सहाजिकच त्यांनी त्यांच्याकड्चे ज्ञान गुप्त ठेवण्यावर भर दिला असणार हे उघड आहे.

टिकाकार

प्रकाश घाटपांडे's picture

24 Sep 2007 - 6:48 pm | प्रकाश घाटपांडे

सहाजिकच त्यांनी त्यांच्याकड्चे ज्ञान गुप्त ठेवण्यावर भर दिला असणार हे उघड आहे.

हे मात्र पटण्यासारखे आहे. भिक्षुकी ही एक प्रकारची बलुतेदारीच आहे. पंचांग व धर्मशास्र सांगण्यातून गावच्या बाम्हनाला भाजीपाला, धान्य मिळत असे.
प्रकाश घाटपांडे

धनंजय's picture

24 Sep 2007 - 11:00 pm | धनंजय

मिसळपावावरच दुसर्‍या एका ठिकाणी कोणीतरी ज्ञानेश्वरांवर थुंकणे हा (का असाच काहीतरी) शब्दप्रयोग केला होता. तो वादग्रस्त दुवा येथे देऊन त्याच्याकडे अधिक लक्ष मी वेधू नये. या चर्चेत दुसर्‍या एका आदरस्थानाकडे निर्देश आहे. आणि कोणी मी त्याच तोडीचा अनादर करतो म्हणून अर्थ लावेल तर म्हटले, मीच वाईट शब्द लावून आधी लावून घेतो. माझ्या चर्चेने सूर्याचे काही होणार नाही, माझे मात्र तोंड बरबटेल हा साधा अर्थ आहेच. पण मिसळपावावरच्या दुसर्‍या एका चर्चेचा हा निषेधात्मक उल्लेख आहे, हेही समजून घ्या.

कौटील्य's picture

25 Sep 2007 - 12:05 pm | कौटील्य

आपल्या लेखना संदर्भात मला काही प्रश्न विचारायचे आहेत.

१) शंकराचार्याच्या काळात बौध्द धर्माचा प्रभाव किती होता व त्यांनी तो एकहाती कसा कमी केला किंवा जवळ जवळ संपवुन टाकला याची आपणास कितपत माहिती आहे‍?
२)ब्रिटीशांनी इथली अर्थव्यवस्था मोडकळीस आणण्यापुर्वी म्हणजेच इसवी सन १८०० पर्यंत हिंदुस्थानचा एकूण जागतिक अर्थव्यवस्थेत किती वाटा होता?आपणास कितपत माहिती आहे‍?
३) इसवी सनापुर्वी पासुन तर कालपर्यत हिंदुस्थान वर आक्रमण करणे हे स्वप्न उराशी बाळगुन कित्येक देश बरबाद झाले? किती वंश संपुन गेले? शक, हुण, मोंगल, तुर्क, डच, फ्रेंच, पोर्तुगीझ, ब्रिटिश इ. याची आपणास कल्पना आहे का?
४) जर आपण आळशी असतो तर हे शक्य होते का?
५) प्रत्येक मानव समुहाचे एक वैशिष्ठ्य असते व कालाच्या ओघात जरी ते कमी अधिक प्रमाणात दृगोचर होत असले तरी वेळ आल्यावर ते पुर्वीपेक्षा अधिक तेजाने झळाळुन उठते. भारताचे वेगळेपण त्याच्या अध्यात्मिक वारश्यात आहे व तो वारसा कितीही प्रयत्न केला तरी दुर्लक्षित करता येणार नाही.
६)पंधराव्या शतकात ज्याला दुर्गेचा दुष्काळ म्हणुन नोंद आहे तो सलग १२ -१२ वर्षे व कित्येक ठिकाणी ३६ वर्षे पडलेला दुष्काळ यांमुळे हिंदुची किती हानी झाली व त्यामुळे एकंदरीत पीछेहाट झाली याची आपणास कल्पना आहेका‍?

७)आपण वर दिलेले वाक्य चर्पटपंजरिका स्तोत्रातील असुन आपण त्याचा नीट अभ्यास करावा. महाजालावर ते http://www.pujaarcha.com/node/51 इथे उपलब्ध आहे.

समोरचा थुंकला म्हणुन आपण पण थुंकावे ही आमची संस्कृती नाही. पण पान खाउन तोंड योग्य ठिकाणी रिकामे करणे हि कला आम्हाला अवगत आहे.

अजुन वेळ गेलेली नाही, वर्तन सुधार अपेक्षित.

या बाबतीत एका वेगळ्या संदर्भात लिहीण्याची इच्छा आहे. पण त्याला जरा वेळ लागेल.

"एक मिसळ पाव नको" नावाखाली लिहीणार्‍या महोदयांनी विचारलेले प्रश्न हे धनंजयना पडलेल्या प्रश्ना इतकेच विचार करायला लावणारे आहेत. नुसते "भज गोविन्दम" असे स्वतः शंकराचार्यपण म्हणत बसले नाहीत, तर त्यांनी सांस्कृतीक दृष्ट्या देशाला एक केले. त्यामुळेच त्यांचा एकही मठ हा केरळात (जन्मस्थानी) नव्हता. शंकराचार्यांना "प्रच्छन्न बुद्ध" म्हणत, कारण त्यांनी तत्कालीन हिंदू धर्मात क्रांतीकारक विचार आणले. त्यांनी काही रूढी/परंपरा तयार केल्याचे ऐकीवात नाही. अर्थात कुठल्याही मोठ्या व्यक्तीचे होते त्याप्रमाणे त्यांच्या भक्तगणाने नंतर काय केले असेल तर प्रश्न वेगळा आहे.

भारतात जे काही झाले अथवा झाले नाही त्याचा दोष हिंदू धर्माला आणि हिंदू धर्मप्रसाराला देण्यात काहीच अर्थ नाही. एक म्हणजे १३०० सालापर्यंत (देवगिरीचे साम्राज्य लयाला जाई पर्यंत) अनेक शतकांची शांतता भारतात होती. वरच्या प्रतिक्रीयेत मांडलेले भारताचे वैभव तुम्हाला टाईम साप्ताहीकाच्या या लेखात पण वाचायला मिळेल.

अजून एक तर्क करायला लावणारी गोष्ट म्हणजे युरोपात धर्मसत्ता प्रबळ होती , अ-वैज्ञानीक विचारसरणीस महत्व देत होती आणि तरीही गॅलीलिओ, न्यूटन आणि डी विंची सारखी माणसे तयार होत होती. तेंव्हा हा दोष केवळ शंकराचार्यांना अथवा हिंदू धर्मास देणे योग्य वाटत नाही. शंकराचार्यांच्या भज गोविंदम नंतर, "प्रभाते मनी राम चिंतीत जावा" अथवा" घटका जाती, पळे जाती, तास वाजे झनाना, आयुष्याचा काळ जातो राम कारे म्हणाना" असे रामदासपण म्हणाले ज्यांनी "मेळविती तितुके भक्षीती ते कठीण काळे मरूनी जाती, दिर्घ सुचनेने वर्तती, तेची भले "असे ही म्हणले. शिवाजीनी काय नुसते "राम राम" करत औरंगजेबाशी दोन हात केले नाहीत. तत्वज्ञानाचा अर्थ न समजता ते जर तसेच्या तसे समजून कोणी वागले तर तो दोष त्या तत्वज्ञानाचा होत नाही. हे "अणू शक्ती शाप की वरदान" वगैरे सारखेच आहे असे वाटते.

१) शंकराचार्याच्या काळात बौध्द धर्माचा प्रभाव किती होता व त्यांनी तो एकहाती कसा कमी केला किंवा जवळ जवळ संपवुन टाकला याची आपणास कितपत माहिती आहे‍?
होय, माहीत आहे. पण त्याचा या चर्चेत मला संबंध नीट लागत नाही. बौद्ध धर्माशी आपले काय भांडण आहे? बौद्ध धर्म विरक्ती आणतो आणि वंशवृद्धी कमी करतो असे काहीसे ऐकले आहे.पण ते खरे असावे असे वाटत नाही. ज्या देशांत बौद्ध धर्म प्रधान असतो त्यांच्यात वंश खुंटलेला नाही. बौद्ध धर्म अहिंसाप्रिय असल्यामुळे देश असहाय झाला असता असे ऐकले आहे. भारतातल्या बौद्ध राजांकडे सैन्ये होती, ते बाकीच्यांइतकेच भांडणतंटे करीत. भारताबाहेरचे बौद्ध देशही अहिंसक झाले नाहीत. बौद्ध हे हिंदूंचा एक पंथ आहे असा प्रचार मी विहिंपच्या एका पत्रकात वाचला. हे जर खरे असेल तर बौद्ध जास्त टिकले काय, शैव जास्त टिकले काय, द्वैतवादी जास्त टिकले काय, "हिंदू" भारतीयाने त्याची काय काळजी करावी. नाहीतरी हिंदूंपैकी शंकराचार्यांच्या केवलाद्वैतापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे द्वैत-मूलक भक्तीपंथच आज मोठ्या प्रमाणात समाजात आपल्याला दिसतात.

२)ब्रिटीशांनी इथली अर्थव्यवस्था मोडकळीस आणण्यापुर्वी म्हणजेच इसवी सन १८०० पर्यंत हिंदुस्थानचा एकूण जागतिक अर्थव्यवस्थेत किती वाटा होता?आपणास कितपत माहिती आहे‍?
बर्‍यापैकी वाटा होता. याविषयी दादाभाई नवरोजींनी १९व्या शतकातही चर्चा केली होती. प्रचंड लोकसंख्येच्या (त्या काळाच्या थोडक्या मानवसंख्येच्या मानाने) महाकाय क्षेत्रफळाच्या देशाची केवळ शेतीच जगाच्या अर्थव्यवथेचा मोठा वाटा उचलू शकते. पण औद्योगिक प्रगती किती केली होती? वैचारिक प्रगती १०००-१७०० काळात किती केली? त्यापूर्वी या दोन्ही ठिकाणी प्रगती करण्याची आपली परंपरा होती, नंतर काय झाले?

३) इसवी सनापुर्वी पासुन तर कालपर्यत हिंदुस्थान वर आक्रमण करणे हे स्वप्न उराशी बाळगुन कित्येक देश बरबाद झाले? किती वंश संपुन गेले? शक, हुण, मोंगल, तुर्क, डच, फ्रेंच, पोर्तुगीझ, ब्रिटिश इ. याची आपणास कल्पना आहे का?
बरबाद झाले हे कळले नाही. शक-हूण बरबाद झाल्याचे माहीत नाही. मोंगल इथेच राहून आबाद झाले. तुर्क राजे खुद्द भारतात आले नाहीत, (भाडोत्री सरदार/सैनिक आलेत). डच श्रीमंत झाले - त्यांच्या सोयीनुसार भारत सोडून त्यांनी इंडोनेशियावर सत्ता गाजवली. फ्रेंच लोकांनीही त्यांना जिथे जमले तिथे साम्राज्य केले. भारतात इथल्या लोकांनी त्यांना पूर्ण पाडाव केला नाही, ब्रिटिशांबरोबर युद्धे झालीत त्यामुळे त्यांनी इथे साम्राज्य वसवले नाही. पोर्तुगीज भारतातल्या साम्राज्यामुळे श्रीमंत झाले. पण युरोपात तो देश स्वतः स्पेनने (काही काळासाठी) गिळंकृत केला. पोर्तुगालच्या तिथल्या पारतंत्र्यापासून त्यांची साम्राज्य चालवण्याची धमक कमी झाली. पण जी अर्धीमुर्धी श्रीमंती राहिली ती त्यांच्या साम्राज्यामुळे. भारतीय साम्राज्याच्या स्वप्नांनी पोर्तुगीजांना बरबाद केले नाही. ब्रिटिशांची आजचीही श्रीमंती त्यांच्या गत साम्राज्यवैभवाचे द्योतक आहे. भारतावर साम्राज्याच्या स्वप्नाने (किंवा गाजवलेल्या राज्याने) ब्रिटिशांचा नाश झाला हे पटत नाही.

४) जर आपण आळशी असतो तर हे शक्य होते का?

हे माझे कधीच म्हणणे नाही. भारतातली शेतकी ही नेहमीच कामसू होती. व्यापारीही खूप हुन्नरी होती. राजे युद्धे-लढाया करत होते, त्यालाही आळस करून चालत नाही. ही कार्यशीलता औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रगतीच्या बाबतीत आधी उपयोगात होती, नंतर का बंद झाली, हा चर्चेचा विषय आहे.
५) ...भारताचे वेगळेपण त्याच्या अध्यात्मिक वारश्यात आहे व तो वारसा कितीही प्रयत्न केला तरी दुर्लक्षित करता येणार नाही.
प्रत्येक देशाचे वैशिष्ट्य वेगळे असते ते खरे आहे. पण प्रत्येक देश आपापला आध्यात्मिक वारसा महत्त्वाचा आणि वेगळा आहे असेच ठसवून सांगत असतो. अगदी अमेरिकासुद्धा जगाची "स्पिरिचुअल अँड मॉरल लीडरशिप" आपल्याकडे आहे असे मनापासून ठसवून सांगत असतो. (हे आपल्या बिगर-अमेरिकन लोकांना हास्यास्पद वाटते. पण त्यांना मनापासून खरे वाटते. क्षणभर विचार करा की आपला "आमच्या भारताकडे मानवी संस्कृतीचा आध्यात्मिक वारसा आहे" हे बाकीच्या लोकांना किती हास्यास्पद वाटत असेल. अतोनात अन्याय थंडपणे बघून भारतीय समाजाची आध्यात्मिकता ढोंगी नाही हे मला कित्येकदा अन्यदेशीय मित्रांना समजवून द्यावे लागते [बहुतेक वेळा त्यांच्या देशाची ढोंगे दाखवून देऊन]. तो ढोंग वि. ढोंग वाद जिंकलो म्हणून पुन्हा थंड होऊन चालणार नाही.) प्रत्येक देशाची अस्मिता वेगळी याच्याकडे दुर्लक्ष केले नाही तरी वेगवेगळ्या देशांत (एकच) स्पर्धा आहे हे कसे विसरून चालेल? आता कोणी म्हणाले तर ऐहिक अधोगती चालेल कारण ती महत्त्वाची नाही, तर ते तर्कशुद्ध आहे. पण आजचे बहुतेक भारतीय तरी अशी टोकाची ऐहिक-नको भूमिका घेईल का?

६)पंधराव्या शतकात ज्याला दुर्गेचा दुष्काळ म्हणुन नोंद आहे तो सलग १२ -१२ वर्षे व कित्येक ठिकाणी ३६ वर्षे पडलेला दुष्काळ यांमुळे हिंदुची किती हानी झाली व त्यामुळे एकंदरीत पीछेहाट झाली याची आपणास कल्पना आहेका‍?
या दुष्काळामुळे अतोनात हानी झाली, पण मग १०००-१५०० मध्ये औद्योगिक/वैचारिक प्रगतीचे काय? दुष्काळ अधूनमधून भारतात आणि बाकी देशांतही पडत असतात. त्या एका प्रदीर्घ आपत्कालामुळे पूर्ण भारताचा आधी-नंतरचा औद्योगिक/वैचारिक इतिहास खुंटला असे म्हणण्यासाठी त्या दुष्काळाचा केवळ नामोनिर्देश चालणार नाही. आपण अधिक समजावून सांगावे लागेल.

७)आपण वर दिलेले वाक्य चर्पटपंजरिका स्तोत्रातील असुन आपण त्याचा नीट अभ्यास करावा.

चर्पटपंजरिका मला मुखोद्गत होती, अजून बर्‍यापैकी आठवते. पण काही पाठभेद असतील ते बघण्यासाठी तुम्ही दिलेले संकेतस्थळ पुन्हा पडताळीन.

समोरचा थुंकला म्हणुन आपण पण थुंकावे ही आमची संस्कृती नाही. पण पान खाउन तोंड योग्य ठिकाणी रिकामे करणे हि कला आम्हाला अवगत आहे.

:-) "थुंकणे" शब्दाचे लेखात संपादन केलेले आहे. "वैचारीक प्रगती का खुंटली, आध्यात्मिक विचारात ऐहिक ज्ञानाचा तिरस्कार आहे, तो त्याच्या मुळाशी आहे का?" हा विचार करणेच सोडायचे मला योग्य वाटत नाही. आणि माझ्यासारखा या विषयात थोडेच वाचन असलेला माणूस जेव्हा येथील व्यासंगी लोकांपुढे तोंड उघडेल ते अप्रासंगिक वाटणे (पिंक टाकल्यासारखे दिसणे) साहजिक आहे. तरी लोकशाहीत सर्वांनी बोलावे. या सर्व इतिहासाबद्दल पूर्ण ज्ञान असले नाही तर "बोलूच नये" हा सुधार मला मान्य नाही. म्हणूनच हा "काथ्याकूट" चर्चेचा विषय आहे, "जनातले, मनातले" लेख नाही.

तुमचे मुद्दे अभ्यासपूर्ण आहेत, पण माझ्या चर्चेच्या संबंधात मी ते पूर्ण समजू शकलो नाही. आणखी समजावून सांगू शकाल काय?

>>>तुमचे मुद्दे अभ्यासपूर्ण आहेत, पण माझ्या चर्चेच्या संबंधात मी ते पूर्ण समजू शकलो नाही. आणखी समजावून सांगू शकाल काय?

नक्कीच
थोडे थांबा
मी यावर सविस्तर लिहित आहे. अभ्यास चालु आहे; तुम्हास आनंद देइल असा लेख लिहित आहे

इतर प्रश्नांची उत्तरे कोणाला द्यायची असतील ते देतीलच. तेवढी माझी योग्यता नाही.
पण
"आपण वर दिलेले वाक्य चर्पटपंजरिका स्तोत्रातील असुन आपण त्याचा नीट अभ्यास करावा. महाजालावर ते http://www.pujaarcha.com/node/51 इथे उपलब्ध आहे."
हे वाक्य वाचून स्तंभित झालो.
धनंजयांना या स्तोत्राचा अभ्यास करायला एकमिसळपावनको यांनी सांगणे म्हणजे बुटक्या माणसाने उंटाचा मुका घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
आधी धनंजयांनी कुठे काय लिहिले आहे ते पहावे, वाचावे, पचवावे व मगच त्यांना काहीही शिकवायला जावे अशी माझी नम्र सूचना.
नपेक्षा "डुकृञकरणे" कशात आहे तो संदर्भ व त्याचा अर्थसुद्धा त्यांनी धनंजयांना (आणी आम्हालाही) समजावून सांगावा

विसोबा खेचर's picture

25 Sep 2007 - 6:25 pm | विसोबा खेचर

>>चर्चेचा विषय हा : भारतीय विज्ञानाच्या दीर्घ योगनिद्रेचे कारण त्या काळात झालेला हिंदूधर्मातील बदल आहे, हे तुम्हाला पटते का?

मी कारणमिमांसा करू शकत नाही, परंतु वरील विधान पटते..

धन्याशेठ, आता पुढच्या भागात तुझ्याकडूनच याचा जरा साध्या आणि सोप्या शब्दात खुलासेवार विस्तार अपेक्षित आहे! :)

तात्या.

लिखाळ's picture

25 Sep 2007 - 10:51 pm | लिखाळ

धनंजय,
आपला चर्चा प्रस्ताव चांगला आहे. सुरुवातीला चर्चेचे नाव पाहून काही बरे वाटले नव्ह्ते. ते आता बदालेत हे बरे केलेत.

>> यात शंकराचार्य एकटेच नाहीत, पण त्या काळात अवघ्या हिंदू/हिंदी विचारधारेने एका टोकाचे तंत्र-विज्ञान-द्वेष्टे रूप घेतले. <<
हे खरेच तसे होते का? का असे झाले हे जाणून घ्ययला आवडेल.

>>भारतीय विज्ञानाच्या दीर्घ योगनिद्रेचे कारण त्या काळात झालेला हिंदूधर्मातील बदल आहे, हे तुम्हाला पटते का <<
या विषयी अजून जाणून घ्यायला आवडेल. सर्व प्रतिसाद वाचले. अभ्यासपूर्ण आहेत, त्यातून नवी माहिती मिळाली.

माझ्या मते बदल हा समाजाचा स्वभाव आहे. जेव्हा ज्या गोष्टिची अती निकड निर्माण होते तेंव्हा ते समाजात निपजते.
समाजात अती स्वातंत्र्य आले त्याची प्रतिक्रिया म्हणून कर्मठपणा आला.
कर्मठपणा अति झाल्यावर बुद्ध धर्मासारख्या चळवळी झाल्या.
त्यामुळे समाज संन्यस्त वृत्तीचा होवून अहिंसक होईल अशी भीति वाटल्याने बहुधा पुन्हा शंकराचार्य झाले.
देश विलासी झाला, आपापसात गणतंत्रे भांडत बसली आणि देश परतंत्र झाला.
पारतंत्र्य असह्य झाल्यने पुन्हा स्वतंत्र झाला.

हे सर्व होताना त्याचे बारिक सारिक इतर परिणाम होतात जसे वैज्ञानिक प्रगती थांबणे. मग ते परिणाम जाचक झाले की ती मुख्य निकड बनून तिकडे प्रगती होते. तुम्ही म्हणता तसे वै़ज्ञानिक प्रगतीमध्ये तो त्या वेळी योगनिद्रेत गेला असेल तर आता तो जागा होत आहे.
हे आपले माझे मत. ते योग्य आहे की नाही ते विचारवंतच जाणोत. आणि माझा प्रतिसाद आवंतर नसो ही आशा.
--लिखाळ.

मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

सर्किट's picture

25 Sep 2007 - 11:15 pm | सर्किट (not verified)

माझ्या मते (ह्याला काहीही स्पष्ह्ट पुरावे नाहीत, म्हणजे ही पिंकच आहे) यज्ञ म्हणजे एक्स्पिरिमेंट. छोट्या प्रमाणावर घरच्या घरी एक्स्पिरिमेंट केल्यावर त्यातील निरीक्षणे मोठ्या प्रमाणावर, अनेकांच्या उपस्थितीत रिपीट करता येतात का, ह्यासाठी मोठा यज्ञ करायला ऋषी राजांकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी जात असत. राज दरबारचे रेसिडेंट ऋषी त्या यज्ञांतून काय फळे मिळणार हे ऐकूनच तो प्रोजेक्ट सँक्शन करत असत. हे अगदी एनएसएफ कडून रिसर्च ग्रँट मिळवण्यासारखे आहे. ह्या यज्ञांचे मूळ स्वरूप विकृत होऊन नंतर कर्मकांडात त्याचा समावेश झाला, आणि हिंदू धर्माने विज्ञानापासून फारकत घेतली.

- (याज्ञिक) सर्किट

विकास's picture

26 Sep 2007 - 12:43 am | विकास

>>>राज दरबारचे रेसिडेंट ऋषी त्या यज्ञांतून काय फळे मिळणार हे ऐकूनच तो प्रोजेक्ट सँक्शन करत असत. हे अगदी एनएसएफ कडून रिसर्च ग्रँट मिळवण्यासारखे आहे.

हे लॉजीक आवडले आणि पटलेही.

(हे जरा अवांतर ) ज्या ॠषींची ज्या राजाशी ओळख असेल आणि त्याला त्या राजाच्या कुवतीनुसार ग्रँट मिळणार आणि त्या ॠषीचे "रिसर्च फिल्ड" वर येणार. एनएसएफ च्या बाबतीत पण तसा थोडाफार हाच प्रकार फक्त येथे राजा ऐवजी, प्रोग्रँम मॅनेजरला भेटून मते तयार करता येऊ शकतात आणि आपल्याभागातला काँग्रेसमन/सिनेटर जर (राजकीय दृष्ट्या) वजनदार असेल तर उत्तमच!
विकास

सर्किट's picture

26 Sep 2007 - 1:03 am | सर्किट (not verified)

काही काही राजे (उदा दशरथ) तर आपल्या मुलांना यज्ञाचे रक्षण करायला पाठवत. काही दैत्यांचा यज्ञ ह्या प्रकाराला विरोध असण्याचे कारण असे, की ह्या यज्ञातून मिळणारी फळे, उदा. कुठले तरी नवीन अस्त्र, ह्याचा वापर शेवटी त्या दैत्यांवरच होत असे. मला आधी यज्ञ करून अस्त्रे मिळवणे गंमतशीर वाटे, पण एवढा मोठा अग्नी, त्यात लोखंड, इतर धातू वगैरे सगळे, म्हणजेच वेगवेगळे ऍलॉय तयार करण्याची फ्याक्टरीच ती. त्यातून अस्त्रे मिळणार नाहीत तर कुठून मिळणार ?

थोडक्यात हे ऋषी म्हणजे आजच्या डी आर डी ओ ची भूमिका बजावून नवनवीन कंपोझिट्स वर संशोधन करत होते.

- सर्किट

सर्किटकाका,

तुमचे गमतीदार लिहिणे वाचतच जावेसे वाटते. पण या प्रकारचे डी आर् डी ओ यज्ञ जर करत असतील तर ते फार पूर्वी. हजार ते अडीच हजार वर्षांपूर्वीचे यज्ञ अगदी नेमक्या कर्मकांडांचे होते. १. अमुक सामग्री जमवा २. अमुक तयारी करा ३. अमुक मंत्र म्हणा ४. ...
त्या सगळ्या "पाककृती" आपल्याला बर्‍यापैकी माहीत आहेत. त्यामुळे या मधल्या काळात तरी यज्ञांचा रसायनशास्त्रात आणि धातूमिश्रणे (ऍलॉय) तयार करण्याच्या शास्त्रात फारसा उपयोग झाला नसणार.

एकदम पावरबाज यज्ञ करणार्‍या (म्हणजे असे पुराणातून आपल्याला कळते अशा) काही ऋषींच्या स्वतःच्या रचना आपल्याला वेदांत सापडतात. पण त्या रचना बहुतेक सुंदर काव्य आहेत, किंवा स्टँडर्ड यज्ञासाठीचे मंत्र.

बिग-बजेट सार्वजनिक यज्ञाचे मुख्य कारण पाऊस पाडणे "यज्ञाद् भवति पर्जन्यः..." वगैरे. किंवा युद्धाच्या तोंडावर देवांना आपल्या बाजूला वळवणे - हे लोककार्य पेक्षा राजकार्य म्हणावे. लग्नासाठी, पुत्र जन्मावा म्हणून वगैरे घरगुती यज्ञ तर एकदम लो-बजेट. त्यात फार तर लाह्या जळतानाचा वास छान येतो, आणि अमुक लाकडाच्या धुराने डोळ्यात जास्त पाणी येते, एवढेच कळणार.

पण या मध्यंतरीच्या काळातसुद्धा वैज्ञानिक विचार भारतात वाढत होता. खगोलशास्त्रात, गणितात खूप प्रगती या काळात झाली. नंतर साधारण आजच्या १००० वर्षांपूर्वी ते आतापर्यंत प्रगती बरीच कमी झाली. त्यामुळे या डीआरडीओ यज्ञाशिवाय-प्रगतीची १००० वर्षे, आणि मग प्रगती थांबण्याची १००० वर्षे याविषयी सुद्धा मते सांगा.

सर्किट's picture

26 Sep 2007 - 1:55 am | सर्किट (not verified)

अहो, मला तर गेल्या दोन दिवसांत काय घडले हेदेखील छातीठोकपणे सांगता येत नाही.

सुरुवातीलाच म्हटले आहे, की ह्याला स्पष्ट पुरावे नाहीत. त्यामुळे ही "मताची पिंक" असे समजयला अजीबात हरकत नसावी.

माझ्या मते, एकदा पुरातन ऋषींनी वेगवेगळी ऍलॉय्ज तयार करण्याच्या रेसिपी बनवल्या. त्या पुन्हा पुन्हा तशाच करून करून त्याचे रुपांतर कर्मकांडात झाले. लोखंड तापण्यासाठी जितका वेळ लागतो, तो मोजण्यासाठी एक मंत्र तयार झाला. म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायला जितका वेळ लागतो, तितका वेळ लोखंड अग्नीत ठेवून तूप टाकत राहावे, वगैरे. ते काळाच्या स्मृती आड गेले, आणि नुस्ता मंत्र राहिला, आणि तो एकशे आठ आकडा.

लग्नासाठी आणि पुत्रकामेष्टी वगैरे म्हणाल, तर ती वातावरण निर्मिती होती. आजकाल नाहीका सेक्सॉलॉजिस्ट सांगत की त्यासाठी घरात शांतता असावी वगैरे ? तसेच. काही सुगंधी द्रव्ये वगैरे यज्ञात टाकून घरात उत्तेजक वातावरण तयार व्हावे, आणि पुत्रप्राप्तीची प्रॉबेबिलिटी वाढावी असा हा विचार.

यज्ञाचा सेंट्रल पार्ट म्हणजे अग्नी. त्याचा उपयोग किती वेगवेगळ्या कारणासाठी होतो, ते बघा. त्यात काही औषधी लाकडे टाकलीत, की परिसर निर्जंतुक करण्यास उपयोग होतो. त्यात आणखी निलगिरीची वगैरे झाडे टाकलीत, की त्या धुराने ढगांत पाण्याचे थेंब तयार होतात आणि पाऊस पडतो.

आणि हो, एकदा यज्ञ संपला की त्याच वेदीवर झकास उसाचा रस उकळवून, नवसागर वगैरे टाकून पुरोहितांच्या संध्याकाळची पण सोय होते.

- सर्किट

धनंजय's picture

26 Sep 2007 - 2:23 am | धनंजय

> आणि हो, एकदा यज्ञ संपला की त्याच वेदीवर झकास
> उसाचा रस उकळवून, नवसागर वगैरे टाकून पुरोहितांच्या
> संध्याकाळची पण सोय होते.

याबाबतीत हा श्लोक वाचला आहे :
यदुदुम्बरवर्णानां घटीनां मण्डलं महत् ।
पीबेन् न गमयेत् स्वर्गं तत् किं क्रतुगतं नयेत् ? ॥
उंबराच्या रंगाच्या घड्यांचे मोठे मंडल (गुत्त्यात) प्याले तर स्वर्गाला जात नाही म्हणता तर, मग (सौत्रामणी) यज्ञात (थोडेसे) प्यालेले थोडेच स्वर्गात नेणार आहे?
सारांश जर यज्ञातले थोडेसे स्वर्गात नेते तर गुत्त्यातले मोठ्या प्रमाणातले का नाही - तर मग गुत्त्यातच जाऊ! हा श्लोक कमीतकमी २०००-२५०० वर्षे जुना आहे, खात्रीलायक.
हे बहुधा त्याकाळचे "ड्रिंकिंग साँग" होते - हे धर्मशास्त्रातले नाही!

सर्किट's picture

26 Sep 2007 - 2:26 am | सर्किट (not verified)

एकंदरीत ह्यालाही पुरावा आहे, म्हणता तर !

- सर्किट

प्रियाली's picture

26 Sep 2007 - 2:28 am | प्रियाली

हे ड्रिंकिंग साँग सापडले कुठे म्हणायचे?

चार्वाक श्टाईल वाटले.

विकास's picture

26 Sep 2007 - 3:10 am | विकास

आपण सांगीतलेल्या श्लोकास काही संदर्भ असल्यास सांगावे. कधीचा हे कदाचीत सांगता येणार नाही, पण आपण कोठे/कशात वाचला, कोणी संपादीत केलेल्या पुस्तकात आणि वर्तमानातील कालसंदर्भ.. केवळ उत्सुकता म्हणून (वाद वगैरे नाही). प्रियालींनी म्हणल्याप्रमाणे तो वाचता क्षणी चार्वाकाचा वाटला.

तसेच तो वाचल्यावर माडगुळकरांच्या एका गाण्याची आठवण झाली, ते संपूर्ण माहीत नाही पण त्याच्या पहील्या ओळी आहेत "स्वर्ग मेल्यावीना दावतात त्याला व्यसन म्हनतात".

धनंजय's picture

26 Sep 2007 - 3:29 am | धनंजय

हल्ली जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मला भाष्यच भाष्य दिसते आहे.

कुठल्या प्रकारचे श्लोक प्रमाण म्हणून मान्य नाहीत, याचे उदाहरण म्हणून तो श्लोक दिलेला आहे. महाभाष्याचा काळ अलेक्झँडरच्या नंतरचा, पण फार नंतरचा नाही असे मानतात. अलेक्झँडर हिंददेशात इ.स.पू. ३२६ ला आला. कारण भाष्यात "यवनाने श्रावस्तीला वेढा घातला" आणि "यवनाने साकेताला वेढा घातला" अशी वाक्ये कसलीतरी उदाहरणे म्हणून दिली आहेत. त्यामुळे यवन आक्रमणांची आठवण खूप ताजी असावी.

विकास's picture

26 Sep 2007 - 3:39 am | विकास

>>हल्ली जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मला भाष्यच भाष्य दिसते आहे.

तुम्ही आमच्यासारख्यांची पण उत्सुकता चाळवली आहे!

धन्यवाद!

प्रियाली's picture

26 Sep 2007 - 4:03 am | प्रियाली

यांचा अलेक्झांडरशी काय संबंध असावा? ही दोन्ही शहरे उत्तर प्रदेशातील असावी. श्रावस्ती कोठेतरी अयोध्येजवळ.

महाभाष्य पटकन बघितले - श्रावस्ती नाही.
साकेत आणि मध्यमिका शहरे.
अलेक्झँडर नाही - मेनँडर : काळही वेगळा २००-१०० इ.स.पूर्व साधारण. या "मिलिंदा"ने मथुरा, साकेत, मध्यमिका काबीज केलीत. यूपी सरकारच्या संकेतस्थळाप्रमाणे साकेतचे हे युद्ध १८२ इ.स.पू.
प्रियाली आहेत म्हणून चुकीचा संदर्भ लक्षात आला - एरव्ही एखादी चुकीची गोष्ट कोणास ठाऊक लक्षात राहिली की कधीकधी त्या चुकीतली विसंगती मुळीच लक्षात येत नाही.

प्रियाली's picture

26 Sep 2007 - 7:28 am | प्रियाली

मीही घाईत प्रतिसाद टाकला तेव्हा अलेक्झांडर नाही हे चटकन लक्षात आले पण मेनँडर (मिलिंद) त्यावेळी आठवला नाही. नंतर आठवला पण लिहायला वेळ झाला नाही. अर्थात, तोपर्यंत तुमचा प्रतिसाद आलाच. :) मला वाटते की मेनँडरच असावा. तो मथुरेपर्यंत धडक मारून गेला होता. (स्ट्राबोच्या मते अगदी पाटलीपुत्रापर्यंतही)

आपण महाभाष्यावर अधिक लिहावे, केवळ भाषेचेच नाही तर इतिहासाचे संदर्भ घेऊन लिहिले तर बहार येईल.

विकिवर शोधले आताच, त्यात पाहा काय मिळाले -

The Indian records also describe Greek attacks on Mathura, Panchala, Saketa, and Pataliputra. This is particularly the case of some mentions of the invasion by Patanjali around 150 BC, and of the Yuga Purana, which describes Indian historical events in the form of a prophecy:

"After having conquered Saketa, the country of the Panchala and the Mathuras, the Yavanas (Greeks), wicked and valiant, will reach Kusumadhvaja. The thick mud-fortifications at Pataliputra being reached, all the provinces will be in disorder, without doubt. Ultimately, a great battle will follow, with tree-like engines (siege engines)." (Gargi-Samhita, Yuga Purana chapter, No5).

विषयांतर थोडे अधिकच झाले त्याबद्दल क्षमस्व! व्याकरणमहाभाष्य कोणत्या काळात लिहिले गेले त्याचेही उत्तर मिळाले. इ.स्.पूर्व सुमारे २०० वर्षे. म्हणजे मिलिंदाशी काळ जुळतो.

सहज's picture

26 Sep 2007 - 7:41 am | सहज

>>इ.स्.पूर्व सुमारे २०० वर्षे. म्हणजे मिलिंदाशी काळ जुळतो.

आत्ता कळले की सर्कीटराव मलाच बुवा कसे सारे काही सारे कळते असे करत असतात. त्यांचा दांडगा अनुभव खरच आहे तर. ऑल हेल ग्रीक गॉड (वीथ ग्रीन कार्ड)!

मग हे कोडे उलगडा की हो मिलिंदराव का नेमका झाला अल्झायमर? ;-)

सर्किट's picture

26 Sep 2007 - 11:07 am | सर्किट (not verified)

तसेच असो.
पण खरंच.माझ्याव्यतिरीक्त इतर कुणाला माझं म्हणणं कळतं असं दिसलं की मी इथून निघीनच ;-)

- (मिनँडर) सर्किट

यनावाला's picture

27 Sep 2007 - 10:22 pm | यनावाला

शंकराचार्यांनी पुरस्कृत केले ते अद्वैत तत्त्वज्ञान.त्यांची निष्ठा संन्यासमार्गावर."ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या| जीवो ब्रह्मेव नापरः|" हे मुख्य पतिपादन.म्हणजे जे वास्तव ऐहिक आहे ते नाकारायचे. जगदाभास म्हणायचा. आणि जे काल्पनिक पारलौकिक ते सत्य मानायचे.जीवितध्येय मोक्ष. ,म्हणजे विश्वाच्या आदितत्त्वात आत्मा विलीन होणे. साराच कल्पनाविलास.जे काही करायचे ते मोक्षासाठी.यांत अधिक सुखकर जीवन,समाजाची ऐहिक प्रगती,विकास या विषयींची प्रेरणाच नाही.
विश्वाची निर्मिती कशी झाली याचे प्रमेय मांडण्यासाठी एक गृहीतक म्हणून आदितत्त्व ब्रह्म ही एक चांगली कल्पना आहे असे म्हणता येईल.पण त्या आदितत्त्वात विलीन होणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता असे मानल्या मुळे वैज्ञानिक प्रगती झाली नाही. ऐहिक उन्नती खुंटली हे सत्य आहे. म्हणून श्री.धनंजय यांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे.

विकास's picture

28 Sep 2007 - 3:35 am | विकास

>>शंकराचार्यांनी पुरस्कृत केले ते अद्वैत तत्त्वज्ञान.त्यांची निष्ठा संन्यासमार्गावर."ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या| जीवो ब्रह्मेव नापरः|" हे मुख्य पतिपादन. म्हणजे जे वास्तव ऐहिक आहे ते नाकारायचे. जगदाभास म्हणायचा. आणि जे काल्पनिक पारलौकिक ते सत्य मानायचे.जीवितध्येय मोक्ष.

यातील काही विधाने फारच अर्थाचा अनर्थ करणारी वाटताहेत. शंकराचार्यांनी अथवा एकंदरीतच हिंदू परंपरेतील (बाकीच्यांची कल्पना नाही) कुठल्याच पारमार्थीक पंडीताने केवळ संन्यासच योग्य असे म्हणल्याचे म्हणजेच केवळ संन्यासावर निष्ठा सांगीतल्याचे ऐकलेले नाही. आपल्या एकंदरीत तत्वज्ञानात धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चारी गोष्टींना महत्व आहे. जो पर्यंत अर्थ (वैभव/संपत्ती) आणि काम (डिझायर्स) यांना (म्हणजे ऐहीकता) उपभोगणे हे धर्म आणि मोक्ष या दोन मर्यादांच्यात होते तो पर्यंत माणूस चांगले आयुष्य जगू शकतो असे म्हणू शकतो.

"ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या| जीवो ब्रह्मेव नापरः|" हे पण, ब्रम्ह हे सत्य, जग हा भास पण जीव हेच ("काल्पनिक पारलौकिक" नव्हे) ब्रम्ह असे कोड्यात टाकणारे वाक्य आहे. गणिताच्या समिकरणाने याचा विचार केल्यास (अ=ब, ब=क म्हणजे अ=क) त्याचा अर्थ इतकाच होऊ शकतो की स्वतःतील ब्रम्ह ओळखा बाकी सारे मिथ्या. या विचारामुळे पुढे शंकराचार्यांना प्रच्छन्न बुद्ध असे म्हणले गेले आणि त्यांना अनेक वादांना सामोरे जावे लागले.

बाकी शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा आणि वैज्ञानीक प्रगतीचा काही संबंध आहे असे वाटत नाही हे मी आधी लिहीलेल्या प्रतिसादात आहे. शिवाय शंकराचार्यांचा प्रभाव संपूर्ण भारतावर त्याकाळात पडला असे म्हणायला जागा नाही, त्यामुळेच त्यांचे मठ जरी देशाच्या चार कोपर्‍यात स्थापीत होऊन धार्मिक कार्य करू लागले तरी पोपच्या धर्मसत्तेसारखे त्यांचे वर्चस्व कधीच प्रस्थापीत झाले नाही.

अवांतरः या संदर्भात मला कायम सोपानदेव चौधरींची "आणि आम्ही / विज्ञान योगी " ही कवीता आठवते. काही अर्थी प्रक्षोभक वाटेल अशा या कवीतेच्या शेवटच्या ओळी ह्या आजच्यापण आस्तिक-नास्तीक भारतीय समाजाला विचार करायला लावणार्‍या आहेत असे कुठेतरी वाटते:

सर्व प्रमुख शोधांचे धनी, पाश्चिमात्य विज्ञानयोगी
आम्ही? आम्ही फक्त उपभोगी
ते यंत्रकार, आम्ही दुरूस्तीकार
संशोधक, निर्माते, सारे तिर्‍हाईत
आम्ही मात्र राहीलो, फक्त गिर्‍हाईक, फक्त गिर्‍हाईक, फक्त गिर्‍हाईक...

व्यंकट's picture

29 Sep 2007 - 3:17 am | व्यंकट

म्हणजे भास नाही ; मिथ्थ्या म्हणजे जुळून आलेले. मिथ म्हणजे जुळणे. मिथक म्हणजे जुळवून सांगितलेले, खोटे असेलच असे नाही.
ब्रह्म सत्य आणि जगत असत्य असे ते वाक्य नाही. जर मी ब्रह्म, तत्वं असि आणि सो हं तर जगत असत्य असे शंकराचार्य कसे म्हणतील? ब्रह्म सत्य, तर जगत हा ब्रह्मांश असत्य कसा असेल? म्हणून ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या म्हणजे जग हे जुळून आलेले आहे, मुळात हा सगळा गोतावळा एकच (ब्रह्म) आहे असे त्यांनी म्हटले असावे.
तुकोबांनी हेच सोप्या मराठीत सांगितले आहे की आधी बीज एकले.

यनावाला's picture

29 Sep 2007 - 7:41 pm | यनावाला

हा अभंग संत तुकाराम चित्रपटातील असला तरी तो तुकोबांनी लिहिलेला नाही.ती रचना आहे शांताराम आठवले यांची.
२/' मिथ्या '(मिथ्थ्या नव्हे .असा शब्दच नाही.) या शब्दाचा अर्थ : खोटे, भ्रामक, व्यर्थ असा आहे.(गीर्वाण लघुकोश : ज.वि.ओक )
मिथ (एम वाय टी एच ) या इंग्रजी शब्दाचा अर्थ : काल्पनिक पौराणिक कहाणी, देवांची कथा असा आहे. यावरून 'मिथक' असा शब्द मराठीत, हिंदीत आणला आहे.
३/ जगन्मिथ्या याचा अर्थ : जग हे भासमान आहे, खोटे आहे, मायारूप आहे असाच आहे. एकमेवाद्वितीय ब्रह्म हेच सत्य आहे.अज्ञानामुळे नामरूपात्मक जग भासते. ब्रह्मज्ञान झाले की जग लोपते. हे अद्वैत तत्त्वज्ञान सर्वश्रुत आहे. त्यामुळे या अर्थाविषयी दुमत नसावे. या संदर्भात पुष्कळ लिहिता येईल. पण एवढे पुरे.

व्यंकट's picture

30 Sep 2007 - 12:20 am | व्यंकट

धन्यवाद. माझे बरेच गैरसमज दूर झाले.

विसोबा खेचर's picture

29 Sep 2007 - 9:55 am | विसोबा खेचर

वालावलकरशेठ,

शंकराचार्यांनी पुरस्कृत केले ते अद्वैत तत्त्वज्ञान.त्यांची निष्ठा संन्यासमार्गावर."ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या| जीवो ब्रह्मेव नापरः|" हे मुख्य पतिपादन.

एखादी मादक आव्हानत्मक स्त्री, मासळीचे विविध प्रकार असलेले जेवणाचे ताट, व सोबत ग्लेनफिडिचचे दोन पेग आणि चाखना म्हणून तळलेली कोलंबी हे जर समोर आले असते तर शंकराचार्यशेठनीदेखील "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या| जीवो ब्रह्मेव नापरः|" अश्या बाता मारल्या नसत्या असं मला वाटतं! :)

आपला,
तात्या.

व्यंकट's picture

29 Sep 2007 - 11:58 am | व्यंकट

त्यांच्या समोर आल्याची कथा आहे, साईबाबांसमोर आल्याची सुद्धा आहे. पण आत्मानंदाची धुंदी / व्यसन त्याहून स्ट्राँग आहे म्हणतात.

विसोबा खेचर's picture

2 Oct 2007 - 11:29 pm | विसोबा खेचर

पण आत्मानंदाची धुंदी / व्यसन त्याहून स्ट्राँग आहे म्हणतात.

खरं आहे! व्यसनच ते. आणि ही आत्मानंदची भुतं एकदा मानेवर बसली की उतरता उतरत नाहीत. त्यापेक्षा रात्री झोपताना मारलेले ब्लॅक डॉगचे दोन पेग निदान सकाळी उतरतात तरी आणि माणूस पुन्हा दिवसभर पुन्हा आपल्या पोटापाण्याच्या उद्योगाला लागतो! :)

तात्या.

यनावाला's picture

2 Oct 2007 - 10:17 pm | यनावाला

तात्यासाहेब,
श्री .धनंजय यांनी ज्या "भज गोविन्दम "चा उल्लेख लेखाच्या प्रारंभी केला आही त्यातील एक कडवे असे :
********************************************
नारी स्तनद्वयनाभिप्रदेशम|
दृष्ट्वा मा गा मोहावेशम |
एतन्मांसवसादि विकारम |
मनसि विचिन्तय वारंवारं |
भज गोविन्दम भज गोविन्दम | गोविन्दम भज मूढमते |
*****************************************
(आठवले तसे लिहिले आहे.एखादी चूक संभवते.)
................................................................................
(सर्वसाधारण) अर्थ : स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय.(त्यात मोह पडण्यासारखे काय आहे? इट इज जस्ट अ मॉडिफिकेशन ऑफ फ्लेश & फॅट ) असा विचार मनात आण. पुनःपुन्हा हाच विचार कर.

विसोबा खेचर's picture

2 Oct 2007 - 11:12 pm | विसोबा खेचर

.(त्यात मोह पडण्यासारखे काय आहे? इट इज जस्ट अ मॉडिफिकेशन ऑफ फ्लेश & फॅट ) असा विचार मनात आण. पुनःपुन्हा हाच विचार कर.

अरे वा रे वा! म्हणे यात मोहात पडण्यासारखे काय आहे! बोंबला तिच्यायला.... :)

सध्या संत तात्याबा महाराज हा फोटो निरखून पाहण्यात रममाण झाले आहेत! :)

आपला,
(सामान्य माणूस!) तात्या.

--

आमच्या सारखे सामान्यजन आहेत म्हणूनच शंकराचार्यांसारख्या मंडळींची चलती आहे! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2007 - 8:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतके मोठे तपस्वी शंकराचार्य म्हणताहेत -

"स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय "

पण खरे सांगू का ! च्यायला हेच आमचे ते वीक प्वॊइंट आहे. संसारी माणूस आहे, पण ट्च्च भरलेल्या स्त्रीकडे वळून वळून पाहण्याचा मोहसुद्धा आम्हाला टाळता येत नाही. तसेच स्त्रीयांना म्हणे एक नजर असते, पुरुषाची नजर काय बोलते ते समजण्याची. त्यामुळे अनेकदा आमची नजर पकडल्या जाते , मैत्रीणींचे बोलणे खाल्ले आहेत. आमची नजर चेह-यावरुन मानेकडे घरंगळायला लागली की, उजवा हात गळ्याकडे नेतांना मैत्रीणीचे काय, हे ! असे नजरेतले भाव आम्हीही टीपले आहेत. :)

शंकराचार्यांना ठाण्याच्या संगीत डान्सबारला नेला असता ना ! ( सर्व खर्च आम्ही केला असता) नाही सौदंर्याचा श्लोक बदलला असता तर नावाचा प्रा.डॊ. नाही ! :)

जगात जे जे सुंदर आहे त्याच्याकडे टक लावून पाहणारा !
प्रा.डॊ.दिलीप बिरुटे

सहज's picture

4 Oct 2007 - 9:59 am | सहज

एक आचार्य श्री. फ्रँक बरोन म्हणजे श्री. रेमंड बरोन यांचे पिताश्री (आधिक माहीतीसाठी) यांचे एक वचन आहे. स्त्री व पुरूष दोघांना लागू आहे. बघा पटतय का?

"It does not matter where you get your hunger from as long as you eat at home."

----------------------------------------------------------------------------------------
जगात जे जे सुंदर आहे त्याचा असा आस्वाद घ्या की त्या सुंदरतेला पण वाटले पाहीजे की ह्याच रसिकासाठी हे सौंर्दय आहे.

मोगा's picture

3 Feb 2016 - 10:03 am | मोगा

लग्नातून पळालेले , लग्नच न केलेले , अर्धवट संसार सोडलेले , बायकोला घेउन वनवासात गेलेले , बायकोला सोडुन वनवासात गेलेले ..... असल्या आदर्शांनीच या देशाची सांसारिक स्थिती बाद करुन ठेवली आहे.

....

स्तनात चरबी असते ... तसा मेंदुही चरबीचाच असतो. त्याचे काय करणार ?

ज्याने निसर्गाचे अनेक नियम शोधून काढले असा महान भौतिक शास्त्रज्ञ आर्किडीज याने "संप्राप्ते सन्निहिते काले " काय केले ते थोडक्यात पुढील प्रमाणे. श्री. धनंजय यांनी या चर्चेचा प्रारंभ करताना जो मुद्दा उपस्थित केला होता त्यावर यामुळे किंचित का होईना, प्रकाश पडू शकेल असे वाटते.
..संदर्भ : द वर्ल्ड ऑफ मॅथेमॅटिक्स : सं.जेम्स न्यूमन : व्हॉल्युम वन :(पेज;१८५)
(आर्किमिडीज डाईड यॅट द एज ऑफ ७५ ऍट द टाइम ऑफ फॉल ऑफ सिरॅक्यूज २१२ बी.सी.)
....आर्किमिडीज वॉज अलोन एझॅमिनिंग अ डायग्रॅम, हॅविंग फिक्स्ड हिज माइंड & आईज ऑन द ऑब्जेक्ट ऑफ हिज इन्क्वायरी. अ रोमन सोल्जर केम अपॉन हिम विथ ड्रॉन स्वोर्ड इंटेंडिंग टु किल हिम. आर्किमिडीज बिसॉट & एन्ट्रीटेड ( विनवणी केली) हिम टु वेट अ लिटल व्हाइल ,सो दॅट ही (आर्कि.) माइट नॉट लीव्ह द प्रॉब्लेम अनफिनिश्ड. द सोल्जर डिड नॉट अंडरस्टँड & स्ल्यू (तलवारीने ठार मारले ) हिम.....
आपला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा आर्किमिडीज एक भौतिक प्रश्नावर प्रकर्षाने विचार करत होता. मृत्युनंतर काय हा प्रश्न त्याला शिवला नाही. " गोविन्द !गोविन्द !! " जपाचा प्रश्नच नव्हता.

विकास's picture

15 Oct 2007 - 8:57 am | विकास

आपला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा आर्किमिडीज एक भौतिक प्रश्नावर प्रकर्षाने विचार करत होता.

माफ करा, पण हे सर्व असबंद्ध वाटले.

तसे काय भगतसिंग हा फाशी जाईपर्यंत कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचत होता. चाफेकर बंधू गीता हातात घेऊन फासावर चढले. पण त्यांचा आणि आर्कीमिडीझचा जसा काही संबंध लागत नाही, तसाच आक्रिमिडीज आणि शंकराचार्यांचा लागत नाही. एकाची आवड भौतीक होती म्हणून त्याने त्याला कवटाळले तर दुसर्‍याची पारमार्थीक/तत्वज्ञानाची म्हणून त्यांनी त्याला कवटाळले. शिवाय सहज यांच्या चर्चेतील माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे :

शंकराचार्य आपल्या शिष्याबरोबर काशीमधे हिंडत असताना त्यांना एक संस्कृतचा म्हातारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून कर्मठपणे केवळ व्याकरणाची घोकमपट्टी करवून घेताना दिसला. ते पाहून त्यांना सुचलेले हे काव्य आहे. त्याला स्त्रोत्र वगैरे म्हणून कोणी त्याच्या सारखे वागण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. कदाचीत पाचव्या वर्षीच पारमार्थीक ओढ लागलेल्या या व्यक्तीस संस्कॄत कधी कोणी शिकवले होते का ते माहीत नाही पण अवगत चांगलेच होते हे नक्की. त्या अनुभवावरून आणि पिंड कवीचा असल्यामुळे ते लिहीले गेले असावे. एम एस सुब्बालक्ष्मीमुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना ते आवडले असावे.

जेंव्हा आपल्याकडे तत्वज्ञान जागृत होते (शंकाराचार्यांच्या आधी) तेंव्हापण वैज्ञानीक प्रगती होती. ती नंतर निद्रीस्त झाली ह्याचा शंकराचार्यांना दोष देऊन समस्त भारतीय तामसी वृत्तीला त्यातून मुक्त करणे हे योग्य वाटत नाही... त्यात आर्कीमिडीज ने अमुक केले आणि शंकराचारर्यांनी तमुक म्हणजे एक घोडा म्हणून दुसरा गाढव म्हणण्यातला प्रकार झाला, असे वाटले. एखाद्या डॉक्टरचे ज्ञान आपण एखाद्या अभियंताशी अथवा अर्थशास्त्रज्ञाशी अथवा कुशल व्यवस्थापकाशी लावावे का? आणि या सर्वांचा भौतीक प्रगतीसाठी फायदा होऊ शकतो तसा लेखक/कवी/विचारवंताचा होत नाही म्हणून त्यांना कमी लेखाल का?

सहज's picture

15 Oct 2007 - 9:06 am | सहज

>> एकाची आवड भौतीक होती म्हणून त्याने त्याला कवटाळले तर दुसर्‍याची पारमार्थीक/तत्वज्ञानाची म्हणून त्यांनी त्याला कवटाळले.

पटले.

एखादा दारूडा शेवटच्या दिवशी देखील दारु पितानाच मरेल.

("स्वातंत्र्य"शब्दाची ची व्याख्या माहीत नाही पण) स्वतंत्र मन / मेंदू असल्याने प्रत्येक मनुष्य कुठल्याही गोष्टीचा आपापल्यापरीने अर्थ लावतो व जे योग्य वाटेल तेच करतो.

आता मात्र सगळाच ऍज युज्वल शब्दोछल वाटायला लागला आहे.

यनावाला's picture

16 Oct 2007 - 1:49 pm | यनावाला

इथे आद्यशंकराचार्यांच्या विचारांचा तसेच अर्किमिडीजच्या विचारांचा लोकांवर काय परिणाम झाला असावा ते पहायचे आहे.
आचार्यांनी जरी वेदान्त तत्त्वज्ञानच मांडले असले तरी त्यांनी मायावादाचे अगदी सोप्या परिणामकारक शब्दांत,तर्कशुद्ध पद्धतीने आणि प्रभावी पणे प्रतिपादन केले. "ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या | जीवो ब्रह्मैव नापरः |" ही वचने बहुधा त्यांचीच असावी. "असार जीवित केवळ माया " हा विचार शंकराचार्यांच्या काळी पसरला नसला तरी नंतर कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या माध्यमातून तो जनसामान्यांं पर्यंत पोचला. आपल्या अध्यात्म तत्त्वज्ञानावर शंकराचार्यांचा फार मोठा प्रभाव आहे. किंबहुना अद्वैत तत्त्वज्ञान आणि मायावाद यांचे प्रवर्तक तेच मानले जातात.लोकांनाही मायावाद रुचला. कारण त्यामुळे काम करणे आणि जबाबदारी घेणे या गोष्टी टाळता आल्या. हे जग आभासात्मक असल्याने त्यात सुधारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. "अगा जे घडलेचि नाही, त्याची वर्ता पुससी काई?" असे सामान्यजनही म्हणू लागले.जे काही करायचे ते मोक्षासाठी.कारण अंतिम सत्य म्हणजे परब्रह्म.त्याच्याशी एकरूपता हेच जीवनाचे इतिकर्तव्य. या विचारामुळे लोकांनी भौतिक जगाकडे पाठ फिरवली.त्यासंबंधीचा विचारच सोडला. आणि कल्पनिक पारलौकिकाच्या मागे लागले. त्यामुळे आपली भौतिक प्रगती खुंटली.
.."संप्राप्ते सन्निहते काले " आर्किमिडीज ने जे केले त्याचा परिणाम लोकांवर काय झाला असावा ते उघडच आहे. रोमन सैनिकाने जरी त्याला मारले असले तरी ग्रीकां प्रमाणे रोमनांवरही आर्किमिडीजच्या विचारांचा प्रभाव पडला असणार. म्हणून संपूर्ण युरोपभर वैज्ञानिक प्रगती झपाट्याने झाली. हा दृष्टीकोनांतील भेदांचा परिणाम आहे.

हे सगळे वाचुन मला एकाच वेळी आपण सन्यस्त, उपभोगवादी ,शास्त्रज्ञ , हतबुद्ध बुद्ध , ग्रीक , आर्किमीडीज ला दरबारत बोलावायला गेलेला दरबारी ,जगाकडे पाठ फिरवलेला हिप्पी , स्वतःला पाहणारा प्रेक्षक , स्वतःला ऐकणारा श्रावक ,याज्ञवल्क्यांचा शिष्य , राजा भोजा कडे गेलेला गंगु तेली , स्वतःची पाठ खाजवायला काहीच न मिळालेला विश्व चिंतक ,अर्जुनाचा पाञ्चजन्य , कंसाच्या दरबारातला कुवलयपीड हत्ती , नचिकेत यमलोकात गेला असता त्याच्या ऐवजी विट्टी दांडुच्याटीम मध्ये घेतला गेलेला भिडु , हरिस्चन्द्राला विकत घेणार्‍या डोम्बाचे हातावर पाणी टाकणारा हरकाम्या , टिळक किती सुपारी खातात याची गायकवाड वाड्याबाहेर चर्चा करणारा पुणेकरज्येष्ठ नागरीक , बेलबागेत प्रवचनत वाती वळायला चांगली जागा मिळावी म्हणुन लवकर गेलेल्या आजीबाई आहोत असे वाटत आहे.....अवस्था थोडीशी प्रद्युम्नासारखी उन्मनी , स्थितप्रज्ञा सारखी आणि निव्रुत्ती वेतनात नुकताच अरीयर जाहीर करुनही न मिळालेला म्युनसीपल हापिसर अशी एकसमयाच्छेदेकरुन झालेली आहे
काही जुने जाणते लोक याला सोमवल्ली किंवा सोमप्रिया मुळे आलेली अवस्था असे म्हणतात
यावर उतारा आम्ही ( बघा बघा भाषा सुद्धा कशी बदलत चाल्येय) शोधत आहोत.
तोपर्यंत उतार्याच्या शोधात.........याच अवस्थेत असलेला विजुभाऊ

"स्वतःची पाठ खाजवायला काहीच न मिळालेला विश्व चिंतक"
काही लोक जानव्यानेसुद्धा पाठ खाजवतात.आमचे एक शेजारी असे करायचे...चाळीतले सगळे जण त्याना "खाजानवे" म्हाणायचे.
आठवुन ह ह पु वा

शुचि's picture

19 May 2010 - 1:57 am | शुचि

विज्ञान आदि गोष्टींचा पाठ्पुरावा करायला, व्यासंग करायला, माणसाचा धर्म शाबूत हवा. त्यावरच जर अतिक्रमण होत असेल, मनसिक गुलामगिरीचं जोखड घातलं जात असेल तर कुठलं विज्ञान आणि कुठलं व्याकरण? पदोपदी हिंदू धर्मावर अन्य धर्मीय अतिक्रमण करतात तेव्हा आदि शंकराचार्यांसारख्या तेजस्वी विभूतीचा अवतार ही अतिशय आवश्यक बाब होऊन बसते.
त्यांनी हिंदू धर्म टिकवला म्हणून आहे तेवढी तरी प्रगती होऊ शकली. शंकराचार्यांच्या "भज गोविंदम" मुळे वैज्ञानिक दृष्टीला खीळ बसली नसून, मूलभूत गोष्टी - धर्म यंच रक्षण झालं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

धनंजय's picture

19 May 2010 - 2:12 am | धनंजय

थोडा फरक :

विज्ञान, व्याकरण, धर्म आदि गोष्टींचा पाठ्पुरावा करायला, व्यासंग करायला, माणसाचे स्वातंत्र्य शाबूत हवे. त्यावरच जर अतिक्रमण होत असेल, मनसिक गुलामगिरीचं जोखड घातलं जात असेल तर कुठलं विज्ञान आणि कुठलं व्याकरण आणि कुठला धर्म?

असे वाक्य असते तर समजले असते, आणि सहमत असतो. परंतु ज्या प्रकारे वाक्य लिहिलेले आहे, त्यावरून प्रतिक्रियेचा पुढचा भाग समजला नाही.

धर्मांतर केलेल्या स्वतंत्र लोकांची प्रगती होते, आणि धर्म कायम राखलेल्या स्वतंत्र लोकांचीही प्रगती होते. अस्वतंत्र असल्यास धर्मांतरितांचीही अधोगती होते, आणि धर्माधिष्ठितांचीही. अर्थात येथे मोठाच प्रश्न पडतो "प्रगती म्हणजे काय?" शुचि यांच्या मते "प्रगती"चा अर्थ काय वाटतो? आणि शंकराचार्यांनी कुठल्या परधर्माविरुद्ध हिंदू धर्माचे रक्षण केले? त्यांचे बहुतेक वादविवाद हिंदूधर्मातील अन्य पंथांशीच होते. (आणि आजकाल काही लोक म्हणतात की बौद्ध धर्मही हिंदू धर्माचाच एक पंथ आहे - विशेष करून आक्रमण करून आलेला धर्म नाही.) यावेगळ्या कुठल्या धर्मापासून हिंदूधर्माला शंकराचार्यांनी वाचवलेले शिचि यांना ठाऊक आहे काय?

शंकराचार्यांच्या काळाच्या आधी शक-हूण वगैरे जे लोक भारतावर चालून आले, ते इथे राहिल्यास वैदिक/बौद्धच झाले. (मिलिंद, कनिष्क वगैरे)
शंकराचार्यांच्या काळानंतर आलेले आक्रमक सम्राट मात्र हिंदू/बौद्ध झाले नाहीत, भारतातील काही लोकांना मात्र धर्मांतरित केले. मग शंकराचार्यांच्या शिकवणीने धर्मांतर वाचवले नाही, तर उलट वाढवलेच!

शुचि's picture

19 May 2010 - 2:21 am | शुचि

मी जे वाचलं त्यावरून -
Shri Adi Shankaracharya or the first Shankara with his remarkable reinterpretations of Hindu scriptures, especially on Upanishads or Vedanta, had a profound influence on the growth of Hinduism at a time when chaos, superstition and bigotry was rampant. Shankara advocated the greatness of the Vedas and was the most famous Advaita philosopher who restored the Vedic Dharma and Advaita Vedanta to its pristine purity and glory.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

वरील इंग्रजी परिच्छेदाचा परचक्र, परधर्मीयांचे आक्रमण, वगैरे मुद्द्यांशी संबंध कळला नाही.

had a profound influence on ... Hinduism
याबाबत सहमत. कदाचित growth शब्द समजलेला नाही, पण "कालक्रमण" या अर्थी चालेल.

पण chaos (अंदाधुंद), superstition (अंधश्रद्धा) and bigotry (पंथीय दु:स्वास) शंकराचार्यानंतर कमी झाली ती कुठली? काही उदाहरणे देता येतील का?

शंकराचार्यांच्या आधी नेमकी कुठली अंदाधुंद होती, जी त्यांच्या शिकवणीनंतर नव्हती? आधी कोणती अंधश्रद्धा होती, जी त्यांच्यानंतर नव्हती? आधी कोणता पंथीय दु:स्वास होता जो त्यांच्यानंतर नव्हता?

शुचि's picture

19 May 2010 - 2:36 am | शुचि

परधर्मीयांच आक्रमण माझी चूक झाली. ( I read between the lines)
उदाहरणं मला तरी माहीत नाहीत.

पण एक वाचलं की अनेक परस्परांत भांडणारी राज्य होती. शंकराचार्यांनी ४ मठ स्थापन केले ज्यानी मनोबळ तसच ऐक्य वाढीस लागलं असावं.
While Shankaracharya criticized Buddhism in its decayed form, he assimilated many tenets of Buddhism cleverly, like that of nirvana (void). It was Shankaracharya who was responsible to absorb Buddha into Hinduism and recognize Buddha as an avatar (incarnation) of God !
बुद्धीझम ही हिंदुत्वाची शाखा म्हणून प्रस्थापित करण्यातही त्यांचा हात दिसतो.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अत्यंत दर्जेदार चर्चा एकाहुन एक प्रतिसाद
मिपा वैभव

साहना's picture

3 Feb 2016 - 1:51 am | साहना

अगदी १९४७ पर्यंत भारत कुठल्याही क्षेत्रांत मागे नव्हता. कोलकाता विद्यापीठ सारख्या विद्यापीठातून रमनना नोबेल भेटले होते. १९४० साली प्रायवेट कंपन्या विमाने बनवत होत्या इत्यादी इत्यादी. पारतंत्र्य जरी असले आणि हिंदू धर्म संकुचित जरी वाटला तर आंबेडकर सारखा गुणी मुलगा १००% निर्धन असून सुद्धा कसा तरी इंग्लंड अमेरिकेत जावून शिकला होता.

भारताची गरिबी आणि अधोगती हि १९४७ सालापासून जास्त वेगाने सुरु झाली. सर्व जग अत्याधुंक होत असताना आमचे मूर्ख लोक मात्र चरखा धारी आणि खादी धारी ब्रिटीश एजंट लोकांच्या नादाला लागली होती. गांधी नेहरू स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणत असोत पण प्रत्यक्षांत त्यांची लढाई गोर्या साहेबा कडून सत्तेची दोरी आपल्या हातात घेण्याची लढाई होती. देशातीन बहुतेक कायदे ब्रिटीश लोकांनी आम्हा लोकांना खितपत आणि असहाय्य बनवण्या साठी केले होते तेच चालू आहेत. ह्यातून नवीन ते काय येणार ?

व्ययैक्तिक स्वातंत्र्य हे समाजाच्या प्रगतीचे मूळ कारण आहे. जेंव्हा प्रत्येक माणसाला आपले आयुष्य स्वताच्या विचारांनी जगण्याचे स्वातंत्र्य असते तेंव्हा १०० माणसात एखादा माणूस एक नवीन दिशा दाखवतो. पण आपले कायदेच असे आहेत कि व्यक्ती स्वातंत्र्य हे आम्हाला शिवी घातल्या सारखे वाटते. सर्व शिक्षण व्यवस्था सरकारी ताब्यांत असल्याने एकाच प्रकारचे गाढव ह्या व्यवस्थेतून बाहेर येतात.

तर्राट जोकर's picture

3 Feb 2016 - 2:12 am | तर्राट जोकर

बघा बरं, एवढं झालं तरीही भागवतसाहेब म्हणतात की व्यक्तीहित बाजुला ठेवून आधी राष्ट्रहित बघितले पाहिजे. ते चर्खा-धारी-खादी-एजंट आणि ह्या लोकांच्या बोलण्यात काहीच फरक नाही. आता काय करावे बरे?

मारवा's picture

3 Feb 2016 - 8:22 am | मारवा


पारतंत्र्य जरी असले आणि हिंदू धर्म संकुचित जरी वाटला तर आंबेडकर सारखा गुणी मुलगा १००% निर्धन असून सुद्धा कसा तरी इंग्लंड अमेरिकेत जावून शिकला होता.

स्वधर्म's picture

4 Feb 2016 - 7:13 pm | स्वधर्म

सहमत

प्रतिसाद आवडला. यावरून माझ्या एका आवडत्या कवितेचे कडवे आठवले -

'फुल मेनी अ फ्लॉवर इज बॉर्न टू ब्लश अनसीन
अ‍ॅण्ड वेस्ट्स इट्स फ्रॅग्रन्स ओव्हर डेझर्ट बेअर

फुल मेनी अ जेम्स ऑफ प्योरेस्ट रेज सिरीन
द डार्क अनफॅदम्ड केव्हज ऑफ ओशन बेअर!'